मराठी: Open Bible Stories
1. सृष्टी
अशा प्रकारे सर्व गोष्टींची सुरुवात झाली. देवाने सर्व जग व त्यातील सर्व वस्तु सहा दिवसामध्ये बनविल्या. पृथ्वीची निर्मिती केल्यानंतर ती तशीच काळोखी व रिकामी होती, व तिच्यावर काहीच नव्हते. परंतु देवाचा आत्मा तेथे जलावर (पाण्यावर) होता.
मग देव बोलला, “प्रकाश होवो! आणि प्रकाश झाला. देवाने पाहिले की प्रकाश चांगला आहे आणि त्याने त्यास “दिवस म्हटले.” देवाने त्यास अंधारापासून वेगळे केले व अंधारास “रात्र” म्हटले. देवाने सृष्टीच्या पहिल्या दिवशी प्रकाश बनविला.
उत्पत्तीच्या दुसऱ्या दिवशी, देव बोलला आणि पृथ्वीच्या वरती आकाश बनविले. त्याने वरील व खालील जलाशयास वेगळे करत आकाश बनविले.
तिसऱ्या दिवशी, देव बोलला आणि पाण्यापासून कोरडी भूमि वेगळी केली. त्याने कोरडया भूमिस “पृथ्वी” व पाण्यास “समुद्र” म्हटले. देवाने पाहिले की त्याने जे कांही निर्माण केले ते चांगले आहे.
मग देव बोलला, “पृथ्वीवर वेगवेगळया प्रकारची झाडे तयार होवोत.” आणि तसेच झाले. देवाने पाहिले की त्याने जे कांही निर्माण केले ते हे चांगले आहे.
सृष्टीच्या चौथ्या दिवशी, देवाने आपल्या शब्दाद्वारे सूर्य, चंद्र व तारे बनविले. देवाने त्यांना पृथ्वीवर प्रकाश देण्यासाठी व दिवस रात्र, ॠतु व वर्षे दर्शविण्यासाठी बनविले. देवाने पाहिले की हे त्याने निर्माण केलेले सर्व चांगले आहे.
पाचव्या दिवशी, देवाने जलचर प्राणी व पक्षी बनविले. देवाने पाहिले की हे चांगले आहे आणि त्याने त्यांना आशीर्वाद दिला.
उत्पत्तीच्या सहाव्या दिवशी, देव बोलला,“पृथ्वीवर वस्ती करणारे प्राणी तयार होवोत!” आणि देवबाप बोलल्याप्रमाणेच सर्व काही झाले. अशा प्रकारे काही ग्रामपशु, जमीनीवर रांगणारे व कांही वन्यपशु निर्माण झाले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य आपण करू. त्यांना पृथ्वीवर व सर्व प्राण्यांवर सत्ता चालवता येईल.”
मग देवाने मातीपासून मनुष्य निर्माण केला व त्यामध्ये जीवनी श्वास फुंकला. हया मनुष्याला आदाम हे नाव देण्यात आले. देवाने आदामाला राहण्यासाठी एक बाग निर्माण केली व त्याची काळजी घेण्यासाठी त्याला तेथे ठेवले.
बागेच्या मध्यभागी, देवाने दोन खास झाडे लावली-- जीवनाचे झाड व बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणारे झाड. देवाने आदामास सांगितले की त्याने बागेमधून कुठल्याही झाडाचे फळ खावे, फक्त बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडास फळ खाऊ नये. जर त्याने त्या झाडाचे फळ खाल्ले, तर तो निश्चित मरेल.
मग देव बोलला, “मनुष्य एकटा असणे हे बरे नाही. परंतु प्राण्यांमध्ये आदामासाठी योग्य जोडीदार मिळाला नाही.
मग देवाने आदामाला गाढ अशी निद्रा लागू दिली. मग देवाने आदामाच्या एका फासळीपासून एक स्त्री तयार करुन तिला आदामासमोर आणले.
आदामाने तिच्याकडे पाहून म्हटले, “शेवटी मिळाली! ही तर माइयासारखीच आहे! तिला ‘नारी’ म्हणावे कारण, ‘ ती नरापासून बनविली आहे.” आणि म्हणूनच पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या पत्नीशी जडून राहतो
देवाने आपल्या प्रतिरूपाचे स्त्री पुरुष बनवले. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, “तुम्हाला पुष्कळ मुलेमुली व नातवंडे होवोत व पृथ्वी भरून टाका !” देवाने पाहिले की सर्व काही चांगले आहे, व त्या सर्वाविषयी तो आनंदित झाला. हे सर्व उत्पत्तीच्या सहाव्या दिवशी, घडले
सातव्या दिवशी काम पूर्ण झालेले होते. मग आपल्या कामापासून त्या दिवशी देवाने विश्रांती घेतली. देवाने सातव्या दिवसाला आशीर्वादित करुन पवित्र ठरविले कारण त्या दिवशी त्याने आपल्या कामापासून विश्रांती घेतली. अशा प्रकारे जग व त्यातील सर्व काही देवाने निर्माण केले.
बायबल कथा: उत्पति 1-2
2. पापाचा जगामध्ये प्रवेश
देवाने बनविलेल्या सुंदर बागेमध्ये आदाम व त्याची बायको ही दोघे खूप आनंदीत होते. ती दोघेही नग्न होती, पण त्यांना संकोच वाटत नव्हता, कारण त्यावेळी जगामध्ये पाप नव्हते. ती दोघे नेहमी बागेमध्ये देवाबरोबर फिरत असत व देवाशी बोलत असत.
परंतु त्या बागेमध्ये एक धूर्त साप होता. तो स्त्रीस म्हणाला, “काय तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले हे खरे काय ?
स्त्रीने उत्तर दिले, “बागेतील कुठल्याही झाडाचे फळ खाण्याची आम्हाला मोकळीक आहे फक्त बऱ्यावाईटाचे ज्ञान करुन देणारे फळ खाण्यास मनाई आहे. देव बोलला, ‘जर तुम्ही खाल किंवा त्यास स्पर्शही कराल, तर मराल.”
सापाने स्त्रीस म्हटले, “हे खोटे आहे ! तुम्ही खरोखर मरणार नाही. देवाला ठाऊक आहे की हे फळ खाल्ल्यानंतर, तुम्हास त्याच्या प्रमाणेच बऱ्यावाईटाचे ज्ञान होईल.”
स्त्रीने पाहिले की ते फळ खायला चांगले व दिसायला मनोहर आहे. तिला शहाणेसुदधा व्हायचे होते, म्हणुन तिने कांही फळे घेतली व खाल्ली. मग तिने आपल्या नवऱ्यास कांही दिली, तो तिच्याजवळ होता, व त्याने सुदधा ती खाल्ली.
अचानक, त्यांची डोळे उघडले व ते नग्न आहेत ते त्यांना कळले. मग त्यांनी झाडाची पाने शिवून आपणाला झाकण्यासाठी कटिवेष्टने(कपडे) तयार केली.
मग आदाम व त्याची बायको यांनी देवबाप बागेत आल्याचा आवाज ऐकला." ती दोघेही देवापासून लपली. मग देव आदामास म्हणाला, “तु कोठे आहेस ? आदामाने उत्तर दिले, “बागेत चालण्याचा तुझा आवाज ऐकला, व मी घाबरलो, कारण मी नग्न आहे. म्हणून मी लपलो.”
मग देवाने विचारले,” तु नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? “मी मना केलेले फळ तू खाल्ले आहेस काय ? आदामाने उत्तर दिले, “तू मला ही स्त्री दिली, आणि तिने हे फळ मला दिले. मग देव स्त्रीस बोलला, “तू हे काय केलेसे ? स्त्रीने उत्तर दिले, ” सापाने मला फसविले.”
देव सर्पास बोलला, “तू शापीत झाला आहेस ! तू आपल्या पोटाने चालशील आणि माती खाशील. तू व स्त्री यामध्ये वैर स्थापीत करीन व तुइया व स्त्रीच्या संततीमध्येही मी वैर स्थापीत करीन. स्त्रीचे संतान तुझे डोके ठेचील व तु त्याची टाच फोडशिल.”
मग देव स्त्रीस बोलला, “तु मोठया कष्टाने मुले प्रसवशील असे मी करीन. तरीही तुझी ओढ, तुझ्या नवऱ्याकडे राहील, व तो तुझ्यावर स्वामित्व चालविल.”
देव मनुष्यास म्हणाला, “ तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस व माझी आज्ञा मोडलीस. म्हणून जमिन शापित झाली आहे, आता तूला कष्ट करुनच अन्न मिळेल. तू मरशील, आणि तुझे शरीर मातीस मिळेल.” आदामाने त्याच्या बायकोस हव्वा हे नाव दिले याचा अर्थ “जन्मदात्री कारण तिच्याद्वारेच सर्व माणसे जन्मास आली. मग देवाने आदाम व हव्वा यांना चर्मवस्त्रे करुन घातली.
मग देव बोलला, “आता मनुष्यप्राणी आपणासारखाच झाला आहे. त्याला बऱ्यावाईटाचे ज्ञान झालेले आहे, त्यांना जीवनाच्या झाडाचे फळ खाऊ देऊन सर्वकाळ जगू देऊ नये.” म्हणून देवाने आदाम व हव्वा यांना सुंदर बागेतून घालवून दिले. देवाने त्या बागेभोवती सामर्थ्यशाली देवदूतांचा पहारा ठेवला, की कोणी त्या झाडाचे फळ खाऊ नये.
बायबल कथा: उत्पति 3
3. जल प्रलय
बऱ्याच वर्षानंतर, पृथ्वीवर खूप लोकवस्ती वाढली. लोक खूपच दुष्ट व हिंसाचारी होत गेले. ते एवढे वाईट झाले की देवाने ठरविले की त्यांचा जलप्रलयाने नाश करावा.
परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. पृथ्वीवरील दुष्ट लोकांमध्ये राहणारा हा एक न्यायी पुरुष होता. देव एक मोठा पूर पाठवणार होता त्या जल प्रलयाविषयी देवाने नोहाला सांगितले. त्याने नोहाला एक प्रचंड तारू (जहाज) बनविण्यास सांगितले.
देवाने नोहाला 140 मीटर लांब, 23मीटर रुंद, व 13.5 मीटर उंचीचे तारू तयार करण्यास सांगितले. त्याने नोहास त्यामध्ये तीन मजले, पुष्कळश्या खोल्या, छत, व खिडकी बनविण्यास सांगितले. त्या तारवामध्ये नोहा, त्याचे कुटुंब, आणि पृथ्वीवरील प्रत्येक जातीचे पशु प्रलय समयी सुरक्षित राहाणार होते.
नोहाने देवाची आज्ञा पाळली. त्याने आणि त्याच्या तिन्ही मुलांनी देवाने सांगितल्याप्रमाणे तारू बांधले. हे जहाज बनविण्यासाठी कित्येक वर्षे लागली, कारण ते खूप मोठे होते. नोहाने लोकांना प्रलयाविषयी सांगितले व देवाकडे वळण्यास सांगितले पण कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही.
देवाने नोहा व त्याच्या कुटुंबियांसाठी व प्राण्यांसाठी पुष्कळसे अन्नधान्य साठविण्यास सांगितले. जहाज तयार झाल्यानंतर देवाने नोहा, त्याची बायको, त्याची मुले व सुना यांना तारवामध्ये जाण्यास सांगितले एकूण आठ जण होते.
देवाने नोहाकडे प्रत्येक प्राण्याचे व पक्षाचे नर व मादी पाठविले, अशासाठी की त्यांनी तारवात जावे व प्रलयापासून त्यांस संरक्षण मिळावे. देवाने प्रत्येक जातीच्या प्राण्याचे सात नर व सात मादी देखील पाठविले त्यांचा उपयोग अर्पण करण्यासाठी होणार होता. त्या सर्वांनी तारवात प्रवेश केल्यानंतर देवाने स्वतः तारवाचा दरवाजा बंद केला.
आणि मग पाऊस सुरु झाला. पाऊस, पाऊस आणि पाऊस. चाळीस दिवस व चाळीस रात्र सतत पाऊस पडला. पृथ्वीखालील पाण्याचे उगम सुदधा मोकळे झाले व त्यातून जोरात पाणी वाहू लागले. सर्व पृथ्वी पाण्याने व्यापून टाकली. सर्व पर्वतही बुडाले.
तारवातील लोक व प्राणी सोडून, तारवाच्या बाहेर जमिनीवर असलेले सर्व काही प्रलयामध्ये मरून गेले. तारु पाण्यावर तरंगत राहिले व आतील सर्वजण बुडण्यापासून सुरक्षित होते.
पाऊस थांबल्यानंतर, तारु पाच महिने पाण्यावर तरंगत होते, व त्या अवधित पाणी ओसरत राहिले. मग एके दिवशी तारु एका पर्वतावर टेकले, परंतु संपूर्ण जग अजूनही पाण्याखालीच होते. आणखी तीन महिन्यानंतर पर्वताचे माथे दिसू लागले.
त्यानंतर आणखी चाळीस दिवसांनी नोहाने एक कावळा पाणी सुकले की नाही हे पाहाण्यास बाहेर सोडला. तो कावळा सुकी जमीन मिळावी म्हणुन इकडेतिकडे फिरत राहिला पण त्याला कोरडी जमीन मिळाली नाही.
नंतर नोहाने एक कबूतर बाहेर सोडले. परंतु त्यालाही कोरडी जमीन न मिळाल्याने ते नोहाकडे परत आले. एका आठवड्याने त्याने पुन्हा एक कबुतर बाहेर सोडले व ते आपल्या चोचीत जैतुनाची फांदी घेऊन आल! पाणी ओसरत होते, आणि वनस्पती वाढू लागल्या होत्या!
नोहाने आणखी एक आठवडा वाट पाहून त्या कबूतरास तिसऱ्यांदा पाठविले. यावेळी, त्याला विसावण्यास ठिकाण सापडले व ते माघारी आले नाही. पाणी सुकत चालले होते!
दोन महिन्यानंतर देव नोहास म्हणाला, “ तु व तुझे कुटुंब आता तारवाबाहेर येऊ शकता. तुम्हाला पुष्कळ मुलेमुली व नातवंडे होवोत व पृथ्वी भरून टाका.” मग नोहा व त्याचे कुटुंब तारवाबाहेर आले.
नोहा तारवाबाहेर आल्यानंतर,त्याने वेदी बांधली व अर्पणासाठी वापरल्या जाणा-या प्राण्यांपैकी प्रत्येक प्रकारातुन काही प्राण्यांचे देवाला होमार्पण केले. देव नोहाच्या होमार्पणाने संतुष्ट झाला व त्याला व त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद दिला.
देव बोलला, “मी वचन देतो येथूने पुढे मानवाच्या दुष्टाईमुळे भूमीला कधीही शाप देणार नाही, व पाण्याने जगाचा नाश करणार नाही, कारण मानव बाळपणापासुन पापी असतात.”
मग देवाने पहिल्यांदा मेघधनुष्य बनवला व नोहा बरोबर करार केला. मेघधनुष्य जेव्हाजेव्हा आकाशात दिसते, तेव्हा तेव्हा देवाला मानवाबरोबर केलेल्या कराराची आठवण होते व त्याच्या लोकांनाही आठवण होते.
बायबल कथा :// उत्पति 6-8//
4. देवाचा आब्राहामाशी करार
महापुरानंतर अनेक वर्षांनी, जगामध्ये पुन्हा लोक वाढले, व सर्वांची एकच भाषा होती. देवाने सांगितल्याप्रमाणे पृथ्वी व्यापून न टाकता, ते एकत्र जमले व त्यानी एक शहर बांधले.
ते खूप गर्विष्ठ होत गेले, व देव काय बोलला याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी स्वर्गापर्यंत पोहोचेल असा एक उंच बुरुज सुद्धा बांधण्यास सुरुवात केली. देव बोलला अशा प्रकारे दुष्टाई करण्यासाठी ते एकत्र काम करतील, तर ते अजून अधिक दुष्ट कृत्ये करतील.
मग देवाने त्यांच्या भाषेमध्ये गोंधळ निर्माण केला व अनेक भाषा निर्माण केल्या व अशा प्रकारे त्यांना सर्व जगात पांगवले. जे शहर त्यांनी बनवण्यास घेतले त्यास बाबेल, म्हणजे “गोंधळ” असे म्हटले आहे.
शेकडो वर्षानंतर, देव अब्राम नावाच्या मनुष्याबरोबर बोलला. देव त्यास बोलला, “तू आपला देश व आपल्या नातेवाईकांस सोडून मी दाखविल त्या देशात जा. मी तुला आशीर्वाद देईन व तुझ्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुझे नाव मोठे करीन. तुला जे आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन व तुला जे शाप देतील त्यांना मी शाप देईन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादीत होतील.
अब्रामने देवाच्या आज्ञेचे पालन केले. त्याने आपली पत्नी साराय, व सर्व नोकरचाकरासहीत मिळवलेली सर्व मालमत्ता घेऊन अब्राम देवाने दाखविलेल्या कनान देशात जायला निघाला.
कनान देशात आल्यानंतर देव अब्रामास म्हणाला, “तु तुझ्या आजूबाजूला बघ. हा देश जो तू पाहातोस मी तुला व तुझ्या संतानांना वतन म्हणुन देईन. मग आब्राम तेथे वस्ती करुन राहिला.
एके दिवशी, अब्राम परात्पर देवाचा याजक मलकीसदेकास भेटतो. मलकीसदेकाने आब्रामास आशीर्वाद दिला व म्हणाला. “आकाश आणि पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव अब्रामाला आशीर्वाद देवो.” मग अब्रामाने मलकीसदेकाला आपल्या सर्व गोष्टींचा दहावा भाग दिला.
पुष्कळवर्षे गेली, पण अब्राम व साराय यांना अद्याप मुलगा नव्हता. देवाने अब्रामाला पुन्हा दर्शन देऊन म्हटले की त्याला पुत्र होईल व त्याची संतती आकाशातील ताऱ्यांप्रमाणे होईल. अब्रामाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. देवावर ठेवलेल्या विश्वासामुळे देवाने अब्रामाला नितिमान ठरवले.
मग देव अब्रामाबरोबर करार करतो. करार हा दोन व्यक्तीमध्ये किंवा दोन पक्षांमध्ये केला जातो. देव बोलला, “तुझ्या पोटचाच तुला पुत्र होईल. तुझ्या संतानाला मी कनान देश देईल.” परंतु अद्याप अब्रामास पुत्र झाला नव्हता
बायबल कथा:// उत्पति 11-15//
5. अभिवचनानुसार झालेला पुत्र
अब्राम व साराय कनान देशात येऊन दहा वर्षे झाली, तरीही त्यांना मुल झाले नव्हते. म्हणून अब्रामाची पत्नी, साराय, त्यास म्हणाली, “ देवाने मला मुले दिली नाहीत आणि आता मी खूप म्हातारी झाल्यामुळे मला मुले होणार नाहीत, म्हणून तुम्ही माझी दासी, हागार घ्या. तिच्याबरोबर लग्न सुद्धा करा म्हणजे ती मजसाठी पुत्र प्रसवेल.”
यास्तव अब्रामाने हागारेशी विवाह केला. हागारापासून अब्रामास पुत्र झाला, व त्याचे नाव त्याने इश्माएल ठेवले. परंतु साराय हागारेचा द्वेष करु लागली. इश्माएल तेरा वर्षाचा असताना, देव पुन्हा अब्रामाशी बोलला.
देव बोलला, “मी सर्वसमर्थ देव आहे. मी तुझ्याशी करार करीन.” मग अब्रामाने परमेश्वरास जमिनीपर्यंत लवून नमन केले. देवाने अब्रामास असे सुद्धा म्हटले की, “तु अनेक राष्ट्रांचा पिता होशील. मी तुला व तुझ्या संतानास कनान देश देईल व मी त्यांचा निरंतरचा देव होईन. तु आपल्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता कर.
“तुझी पत्नी साराय हीस पुत्र होईल- तोच खरा वारसदार होईल. त्याचे नाव इसहाक ठेव. मी त्याच्याशी आपला करार करीन, व त्याचे महान राष्ट्र करीन. मी इश्माएलचेही एक मोठे राष्ट्र करीन, पण माझा करार इसहाकाशी असेल.” मग देवाने अब्रामाचे नाव बदलले अब्राहाम केले,याचा अर्थ “पुष्कळांचा पिता.” देवाने सारायचेही नाव बदलले “सारा असे ठेवले याचा अर्थ, “राजकन्या.”
त्या दिवशी अब्राहामाने आपल्या घराण्यातील सर्व पुरुषांची सुंता केली. एका वर्षानंतर, अब्राहाम 100 वर्षाचा व सारा 90 वर्षाची असताना सारेने अब्राहामाच्या पुत्राला जन्म दिला. त्यांनी देवाने सांगितल्याप्रमाणे त्याचे नाव इसहाक ठेवले.
जेंव्हा इसहाक तरूण झाला, देवाने अब्राहमाच्या विश्वासाची परिक्षा पाहाण्यासाठी, तो म्हणाला, “इसहाक, तुझा एकुलता एक पुत्र, घे व त्याचे मला होमार्पण कर.” अब्राहाम पुन्हा देवाची आज्ञा मानतो व इसहाकाचे अर्पण करतो.
अब्राहाम व इसहाक होमार्पणाच्या ठिकाणी जात असताना इसहाकाने विचारले “बाबा, होमापर्णासाठी लाकडे आहेत, पण कोकरु कोठे आहे?” अब्राहाम म्हणाला, “मुला, देव स्वत: होमार्पणासाठी कोकरु पाहून देईल.”
जेव्हा ते होमार्पणाच्या ठिकाणी पोहोचले, अब्राहामाने आपला पुत्र इसहाकास बांधले व वेदीवर ठेविले. तो आपल्या पुत्राला ठार मारणार इतक्यात देव बोलला, “थांब! मुलास इजा करु नकोस! आता मला कळले की तु माझी भिती बाळगतोस कारण तु आपला पुत्र माझ्यापासून राखून ठेवला नाही.”
अब्राहामाने जवळच्या झुडूपामध्ये शिंगे गुंतलेला एक एडका पाहिला. इसहाकाच्या ठिकाणी देवाने एडका पुरविला होता. अब्राहामाने आनंदाने त्या एडक्याचे अर्पण केले.
मग देव अब्राहामाशी बोलला, “कारण तु आपले सर्वस्व माझ्यासाठी देऊ केलेस आपला एकूलता एक पुत्र देखिल देऊ केलास म्हणून मी तुला आशीर्वाद देईन. तुझी संताने आकाशातील ताऱ्यांपेक्षा जास्त होतील. तु माझी आज्ञा पाळलीस म्हणून तुझ्या संततीद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.”
बायबल कथा:// उत्पति 16-22//
6. परमेश्वर इसाकास मदत करतो
जेव्हा अब्राहाम म्हातारा झाला होता, तेव्हा त्याचा मुलगा, इसहाक तरूण पुरुष झाला होता. म्हणून अब्राहामाने आपल्या दासांपैकी एका दासाला त्याचे नातेवाईक राहत असलेल्या प्रदेशामध्ये जाऊन आपला मुलगा इसहाक,याच्यासाठी वधू आणण्यास पाठविले.
खूप लांब प्रवास केल्यानंतर अब्राहमचे नातेवाईक राहात असलेल्या ठिकाणी, देवबाप त्या सेवकास रिबकाकडे घेऊन येतो. ती आब्राहमच्या भावाची नात होती.
रिबका आपल्या बापाचे घर सोडून त्या सेवकाबरोबर इसहाकाच्या घरी जाण्यास तयार झाली. ती आल्यानंतर लगेच इसहाकाने तिच्याशी विवाह केला.
ब-याच वर्षांनंतर, अब्राहाम मरण पावला व देवाने त्याला कराराच्या रुपाने दिलेली सर्व अभिवचने इसहाकाकडे सोपवण्यात आली. देवाने अब्राहामास असंख्य संतती देण्याचे अभिवचन दिले होते, परंतु इसहाकाची पत्नी रिबेकास मुलबाळ नव्हते.
इसहाकाने रिबेकासाठी प्रार्थना केली, व देवाच्या कृपेने ती गरोदर राहीली व तिच्या पोटात जुळी मुले होती. ही दोन मुले रिबकेच्या पोटामध्ये असतांनाच एकमेकांशी झगडू लागली, तेव्हा तिने देवाला विचारले की असे का होत आहे.
देव रिबकेस म्हणाला, "तुझ्या पोटातील दोन मुलांद्वारे दोन राष्ट्रे होतील. ते एकमेकांशी झगडतील; आणि वडील धाकट्याची सेवा करील."
जेव्हा रिबकेच्या मुलांचा जन्म झाला, तेव्हा पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केशवस्त्रासारखे होते, त्याचे नांव एसाव ठेवले. त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ एसावाची टाच पकडून बाहेर आला आणि त्याचे नाव याकोब ठेवण्यात आले.
बायबल कथाः उत्त्पत्ति २४:१-२५-२६
7. देव याकोबास आशीर्वाद देतो
ही मुले वाढत असतांना, याकोबाला घरीच राहायला आवडत असे, परंतु एसावाला शिकार करायला आवडत असे. याकोब रिबकेचा आवडता होता, परंतु इसहाकाला एसाव आवडत होता.
एके दिवशी, एसाव शिकारीहून आला असता, त्याला खूप भूक लागली होती. एसाव याकोबास म्हणाला, "तू बनवलेल्या जेवणातून मला काही दे." याकोब उत्तराला, "पहिल्याने, तू मोठा मुलगा म्हणून तुझे जे हक्क आहेत ते हक्क मला दे." अशा प्रकारे एसावाने याकोबाला आपला ज्येष्ठत्वाचा (मोठ्या मुलाचा) हक्क देऊन टाकला. मग याकोबाने त्याला काही अन्न दिले.
इसहाक आपला आशीर्वाद एसावास देऊ इच्छित होता. परंतु असे करण्यापूर्वी रिबका आणि याकोब यांनी मिळून याकोब हा एसाव असल्याचे ढोंग करून इसहाकास फसविले. इसहाक म्हातारा झाल्यामुळे त्याला दिसत नव्हते. याकोबाने एसावाचे कपडे घातले आणि आपल्या मानेवर व हातांवर शेळीची कातडी घातली.
याकोब इसहाकाकडे येऊन म्हणाला, "मी एसाव आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्यावा म्हणुन मी तुम्हाकडे आलो आहे.” जेव्हा इसहाकाने शेळीच्या केसास स्पर्श केला व त्याच्या कपड्यांचा वास घेतला, तेव्हा तो एसावच आहे असे वाटून त्याने त्यास आशीर्वाद दिला.
एसाव याकोबाचा द्वेष करू लागला कारण याकोबाने त्याचा जेष्ठत्वाचा अधिकार आणि आशीर्वाद चोरला होता. म्हणून आपला बाप वारल्यानंतर त्याने याकोबास ठार मारण्याची योजना आखली.
परंतु रिबकेने एसावच्या योजनेबद्दल ऐकले. म्हणून तिने आणि इसहाकाने याकोबास आपल्या दूर देशी असलेल्या नातेवाईकाकडे राहाण्यास पाठवले.
याकोब बरीच वर्षे रिबकेच्या नातेवाईकांबरोबर राहिला. या कालावधीमध्ये त्याने लग्न केले व त्यास बारा पुत्र व एक कन्या झाली. परमेश्वराने त्यास खूप श्रीमंत बनविले.
त्यानंतर वीस वर्षांनी कनानामध्ये असणा-या आपल्या घरी, याकोब आपला परिवार, नोकर-चाकर व गुराढोरांच्या कळपासह परतला.
याकोब खूप घाबरला झाला होता कारण त्याला वाटले की त्याचा भाऊ एसाव अजूनही त्यास मारण्यासाठी टपला असेल. म्हणून त्याने आपल्या जनावरांचे अनेक कळप एसावाकडे भेट म्हणून पाठविले. ज्या सेवकांनी ते कळप एसावाकडे नेले ते त्यास म्हणाले, "आपला दास याकोब आपणासाठी हे कळप भेट म्हणून देत आहे. तो लवकरच येत आहे."
परंतु एसावाने अगोदरच याकोबास क्षमा केली होती, आणि त्यांना एकमेकांना भेटून आनंद झाला. मग याकोब सुखाने कनानामध्ये राहू लागला. मग इसहाक मरण पावला, आणि याकोब व एसावाने त्यास पुरले. देवाने अब्राहामाशी केलेल्या कराराचे अभिवचन आता इसहाकाकडून याकोबाकडे सुपूर्त करण्यात आले.
बायबल कथाः उत्त्पत्ति २५:२७-३३:२०
8. देव योसेफ व त्याच्या कुटुंबाचा बचाव करतो
ब-याच वर्षांनंतर याकोब वयोवृद्ध झाला असतांना, तो आपला आवडता पुत्र, योसेफ, यास मेंढरांचे राखण करत असलेल्या आपल्या भावांकडे त्यांचे कसेकाय चालले आहे हे पाहाण्यास पाठविले.
आपला पिता याकोब याचे योसेफावर जास्त प्रेम असल्यामुळे व योसेफ आपल्या भावांवर राज्य करील असे स्वप्न त्याला पडल्यामूळे त्याचे भाऊ त्याचा द्वेष करू लागले. जेव्हा योसेफ आपल्या भावांकडे आला, तेव्हा त्यांनी त्यास काही गुलामांच्या व्यापा-यांस विकून टाकले.
योसेफाच्या भावांनी घरी परतण्यापूर्वी योसेफाचा झगा शेळीच्या रक्तामध्ये बुडवला. मग त्यांनी तो झगा आपल्या बापास दाखविला अशासाठी की हिंस्त्र पशूने योसेफाची हत्या केली आहे यावर त्याचा विश्वास बसावा. याकोबास फार दुःख झाले.
त्या गुलामांच्या व्यापा-यांनी योसेफास मिसर देशामध्ये आणले. नाईल नदीच्या तीरावर वसलेला मिसर देश हा एक मोठा, व सामर्थ्यशाली देश होता. गुलामांच्या व्यापा-यांनी योसेफास एका श्रीमंत सरकारी अधिका-यास विकून टाकले. योसेफाने आपल्या स्वामीची चांगली सेवा केली, आणि देवाने योसेफास आशीर्वादित केले.
त्याच्या स्वामीच्या पत्नीने योसेफाबरोबर कुकर्म करण्याचा प्रयत्न केला, परंतु अशा प्रकारे देवाच्या विरूद्ध पाप करण्यास योसेफाने नकार दिला. यावर तिने संतप्त होऊन योसेफावर खोटा आरोप केला व योसेफास पकडून तुरुंगामध्ये टाकण्यात आले. तुरुंगामध्ये देखिल, योसेफ देवाशी विश्वासू राहिला, आणि देवाने त्यास आशीर्वाद दिला.
दोन वर्षांनंतर, निष्पाप असूनही योसेफ तुरुंगातच होता. एके रात्री, फारोला, मिसरी लोक आपल्या राजांना म्हणत असत, त्याला दोन चिंताजनक स्वप्ने पडली. त्याच्या सल्लागारांपैकी कोणीही त्याला स्वप्नांचा अर्थ सांगू शकला नाही.
देवाने योसेफाला स्वप्नांचा अर्थ सांगण्याची क्षमता दिली होती, म्हणून फारोने योसेफास तुरूंगातून आपल्या घरी आणले. योसेफाने त्याच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला व म्हटले, "देव सात वर्षे पुष्कळ पिकपाणी देईल व त्यानंतर सात वर्षे दुष्काळ पडेल.
योसेफाची फारोवर एवढी छाप पडली की त्याने त्याला मिसर देशाचा पंतप्रधान बनविले.
योसेफाने लोकांना सुकाळातील सात वर्षांमध्ये धान्याचा भरपूर साठा करून ठेवण्यास सांगितले. मग योसेफाने दुष्काळातील सात वर्षे लोकांना खाण्यासाठी पुरेसे होईल इतके धान्य विकले.
तो दुष्काळ फक्त मिसरातच नव्हे तर याकोब आणि त्याचे कुटुंबिय राहात असलेल्या कनान देशामध्येही भयंकर असा होता.
मग याकोब आपल्या मोठ्या मुलांस अन्न विकत घेण्यासाठी मिसरात पाठवतो. धान्य विकत घ्यायला आलेले भाऊ योसेफाच्या समोर उभे होते पण त्यांनी त्यास ओळखले नाही. परंतु योसेफाने त्यांना ओळखले.
ते बदलले आहेत की नाही याची परीक्षा पाहिल्यानंतर, योसेफ त्यांना म्हणाला, "मी तुमचा भाऊ योसेफ आहे!" भिऊ नका. तुम्ही मला गुलाम म्हणून विकून वाईट करण्याचा प्रयत्न केला, पण देवाने त्याच वाईटाचा चांगले करण्यासाठी उपयोग केला! या आणि मिसर देशामध्ये वस्ती करून राहा, म्हणजे मी तुम्हास व तुमच्या कुटुंबियांस धान्याचा पुरवठा करीन.
जेव्हा योसेफाचे भाऊ घरी आले व त्यांनी आपल्या बापास, याकोबास, योसेफ अजून जीवंत आहे असे सांगितले, तेव्हा याकोबास खूप आनंद झाला.
जरी याकोब आता वृद्ध झाला होता, तरीही तो आपल्या कुटुंबियांसह मिसरात आला व ते सर्व तेथे राहू लागले. याकोबाने आपल्या मरणापूर्वी, आपल्या सर्व मुलांस आशीर्वाद दिला.
देवाने अब्राहमाशी केलेल्या कराराचे अभिवचन इसहाकाकडे, मग याकोब आणि त्याच्या बारा पुत्रांकडे व त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आले होते. या बारा पुत्रांची संतती ही इस्राएलाचे बारा वंश झाले.
बायबल कथाः उत्त्पत्ति ३७-५०
9. देव मोशेला पाचारण करतो
योसेफ मृत्यु पावल्यानंतर, त्याचे सर्व नातेवाईक मिसर देशात राहत होते. ते आणि त्यांची संताने अनेक वर्षे तेथे राहिली व त्यांस पुष्कळ मुले झाली. त्यांनी इस्राएली असे म्हणण्यात आले.
शेकडो वर्षांनंतर इस्राएली लोकाची संख्या खूप वाढली. योसेफाने केलेल्या कामगिरीचा मिसरी लोकांना विसर पडला. त्यांना आता इस्राएली लोकांची भिती वाटू लागली. कारण ते पुष्कळ होते. म्हणून त्यावेळी मिसरावर राज्य करत असलेल्या फारोने इस्राएल लोकांस मिसरी लोकांचे गुलाम करून ठेवले.
मिस-यांनी इस्राएलांस अनेक इमारतींचे बांधकाम करण्यास व मोठमोठ्या शहरांचे निर्माण करण्यास सक्ती केली. अशा कष्टांच्या कामाने त्यांचे जीवन खूप त्रासदायक झाले, परंतु देवाने त्यांना आशीर्वादित केले व त्यांना आणखी मुले झाली.
फारोने पाहिले की इस्राएल लोकांना पुष्कळ मुले होत आहेत, म्हणून त्याने आदेश दिला की इस्राएलांच्या पुत्र संतानांस नाईल नदीमध्ये फेकून द्यावे.
एका इस्राएली स्त्रीने एका मुलास जन्म दिला. तिने व तिच्या पतीने आपल्या बाळास काही काळापर्यंत लपविण्याचा प्रयत्न केला.
जेव्हा त्या बाळाचे आईवडिल त्यास लपवू शकले नाही, तेव्हा त्यांनी त्या बाळास मृत्युपासून वाचविण्यासाठी त्याला एका तरंगणा-या टोपलीमध्ये ठेवून ती नाईल नदीच्या तीरावर लव्हाळ्यात ठेवली. त्या बाळाची थोरली बहिण त्याचे काय होईल ते पाहत होती.
फारोच्या मुलीने ती टोपली उघडून आत बघितले. जेव्हा तिने त्या बाळास पाहिले, तेव्हा तिने त्यास आपला पुत्र बनविले. तिने त्या बाळास दुध पाजण्यासाठी एका इस्राएली स्त्रीस बोलाविले, परंतु ती त्याची आई होती हे तिला ठाऊक नव्हते. जेव्हा ते बाळ मोठे झाले व त्यास आपल्या आईच्या दुधाची आवश्यकता नव्हती, तेव्हा तिने त्यास फारोच्या मुलीकडे सोपवले, तिने त्याचे नाव मोशे ठेवले.
एके दिवशी, जेव्हा मोशे मोठा झाला, तेव्हा त्याने एका मिसरी मनुष्यास एका यहूदी गुलामास मारताना पाहिले. मोशेने आपल्या इस्राएली बांधवास वाचविण्याचा प्रयत्न केला.
आपणांस कोणी पाहत नाही हे बघून मोशेने त्या मिस-यास जीवे मारले व त्याचे शरीर पुरले. परंतु मोशेने केलेले हे कृत्य कोणीतरी पाहिले होते.
जेव्हा फारोने मोशेने केलेल्या कृत्याविषयी ऐकले तेव्हा त्याने त्यास मारण्याचा प्रयत्न केला. फारोच्या शिपायांपासून सरक्षित राहाण्यासाठी मोशे मिसर देश सोडून जंगलामध्ये पळून गेला.
मोशे आता मिसर देशापासून दूर जंगलामध्ये मेंढरे चारू लागला. त्याने तिथेच एका स्त्रीशी विवाह केला व त्यास दोन पुत्र झाले.
एके दिवशी मेंढरे चारत असतांना, मोशेने एक झुडूप जळत असतांना पाहिले. परंतु ते झाड जळून भस्म झाले नाही असे त्यास दिसून आले. मग ते न्याहाळून पाहावयास तो त्या झुडूपाकडे गेला. तो त्या जळत असलेल्या झुडूपाजवळ जात असतांना, देवाचा आवाज त्याच्या कानी पडला, "मोशे, तू आपल्या पायातले जोडे काढ. कारण तू पवित्र भूमीवर उभा आहेस."
देव म्हणाला, "मी आपल्या लोकांचे दुःख पाहिले आहे. मी तुला फारोकडे माझ्या लोकांना मिसराच्या गुलामगिरीतून सोडविण्यासाठी पाठविणार आहे. मी त्यांना कनान देश देणार आहे, जो मी अब्राहाम, इसहाक व याकोबास देण्याची प्रतिज्ञा केली होती."
मोशे म्हणाला, "जर लोकांनी मला विचारले की तुला कोणी पाठविले आहे, तर मी त्यास काय सांगू?" देव म्हणाला, "मी आहे तो आहे. त्यांना सांग, ‘मी आहे याने मला तुम्हाकडे पाठविले आहे.’ त्यांना हेही सांग की, मी त्यांच्या पूर्वजांचा अर्थात अब्राहाम, इसहाक व याकोबाचा देव आहे. हेच माझे सनातन नाव आहे."
मोशे फार भयभित झाला व फारोकडे जाण्यास नकार देऊ लागला कारण त्याला व्यवस्थित बोलता येत नव्हते, म्हणून देवाने मोशेचा भाऊ, अहरोन, ह्यास त्याच्या मदतीस पाठविले. देवाने मोशे व अहरोनास अगोदरच सांगून ठेवले की फारो हट्टीपणा करील.
बायबल कथाः निर्गम १-४
10. दहा पीडा
मोशे आणि अहरोन फारोकडे गेले. ते म्हणाले, "इस्राएलाचा देव असे म्हणतो, 'माझ्या लोकांना जाऊ द्या!" फारोने त्यांचे ऐकले नाही. इस्त्राएल लोकांना मोकळे करण्याऐवजी त्याने त्यांस आणखी कष्टाची कामे करण्याची सक्ती केली!
फारोने लोकांना जाण्याची सतत मनाई केली, म्हणून देवाने मिसर देशावर दहा भयानक पीडा पाठविल्या. या पीडांद्वारे देवाने दाखवून दिले की तो फारो आणि मिसरातील देवतांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे.
देवाने नाईल नदीच्या पाण्याचे रक्तामध्ये रूपांतर केले, पण तरीही फारो इस्राएलाची सुटका करावयास तयार झाला नाही.
मग देवाने सर्व मिसर देशामध्ये बेडूक पाठविले. फारोने मोशेस बेडूक दूर करण्यास विनंती केली. परंतु सर्व बेडूक मेल्यानंतर फारोचे अंतःकरण आणखी कठोर झाले व त्याने इस्राएलास मिसर देश सोडण्याची परवानगी दिली नाही.
मग देवाने उवांची पीडा पाठविली. मग त्याने गोमाशांची पीडा पाठविली. फारोने मोशे व अहरोनास बोलावून म्हटले की जर ते गोमाशांची पीडा दूर करत असतील तर तो इस्राएलास मिसर देश सोडता येईल. जेव्हा मोशेने प्रार्थना केली, तेव्हा देवाने सर्व गोमाशा दूर केल्या. परंतु फारोने आपले अंतःकरण आणखी कठोर केले व लोकांना जाण्यास मनाई केली.
पुढे, देवाने मिसरी लोकांचे सर्व पाळीव प्राणी आजारी पाडून मारले. परंतु फारोचे मन अधिक कठोर होत गेले व त्याने इस्राएलास जाऊ दिले नाही.
मग देवाने मोशेस फारोसमोर हवेमध्ये राख उधळण्यास सांगितले. त्याने असे केल्यानंतर, सर्व मिसर देशातील लोकांच्या अंगावर गळवे तयार झाले, मात्र इस्राएलावर त्याचा काही परिणाम झाला नाही. वाने फारोचे अंतःकरण अधिक कठोर केले, व फारो आता इस्राएलास सोडण्यास तयार नव्हता.
त्यानंतर, देवाने मिसर देशावर गारांचा पाऊस पाडून ब-याच पिकांचे नुकसान केले व बाहेर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीस ठार मारले. फारोने मोशे व अहरोनास बोलावून म्हटले, "मी मोठे पाप केले आहे.तुम्ही जाऊ शकता.” मग मोशेने प्रार्थना केली व गारांचा पाऊन थांबला.
परंतु फारोने पुन्हा पाप केले व आपले मन कठोर केले. तो आता त्यांना बाहेर पाठविण्यास तयार नव्हता.
मग देवाने मिसर देशावर टोळांची पीडा पाठवली. या टोळांनी गारपिटीच्या पावसामध्ये शिल्लक राहिलेले सर्व पिक खाऊन टाकले.
मग देवाने मिसरावर तीन दिवस निबिड अंधकाराची पीडा पाठविली. एवढा काळोख होता की मिसरी लोक घराबाहेर पडू शकत नव्हते. परंतु इस्राएली लोक राहत असलेल्या ठिकाणी प्रकाश होता.
या नऊ पीडांनंतरही, फारो इस्राएल लोकांना जाऊ देण्यास नाकारत होता. फारो ऐकत नसल्यामूळे देवाने आणखी एक शेवटची पीडा पाठविली. या पीडेने फारोचे मन बदलले.
बायबल कथाः निर्गम_ 5-10_
11. वल्हांडण सण
देवाने फारोला सांगितले की जर तो इस्राएल लोकांना जाऊ देणार नाही, तर देव मिसरातील प्रथम जन्मलेल्या मनुष्यांस व प्राण्यांस जीवे मारील. जेव्हा फारोने हे ऐकले तेव्हाही त्याच्यावर काही परिणाम झाला नाही व त्याने इस्राएलास सोडले नाही.
जो कोणी देवावर विश्वास ठेवील त्याच्या घरातील प्रथम जन्मलेल्यास वाचविण्यासाठी देवाने मार्ग काढला. प्रत्येक कुटुंबाला एक निष्कलंक कोकरु निवडायचे होते आणि ते वधायचे होते.
देवाने इस्राएलास सांगितले की त्यांनी कोक-याचे कांही रक्त त्यांच्या घराच्या दरवाजाच्या चौकटीस लावावे, आणि त्याचे मांस विस्तवावर भाजून बेखमीर भाकरीबरोबर घाईघाईने खावे. त्याने त्यांना भोजन झाल्यानंतर मिसर देश सोडण्यास तयार राहण्यासही सांगितले.
देवाने सांगितल्याप्रमाणे इस्राएलांनी सर्व तयारी केली. मध्यरात्री, देवाने जाऊन मिसरातील प्रत्येक कुटुंबातील प्रथम जन्मलेल्या पुत्रास मारले.
इस्राएलाच्या सर्व घरांच्या चौकटीवर कोक-याचे रक्त असल्यामूळे देव त्या घरांना ओलांडून गेला. त्या घरातील सर्वजण सुरक्षित होते. कोक-याच्या रक्तामुळे त्यांचा बचाव झाला होता.
परंतु मिस-यांनी देवावर विश्वास ठेवला नाही व त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. म्हणून देवाने त्यांचे घर ओलांडले नाही. देवाने मिसरातील प्रत्येक प्रथम जन्मलेल्यांस जीवे मारले.
तुरुंगातील प्रथम जन्मलेल्या मुलापासून ते फारोच्या घरातील प्रथम जन्मलेल्या मुलापर्यंत प्रत्येक मिसरी पुरूष मरण पावला. मिसर देशातील पुष्कळ लोक खुप दुःखाने रडत व विव्हळत होते.
त्याच रात्री, फारोने मोशे व अहरोनास बोलावून म्हटले, "इस्राएलांना घेऊन लगेच मिसर देश सोडा." मिसरातील लोकांनीही इस्राएली लोकांना मिसर देश लगेच सोडण्याची विनंती केली.
बायबल कथाः निर्गम ११:१-१२:३२
12. निर्गमन
मिसर देश सोडत असतांना इस्राएल लोकांना खूप आनंद झाला. आता ते गुलाम नव्हते, ते आता वचनदत्त भूमीकडे वाटचाल करत होते! मिसरातील लोकांनी इस्राएल लोकांनी मागितलेल्या सर्व वस्तु अर्थात सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तू त्यांना दिल्या. काही परराष्ट्रीय लोकांनीही देवावर विश्वास ठेवला व इस्राएल जनतेबरोबर त्यांनीही मिसर देश सोडला.
देवाने एका ऊंच ढगाच्या खांबाद्वारे जो दिवसा त्यांच्या पुढे चालत असे व रात्री तोच ऊंच अग्निचा खांब बनत असे त्याद्वारे त्यांचे मार्गदर्शन केले. देव नेहमी त्यांच्याबरोबर होता व प्रवासात त्यांचे मार्गदर्शन करत होता. त्यांना एकच गोष्ट करायची होती ती म्हणजे देवाचे आज्ञापालन करणे.
थोड्या वेळाने इकडे फारोचे व त्याच्या लोकांचे मन बदलले व इस्राएलांना पुन्हा त्यांचे गुलाम करावे असे त्यांना वाटले. परमेश्वराने फारोला हट्टी व कठोर बनविले, अशासाठी की लोकांना ख-या व जीवंत देवाची ओळख पटावी व यहोवा देव हा फारो व त्याच्या देवतांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे हे त्यांना समजावे.
मग फारो व त्याचे सैन्य इस्राएल लोकांना पुन्हा त्यांचे गुलाम बनविण्यासाठी त्यांचा पाठलाग करू लागले. जेव्हा इस्राएलांनी मिसरी सैन्य त्यांचा पाठलाग करतांना पाहिले तेव्हा त्यांना समजले की ते आता मिसरी सैन्य आणि तांबड्या समुद्राच्या मध्ये अडकले आहेत. ते फार घाबरले व ओरडले, "आम्ही मिसर देश का सोडला? आता आम्ही मरणार !"
मोशेने इस्राएलास सांगितले, "भिऊ नका! देव तुमच्या वतीने आज लढणार आहे व तुमचे तारण करणार आहे.” मग देव मोशेस म्हणाला, "लोकांना तांबड्या समुद्राकडे जाण्यास सांग."
मग देवाने इस्राएली लोक व मिसरी सैन्य यांच्या मधोमध मेघस्तंभ (ढगाचा खांब) उभा केला व यामुळे मिसरी सैन्य इस्राएलास पाहू शकत नव्हते.
देवाने मोशेला तांबड्या समुद्रावर आपली काठी उभारण्यास व तो समुद्र दुभागण्यास सांगितले. मग देवाने जोरदार वा-याच्या साह्याने समुद्राचे पाणी डावीकडे व उजवीकडे हटवले,व समुद्रात कोरडी वाट तयार केली.
इस्राएली लोक भरसमुद्रात कोरड्या भूमिवरून चालत गेली व त्यांच्या दोन्ही बाजूंनी पाणी भिंतीसारखे झाले.
मग देवाने मेघस्तंभ वरती घेऊन मार्गातून हलवला यासाठी की इस्राएली लोक आपल्या हातातून निसटून जात आहेत हे त्यांना दिसावे. मिसरी लोकांनी त्यांचा पाठलाग करावयाचे ठरवले.
व ते इस्राएलांचा पाठलाग करत समुद्रातील वाटेने आत आले, परंतु देवाने त्यांना भिती घातली व त्यांचे रथही चिखलामध्ये अडकून बसले. ते ओरडले, "पळा!" कारण देव इस्राएलांच्या वतीने लढत आहे!"
जेव्हा सर्व इस्राएल लोक सुरक्षितपणे समुद्राच्या दुस-या बाजुला पोहोचले, देवाने मोशेला आपला हात उंच करावयास सांगितले. त्याने असे केल्यानंतर, समुद्राचे पाणी मिसरी सैन्यावर पडू लागले व पूर्वीसारखे झाले. सर्व मिसरी सैन्य पाण्यात बुडून मेले.
जेव्हा इस्राएलांनी पाहिले की मिसरी सैन्य मेले, तेव्हा त्यांनी देवावर व मोशे हा देवाचा संदेष्टा आहे याजवर विश्वास ठेवला.
इस्राएल लोकांनी मोठा आनंद केला, कारण देवाने त्यांचे मरण व गुलामगिरीपासून तारण केले होते! आता ते आपल्या देवाची सेवा करण्यासाठी स्वतंत्र झाले होते. इस्राएल लोकांनी त्यांना नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल पुष्कळ गीते गाऊन आनंद केला व देवाची स्तुती केली, कारण देवाने त्यांना मिसरी सैन्यांपासून तारले होते.
देवाने इस्राएलाला मिसरी लोकांवर कसा विजय दिला व त्यांची गुलामगिरीपासून कशी सुटका केली याचे स्मरण त्यांना राहावे म्हणून देवाने इस्राएलास दरवर्षी वल्हांडण सण साजरा करण्याची आज्ञा दिली. निष्कलंक कोक-याचे बलिदान देऊन त्याचे मांस बेखमीर भाकरीबरोबर खाऊन त्यांनी हा सण साजरा केला.
बायबल कथाः निर्गम १२:३३-१५:२१
13. देवाचा इस्राएलाशी करार
तांबडा समुद्र पार केल्यानंतर, देव इस्राएलाला जंगलामधून सीनाय पर्वताकडे घेऊन गेला. मोशेने जेथे जळते झाड पाहिले होते, तो हाच पर्वत होता. लोकांनी पर्वताच्या पायथ्याशी आपले तंबू ठोकले.
देव मोशेला व इस्राएल लोकांस म्हणाला, "जर तुम्ही माझी आज्ञा व माझा करार पाळाल, तर तुम्ही माझे खास निवडलेले लोक व्हाल, राजकीय याजकगण व पवित्र राष्ट्र असे व्हाल."
तिस-या दिवशी, लोकांची आत्मिक तयारी झाल्यानंतर, देव सिनाय पर्वताच्या शिखरावर उतरत असतांना मेघगर्जना, विजेचा प्रखर प्रकाश, धूर, प्रचंड शिंगाचा नाद यासह उतरून आला. पर्वतावर जाण्याची परवानगी केवळ मोशेलाच होती.
मग देवाने त्यांना ही वचने सांगितली, "मी यहोवा, तुमचा देव आहे, ज्याने तुम्हास मिसरच्या दास्यत्वातून सोडवले. तुम्ही अन्य देवतांची पूजा करू नका."
"आपल्यासाठी कोरीव मुर्ती करू नका व तिच्या पाया पडू नका, कारण मी, यहोवा, तुझा देव ईर्षावान देव आहे. तू माझे नाव व्यर्थ घेऊ नकोस. शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. अर्थात सहा दिवस तू आपले सर्व काम कर व सातवा दिवस हा तुझा विश्रांतीचा दिवस व माझी आठवण करण्याचा दिवस म्हणून पाळ."
"आपल्या बापाचा व आईचा मान राख. तू खून करू नकोस. तू व्यभिचार करू नकोस. तू चोरी करू नकोस. तू खोटी साक्ष देऊ नकोस(खोटे बोलू नकोस.) तू आपल्या शेजा-याच्या बायकोचा, त्याच्या घराचा, किंवा त्याच्या कुठल्याही गोष्टीचा लोभ धरू नकोस."
मग देवाने ह्या दहा आज्ञा दगडाच्या दोन पाट्यांवर लिहून मोशेकडे दिल्या. देवाने त्यांना पालन करण्यासाठी आणखी पुष्कळ नियम व विधी देखिल दिले. जर त्यांनी हे सर्व नियम पाळले, तर देवाने त्यांना आशीर्वाद व संरक्षण देण्याचे अभिवचन दिले. जर त्यांनी त्याचे उल्लंघन केले, तर देव त्यांना शासन करील.
देवाने इस्राएल लोकांना त्याच्यासाठी एक मंडप बनवण्यासाठी तपशिलवार माहिती दिली. ह्याला निवासमंडप म्हणत, यामध्ये दोन खोल्या होत्या व त्यांना दुभागणारा एक मोठा पडदा होता. पडद्याच्या पाठीमागे असणा-या खोलीमध्ये केवळ महायाजकासच जाण्याची परवानगी होती कारण तेथे देवाचा निवास होता.
देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करणारा प्रत्येक जण निवासमंडपा समोर असणा-या वेदीवर देवाला होमार्पण करण्यासाठी पशू आणू शकत असे. याजक त्या पशूस मारून त्याचे वेदीवर होमार्पण करत असे. त्या पशूच्या रक्ताद्वारे त्या व्यक्तीचे पाप झाकले जाऊन ती व्यक्ति देवाच्या दृष्टीने शुद्ध ठरत असे. मोशेचा भाऊ अहरोन व अहरोनाची संताने यांना देवाने आपले याजक म्हणून निवडले.
देवाने दिलेल्या आज्ञा पाळावयास व केवळ त्याचीच उपासना करून त्याचे खास लोक होण्यास इस्राएल लोक सहमत झाले. परंतु देवाला आज्ञापालनाचे वचन दिल्यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांनी भयंकर पाप केले.
पुष्कळ दिवस, मोशे सिनाय पर्वत शिखरावर देवाशी संभाषण करत होता. लोकांना त्याची वाट पाहता-पाहता कंटाळा आला. म्हणून त्यांनी सोने आणून त्याची मूर्ती बनविण्यासाठी ते अहरोनाकडे दिले.
अहरोनाने त्याची एक वासराच्या आकाराची सोन्याची मूर्ती बनवली. लोक बेभान होऊन तिची पूजा करू लागले व त्या मूर्तीस यज्ञ करू लागले. त्यांच्या पापामुळे देवाला त्यांचा भयंकर राग आला व त्याने त्यांचा नाश करावयाचे ठरविले. परंतु मोशेने त्यांच्यासाठी प्रार्थना केली व देवाने त्याची प्रार्थना ऐकली व त्यांचा नाश केला नाही.
जेव्हा मोशे पर्वतावरून खाली आला व त्याने ती मूर्ती पाहिली, त्याला फार राग आला व ज्याच्यावर देवाने दहा आज्ञा लिहिल्या होत्या त्या दगडाच्या पाट्या त्याने तोडून टाकल्या.
ममग त्याने त्या मूर्तीचा कुटून चुरा केला, तो त्याने पाण्यामध्ये टाकला व लोकांना ते पाणी प्यावयास दिले. देवाने लोकांवर भयानक पीडा पाठविली व त्यांपैकी बरीचशी माणसे त्यामध्ये मरण पावली.
मोशेने पुन्हा दहा आज्ञा लिहिण्यासाठी दगडाच्या दोन नविन पाट्यां बनवल्या कारण पहिल्या पाट्या त्याने फोडल्या ङोत्या. मोशे पुन्हा पर्वतावर चढला व त्याने लोकांच्या क्षमेसाठी देवाकडे प्रार्थना केली. देवाने मोशेचे ऐकले व त्यांना क्षमा केली. मोशे दहा आज्ञा लिहिलेल्या नवीन पाट्या घेऊन परत पर्वतावरुन खाली उतरतो. मग देवाने सीनाय पर्वतापासून वचनदत्त देशाकडे जाण्यास लोकांचे मार्गदर्शन केले.
बायबल कथाः निर्गम १९-३४
14. जंगलामध्ये भटकणे
देवाने इस्राएल लोकांशी केलेल्या कराराचा भाग म्हणून जे नियम त्यांना पाळण्यासाठी दिले होते ते सांगून झाल्यानंतर त्यांनी सीनाय पर्वत सोडला. देव त्यांना वचनदत्त देशाकडे, ज्याला कनान देश सुदधा म्हटले जायचे त्याकडे त्यांना घेऊन जात होता. कनान देशाकडे जात असतांना मेघस्तंभ त्यांच्यापुढे गेला व ते त्यांच्या पाठीमागे गेले.
देवाने अब्राहाम, इसहाक व याकोब यांना वचन दिले होते की त्यांच्या वंशजांना तो वचनदत्त देश देईल, पण आता त्या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक राहत होते. त्यांना कनानी असे म्हणत असत. कनानी लोक देवाची आराधना करीत नव्हते व त्याची आज्ञा मानत नव्हते. ते खोट्या देवदवतांची पुजा करीत होते व पुष्कळ वाईट गोष्टी करीत होते.
देव इस्राएलास म्हणाला, "वचनदत्त देशामधील कनानी लोकांचा तुम्ही पुर्णपणे नाश करा. त्यांच्याशी शांतीने वागू नका व त्यांच्याशी विवाह करू नका. तुम्ही त्यांच्या सर्व मूर्त्यांचा समूळ नाश करा. जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाही, तर तुम्ही माझ्याऐवजी त्यांच्या मूर्त्यांच्या पाया पडाल ."
जेव्हा इस्राएल लोक कनान देशाच्या सीमेवर आले, तेव्हा मोशेने इस्राएलाच्या बारा वंशामधून प्रत्येकी एक अशा बारा मनुष्यांस निवडले. त्याने त्या मनुष्यांस कसे जावे व देश कसा हेरावा याविषयी सुचना देऊन तो देश कसा आहे हे बघायला सांगितले. कनानी लोकांवरतीही हरगिरी करुन ते शक्तिशाली आहेत की दुर्बल आहेत हे पाहायला सांगितले.
ही बारा माणसे चाळीस दिवस कनानात फिरली व परत आली. त्यांनी लोकांस सांगितले. "जमीन एकदम सुपीक आहे व पिकपाणी भरपूर आहे. परंतु दहा हेर म्हणाले, "शहरे खूप मजबूत व तटबंदीची आहेत तेथिल लोक राक्षस आहेत!" जर आपण त्यांच्यावर हल्ला केला तर ते निश्चितच आपला पराभव करतील व आपणांस जीवे मारतील!"
लगेच कालेब आणि यहोशवा ही दोघे हेर म्हणाले, "कनानी लोक उंच व बलाढ्य आहेत ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण त्यांना निश्चितपणे पराभव करु शकतो. देव आमच्या बाजूने लढेल!"
परंतु लोकांनी कालेब व यहोशवाचे ऐकले नाही. ते मोशे व अहरोनावर भडकले व म्हणाले, "तुम्ही आम्हांस अशा भयानक ठिकाणी का आणिले?" इथे युद्धामध्ये मरणे व आमच्या बायका व मुले यांना गुलाम बनण्यापेक्षा मिसर देशामध्ये राहणे हे बरे होते. आपणांस पुन्हा मिसर देशामध्ये घेऊन जाईल असा वेगळा नेता त्यांना निवडायचा होता.
हे पाहून देव रागावला व दर्शनमंडपाजवळ आला. देव म्हणाला, "तुम्ही माझ्याविरूद्ध बंड पुकारल्यामुळे आता तुम्हा सर्वांना ह्या जंगलामध्ये भटकावे लागेल. फक्त यहोशवा आणि कालेब, यांना सोडून बाकी सर्व वीस वर्षाचे व वीस वर्षांवरील लोक या जंगलामध्येच मरतील व त्यांचा वचनदत्त देशामध्ये प्रवेश होणार नाही.”
लोकांनी हे ऐकल्यावर, त्यांना असे केल्याचे दुःख झाले. त्यांनी आपली हत्यारे घेतली व कनानी लोकांविरूद्ध लढाई करायला गेले. मोशेने त्यांना सावध केले व म्हटले की जाऊ नका कारण देव त्यांच्याबरोबर नव्हता, तरी त्यांनी त्याचे ऐकले नाही.
या युद्धामध्ये देव त्यांच्याबरोबर गेला नव्हता, म्हणून त्यांचा पराभव झाला व बरेच जण मृत्युमुखी पडले. मग इस्राएली लोक कनानमधून परतले व चाळीस वर्षे जंगलामध्ये भटकत राहिले.
त्यांच्या या चाळीस वर्षाच्या भटकंतीच्या समयी देवाने जंगलामध्ये देखिल त्यांच्या सर्व गरजा पुरविल्या. त्याने त्यांना स्वर्गातील भाकर ज्याला त्यांनी "मान्ना" म्हटले ती खावयास दिली. त्याने त्यांच्या तंबूमध्ये लावा पक्षांचे(हे पक्षी मध्यम आकाराचे असतात) थवे पाठविले, अशासाठी की त्यांना मांस खावयास मिळावे. या काळामध्ये, देवाने त्यांची वस्त्रे फाटू दिली नाहीत व त्यांची पादत्राणेही झिजू दिली नाहीत.
देवाने आश्चर्यकारक रितीने त्यांना खडकामधून पाणी दिले. पण तरीही इस्राएल लोकांनी देवाविरूद्ध व मोशेविरूद्ध कुरकुर केली. तरीदेखील देव अब्राहाम, इसहाक व याकोब यांना दिलेल्या अभिवचनाविषयी विश्वासू राहिला.
अजून एकदा जेव्हा लोकांना प्यावयास पाणी नव्हते, तेव्हा देव मोशेस म्हणाला, "खडकाशी बोल, म्हणजे त्यातून पाणी निघेल." परंतु त्या खडकास आज्ञा करण्याऐवजी त्याने दोनदा त्या खडकावर काठी मारून सर्व लोकांसमोर देवाचा अनादर केला. सर्वांना पिण्यासाठी खडकातून पाणी आले, परंतु देव मोशेवर रागावला आणि म्हणाला, "तू वचनदत्त देशात प्रवेश करणार नाहीस."
चाळीस वर्षे इस्राएल लोक जंगलामध्ये भटकले, ज्या इस्राएलांनी देवाविरूद्ध बंड केले, ते सर्व तेथेच मरण पावले. मग देवाने लोकांस पुन्हा त्या वचनदत्त देशाकडे येण्यास त्यांचे मार्गदर्शन केले. मोशे आता वयोवृद्ध झाला असल्यामूळे परमेश्वराने लोकांचे नेतृत्व करण्यास त्याची मदत करण्यासाठी यहोशवाची निवड केली. देवाने मोशेस हेही आश्वासन दिले की एक दिवस त्याच्या सारखाच दुसरा संदेष्टा देव पाठविल.
मग देवाने मोशेस पर्वताच्या शिखरावर जाऊन वचनदत्त देश पाहावयास सांगितले. मोशेने वचनदत्त देश पाहिला, परंतु देवाने त्यास तेथे प्रवेश करण्यास परवानगी दिली नाही. मग मोशे मरण पावला व इस्राएलांनी चाळीस दिवस त्याच्यासाठी शोक केला. यहोशवा त्यांचा नविन नेता बनला. यहोशवा एक चांगला नेता झाला कारण त्याने देवावर विश्वास ठेविला व त्याच्या आज्ञा पाळल्या.
बाबल कथाः निर्गम १६-१७; गणना १०-१४; २०; २७; अनुवाद ३४
15. वचनदत्त देश
शेवटी आता इस्राएलांना कनानामध्ये, वचनदत्त देशामध्ये प्रवेश करण्याची वेळ आली. यहोशवाने कनानी शहर यरीहो जे मोठ्या वेशींनी सुरक्षित केले गेले होते, तेथे दोन हेरांस हेरगिरी करण्यास पाठविले. त्या शहरामध्ये रहाब नावाची एक वेश्या राहत होती. तिने त्या हेरांना आपल्या घरामध्ये लपवले व नंतर त्यांना निसटून जाण्यास मदत केली.तिने असे केले कारण तिने देवावर विश्वास ठेवला होता. जेव्हा इस्राएल लोक यरीहोचा नाश करतील तेव्हा रहाब व तिच्या घराण्याचे रक्षण करण्याचे त्यांनी वचन दिले.
इस्राएलांना वचनदत्त देशामध्ये प्रवेश करण्यासाठी यार्देन नदी पार करणे अगत्याचे होते. देवाने यहोशवास सांगितले, "प्रथम याजकांस पुढे जाऊ द्या." जेव्हा याजकांच्या पायाचा स्पर्श पाण्यास झाला तेव्हा यार्देन नदीचा वरून येणारा प्रवाह बंद झाला व इस्राएल लोक कोरड्या जमिनीवरून चालत नदीच्या पलिकडे जाऊ शकले.
यार्देन नदी पार केल्यानंतर, देवाने यहोशवास सांगितले की कशा प्रकारे त्यांनी मजबूत यरीहो नगरावर हल्ला करावा. लोकांनी देवाच्या आज्ञेचे पालन केले. देवाने सांगितल्या प्रमाणेच सर्व सैनिकांनी व याजकांनी यरीहो शहरास सहा दिवस प्रत्येकी एक वेळा प्रदक्षिणा घातल्या.
मग सातव्या दिवशी, इस्राएलांनी आणखी सात वेळा शहरास प्रदक्षिणा घातल्या. शेवटच्या वेळी प्रदक्षिणा घालत असतांना सैनिकांनी गर्जना केल्या व याजकांनी आपली कर्णे वाजवले.
मग यरीहो शहराच्या भिंती कोसळल्या. देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएलांनी शहराचा नाश केला. त्यांनी केवळ राहाब व तिच्या कुटुंबास जिवंत ठेविले, जे नंतर इस्राएलांचा एक भाग बनले. जेव्हा कनानमध्ये राहणा-या इतर लोकांनी ऐकले की इस्राएलांनी यरीहो नगराचा नाश केला आहे, तेव्हा इस्त्राएली लोक त्यांच्यावरही हल्ला करतील याची त्यांनी भिती वाटली.
देवाने इस्राएलास आज्ञा केली होती की त्यांनी कनानी लोकांबरोबर शांतीचा करार करु नये. परंतु गिबोनी नावाचा कनानामधील एक लोकगट यहोशवाबरोबर खोटे बोलला ते म्हणाले की ते कनानापासून खूप लांब रहातात. त्यांनी यहोशवास त्यांच्यासोबत शांतीचा करार करण्यास विनंती केली. यहोशवा व इस्राएल यांनी गिबोनी लोक कोठून आले होते याची देवाकडे विचारपूस केली नव्हती. म्हणून यहोशवाने त्यांच्याशी शांतीचा करार केला.
जेव्हा इस्राएलास समजले की गिबोनी लोकांनी त्यांची फसवणूक केली आहे, तेव्हा ते खूप रागावले, पण तरीही त्यांनी तो करार पाळला कारण त्यांनी देवासमोर त्यांना वचन दिले होते. काही काळानंतर, कनानामधील इतर लोकगटाच्या राजांनी, अमोरी लोकांनी, ऐकले की गिबोनी लोकांनी इस्राएलाबरोबर करार केला आहे, तेव्हा त्यांनी आपले सैन्य एकत्र करून गिबोन्यांवर हल्ला केला. गिबोन्यांनी यहोशवाकडे संदेश पाठविला व त्यांना मदत करण्याची विनंती केली.
यास्तव यहोशवाने इस्राएलाच्या सैनिकांस जमा केले व गिबोन्यांकडे पोहोचण्यासाठी रात्रभर चालत राहिले. पहाटेच त्यांनी अमोरी सैनिकांना आश्चर्याचा धक्का दिला व त्यांच्यावर हल्ला केला.
त्या दिवशी इस्राएलाच्या बाजूने देव स्वतः लढला. त्याने अमोरी सैनिकांमध्ये गोंधळ निर्माण केला व त्यांच्यावर मोठ्या गारा पाडल्या, ज्यामध्ये अनेक अमोरी मरण पावले.
देवाने सुद्धा सूर्यास आकाशात एका जागी स्थिर राहाण्याची आज्ञा केली कारण इस्राएलांना अमो-यांचा पुर्णपणे नाश करण्यास वेळ मिळावा. त्या दिवशी देवाने इस्राएलाला मोठा विजय प्राप्त करून दिला.
देवाने त्या सैनिकांस पराजित केल्यानंतर, अनेक कनानी लोकगटांनी एकत्र येऊन इस्त्राएलावर चढाई केली. यहोशवा आणि इस्राएलांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा नाश केला.
या लढाईनंतर देवाने इस्राएलाच्या प्रत्येक वंशास वचनदत्त देशाची वाटणी करुन दिली. त्यानंतर देवाने इस्राएलाच्या सर्व सीमेवर शांती प्रस्थापित केली.
जेव्हा यहोशवा वृद्ध झाला, तेव्हा त्याने सर्व इस्राएली लोकांस एकत्र बोलावले. मग त्याने इस्राएली लोकांस देवाने त्यांच्याशी केलेल्या सीनाय पर्वतावरील कराराचे स्मरण करून दिले की त्यांनी देवाच्या आज्ञा पाळाव्यात. सर्व लोकांनी देवाशी विश्वासू राहण्याचे व त्याच्या आज्ञा पाळण्याचे वचन दिले.
बाबल कथाः Joshua 1-24
16. तारणारे
यहोशवाच्या मृत्युनंतर, इस्त्राएल लोकांनी देवाचे अनुकरण केले नाही, उरलेल्या कनानी लोकांना घालवून दिले नाही व देवाचे नियम पाळले नाहीत. याव्हे ख-या व जिवंत देवाची उपासना न करता इस्त्राएली लोक कनानी देवतांची पूजा करू लागले. इस्त्राएलांस राजा नव्हता, म्हणून प्रत्येक जण आपल्या दृष्टिने जे बरे ते तो करत असे.
इस्त्राएलांनी सतत देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे, देवाने त्यांना त्यांच्या शत्रूंच्या पुढे पराभूत करून शिक्षा दिली. ह्या शत्रुंनी इस्त्राएल लोकांची वस्तूंची चोरी केली, त्यांच्या संपत्तीचा नाश केला व त्यांच्यातील कित्येकांना मारून टाकले. अनेक वर्षानंतर देवाचा आज्ञाभंग व शत्रूद्वारे जुलूम सोसून झाल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला व त्यांनी सुटकेसाठी देवाकडे धाव घेतली.
मग देवाने त्यांना एक तारणारा पाठविला ज्याने त्यांना शत्रूंपासून सोडविले व त्यांच्या मध्ये शांती प्रस्थापित झाली. पण नंतर इस्त्राएल लोकांना देवाचा विसर पडला व ते पुन्हा मूर्तिपूजा करू लागले. मग देवाने शेजारच्या मिद्यांनी लोकांद्वारे त्यांचा पराभव केला.
मिद्यांनी लोकांनी सात वर्षे इस्त्राएल लोकांचे अन्न - धान्य हडप केले. आता इस्त्राएली खूप भयभीत झाले व आपण मिघान्यांच्या हातामध्ये सापडू नये म्हणून ते गुहेमध्ये राहू लागले. शेवटी आपला बचाव व्हावा म्हणून ते देवाकडे विनवणी करू लागले.
एके दिवशी गिदोन नावाचा एक इस्त्राएली मनुष्य मिद्यान्यांनी आपले धान्य चोरू नये म्हणून गुप्तपणे त्याची झोडणी करीत होता. यहोवाचा एक दूत येऊन त्याला म्हणाला, ‘‘हे बलवान वीरा, देव तुझ्याबरोबर आहे. जा आणि इस्त्राएलाला मिद्यान्यांच्या हातातून सोडव’’
गिदोनाच्या पित्याने एका मूर्तीसाठी वेदी बनवली होती. देवाने गिदोनास ती वेदी तोडण्यास सांगितले. परंतु गिदोनास लोकांचे भय वाटल्यामुळे तो अंधार पडण्याची वाट पाहत होता. मग त्याने ती वेदी फोडून तिचे तुकडे तुकडे केले. मुर्तीसाठी बांधलेल्या वेदीजवळ त्याने जीवंत देवासाठी एक नवीन वेदी बांधली व त्यावर देवाला पशूबली अर्पण केला.
दुस-या दिवशी त्या वेदीचा कोणीतरी नाश केला आहे हे पाहून लोक खूप रागावले. ते गिदोनास जीवे मारण्यासाठी त्याच्या घरी गेले, पण गिदोनाचा पिता त्यांस म्हणाला, ‘‘तूम्ही आपल्या देवाची मदत करण्याचा प्रयत्न का करता? जर तो देव आहे तर त्याला स्वत:चे रक्षण करु द्या!’’ त्याने असे म्हटल्यामुळे त्यांनी गिदोनास मारिले नाही.
मग मिद्यानी लोक पुन्हा इस्त्राएल लोकांचे धान्य चोरी करण्यासाठी आले. ते इतके पुष्कळ होते की, ते मोजण्याच्या पलीकडे होते. गिदोनाने इस्त्राएल लोकांस एकत्र बोलावून मिद्यान्यांशी युध्द करण्यास तयार केले. गिदोनाने देव आपणास इस्त्राएल लोकांची सुटका करण्यासाठी उपयोग करणार आहे याची खा़त्री पटावी म्हणून देवाकडे दोन चिन्हे मागितली.
पहिले चिन्ह म्हणून गिदोनाने जमिनीवर कपडा ठेवला व देवाला म्हटले की उद्या सकाळी जमिनीवर दहिवर न पडता फक्त कापडावरच पडावे असे होवो. देवाने तसेच केले. दुस-या रात्री, त्याने म्हटले की जमीन भिजावी पण कपडा सुकाच रहावा असे होवो. देवाने तेही केले. हया दोन्ही चिन्हांद्वारे गिदोनास खात्री पटली की देव त्याचा उपयोग इस्त्राएलाला मिद्यान्यांपासून सोडविण्यासाठी उपयोग करणार आहे.
32,000 इस्त्रायली सैनिक त्याच्याकडे आले, परंतु देवाने त्याला सांगितले की, ते खूप आहेत. म्हणून युध्द करण्यास भिणा-या 22000 सैनिकांना त्याने परत पाठविले. देवाने गिदोनास सांगितले की ते अजूनही पुष्कळ आहेत. म्हणून 300 सैनिकांना सोडून बाकी सर्वांना त्याने घरी पाठवून दिले.
त्या रात्री देवाने गिदोनास सांगितले,‘‘तू मिद्यान्यांच्या छावणीकडे जा व ते काय बोलतात हे ऐकून भयभित होऊ नकोस.’’ म्हणून त्या रात्री तो छावणीकडे गेला व आपणास पडलेले स्वप्न एक मिद्यानी सैनिक आपल्या मित्रास सांगत असल्याचे गिदोनाने ऐकले. त्या सैनिकाचा मित्र म्हणाला,‘‘ हया स्वप्नाचा अर्थ गिदोनाचे सैन्य मिद्यानी सैन्यांचा पराभव करील असा होतो!’’ गिदोनाने हे ऐकून देवाची उपासना केली.
मग गिदोन आपल्या सैनिकांकडे परतला व त्याने प्रत्येकास एक शिंग, एक मडके व एक मशाल दिली. मिद्यानी सैनिक झोपले होते त्या छावणीस त्यांनी घेरा घातला. गिदोनाच्या 300 सैनिकांनी आपल्या मशाली मडक्यात घालून ठेवल्यामुळे मिद्यान्यांना त्यांचा प्रकाश दिसला नाही.
मग, एकाच वेळी गिदोनाच्या सैनिकांनी मडकी फोडली व आपल्या मशालीचा जाळ दिसू दिला. त्यांनी आपापली रणशिंगे फूंकली व गर्जना केली,‘‘याव्हे देवाची तलवार व गिदोनाची तलवार!’’
देवाने मिद्यान्यांना गोंधळून टाकले व त्यामुळे ते आपसांतच एकमेकांवर हल्ले करु लागले व मारु लागले. लगेच, मिद्यान्यांना हाकलण्यासाठी मदत करायला म्हणून बाकीच्या इस्राएली लोकांना त्यांच्या घरी बोलावणे पाठवले गेले. त्यांनी त्यांपैकी कित्येकांना जीवे मारिले व बाकीच्यांना इस्त्राएलाच्या भूमितून घालवून दिले. त्याच दिवशी 120000 मिद्यांनी सैनिक मारले गेले. देवाने इस्त्रायलाची अशा प्रकारे सुटका केली.
लोक गिदोनास आपला राजा बनवू पहात होते. गिदोनाने त्यांना असे करण्यास मना केले, पण त्यांच्यातील प्रत्येकाने मिद्यान्यांकडून घेतलेल्या सोन्याच्या अंगठयांपैकी कांही त्याने मागितल्या. लोकांनी गिदोनास पुष्कळ सोने दिले.
मग गिदोनाने त्या सोन्यापासून महायाजक घालत असलेल्या वस्त्रासारखे एक विशेष वस्त्र तयार केले. परंतू लोकांनी त्या वस्त्रास एक मूर्ती मानून तिची पूजा ते करु लागले. मग देवाने इस्त्रायलांस पुन्हा शासन केले, कारण त्यांनी मूर्तिपूजा केली होती. देवाने त्यांच्या शत्रूंना त्यांचा पराभव करु दिला. शेवटी त्यांनी देवाचीच मदत मागितली व देवाने त्यांना दुसरा तारणारा पाठविला.
हया नमुन्याची अनेकदा पुनरावृत्ती झाली. इस्त्रायली पाप करत, देव त्यांना शासन करी, ते पश्चात्ताप करत आणि देव त्यांचे तारण करण्यासाठी तारणारा पाठवत असे. अनेक वर्षांपासून, देवाने इस्त्राएली लोकांकडे त्यांना शत्रूंपासून सोडविण्यासाठी अनेक तारणारे पाठविले.
शेवटी, लोकांनी इतर राष्ट्रांसारखा राजा देवाकडे मागितला. त्यांना उंच, सशक्त व युद्धामध्ये नेतृत्व करणारा असा राजा हवा होता. देवाला हे आवडले नाही, तरीही त्याने त्यांच्या मागणी नुसार त्यांना एक राजा दिला.
बायबल कथा : शास्ते 1 -3; 6 - 8
17. देवाच्या दाविदाबरोबर करार
शौल इस्त्रायलचा पहिला राजा होता. इस्राएल लोकांना पाहिजे तसाच तो सुंदर व ऊंच होता. इस्त्राएलावर काही वर्षे शौल राजाने चांगले राज्य केले. परंतु नंतर तो एक दुष्ट राजा बनला व त्याने देवाची आज्ञा मानली नाही, म्हणून देवाने त्याच्या जागी राज्य करण्यासाठी दुस-या मनुष्यास नेमले.
देवाने शौलानंतर दाविद नावाच्या एका इस़्त्रायली तरुणांस राजा होण्यास निवडले. दाविद हा बेथलेहेम नगरातील एक मेंढपाळ होता. आपल्या पित्याची मेंढरे चारीत असताना दाविदाने अनेकदा मेंढरांवर हल्ला करणा-या सिंह व अस्वलास जीवे मारिले होते. दाविद हा देवाचे भय बाळगणारा नम्र व धार्मिक पुरुष होता.
दाविद एक महान योद्धा व पुढारी झाला. दाविद लहान असतानाच त्याने गल्याथ नावाच्या एका राक्षसी मुनष्याबरोबर युद्ध केले. गल्याथ हा एक प्रशिक्षित, बलाढय व तीन मीटर उंचीचा सैनिक होता! परंतू देवाने दाविदाचे सहाय्य केले व त्याच्याकरवी गल्याथाचा वध करुन इस्त्रायल लोकांस सोडविले. त्यानंतर दाविदाने इस्राएलाच्या शत्रूंवर अनेक विजय मिळविले त्यामुळे लोकांनी त्याची प्रशंसा केली.
लोक दाविदाची प्रशंसा करत असेलेले पाहूल शौलाला त्याचा हेवा वाटू लागला. शौलाने अनेकदा त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण दाविदाने स्वत:स शौलापासून लपविले. एके दिवशी शौल दाविदास मारण्यासाठी शोधीत होता. दाविद लपून बसलेल्या गुहेमध्ये शौल गेला, परंतू शौलाला तो दिसला नाही. दाविद आता शौलाच्या अगदी जवळ होता व तो त्याला मारु शकत होता, पण त्याने तसे केले नाही. त्याऐवजी, दाविदाने शौलाच्या वस्त्राचा काठ कापला व सिद्ध केले की राजा बनण्यासाठी तो शौलाचा वध करणार नाही.
शेवटी, शौल युद्धात मरण पावला आणि दाविद इस्त्रायलाचा राजा झाला. तो खूप चांगला राजा होता व लोक त्याजवर प्रेम करत. देवाने दाविदास आर्शिवादीत केले व तो यशस्वी झाला. दाविदाने अनेक युद्ध केले व देवाने त्यास इस्त्रायलांच्या शत्रूस पराजित करण्यास सहाय्य केले. दाविदाने यरुशलेम जिंकली व तिला आपली राजधानी बनविली. दाविदाच्या कारकीर्दीत इस्त्रायल सामर्थ्यवान व श्रीमंत राष्ट बनले.
दाविदाला एक मंदिर बांधावयाचे होते ज्यामध्ये सर्व इस्राएल लोक देवाची उपासना व अर्पणे करु शकतील. जवळजवळ 400 वर्षे लोक मोशेने बांधलेल्या दर्शन मंडपाच्या समोर देवाची उपासना करत व अर्पणे आणत.
परंतु देवाने नाथान संदेष्ट्यास दाविदाकडे संदेश घेऊन पाठविले,‘‘ तू लढाईचा माणुस असल्यामुळे हे मंदिर बांधू शकत नाही.’’ तूझा पुत्र ते मंदिर बांधील. परंतू मी तुला खूप आशीर्वादीत करीन. तुझ्याच वंशातील एक पुरुष माझ्या लोकांवर सर्वकाळ राज्य करील!’’ सर्वकाळ राज्य करणारा दाविदाच्या वंशातील एकमेव पुरुष म्हणजे मशिहा.’’ मशिहा हा देवाचा निवडलेला अभिषिक्त जगातील लोकांना त्यांच्या पापांपासून सोडविणारा होता.
दाविदाने हे शब्द ऐकल्यावर लगेच देवाचा धन्यवाद केला व त्याची स्तूती केली, कारण देवाने त्याला हा सन्मान व पुष्कळ आशीर्वाद देण्याचे अभिवचन दिले होते. देव हे कधी पूर्ण करील याविषयी दाविदास कल्पना नव्हती. परंतु मशिहा येण्याच्या अगोदर इस्त्रायली लोकांना जवळ जवळ 1000 वर्षे त्याची वाट पाहावी लागली.
दाविदाने न्यायाने व विश्वासूपणाने अनेक वर्षे राज्य केले व देवाने त्यास आशीर्वादित केले. तथापि, त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याने देवाविरुध्द भयंकर पाप केले.
एके दिवशी दाविदाचे सर्व सैन्य युद्धासाठी बाहेर गेले असताना, त्याने आपल्या राजमहालातून एक सुंदर स्त्री स्नान करीत असताना पाहिली. तिचे नाव बथशेबा होते.
दुसरीकडे बघण्याऐवजी, दाविदाने त्या स्त्रीस आपणाकडे आणावे म्हणुन कोणालातरी पाठवले. तो तिच्यापाशी निजला व तिला तिच्या घरी पाठवून दिले. काही काळानंतर आपण गरोदर असल्याचा निरोप तिने दाविदास पाठविला.
बथशेबाचा पती उरीया हा दाविदाचा शूर योद्धा होता. दाविदाने उरीयास युद्धातून परत बोलावले व आपल्या पत्नी बरोबर राहण्यास सांगितले. परंतु दूसरे सैनिक युद्ध करत असताना आपण घरी जाणे योग्य नव्हे असे समजून त्याने घरी जाण्यास नकार दिला. म्हणून दाविदाने उरीयास परत युद्धामध्ये पाठविले व सेनापतीस सांगितले की त्याने तुंबळ युद्धाच्या ठिकाणी उरीयाची नेमणूक करावी म्हणजे उरीया युद्धात मारला जाईल.
उरीया मेल्यानंतर दाविदाने बथशेबाशी लग्न केले. नंतर तिने दाविदाच्या पुत्रास जन्म दिला. दाविदाने केलेल्या कृत्याबद्दल देवाचा क्रोध भडकला, व त्याने नाथान संदेष्टयाला दाविदाकडे पाठवून त्याचे पाप किती दुष्ट होते याविषयी सांगितले. दाविदाने आपल्या पापाविषयी पश्चात्ताप केला आणि देवाने त्यास क्षमा केली. नंतर मरेपर्यंत दाविदाने अगदी कठिण प्रसंगी देखिल देवाच्या आज्ञा पाळल्या.
परंतु पापाची शिक्षा म्हणून दाविदाचा पुत्र मरण पावला. दाविदाच्या उरलेल्या जीवनात त्याच्या कुटुंबात नंतर भांडणे होत राहिली व त्याचे सामर्थ्यही खुप कमी झाले. जरी दाविद देवाशी अविश्वासू राहिला होता तरीही देव आपले वचन पाळण्यासाठी दाविदाशी विश्वासू राहिला. नंतर दाविद व बथशेबा यांना आणखी एक पुत्र झाला, आणि त्यांनी त्याचे नाव शलमोन असे ठेवले.
बायबल कथा :// 1 // शमूवेल 10; 15-19; 24; 31; 2 शमूवेल 5 : 7; 11 - 12
18. राज्याची विभागणी
ब-याच वर्षानंतर, दाविद मरण पावला आणि त्याचा पुत्र शलमोन हा इस्त्राएलवर राज्य करु लागला. देवाने शल्मोनास दर्शन दिले व त्यास सर्वात अधिक काय हवे आहे असे विचारले. जेंव्हा शल्मोनाने बुद्धि मागितली तेंव्हा देव त्याच्यावर प्रसन्न झाला व त्याने त्याला जगातील सर्वांत ज्ञानी मनुष्य बनविले. शल्मोन अनेक गोष्टी शिकला व तो एक सुज्ञ न्यायाधीश झाला. देवाने त्यास खूप श्रीमंतही बनविले.
आपला बाप दाविद याच्या योजनेप्रमाणे व त्याने जमविलेल्या साधन सामग्रीने शल्मोनाने यरुशलेममध्ये एक मंदिर बांधले. लोक दर्शनमंडपासमोर उपासना न करता आता मंदिरामध्ये देवाची उपासना व अर्पण करु लागले. देव मंदिरात आला व त्याची उपस्थिती त्या मंदिरामध्ये होती, आणि देव आपल्या लोकांमध्ये वस्ती करु लागला.
परंतू शल्मोनाने परराष्ट्रीय स्त्रीयांवर प्रेम केले. त्याने अनेक स्त्रियांशी विवाह करुन देवाची आज्ञा मोडिली. त्याने 1000 स्त्रियांशी विवाह केला! त्यापैकी अनेक स्त्रिया परराष्ट्रीय होत्या त्यांनी आपली दैवते बरोबर आणिली व त्यांची पूजा करणे चालू ठेवले. शल्मोन वृद्ध झाल्यानंतर त्यानेही त्यांच्या दैवतांची पूजा केली.
देव शल्मोनाने केलेल्या कृत्यांविषयी त्याजवर कोपला. त्याच्या हया अविश्वासूपणाबद्दल देवाने त्यास शासन केले. देवाने शल्मोनाच्या मृत्यूनंतर इस्त्रायलाच्या राज्याचे दोन भाग केले.
शल्मोनाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र रहोबाम हा राजा झाला. रहोबाम हा मूर्ख मनुष्य होता. इस्त्रायल राष्ट्रातील सर्व लोक त्याला राजा म्हणून मान्यता देऊन त्याचा राज्याभिषेक करण्यास एकत्र आले. त्यांनी रहोबामाकडे तक्रार केली की, शल्मोनाने त्यांना खूप परिश्रम करण्यास भाग पाडले व जास्त प्रमाणात कर वसूल केला.
रहोबामाने मूर्खपणाने उत्तर दिले,‘‘तुम्हांस वाटले असेल की माझा पिता शल्मोन हयाने तुमच्याकडून परिश्रम करुन घेतले, परंतु मी तर त्याहीपेक्षा अधिक परिश्रम तुमच्याकडून करुन घेईन व तुमच्याशी क्रूरतेने वागेन.’’
इस्त्राएल राष्ट्राच्या दहा गोत्रांनी एकत्र येऊन रहोबामाविरुद्ध बंड पुकारले. केवळ दोनच गोत्रे त्याच्याशी विश्वासू राहिली. ही दोन गोत्रे मिळून यहूदाचे राज्य झाले.
इस्राएल राष्ट्राच्या अन्य दहा बंडखोर गोत्रांनी यरुबाम नावाच्या मनुष्यास आपला राजा म्हणून नेमले. त्यांनी उत्तरेच्या भागात आपल्या राज्याची स्थापना केली व त्यांस इस्त्रायलचे राज्य असे संबोधण्यात आले.
यराबामाने देवाविरुध्द बंड पुकारले व लोकांना पापात पाडिले. यहूदाच्या राज्यामध्ये असलेल्या देवाच्या मंदिरात उपासना न करता त्याने आपल्या लोकांसाठी दोन मूर्ति स्थापन केल्या व त्यांची पूजा करु लागल्या.
यहूदाचे राज्य व इस्त्रायलचे राज्य एकमेकांचे शत्रू झाले व त्यांच्यामध्ये नेहमी लढाया होऊ लागल्या.
इस्त्रायलाच्या नवीन राज्यामध्ये, सर्वच राजे दुष्ट होते. त्यांपैकी बहुतेक राजांचा वध अन्य इस्त्राएल लोकांनीच केला जे त्यांच्या जागी राज्य करु पाहात होते.
सर्व राजे व इस्त्रायलाच्या राज्यातील बहुसंख्य प्रजा मूर्तींची पूजा करु लागले. त्यांच्या हया मूर्तिपूजेमध्ये बहुधा व्यभिचार व नरबली (बालकांचे अर्पण) यांचा समावेश होता.
यहूदाचे राजे हे दाविदाच्या वंशातील होते. त्यांपैकी काही राजे चांगले होते. त्यांनी न्यायाने राज्य केले व ख-या देवाची उपासना केली. परंतु यहूदाच्या राजांपैकी अनेक राजे दुष्ट होते. त्यांनी भ्रष्ट होऊन मूर्तिपूजा केली. त्यापैकी काही राजांनी तर स्वत:च्या मुलांचेही अर्पण खोटया देवांसाठी केले. यहूदाच्या राज्यातील बहुसंख्य प्रजेने ही देवाविरुध्द बंड करुन अन्य दैवतांची पूजा केली.
बायबल कथा :1 राजे 1 - 6; 11 - 12
19. संदेष्ट्ये
इस्त्रायलाच्या संपूर्ण इतिहासामध्ये, देवाने त्यांच्याकडे संदेष्ट्ये पाठविली. संदेष्ट्ये देवाकडून संदेश ऐकत व तो लोकांपर्यंत पोहचवित असत.
जेंव्हा अहाब इस्राएल राज्याचा राजा होता तेंव्हा एलीया हा संदेष्टा होता. अहाब हा एक दुष्ट राजा होता व त्याने लोकांस बालदेवाची उपासना करावयास प्रोत्साहित केले. एलीया अहाबास म्हणला,‘‘जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इस्त्रायलमध्ये पाऊस पडणार नाही.’’ हे ऐकून अहाबाला खूप राग आला.
अहाब एलीयास जीवे मारु इच्छीत होता म्हणून देवाने एलीयास जंगलातील एका ओहोळाजवळ लपून राहाण्यास सांगितले. प्रत्येक दिवशी सकाळी व संध्याकाळी, पक्ष्यांच्या द्वारे देवाने त्यास भोजन पुरविले. अहाब व त्याचे सैन्य एलीयास शोधत होते, पण त्यांना तो सापडला नाही. दुष्काळ एवढा भयानक होता की शेवटी तो ओहोळही आटला.
म्हणून एलीया शेजारच्या देशामध्ये गेला. त्या देशात राहणारी एक विधवा व तिचा मुलगा यांच्याकडे असणारी अन्नसामग्री दुष्काळामुळे संपत आली होती. परंतु त्यांनी एलीयाची काळजी घेतली, म्हणून देवाने त्यांच्या गरजा पूर्ण केल्या व त्यांच्या डब्यातले पीठ व कुप्पीतील तेल कधीच संपले नाही. संपूर्ण दुष्काळ संपेपर्यंत त्यांच्याकडे अन्न उपलब्ध होते. एलीया त्या ठिकाणी पुष्कळ वर्षे राहिला.
साडेतीन वर्षानंतर देवाने एलीयास इस्त्रायलच्या राज्यात जाऊन देव आता पाऊस पाठविणार आहे याची अहाब राजासमोर घोषणा करावयास सांगितली. जेव्हा अहाबाने एलियास पाहिले तेंव्हा तो म्हणाला,‘‘ तूच तो छळणारा ना!” एलियाने त्यास उत्तर दिले,‘‘तूच छळणारा आहेस ! तू आपला खरा देव याव्हे यास सोडून बालदेवतेची पूजा केली आहेस. इस्त्रायल राज्याच्या सर्व लोकांना कर्मेल डोंगरावर घेऊन ये.’’
तेंव्हा इस्त्रायलाच्या राज्यातील सर्व लोक, बालदेवतेच्या 450 संदेष्टयांसहित कर्मेल डोंगराकडे आले. एलीया लोकांस म्हणाला,‘‘तुम्ही किती वेळ आपले मन बदलत राहणार ? जर याव्हे हा खरा देव असेल तर त्याचीच सेवा करा! जर बाल देव असेल, तर त्याची सेवा करा!”
मग एलीया बालदेवतांच्या संदेष्टयांस म्हणाला,‘‘एक बैल मारा व अर्पण तयार करा, पण त्यास आग लावू नका. मीही तसेच करीन. जो देव अग्निच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा देव.’’ अशा प्रकारे बालदेवतेच्या याजकांनी होमार्पण तयार केले पण त्यास आग लावली नाही.
मग बालदेवतेचे संदेष्टये प्रार्थना करु लागले,‘‘बालदेवता, आमचे ऐका!’’ ते दिवसभर प्रार्थना करत व ओरडत होते, त्यांनी स्वत:ला चाकूने कापलेही तरीही त्यांना उत्तर मिळाले नाही.
शेवटी संध्याकाळच्या वेळी एलियाने देवासाठी होमार्पण तयार केले. मग त्याने लोकांस बारा घागरी(पाणी भरण्याचे मोठे भांडे) पाणी त्या होमबलीवर व इंधनावर ओतण्यास सांगितले. इतके की होमबली व इंधन व वेदी भोवतालची जमीन सुद्धा पूर्णपणे भिजली.
मग एलीयाने प्रार्थना केली,‘‘हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या देवा, इस्त्रायलामध्ये तूच देव आहेस व मी तुझा सेवक आहे हे सर्वांस दाखव. मला उत्तर दे म्हणजे तूच खरा देव आहेस अशी या लोकांना खात्री पटेल.”
तेंव्हा परमेश्वरापासून अग्नि उतरला आणि त्याने होमबली, इंधने, धोंडे आणि माती आणि त्या खळग्यातले पाणी सुद्धा भस्म करुन टाकले. हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, परमेश्वर (याव्हे) हाच देव ! परमेश्वर हाच देव!’’
तेंव्हा एलीया त्यांस म्हणाला,‘‘बआलाच्या संदेष्टयांस पकडा; त्यातल्या एकासही निसटून जाऊ देऊ नका !’’ तेंव्हा त्यांनी त्यांस पकडिले; आणि त्यास दूर नेऊन त्यांस जीवे मारिले.
मग एलीया अहाब राजास म्हणाला,‘‘लवकर नगरास जा कारण पाऊस येत आहे.’’ लगेच आकाशामध्ये काळे ढग जमा होऊन मुसळधार पाऊस पडू लागला. याव्हे देवाने अशाप्रकारे दुष्काळ संपवला आणि आपणच खरा देव आहे हे सिद्ध केले.
एलीया नंतर देवाने अलीशा नावाच्या मनुष्यास आपला संदेष्टा म्हणुन नेमले. देवाने अलीशाद्वारे अनेक चमत्कार केले. एक चमत्कार शत्रुचा सेनापती नामान, याच्यासाठी झाला, त्याला एक भयंकर चर्मरोग होता. त्याने अलीशाविषयी ऐकले होते म्हणून तो त्याच्याकडे गेला व आपणास बरे करा अशी विनंती केली. अलीशाने नामानास यार्देन नदीमध्ये सात वेळा डुबकी मारण्यास सांगितले.
सुरुवातीस नामानास राग आला व असे करण्यास तो तयार झाला नाही, कारण ते त्याला मूर्खपणाचे वाटले. परंतु नंतर त्याने आपले मन बदलले व त्याने यार्देन नदीमध्ये जाऊन सात वेळा डुबकी मारली. जेंव्हा सातव्या वेळी त्याने डुबकी मारली तेंव्हा त्याचे कोड पूर्णपणे बरे झाले! देवाने त्याला बरे केले होते.
देवाने अन्य संदेष्टयेही पाठविले. त्या सर्वांनी लोकांना मूर्तीपूजा बंद करा आणि दुस-यांना न्याय व दया दाखवा असे सांगितले. संदेष्टयांनी त्यांना इशारा दिला की जर त्यांनी आपला वाईट मार्ग सोडून देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत तर देव त्यांना दोषी ठरवून त्यांना शिक्षा करील.
पुष्कळ वेळा लोकांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी वारंवार संदेष्टयांचा अपमान केला व कधी कधी त्यांस जीवे मारिले. एकदा त्यांनी यिर्मया संदेष्टयास मरण्यानाठी कोरड्या विहिरीमध्ये ढकलून दिले. विहिरीच्या तळाशी असलेल्या गाळामध्ये तो रुतला, परंतु नंतर राजाला त्याची दया आली व तो मरण्यापुर्वी त्याला बाहेर काढण्याची त्याने त्याच्या सेवकांना आज्ञा दिली.
जरी लोक त्यांचा द्वेष करत होते, तरी संदेष्टये देवासाठी बोलत राहिले. त्यांनी लोकांस सावधानतेचा इशारा दिला की जर त्यांनी पश्चाताप केला नाही तर देव त्यांचा नाश करील. देवाच्या अभिवचना प्रमाने मशीहा (ख्रिस्त) येणार आहे याचीही त्यांनी लोकांना आठवण करुन दिली.
बायबल कथा :1 राजा 16 - 18; 2 राजा 5 ; यिर्मया 38
20. पाडाव आणि सुटका
इस्त्रायलाचे राज्य व यहूदाचे राज्य या दोहोंनीही देवाविरुध्द पाप केले. देवाने त्यांच्याशी सिनाय पर्वतावर केलेला करार त्यांनी तोडला. देवाने त्यांनी पश्चाताप करावा व देवाकडे वळावे म्हणून भविष्यवक्ते पाठविले, परंतु त्यांनी आज्ञा मानण्याचे त्यांनी नाकारले.
म्हणून देवाने त्या दोन्ही राज्यांना शिक्षा दिली, त्यांच्या शत्रूंना त्यांचा नाश करु दिला. अश्शूर हया दुष्ट व शक्तिशाली राष्ट्राने इस्त्रायलाचा नाश केला. अश्शूरी लोकांनी इस्त्रायलाच्या अनेक लोकांस जीवे मारिले, मौल्यवान वस्तूंची लूटालूट केली व देशाचा बराच भाग जाळून टाकला.
अश्शूरी लोकांनी सर्व नेत्यांस, श्रीमंतांस व कुशल कारागिरांस एकत्र करुन आपल्या देशामध्ये नेले. केवळ फार गरीब इस्त्रायल लोक जे युद्धमध्ये मारले गेले नाहीत, तेच इस्त्रायलमध्ये शिल्लक राहिले.
तेंव्हा अश्शूराने इस्त्रायल राहत असलेल्या ठिकाणी परराष्ट्रीय लोकांस वस्ती करण्यासाठी आणिले. परराष्ट्रीयांनी नाश झालेल्या शहरांची पुनर्बांधणी केली व इस्त्रायली स्त्रियांशी विवाह केला. इस्त्रायली वंशातील ज्या लोकांनी परराष्ट्रीयांशी विवाह केला त्यांना शोमरोनी म्हणण्यात आले.
यहूदा राज्यातील लोकांनी पाहिले की, इस्त्रायल राज्यातील लोकांना अविश्वास व आज्ञा मोडल्यामुळे देवाने कशाप्रकारे शासन केले आहे. पण तरीही त्यांनी मूर्तिपूजा केली व कनानी दैवतांचीही उपासना केली. देवाने इशारा देण्यासाठी त्यांच्याकडे संदेष्टये पाठविले, पण त्यांनी त्यांचे ऐकले नाही.
सुमारे 100 वर्षांनंतर जेंव्हा अश्शूराने इस्त्रायल राज्याचा नाश केला, तेंव्हा देवाने यहूदाच्या राज्यावर हल्ला करण्यासाठी नबुखद्नेस्सर हया बाबेलच्या राजास पाठविले. बाबेल हे एक शक्तिशाली राष्ट्र होते. यहूदाचा राजा नबुखद्नेस्सराचा सेवक बनण्यास तयार झाला व प्रतिवर्षी मोठया प्रमाणात पैसे देण्यासही तयार झाला.
परंतु काही वर्षांनंतर यहूदाच्या राजाने बाबेल विरुध्द बंड पुकारले. म्हणून बाबेलच्या लोकांनी परत येऊन यहूदाच्या राज्यावर चढाई केली. त्यांनी यरुशलेम शहर ताब्यात घेतले, मंदिराचा नाश केला व शहरातील व मंदिरातील सर्व संपती घेऊन गेले.
यहूदाच्या राजाच्या हया बंडखोरपणाबद्दल शासन म्हणून नबुकखद्नेस्सरच्या सैनिकांनी यहूदाच्या राजाच्या मुलांचा त्याच्या समोर वध केला व यहूदाच्या राजाचे डोळे फोडून त्यास आंधळे केले. त्यानंतर त्यांनी त्यास मरण्यासाठी बाबेल येथील तुरुंगात ठेवले.
नबुखद्नेस्सर व त्याच्या सैनिकांनी यहूदाच्या राज्यातील जवळ जवळ सर्वच लोकांना बाबेलमध्ये आणले केवळ फार गरीब इस्त्रायल लोकांनाच शेती करण्यासाठी मागे ठेवले. हयाच कालावधित जेंव्हा देवाच्या लोकांस वचनदत्त देश सोडून जाण्यास सक्ति करण्यात आली, त्यास पाडाव- हद्दपारी असे म्हणतात.
जरी देवाने आपल्या लोकांचा त्यांच्या पापांमुळे त्यांचा पाडाव होऊ दिला तरीही तो त्यांना व त्याने दिलेले वचन विसरला नाही. देवाची आपल्या लोकांवर कृपादृष्टी होती व संदेष्टयांच्या द्वारे तो त्यांच्याशी बोलत असे. त्याने त्यांना आश्वासन दिले की, सत्तर वर्षांनंतर तो त्यांना परत वचनदत्त देशात घेऊन येईल.
त्यानंतर सुमारे सत्तर वर्षांनी पारसाचा राजा कोरेश हयाने बाबेलचा पराभव केला व बाबेलच्या राज्याच्या जागी पारसाचे राज्य आले. इस्त्रायली लोक आता यहूदी या नावाने ओळखले जाऊ लागले व त्यांच्यापैकी पुष्कळ लोक आपल्या आयुष्यभर बाबेलमध्येच राहिले. केवळ थोडयाशा वयोवृध्द यहूद्यांनाच यहूदी राज्याचे स्मरण होते.
पारसाचे साम्राज्य शक्तिशाली होते, परंतु आपण पराभूत केलेल्या लोकांविषयी ते दयाळू होते. कोरेश पारसाचा राजा झाल्यानंतर लगेच त्याने फर्मान काढले की जर कोणी यहूदी यहूदामध्ये परत जाऊ इछितो तर त्याला तसे करण्याची परवानगी आहे. त्याने त्यांना मंदिराचे पुन्हा बांधकाम करण्यासाठी पैसाही पुरविला. अशा प्रकारे सत्तर वर्षाचा हद्दपारी संपवून यहूद्यांचा छोटा समूह यहूदातील यरुशलेमेस परतला.
यरुशलेमेस आल्यानंतर त्यांनी मंदिराचे पुनर्वसन केले व शहराच्या वेशी पुन्हा बांधल्या. जरी अद्याप त्यांच्यावर अन्य लोकांचे वर्चस्व होते, तरी आता पुन्हा एकदा वचनदत्त देशामध्ये ते राहू लागले व मंदिरामध्ये देवाची उपासना करु लागले.
A Bible story from: 2 _ राजा 17; 24-25; 2 इतिहास 36; एज्रा 1-10; नहेम 1-13_
21. देव मशीहा पाठवण्याचे अभिवचन देतो
आरंभापासूनच, देवाने मशीहाला पाठविण्याची योजना बनविली होती. मशीहा संबंधीचे अभिवचन सर्वप्रथम आदाम व हव्वा यांच्याकडे आले. देवाने वचन दिले की हव्वेला जे संतान होईल ते सापाचे डोके फोडील. ज्या सापाने हव्वेस फसविले तो सैतान होता. हया अभिवचनाचा अर्थ असा होता की मशीहा सैतानास पूर्णपणे पराजित करील.
देवाने अब्राहामास असे वचन दिले की त्याच्या द्वारे जगातील सर्व कुळे आशीर्वादीत होतील. पुढे भविष्यात मशीहा आल्यानंतर हया अभिवचनाची पुर्तता होणार होती. तो प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक गटाच्या लोकांचे तारण होणे शक्य करील.
देवाने मोशेस वचन दिले होते की भविष्यामध्ये तो मोशेसारखाच एक संदेष्टा तयार करील. हे मशीहाविषयीचे दुसरे अभिवचन होते. जे काही काळानंतर पूर्ण होणार होते.
देवाने दाविद राजास अभिवचन दिले की त्याच्याच वंशातील एक जण देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करील. त्याचा अर्थ असा होता की मशीहा हा दाविदाच्याच घराण्यात जन्मास येणार होता.
यिर्मया संदेष्टयाच्या द्वारे, देवाने वचन दिले की तो एक नवा करार करणार आहे, परंतु तो सिनाय पर्वतावर इस्राएलांबरोबर केलेल्या करारासारखा नसेल. नव्या करारामध्ये देव आपल्या आज्ञा मनुष्यांच्या हृदयावर लिहिल, लोक देवाला वैयक्तीकरित्या ओळखतील,ते त्याचे लोक होतील आणि देव त्यांच्या अपराधांची क्षमा करील. मशीहा या नव्या कराराचा आरंभ करील.
देवाच्या संदेष्टयांनीही सांगितले होते की मशीहा हा एक संदेष्टा, याजक, आणि राजा असेल. संदेष्टा हा एक असा माणूस असतो की जो देवाचा संदेश ऐकून तो लोकांना सांगतो. देवाने अभिवचन दिलेला मशीहा हा एक परिपूर्ण संदेष्टा असेल.
इस्राएली याजक लोकांनी केलेल्या पापाच्या शिक्षेचे प्रायश्चित म्हणून देवाला होमार्पणे करत असत. याजक लोकांसाठी देवाला प्रार्थनाही करत असत. मशीहा हा एक परिपूर्ण महायाजक असणार होता जो देवाला स्वत:चे परिपूर्ण बलिदान करणार होता.
राजा म्हणजे जो लोकांवर राज्य करतो व त्यांचा न्याय करतो. आपला पूर्वज दाविद याच्या सिंहासनावर बसणारा मशीहा हा एक परिपूर्ण राजा असेल. तो संपूर्ण जगावर सर्वकाळ राज्य करील, आणि प्रामाणिकपणे न्याय करील व योग्य निर्णय घेईल.
देवाच्या भविष्यवाद्यांनी मसीहाविषयी अनेक भाकित केले होते. मलाखी संदेष्टयाने भाकित केले होते की मसिहा येण्याच्या अगोदर एक महान संदेष्टा उदयास येईल. यशया संदेष्टयाने भविष्यवाणी केली की मसिहा हा एक कुमारीच्या पोटी जन्म घेईल. मीखा संदेष्टयोन सांगितले की मसीहा बेथलेहेम नगरामध्ये जन्मास येईल.
यशया संदेष्टा म्हणाला की मशीहा गालिलमध्ये राहील, निराशामध्ये असलेल्या लोकांचे सांत्वन करील, आणि बंदिवानांना सोडवून स्वातंत्र्याची घोषणा करील. त्याने हेही सांगितले की मशीहा आजारी आंधळया, मुक्या, बहि-यांस व लंगडयांस बरे करील.
यशया संदेष्टयाने हेही भाकित केले की मशीहाचा विनाकारण द्वेश केला जाईल व त्याला नाकारले जाईल. इतर संदेष्टयांनी अगोदरच सांगून ठेवले की मशीहास मारणारे लोक त्याचे कपडे वाटून घेण्यासाठी चिठ्टया टाकतील आणि मशीहाचा एक मित्रच त्याचा विश्वासघात करिल. जख-या संदेष्टयाने अगोदरच सांगून ठेवले होते की मशीहाचा विश्वासघात करण्यासाठी त्याच्या मित्रास वेतन म्हणून चांदीची तीस नाणी दिली जातील.
संदेष्टयांनी मशीहा कशा प्रकारे मरेल याचेही भविष्य केले होते. यशयाने भविष्य केले होते की लोक मशीहावर थुंकतील, त्याची थट्टा करतील व त्यास फटके मारतील. जरी त्याने काहीही वाईट केले नव्हते, तरी त्यास खिळे ठोकून भयंकर वेदनेचे पीडादायक मरण देतील.
संदेष्टयांनी हेही सांगितले की मशीहा परिपूर्ण व निष्पाप असेल. तो अन्य लोकांच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून मरेल. त्याची शिक्षा मुनष्य आणि परमेश्वर यांमध्ये समेट घडवून आणिल. हया कारणास्तव, मशीहास ठेचावे ही देवाची इच्छा होती.
संदेष्टयांनी भविष्य केले होते की मशीहा मरेल आणि देव त्याला पुन्हा जीवंतसुद्धा करील. मशीहाच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे देव आपली योजना पूर्ण करील, पाप्यांचे तारण करुन एक नवा करार प्रस्थापित करील.
देवाने संदेष्टयांना मशीहाविषयी अनेक गोष्टी प्रकट केल्या, परंतु त्या संदेष्टयांपैकी कोणाच्याही काळामध्ये मशीहा आला नाही. देवाने संदेष्टयांना मशीहाविषयी अनेक गोष्टी प्रकट केल्या, परंतु त्या संदेष्टयांपैकी कोणाच्याही काळामध्ये मशीहा आला नाही.
बायबल कथा: उत्पत्ति //3:15; 12: 1 -3; अनुवाद 18:15; 2 शमूवेल 7; यिर्मया 31; यशचा 59:16; दानिय्येल7; मलाखी 4 : 5; यशचा 7:147; मिखा 5 : 2; यशया 9:1-7; 35 : 3-5; 61; 53; स्त्रोत 22 : 18; 35 : 19; 69 : 4; 41 : 9 जखर्या 11 : 12 - 13; यशचा 50 : 6; स्त्रोत्र __16 : 10-11//
22. योहानाचा जन्म
पूर्वीच्या काळी, देव आपल्या लोकांशी देवदूत व संदेष्टयांद्वारे बोलला. परंतु त्यानंतर 400 वर्षे तो लोकांशी बोलला नाही. अचानक एके दिवशी जख-या नावाच्या एका वयोवृध्द याजकाकडे एक देवदूत एक संदेश घेऊन आला. जख-या व त्याची पत्नी, अलीशिबा, हे धार्मिक लोक होते, पण त्यांना मुलबाळ नव्हते.
देवदूत जख-यास म्हणाला,‘‘तुझ्या पत्नीस मुलगा होणार आहे.’’ त्याचे नाव तुम्ही योहान असे ठेवा. तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन, मशीहाच्या आगमनासाठी लोकांची तयारी करील !’’ जख-याने उत्तर दिले,‘‘मी आणि माझी पत्नी आता खूप म्हातारे झालो आहोत आणि आता आम्हास मुले होऊ शकत नाहीत! हे घडेल हे कशावरुन मी समजू?’’
देवदूत जख-यास म्हणाला,‘‘तुला ही सुवार्ता सांगण्यासाठी देवाने मला पाठविले आहे. तू माझ्या वचनावर विश्वास ठेविला नाही, म्हणून बाळाचा जन्म होईपर्यंत तुला बोलता येणार नाही. लगेच, जख-या मुका झाला. तेंव्हा देवदूत जख-यास सोडून गेला. त्यानंतर जख-या घरी आला आणि त्याची पत्नी गर्भवती झाली.
जेव्हा अलीशिबा ही सहा महिन्यांची गरोदर होती, तेंव्हा तोच देवदूत अलिशिबाच्या नात्यातील मरीयेस अचानक प्रकट झाला. ती कुमारी होती व योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर तीचे वाग्दान झाले होते. देवदूत म्हणाला,‘‘तू गर्भवती होऊन तूला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव. तो परात्पर परमेश्वराचा पुत्र असून सर्वकाळ राज्य करिल.’’
मरीयाने उत्तर दिले,‘‘हे कसे होणार, मी तर कुमारी आहे?’’ देवदूताने स्पष्ट केले,‘‘पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि देवाचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. यास्तव ते बाळ पवित्र, देवाचा पुत्र असेल.’’ देवदूताने सांगितलेल्या गोष्टीवर मरीयेने विश्वास ठेविला.
देवदूताच्या भेटीनंतर लगेच मरीया अलीशिबा हीस भेटण्यास गेली. मरीयेचे हे अभिवादन ऐकताच अलीशिबेच्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली. देवाने त्यांच्यासाठी जे काही केले होते त्याविषयी दोन्ही स्त्रियांनी एकत्र आनंद केला. अलीशिबेस भेटून तीन महिन्यानंतर मरीया आपल्या घरी परतली.
अलीशिबेने आपल्या पुत्रास जन्म दिल्यानंतर, देवदूताने सांगितल्याप्रमाणे जख-या व अलीशिबेने त्याचे नाव योहान असे ठेविले. तेंव्हा देवाने जख-यास पुन्हा बोलण्याची अनुमति दिली. जख-या म्हणला,‘‘परमेश्वराची स्तुती असो, कारण त्याने आपल्या लोकांचे स्मरण ठेविले आहे! तु, माझ्या पुत्रा, तु परात्पर देवाचा एक महान संदेष्टा होशिल जो आपल्या लोकांना त्यांच्या पापांची क्षमा कशी होईल हे सांगेल!’’
बायबल कथा//: Luke 1//
23. येशूचा जन्म
मरीयेचे वाग्दान योसेफ नावाच्या एका धार्मीक पुरुषाबरोबर झाले होते. मरीया गरोदर असल्याचे ऐकून त्याला कळले की, हे बाळ त्याचे नव्हे. तो धार्मीक पुरुष असल्यामुळे मरीयेची बेअब्रु होऊ नये म्हणून त्याने गुप्तपणे तिला सोडण्याची योजना केली. त्याने असे करण्यापूर्वी, एक देवदूत त्याच्या स्वप्नामध्ये आला व त्याच्याशी बोलला.
देवदूत म्हणाला,‘‘योसेफा, मरीयेस तू आपली पत्नी म्हणून स्विकारण्यास भिऊ नकोस.ठेविल, कारण तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून सोडविल.’’ तिच्या उदरामध्ये असणारे बाळ हे पवित्र आत्म्यापासून आहे. ती एका मुलास जन्म देईल.
तेंव्हा योसेफाने मारियेशी विवाह केला व आपली पत्नी म्हणून तिचा स्विकार केला, परंतु त्या बाळाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी समागम केला नाही.
जेंव्हा बाळाचा जन्म होण्याचा समय जवळ आला, तेंव्हा रोमी सरकारने जनगणना करण्यासाठी आपापल्या गावी जाण्यास सांगितले. योसेफ आणि मरीया यांना नासरेथहून बेथलेहेम असा लांबचा प्रवास करावा लागला, कारण त्यांचा पूर्वज दाविद हा बेथलेहेम गावाचा होता.
.
बेथलेहेम येथे पोहोचल्यावर, त्यांना राहायला जागा मिळाली नाही. फक्त गुरांच्या गोठयामध्ये जागा होती ती त्यांना मिळाली. बाळाचा जन्म त्या गोठयामध्ये झाला व त्याच्या आईने त्यास गव्हाणीमध्ये ठेवले. त्यांनी त्याचे नाव येशू ठेवले.
त्या रात्री, काही मेंढपाळ आपली मेंढरे रानामध्ये राखीत होते. अचानक एक तेजस्वी देवदूत येऊन त्यांच्यासमोर प्रकट झाला, आणि ते खूप घाबरले. देवदूत म्हणाला, ‘‘भिऊ नका, कारण मी तुम्हास मोठ्या आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आज बेथलेहेम नगरामध्ये तुमच्यासाठी मशीहा, अर्थात प्रभू जन्मला आहे!’’
‘‘जा आणि बाळाचा शोध घ्या, आणि तो तुम्हास बाळंत्याने गुंडाळलेला गव्हाणीमध्ये ठेवलेला दृष्टिस पडेल.’’ अचानक, आकाशामध्ये देवदूत देवाची स्तूती करत म्हणाले,‘‘वर स्वर्गात देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या मनुष्यांवर त्याची कृपा झाली आहे त्यांस शांती!’’
मेंढपाळ लगेच येशूच्या जन्माच्या ठिकाणी पोहोचले आणि देवदूताने सांगितल्याप्रमाणे त्यांना ते बाळ गव्हाणीमध्ये ठेवलेले दृष्टीस पडले. हे पाहून त्यांना खूप आनंद झाला. मरीयेस ही खूप आनंद झाला. आपण जे पाहिले व ऐकले त्याविषयी आनंद करत मेंढपाळ आपल्या मेंढरांकडे परतले.
थोडया दिवसांनंतर, पूर्व दिशेला एक विशेष तारा ज्ञानी लोकांनी पाहिला. त्यांना समजले की, हा यहूद्यांचा एक नवा राजा जन्मास आला आहे. म्हणून त्याचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी फार मोठा प्रवास केला. ते बेथलेहेम येथे आले आणि जेथे येशू व त्याचे माता-पिता राहात होते ते घर त्यांनी शोधले.
जेव्हा त्या ज्ञानी लोकांनी येशू बाळास त्याची आई मरीया हिच्या बरोबर पाहिले तेव्हा त्यांनी त्याला नमन केले व त्याची उपासना केली. त्यांनी येशूबाळास मौल्यवान भेटवस्तू दिल्या. तेंव्हा ते आपल्या घरी परतले
बायबल कथा: मत्तय 1; लूक 2
24. योहान येशूचा बाप्तिस्मा करतो
योहान, जख-या आणि अलीशिबा यांचा पुत्र, मोठा होऊन एक संदेष्टा बनतो. तो जंगलामध्ये राहत असे, रानमध व टोळ खात असे आणि त्याची वस्त्रे ऊंटाच्या केसापासून बनविलेली होती.
योहानाचे भाषण ऐकण्यासाठी अनेक लोक जंगलामध्ये जाऊ लागले. त्याने त्यांस प्रचार केला,‘‘पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे!’’
योहानाचा संदेश ऐकून अनेक लोकांनी पश्चाताप केला आणि योहानाने त्यांना बाप्तिस्मा दिला. अनेक धार्मिक पुढारी देखील बाप्तिस्मा घेण्यासाठी आले, परंन्तु त्यांनी आपल्या पापांविषयी पश्चात्ताप केला नव्हता व आपले पाप कबूल केले नव्हते.
योहान त्या धार्मिक पुढा-यांना म्हणाला,‘‘ तुम्ही विषारी सापांनो! पश्चात्ताप करा आणि तुमची वागणूक बदला. प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही, ते तोडले जाईल व अग्निमध्ये टाकण्यात येईल. योहानाने संदेष्टयांच्या या वचनाची पूर्तता केली, ‘‘पाहा, मी आपला दूत तुझ्या पुढे पाठवित आहे, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.’’
काही यहूद्यांनी योहानाला तु मशीहा आहे की काय असे विचारले. योहान म्हणला,‘‘मी मशीहा नाही, परंतू माझ्या मागून एकजण येत आहे. तो एवढा महान आहे की, त्याच्या वहाणांचा बंद सोडण्याची देखील माझी पात्रता नाही.’’
दूस-या दिवशी येशू योहानाकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आला. योहानाने त्यास पाहून म्हटले,‘‘पाहा! जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा.’’
योहान येशूला म्हणाला, ‘‘मी तुला बाप्तिस्मा देण्यास पात्र नाही. त्याऐवजी मला तुझ्याकडून बाप्तिस्मा घेण्याची आवश्यकता आहे. परंतू येशू त्यास म्हणाला,‘‘तु मला बाप्तिस्मा दे, कारण देवाच्या दृष्टिने हे करणे योग्य आहे.’’ तेंव्हा योहानाने त्याला बाप्तिस्मा दिला, जरी येशूने काहीच पाप केले नव्हते.
जेव्हा येशू बाप्तिस्म्यानंतर पाण्यातून वर आला, तेंव्हा देवाचा आत्मा कबूतराच्या रुपामध्ये येऊन त्याच्यावर थांबला. त्याचवेळी आकाशवाणी झाली,‘‘तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुज विषयी मी फार संतुष्ट आहे.’’
देवाने योहानास सांगितले होते, ‘‘तू बाप्तिस्मा दिलेल्या ज्या व्यक्तिवर पवित्र आत्मा उतरुन येईल. तीच व्यक्ति देवाचा पुत्र. असेल’’ एकच देव आहे. परंतु जेव्हा योहानाने येशूला बाप्तिस्मा दिला, तेंव्हा त्याने देवपिता बोलत असलेला पाहिला, देवपुत्र येशू पाहिला, आणि पवित्र आत्मा पाहिला.
बायबल कथा: मत्तय //3; मार्क 1:9 - 11; लूक 3: 1 - 23//
25. येशूची सैतानाकडून परिक्षा
बाप्तिस्म्यानंतर लगेच पवित्र आत्म्याने येशूला अरण्यात नेले , त्या ठिकाणी येशू चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास करतो. तेव्हा सैतानाने तेथे येऊन येशूची परीक्षा पाहिली.
सैतानाने येशूला मोहात पाडले,‘‘जर तू खरोखर देवाचा पुत्र आहेस, तर हया दगडांस भाकरी होण्याची आज्ञा कर म्हणजे तूला जेवण मिळेल!’’
येशूने उत्तर दिले,‘‘देवाच्या वचनामध्ये असे लिहिले आहे,‘लोकांना जगण्यासाठी केवळ भाकरी नको, तर देवाच्या मुखातून निघणा-या प्रत्येक वचनाची गरज आहे!’’
मग सैतानाने येशूला घेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले,‘‘तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असे लिहीले आहे की, ‘देव आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील, आणि तुझा पाय धोंडयावर आपटू नये म्हणून ते तूला हातांवर झेलून धरतील.’’
परन्तु येशूने सैतानाला धर्मशास्त्रातूनच उत्तर दिले. तो म्हणला,‘‘देव आपल्या वचनातून आपल्या लोकांना आज्ञा देतो,‘तू आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस.’’
मग सैतानाने येशूला जगातील सर्व राज्ये व वैभव दाखविले व म्हणाला,‘‘जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे तुला देईन.’’
येयेशूने म्हटले,‘‘अरे सैताना, चालता हो! देव आपल्या वचनामध्ये लोकांस आज्ञा करितो, परमेश्वर तुझा देव हयाला नमन कर व केवळ त्याचीच उपसना कर!’’
अशा प्रकारे येशू सैतानाच्या मोहाला बळी पडला नाही, म्हणून सैतान त्याला सोडून तेथून निघून गेला. मग देवदूतांनी येऊन येशूची सेवा केली.
बायबल कथा: मत्तय 4:1-11; मार्क 1:12-13; लूक 4:1-13
26. येशू आपल्या सेवेचा आरंभ करतो
सैतानाच्या परीक्षेवर विजय मिळविल्यावर येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण होऊन आपण राहत असलेल्या गालील या ठिकाणी परत आला. येशू वचनाचे शिक्षण देत अनेक ठिकाणी जात असे. प्रत्येक जण त्याच्याविषयी चांगलेच बोलत असे.
येशू त्याच्या बालपणी राहात असलेल्या नासरेथ या ठिकाणी गेला. शब्बाथ दिवशी, तो उपासना करीत त्या ठिकाणी गेला. त्यांनी त्यास यशया संदेष्टयाच्या ग्रंथाची गुंडाळी वाचण्यासाठी दिली. येशूने ती गुंडाळी उघडून त्यातील कांही भाग लोकांसमोर वाचला.
येशूने वाचले,‘‘परमेश्वराने त्याचा आत्मा मला दिला आहे, ते अशासाठी की गरीबांस सुवार्ता सांगावी, धरुन नेलेल्यांची सुटका व अंधळयांस पुन्हा दृष्टिचा लाभ व्हावा व ठेचले जात आहेत त्यांस सोडवुन पाठवावे हयाची घोषणा करावी. परेमश्वराच्या कृपा प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी’’
त्यानंतर येशू खाली बसला. प्रत्येकाने त्याला निरखून पाहिले. त्यांना ठाऊक होते की येशूने वाचलेला शास्त्रातील हा उतारा ख्रिस्ताविषयी होता. येशू म्हणला,‘‘ हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.’’ तेंव्हा सर्व आश्चर्य करु लागले. ‘‘हा योसेफाचा पुत्र ना?’’ ते म्हणू लागले.
मग येशू म्हणाला,‘‘ कोणताही संदेष्टा आपल्या गावात मान्य होत नाही हे खरे आहे. एलीया संदेष्टयाच्या काळामध्ये इस्राएलामध्ये अनेक विधवा होत्या. परंतू जेंव्हा साडेतीन वर्षे दुष्काळ पडता तेंव्हा देवाने इस्राएलांतील विधवांना मदत करण्यासाठी एलीयास पाठविले नाही, तर परराष्ट्रीय विधवेस मदत करण्यासाठी पाठविले.’’
येशू पुढे म्हणला, ‘‘आणि अलीशा संदेष्टयाच्या काळामध्ये इस्राएलात अनेक कुष्ठरोगी होते. परंतू अलीशाने त्यांपैकी कोणालाही बरे केले नाही. त्याने फक्त नामानाचा कुष्ठरोग बरा केला, तो इस्राएलाच्या शत्रूंचा सेनापती होता.’’ येशूचे भाषण ऐकत असलेले लोक यहूदी होते. म्हणुन जेंव्हा त्यांनी हे ऐकले, त्यांना त्याचा खूप राग आला.
नासरेथातील लोकांनी येशूला पकडून ओढत डोंगराच्या कडयावरुन फेकून त्यास जीवे मारावे म्हणून नेले. परंतु येशूने गर्दीतून वाट काढत, नासरेथ नगर सोडले.
मग येशू गालिलातील प्रांतामधून प्रवास करत गेला व पुष्कळसे लोक त्याकडे आले. त्यांनी त्याच्याकडे अनेक आजारी, अपंग, आंधळे ,पांगळे, बहिरे, व मुके लोक घेऊन आले आणि येशून त्यांना बरे केले.
भुते लागलेले असे अनेक लोक येशूकडे आणिले गेले. येशूच्या आज्ञेने, ती भूते त्या मनुष्यांतून बाहेर निघाली व पुष्कळदा ओरडून म्हणत ‘‘तू देवाचा पुत्र आहेस!’’ मोठया जनसमुदायाने आश्चर्यचकीत होऊन देवाची उपासना केली.
तेंव्हा येशूने बारा शिष्यांची निवड केली, त्यांना येशूचे प्रेषित म्हणत. ते प्रेषित येशूबरोबर प्रवास करत आणि त्याच्यापासून शिकत असत.
बायबल कथा:मत्तय 4 : 12 - 25; मार्क 1 : 14 - 15; 35 - 39; 3 : 13-21; लूक 4 : 14 - 30; 38 - 44
27. चांगल्या शोमरोण्याची गोष्ट
एके दिवशी, यहूदी धर्मशास्त्रात पारंगत असलेला एक व्यक्ति येशूची परिक्षा पाहण्यासाठी येऊन म्हणाला,‘‘गुरुजी सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी मी काय करावे?’’ येशूने उत्तर दिले,‘‘देवाचा नियमशास्त्रामध्ये काय लिहिले आहे?’’
त्याने म्हटले,‘‘तू आपला देव याजवर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने व संपूर्ण शक्तिने प्रीती कर. आणि जशी आपणावर तशी शेजा-यावर प्रीति कर’’ येशूने म्हटले,‘‘अगदी बरोबर उत्तर दिलेस! हे कर म्हणजे तू सर्वकाळ जगशील.’’
परंतु धर्मशास्त्राचा पंडित स्वत:ला धार्मीक ठरवू पाहात होता म्हणून त्याने विचारले,‘‘माझा शेजारी कोण आहे?’’
येशूने एक गोष्ट सांगून त्या धर्मशास्त्र पंडितास उत्तर दिले. ‘‘एक यहुदी मनुष्य यरुशलेमेहून यरीहो नगरास रस्त्याने जात होता.’’
‘‘‘तो मनुष्य रस्त्याने जात असतांना, लुटारुंनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी त्याकडे असलेली सर्व मालमत्ता घेऊन त्यास मारहाण करुन अर्धमेल्या अवस्थेत सोडून गेले. मग ते तेथून निघून गेले.
‘‘ त्यानंतर लगेच, एक यहूदी याजक त्याच रस्त्याने खाली चालत आला. जेंव्हा हया धार्मिक पुढा-याने पाहिले की हा मनुष्याला लुटारुंनी लुटले आहे, अर्धमेल्या अवस्थेत आहे, तो रस्त्याच्या दुस-या बाजुने गेला, त्याने मदतीची गरज असलेल्याकडे दुर्लक्ष केले व पुढे निघून गेला.
‘‘त्यानंतर थोड्या वेळातच, एक लेवी त्याच रस्त्याने आला. (लेवी हे यहूदी लोकांतील एक गोत्र होते जे मंदिराच्या सेवेमध्ये याजकांची मदत करत असत.) लेवीनेही त्या मनुष्याकडे, ज्याला लुटारुंनी लुटले होते मारले होते, दुर्लक्ष केले व दुस-या वाटेने निघून गेला.”
‘‘त्या मागून येणारा तिसरा व्यक्ति एक शोमरोनी होता. (शोमरोनी हे यहूदी वंशातील परराष्ट्रीयांशी विवाह केलेले लोक होते.) (शोमरोनी व यहूदी एकमेकांचा द्वेष करत असत.) परंतु हया शोमरान्याने त्या यहूदी मनुष्यास पाहिले, तेंव्हा त्याला त्याचा कळवळा आला. मग त्याने त्याची काळजी घेतली व त्याच्या जखमांवर पट्टी बांधली”.
‘‘मग त्या शोमरोन्याने त्या मनुष्याला उचलून आपल्या गाढवावर बसविले व त्याने त्याला मार्गावर असलेल्या एका उतार शाळेमध्ये आणिले व त्याची काळजी घेतली.”
‘‘दुस-या दिवशी, शोमरोन्याला पुढे प्रवासास जायचे होते. म्हणून त्याने उतारशाळेच्या व्यवस्थापकास काही पैसे देऊन म्हटले,‘‘याची काळजी घ्या, आणि यापेक्षा जे कांही अधिक पैसे खर्चाल तो खर्च मी परत आल्यावर तुम्हाला देईन.’’
तेंव्हा येशूने त्या धर्मशास्त्राच्या पंडितास विचारले,‘‘तूला काय वाटते? त्या तिघांपैकी लुटलेल्या मारलेल्या अवस्थेत असलेल्या मनुष्याचा शेजारी कोण होता?’’ तो उत्तरला, ‘‘ज्याने त्याजवर दया दाखविली’’ येशूने त्यास म्हटले,‘‘तूही जाऊन तसेच कर.’’
बायबल कथा :लूक 10 : 25 - 37
28. एक श्रीमंत तरुण अधिकारी
एके दिवशी, एक श्रीमंत तरुण अधिकारी येशूकडे येऊन विचारु लागला,‘‘उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करावे?’’ येशून त्यास म्हटले,‘‘तू मला ‘उत्तम’ असे का म्हणतोस? एका देवा शिवाय कुणीच उत्तम नाही. परंतु तुला सार्वकालिक जीवन हवे आहे, तर देवाच्या आज्ञा पाळ.’’
‘‘कोणत्या आज्ञा मी पाळावयाची आवश्यकता आहे?’’ त्याने विचारले. येशूने उत्तर दिले,‘‘खून करु नकोस. व्यभिचार करु नकोस. चोरी करु नकोस. खोटे बोलू नकोस. आपल्या आईबापाचा मान राख, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजा-यावर प्रीति कर.’’
परंतु त्या तरुणाने म्हटले,‘‘हया सर्व आज्ञा मी लहानपणापासूनच पाळत आलो आहे. सर्वकाळ जगण्यासाठी मला आणखी काय करण्याची गरज आहे?’’ येशूने त्याच्याकडे पाहिले व त्याच्यावर प्रीती केली.
येशूने उत्तर दिले,‘‘जर तू पूर्ण होऊ पाहतोस, तर जा आणि तूझी सर्व मालमत्ता विकून आलेला पैसा गोरगरीबांस दे, म्हणजे तुला स्वर्गामध्ये संपत्ती मिळेल. मग ये आणि माझ्यामागे चालू लाग.’’
येशूचे हे बोलणे ऐकून तो तरुण खूप निराश झाला, कारण तो खूप श्रीमंत होता व आपल्या जवळची मालमत्ता दुस-यास देऊ इच्छीत नव्हता. तो येशूपासून निघून गेला.
मग येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, “श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात जाणे फार कठिण आहे! होय, श्रीमंताचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा ऊंटाला सुईच्या नेढयातून जाणे सोपे आहे.’’
जेंव्हा शिष्यांनी हे ऐकले तेंव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला व ते म्हणाले, ‘‘तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?’’
येशूने शिष्यांकडे पाहून म्हटले, ‘‘मनुष्यांस हे अशक्य आहे, परंतु देवाला सर्व काही शक्य आहे.’’
पेत्र येशूला म्हणाला, ‘‘आम्ही सर्व सोडून तुझ्या पाठीमागे आलो आहोत. याचे आम्हास काय प्रतिफळ मिळणार?’’
येशूने उत्तर दिले,‘‘ज्यांनी माझ्यासाठी घरे, भाऊ, बहिणी, माता, पिता, लेकरे किंवा मालमत्ता सोडली आहे, त्यांना ती 100 पटीने जास्त मिळणार व त्याजबरोबर सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल.’’ परंतु पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले असे पुष्कळांचे होईल’’
बायबल कथा:मत्तय 19:16 - 30; मार्क 10: 17 - 31; लूक 18:18 - 30
29. कृतघ्न चाकराची गोष्ट
एके दिवशी,पेत्राने येशूला विचारले,‘‘प्रभुजी, जेंव्हा माझा भाऊ माझ्याविरुद्ध अपराध करील तेव्हा मी त्यास किती वेळा क्षमा करावी?’’ सात वेळा काय?’’ येशूने म्हटले,‘‘सात वेळा नव्हे, तर साताच्या सत्तर वेळा!’’ यावरुन, येशूला असे म्हणावयाचे होते की, आपण नेहमी क्षमा करावी. तेंव्हा येशूने ही गोष्ट सांगितली.
येशू म्हणाला,‘‘देवाचे राज्य एका राजासारखे आहे. त्याला आपल्या चाकरांकडून हिशेब घ्यावा असे वाटले. त्याच्या एका चाकराकडे 200,000 वर्षांच्या वेतनाइतके इतके फार मोठे कर्ज होते.
‘‘हा चाकर कर्ज फेडू शकत नसल्यामुळे राजाने म्हटले की, हया मनुष्यास व त्याच्या कुटुंबास गुलाम म्हणून विकून त्याच्या कर्जाची फेड करुन घ्यावी.’’
‘‘तो चाकर राजासमोर आपले गुडघे टेकून म्हणाला, कृपया माझ्यावर दया करा व मला कही वेळ द्या, म्हणजे मी तुमचे सर्व कर्ज फेडीन’’ राजाला त्या चाकराची दया आली व त्याने त्याला त्याचे सर्व कर्ज माफ केले व त्याला जाऊ दिले.’’
‘‘ परंतु हा चाकर बाहेर गेला असताना त्याला त्याच्या सोबतीचा एक चाकर भेटला ज्याच्याकडून त्याचे सुमारे चार महिन्यांच्या वेतनाइतके कर्ज येणे होते. त्या चाकराने आपल्या सोबतीच्या चाकराला पकडले आणि म्हणाला,‘आताच्या आता माझे घेतलेले पैसे मला दे!’’
‘‘त्याचा सोबतीचा चाकर गुडघे म्हणाला, ‘‘मला थोडा समय द्या व माझ्यावर कृपा करा, म्हणजे मी तुझे सर्व कर्ज फेडीन’’ परंतु त्याऐवजी, त्याने आपल्या सोबतीच्या चाकराला सर्व कर्जाची फेड होईपर्यंत तुरुंगात टाकले.
‘‘दुस-या चाकरांनी हे पाहिले व त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी राजाकडे जाऊन सर्वकांही सांगितले.’’
राजाने त्या चाकरास बोलावून घेतले व म्हटले,‘अरे दुष्ट चाकरा!’’ तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व कर्ज तुला सोडिले होते. तशी तूही आपल्या सोबतीच्या चाकरावर दया करावयास पाहिजे होती. राजाला त्याचा खूप राग आला व त्याने त्याचे सर्व देणे फेडीपर्यंत त्याला तुरुंगात टाकले.’’
तेंव्हा येशू म्हणाला, ‘‘जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या भावाला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील.’’
बायबल कथा :मत्तय 18 : 21 - 35
30. येशू पाच हजारांना भोजन देतो
येशूने आपल्या प्रेषितांना अनेक गावांतुन लोकांना सुवार्ता सांगण्यास व शिक्षण देण्यासाठी पाठविले. जेंव्हा ते येशूकडे पुन्हा आले, तेंव्हा त्यांनी आपण केलेली सर्व कार्ये येशूला सांगितली. तेंव्हा येशूने त्यांना तळ्याच्या पलिकडे शांत ठिकाणी काही वेळ विश्रांती घेण्यासाठी त्याच्याबरोबर बोलाविले. म्हणून ते तारवामध्ये बसले व तळयाच्या पलिकडे पोहोचले.
परंतु त्या ठिकाणी पुष्कळ लोक होते त्यांनी येशू व शिष्यांना तारवात बसुन जातांना पाहीले. हा जनसमुदाय त्यांच्या अगोदर तळयाच्या पलिकडे पोहचण्यासाठी तळ्याच्या काठाने धावला. म्हणुन येशू व शिष्य त्या ठिकाणी पोहोचले,तेंव्हा एक मोठा जनसमुदाय त्यांची प्रतिक्षा करत तेथे थांबला होता.
त्या जनसमुदायामध्ये सुमारे 5000 पुरुष होते, तरी स्त्रिया व मुले मोजली नव्हती. येशूला त्यांचा कळवळा आला. येशूला, हा समुदाय मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखा दिसून आला. तेंव्हा तो त्यांना शिकवू लागला व त्यामध्ये असणा-या आजा-यांना बरे केले.
दुपारी उशीराने, शिष्यांनी येशूकडे जाऊन सांगितले, ‘‘खूप उशीर झाला आहे आणि येथे जवळपास गाव नाही. तेंव्हा आपण लोकांना पाठवून द्या म्हणजे ते आपणांसाठी कांही खायला घेतील.’’
परंतू येशूने शिष्यांस म्हटले, ‘‘तूम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या!’’ ते उत्तरले, ‘‘आम्ही कसे काय एवढया मोठया समुदायास जेवण देऊ शकतो?’’ आम्हाकडे केवळ पाच भाकरी व दोन मासळी आहेत.’’
येशूने शिष्यांस सांगितले की, त्यांनी लोकांस हिरवळीवर पन्नास पन्नासाच्या पंक्ति करुन बसायला सांगावे.
मग येशूने त्या पाच भाकरी व दोन मासळी घेऊन वरती आकाशाकडे पहिले व त्या अन्नाबद्दल देवाचा धन्यवाद केला.
मग येशूने त्या भाकरी व मासळीचे तुकडे केले. मग त्याने शिष्यांस लोकांना वाढण्यासाठी दिले. शिष्य लोकांना वाढतच राहीले तरी ते अन्न संपले नाही. सर्व लोक जेवून तृप्त झाले.
त्यानंतर, शिष्यांनी उरलेल्या भाकरी व मासळीचे तुकडे गोळा केले व ते बारा टोपल्या भरली! हे सर्व भोजन केवळ पाच भाकरी व दोन मासळयांतूनच पुरविले गेले.
A Bible story from: _ मत्तय 14:13-21; _ मार्क_ 6:31-44; _ लूक_ 9:10-17; John 6:5-15_
31. येशू पाण्यावर चालतो
तेंव्हा लोकांना घरी पाठवून देत असतांना येशूने शिष्यांना मचव्यामध्ये बसून समुद्राच्या पलीकडे जाण्यास सांगितले. सर्व लोक निघून गेल्यानंतर येशू डोंगरावर प्रार्थनेसाठी गेला. येशू तेथे एकटाच होता, आणि रात्री खुप उशिरापर्यंत तो प्रार्थना करीत राहीला.
तोपर्यंत, शिष्य मचवा वल्हवत राहीले,पण बरीच रात्र झाली तरी ते समुद्राच्या मध्यभागापर्यंतच पोहोचले होते. फार कष्टाने ते मचवा वल्हवीत होते कारण जोराचा वारा त्यांच्या विरुद्ध वाहात होता.
तेंव्हा येशू प्रार्थना संपवून शिष्यांकडे आला. तो समुद्रावरुन पाण्यावर चालत त्यांच्या मचव्याकडे येत होता!
येशूला पाहून शिष्य खूप घाबरले, कारण त्यांना वाटले की ते कोणा भुताला पाहात आहेत. येशूला ठाऊक होते की, ते घाबरले आहेत म्हणून तो त्यांना म्हणाला, ‘‘भिऊ नका. मीच आहे!’’
तेंव्हा पेत्र येशूला म्हणला, ‘‘प्रभुजी, जर आपण आहात, तर मला पाण्यावर चालण्याची आज्ञा द्या.’’ येशूने पेत्रास म्हटले, ‘‘ये!’’
म्हणून पेत्र मचव्यातून उतरुन येशूकडे पाण्यावर चालू लागला. परंतू थोडे अंतर चालल्यानंतर, त्याने आपली दृष्टि येशूवरुन काढली आणि तो लाटांकडे व वा-याकडे पाहू लागला.
तेंव्हा पेत्राला भिती वाटली व तो पाण्यामध्ये बुडू लागला. तो मोठयाने ओरडला, ‘‘प्रभुजी, मला वाचवा!’’ येशू लगेच त्याच्यापर्यंत पोहोंचला व त्याला धरले. मग तो पेत्रास म्हणाला, ‘‘अरे अल्पविश्वासी माणसा, तू संशय का धरलास?’’
जेंव्हा पेत्र आणि येशू दोघे मचव्यामध्ये(तारवामध्ये) चढले, तेंव्हा लगेच वारा थांबला आणि पाणी शांत झाले. हे पाहून शिष्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी येशूला नमन केले व म्हणाले, ‘‘तू खरोखर, देवाचा पूत्र आहेस.’’
बायबल कथा: मत्तय //14 : 22 - 33; मार्क 6 : 45 - 52; योहान __6 : 16 - 21//
32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो
एके दिवशी, येशू आणि त्याचे शिष्य मचव्यामध्ये बसून समुद्राच्या पलिकडे गरसेकर राहात असलेल्या प्रदेशात गेले.
सरोवराच्या (छोटा समुद्र किंवा समुद्र म्हटले तरी चालेल) पलिकडे जाताच एक भूतग्रस्त मनुष्य येशूकडे धावत आला.
हा मनुष्य एवढा शक्तिशाली होता की कोणीही मनुष्य त्याला नियंत्रीत करु शकत नव्हता. लोकांनी त्याचे दंड व पाय साखळदंडांनी व बेडयांनी बांधले, परंतू त्या तो तोडत असे.
तो मनुष्य कबरींमध्ये रहात असे. तो रात्रंदिवस मोठयाने ओरडत असे. तो अंगावर कपडे घालत नसे व आपले अंग दगडांनी वारंवार ठेचून घेत असे.
जेंव्हा तो मनुष्य येशूकडे आला, तेंव्हा येशूसमोर येऊन त्याने गुडघे टेकले. येशू त्या दुष्टात्म्यास म्हणाला, ‘‘हया मनुष्यातून बाहेर निघ!’’
तग्रस्त मनुष्य मोठयाने ओरडला, ‘‘परात्पर देवाच्या पुत्रा येशू , तू मध्ये का पडतोस?’’ कृपया मला छळू नकोस !’’ तेंव्हा येशूने दुष्टात्म्यास (अशुद्ध आत्म्यास, भुतास) विचारले, ‘‘तूझे नाव काय आहे?’’ तो उत्तरला,‘‘माझे नाव सैन्य आहे, कारण आम्ही पुष्कळ आहोत.’’ (‘‘लीजन’’ हा शब्द रोमी सेनेतील हजारो सैनिकांच्या गटासाठी होता)
तेते दुष्टात्मे येशूला विनवणी करु लागले, ‘‘कृपया आम्हाला या प्रांतातून घालवून देऊ नका!’’ शेजारच्या टेकडीवर डुकरांचा एक कळप चरत होता. म्हणून, दुष्टात्म्यांनी विनंती केली, “कृपया त्याऐवजी आम्हास डुकरांमध्ये पाठवा!’’ येशू म्हणाला, ‘‘जा!’’
तेंव्हा दुष्टात्मे त्या माणसामधून निघून डुकरामध्ये घुसले. तेंव्हा ती डुकरे कड्यावरुन खाली पळत गेली व समुद्रामध्ये बुडाली. त्या कळपामध्ये सुमारे 2000 डुकरे होती.
हे पाहून डुकरे राखणारे धावत नगरामध्ये गेले व त्यांनी झालेला हा प्रकार व येशूने काय केले हे प्रत्येकाला सांगितले. तेंव्हा नगरातील लोकांनी येऊन त्या भूतग्रस्त मनुष्यास पाहिले. तो शांत बसलेला, अंगावर कपडे घातलेला, व एक सर्वसामान्य वागणा-या माणसा सारखा असा त्यांनी त्याला पाहिला.
हे पाहून लोक फार घाबरले व त्यांनी येशूला त्यांचा प्रांत सोडून जाण्यास सांगितले. तेंव्हा येशू मचव्यात बसून जाण्यासाठी तयार झाला. पूर्वी भूतग्रस्त असलेला मनुष्य येशूच्या बरोबर जाण्यासाठी विनंती करु लागला.
परंतू येशू त्यास म्हणाला, ‘‘नाही, तू आपल्या घरी जा व आपल्या मित्रांस व कुटुंबियांस सर्व सांग की देवाने तुझ्यासाठी काय केले व तुझ्यावर कशी दया दाखविली आहे.’’
तेंव्हा तो मनुष्य निघाला व देवाने त्याच्या साठी काय केले आहे याची साक्ष प्रत्येकाला त्याने दिली. हे ऐकणारा प्रत्येकजण आश्चर्याने थक्क झाला.
येशू सरोवराच्या पलिकडे परत गेला. तो तेथे पोहोचल्यानंतर, लोकांचा मोठा समुदाय त्याच्याभोवती जमला व ते त्याच्यावर पडू लागले. त्या समुदायामध्ये बारा वर्षापासून रक्तस्रावाची पीडा होत असलेली एक स्त्री होती. तिने आपला सर्व पैसा वैद्यांवर खर्च केला पण तरीही ती बरी झाली नाही, तर तिची परिस्थिती आणखी वाईट झाली.
तिने ऐकले होते की येशूने अनेक रोग्यांना बरे केले आहे आणि ती म्हणाली, ‘‘मला खात्री आहे की, जर मी केवळ येशूच्या वस्त्राला स्पर्श केला, तरीही बरी होईन!’’ म्हणून तीने येशूच्या मागे जाऊन त्याच्या वस्त्रास स्पर्श केला. तिने वस्त्राला स्पर्श करताच तीचा रक्तस्राव थांबला!
येताबडतोब, येशूला कळले की त्याच्या शरीरामधून सामर्थ्य गेले आहे. म्हणून त्याने मागे वळून पाहिले व म्हटले,‘‘मला कोणी स्पर्श केला?’’ शिष्यांनी उत्तर दिले, ‘‘लोकांची एवढी गर्दी तुमच्याभोवती आहे व ते तुम्हाला चेंगरत आहेत. तर तूम्ही असे का विचारले, ‘‘मला कोणी स्पर्श केला?’’
त्या स्त्रीने भितीने कापत कापत येशूपुढे जाऊन गुढगे टेकले. मग तिने काय केले व ती कशी बरी झाली ते त्याला सांगितले. येशूने तिला म्हटले, ‘‘तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा.’’
बायबल कथा: मत्तय //8: 28 - 34; 9 : 20 - 22; मार्क 5 : 1 - 20; 5 : 24b - 34; लूक 8 : 26 - 39; 8 : 42b - 48//
33. पेरणी करणा-याची गोष्ट
एके दिवशी समुद्रकिना-याजवळ येशू एका मोठया जनसमुदायास शिकवण देत होता. पुष्कळ लोक त्याचे ऐकण्यास एकत्र जमले तेंव्हा येशू एका मचव्यात बसला व तो मचवा पाण्यामध्ये थोडा आत ढकलला, अशासाठी की त्याला त्यांच्याशी बोलण्यास पुरेशी जागा मिळावी. तो मचव्यात बसून लोकांना शिकवू लागला.
येशूने त्यांना ही गोष्ट सांगितली. ‘‘एक शेतकरी पेरणी करावयास निघाला. तो हाताने पेरणी करत असतांना, काही बी वाटेवर पडले, आणि आकाशातील पक्षांनी येऊन ते सर्व खाऊन टाकले.
‘‘काही बी खडकाळीवर पडले, त्या ठिकाणी खूपच कमी माती होती. खडकाळीवरील बी लगेच उगवले, पंरतु (माती खोल नसल्यामुळे) त्याची मुळे खोलवर जाऊ शकली नाहीत. जेंव्हा सूर्य वर आला तेंव्हा, ते करपले.’’
‘‘आणखी काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले. ते बी वाढू लागले, परंतू काटयांनी त्याची वाढ खुंटविली. म्हणून काटेरी झुडपांमध्ये पडलेल्या बीजाची वाढ होऊ शकली नाही व त्यास फळ आले नाही.’’
‘‘कांही बी चांगल्या जमिनीत पडले. ते बी उगवले व वाढले त्याला पीक आले 30, 60, तर कुठे 100 पट फळ मिळाले. ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको!’’
हया दाखल्याचा अर्थ शिष्यांना समजला नाही. म्हणून येशूने स्पष्टिकरण केले, ‘‘बी हे देवाचे वचन आहे. वाटेवरची जमीन म्हणजे असा व्यक्ती की जो देवाचे वचन ऐकतो पण समजून घेत नाही आणि सैतान येऊन ते मनातून काढून टाकतो.’’
‘‘खडकाळ जमीन म्हणजे अशी व्यक्ती जो देवाचे वचन ऐकूतो आणि आनंदाने स्वीकारतो. परंतू कष्ट व छळ आल्यानंतर लगेच अडखळतात.’’
‘‘काटेरी जमीन म्हणजे जो देवाचे वचन ऐकतो, परंतू कालांतराने संसाराची चिंता, श्रीमंती आणि जगिक सुख यामुळे त्याचे देवावरील प्रेम कमी होत जाते. याचा परिणाम म्हणुन, त्याने ऐकलेले वचन निष्फळ ठरते.’’
‘‘परंतू सुपिक जमिन म्हणजे जो व्यक्ती देवाचे वचन ऐकून त्याजवर विश्वास ठेवतो, आणि फळ देतो.’’
बायबल कथा: मत्तय //13 :1 -8; 18-23; मार्क 4 : 1 - 8 ; 13 - 20; लूक 8 : 4 - 15//
34. येशू अनेक गोष्टी शिकवितो
येशूने देवाच्या राज्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. हरणार्थ, तो म्हणाला, ‘‘देवाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे जे कोणीएकाने आपल्या शेतात पेरले. तुम्हास ठाऊक आहे की मोहरीचा दाणा हा सर्व बीजांमध्ये अगदी लहान आहे.’’
परंतू जेंव्हा हा मोहरीचा दाणा उगवुन वाढतो तेंव्हा बागेतील इतर झुडपांपेक्षा ते सर्वत मोठे होऊन इतके वाढते की, आकाशातील पाखरेही येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करतात.’’
येशूने आणखी एक गोष्ट सांगितली, ‘‘देवाचे राज्य खमिरासारखे आहे जे एका स्त्रीने पिठामध्ये घातले व संपूर्ण पीठ फुगून गेले.’’
‘‘देवाचे राज्य शेतामध्ये कुणीतरी लपवून ठेवलेल्या गुप्त खजिन्यासारखे आहे. दुस-या मनुष्यास ते सापडले व त्याने ते पुन्हा पुरुन ठेवले. त्याला एवढा आनंद झाला की त्याने आपली सर्व संपत्ती विकून आलेल्या पैशांनी ते शेत विकत घेतले.
‘‘देवाचे राज्य एका मौल्यवान मोत्यासारखे सुद्धा आहे. जेंव्हा मोत्याच्या व्यापा-याच्या ते दृष्टिस पडले, तेंव्हा त्याने त्याची सर्व मालमत्ता विकून टाकली व आलेल्या पैशांनी ते मौलवान मोती विकत घेतले.’’
तेंव्हा येशूने कांही लोकांस एक गोष्ट सांगितली जे स्वत:च्या चांगल्या कामावर भरवंसा ठेवत व दूस-या लोकांना तुच्छ मानीत असत. तो म्हणाला, ‘‘दोन माणसे प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेले. त्यांपैकी एक जकातदार व दूसरा एक धार्मिक पुढारी होता.’’
धार्मिक पुढा-याने अशी प्रार्थना केली, ‘‘हे देवा, मी तुला धन्यवाद देतो की मी अन्य मनुष्यांसारखा पापी नाही. जे चोरी, अन्याय, व्यभिचार करतात त्यांच्याप्रमाणे मी नाही, व हया जकातदारासारखाही नाही.”
‘‘उदाहरणार्थ, मी आठवड्यातून दोनदा उपास करितो आणि आपल्या सर्व उत्पन्नाचा दशांश तुला देतो.’’
‘‘परन्तु तो जकातदार त्या धार्मिक पुढा-यापासून फार दूर उभा होता, आणि वर स्वर्गाकडेही पाहात नव्हता. त्याऐवजी, त्याने आपल्या हातांनी छाती बडवून घेतली आणि प्रार्थना केली, ‘‘देवा, मज पाप्यावर दया कर.’’
तेंव्हा येशू म्हणाला, ‘‘मी तुम्हाला खचित सांगतो, देवाने त्या जकातदाराची प्रार्थना ऐकून त्यास नितिमान ठरविले. परंतू त्याला धार्मिक पुढा-याची प्रार्थना आवडली नाही.देव प्रत्येक गर्विष्ठाला नीच करील, व जो स्वत:ला नम्र बनवितो त्याला देव उंचाविल.’’
बायबल कथा: मत्तय //13 : 31 - 33, 44 - 46; मार्क 4 : 30 - 32; लूक 13 : 18 - 21; 18 : 19 - 14//
35. दयाळू पित्याची गोष्ट
एके दिवशी, त्याचे ऐकण्यास जमलेल्या अनेक जकातदार व पापी लोकांस येशू शिकवीत होता.
काही धार्मिक पुढारीही त्या ठिकाणी होते व येशू पापी लोक व जकातदार यांना मित्राप्रमाणे वागवतो हे त्यांनी पाहिले आणि ते त्याच्यावर आपसात टीका करु लागले. तेंव्हा येशून त्यांना ही गोष्ट सांगितली.
‘‘एका मनुष्यास दोन पुत्र होते. धाकटया पुत्राने त्याकडे जाऊन म्हटले, ‘‘बापा, माझ्या वाट्याला येणारी मालमत्ता मला आत्ता द्या’’ यास्तव पित्याने आपल्या संपत्तीचे दोन वाटे दोन मुलांसाठी केले.
‘‘लवकरच धाकटा मुलगा सर्व मालमत्ता घेऊन दूरदेशी निघून गेला आणि तेथे वाईट मार्गानी ती संपवून टाकली.’’
‘‘त्यानंतर, तो राहात असलेल्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्यास अन्न खरेदी करण्यास त्याच्याजवळ पैसे उरले नाहीत. तेंव्हा त्याला केवळ एकच काम मिळाले ते होते शेतामध्ये डुकरे चारण्याचे काम.
तो एवढा दीनवाणा व भूकेलेला होता की डुकरे खात असलेल्या शेंगा खाऊ की काय असे त्याला वाटले. ‘‘शेवटी, तो धाकटा पुत्र स्वत:ला म्हणाला, ‘‘मी येथे काय करतोय?’’ झ्या पित्याच्या घरामध्ये नोकरचाकारांची खाण्याची चंगळ आहे, आणि मी येथे उपाशी मरतोय. मी आपल्या पित्याकडे परत जाईल आणि त्याचा एक चाकर म्हणून राहण्यास विनंती करील.’’
‘‘अशा प्रकारे तो धाकटा पुत्र आपल्या पित्याच्या घराकडे जाण्यास निघाला. तो दूर असतानाच, पित्याने त्यास पाहिले व त्याला त्याची दया आली. त्याने धावत जाऊन त्यास मिठी मारली व त्याचे मुके घेतले.’’
‘‘‘पुत्र म्हणाला, ‘‘हे बापा, मी देवाविरुध्द व आपणाविरुध्द पाप केले आहे. मी आपला पुत्र म्हणविण्यास लायक नाही.’’
‘‘‘परंतू त्याच्या पित्याने एका चाकरास बोलावून म्हटले, ‘लवकर जा आणि माझ्या पुत्रास उत्तम वस्त्रे आण आणि त्याच्या अंगावर घाला! त्याच्या हातामध्ये अंगठी व पायामध्ये जोडे घाला. मग एक पुष्ट वासरु मारुन एक मेजवानी तयार करा व आपण सगळे आनंद साजरा करु, कारण माझा हा मुलगा मेला होता, पण आता जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे!’’
‘‘अशाप्रकारे त्यांनी आनंदोत्सव सुरु केला. त्याअगोदर, थोरला मुलगा शेतामध्ये काम करुन घरी आला होता. संगीत व नृत्याचा आवाज ऐकून त्याला आश्चर्य वाटले.”
‘‘‘‘जेंव्हा थोरल्या पुत्रास कळले की त्याचा घाकटा भाऊ घरी आला आहे, तेंव्हा तो रागावला व आत जाईना. त्याचा पिता बाहेर येऊन त्यास आत येण्यासाठी व आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी विनंती करु लागला, परंतू त्याने आत जाण्यास नकार दिला.
”थोरला पुत्र आपल्या पित्यास म्हणाला, ‘एवढी वर्षे मी तुम्हासाठी विश्वासूपणे काम करत आहे! मी तुमच्या आज्ञेच्या पलिकडे काहीही केले नाही, तरिही तुम्ही माझ्या मित्रांसोबत आनंद करण्यासाठी एक लहानसे करडूही दिले नाही. परंतू तुमचा हा पुत्र आपली सारी मालमत्ता वाईट मार्गाने नष्ट करुन घरी परतल्यावर, आपण त्याच्यासाठी एक उत्तम वासरु कापले आहे!’’
“पित्याने उत्तर दिले, ‘माझ्या मुला, तू नेहमीच माझ्या सोबत आहेस, आणि माझे जे काही आहे, हे सर्व तुझेच आहे. परंतू आता आपण आनंद करणे योग्य आहे, कारण तुझा हा भाऊ मेला होता, पण आता जिवंत झाला आहे. तो हरवला होता, पण आता सापडला आहे!’’
बायबल कथा//: Luke 15:11-32//
36. येशूचे रुपांतर
एके दिवशी, येशूने आपल्या शिष्यांपैकी पेत्र, याकोब व योहान हया तिघांना आपल्या बरोबर घेतले. (य़ोहान नावाचा शिष्य व ज्याने येशूचा बाप्तिस्मा केला ते दोघे एकच व्यक्ती नाहीत.) ते प्रार्थना करण्यासाठी एक उंच डोंगरावर गेले. य़ेशू प्रार्थना करीत असतांना त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरीशुभ्र झाली, इतकी पांढरीशुभ्र की, पृथ्वीवरील कोणालाही तेवढी पांढरीशुभ्र काढता आली नसती.
तेंव्हा मोशे व एलीया संदेष्टा हे त्यांच्या दृष्टीस पडले. ही माणसे शेकडो वर्षांपूर्वी ह्या पृथ्वीवर होऊन गेली होती. ते येशूच्या मृत्युविषयी त्याच्याशी बोलत होते, जे यरुशलेममध्ये घडणार ङोते.
जेंव्हा मोशे व एलीया येशूबरोबर बोलत होते, पेत्र येशूला म्हणाला, “इथे असणे आम्हाला बरे आहे. येथे आपण तीन मंडप बनवू, एक आपणासाठी, एक मोशेसाठी, व एक एलीयासाठी.” पेत्र काय बोलत होता त्याचे त्याला समजत नव्हते.
पेत्र बोलत असतानाच, एका तेजस्वी मेघाने येऊन त्यांना वेढिले व मेघातून अशी वाणी झाली की, ‘‘हा माझा पुत्र आहे याच्यावर मी प्रीती करतो. मी याजविषयी संतुष्ट आहे. त्याचे तुम्ही ऐका’’ ते तिन्ही शिष्य खूप भयभित झाले व भूमिवर खाली पडले.
तेंव्हा येशूने त्यांना स्पर्श करुन म्हटले, ‘‘भिऊ नका. चला उठा.’’ जेंव्हा त्यांनी सभोवताली पाहिले, तेंव्हा तेथे फक्त येशू होता.
येशू आणि ते तीन शिष्य पुन्हा डोंगरावरुन खाली उतरले. तेंव्हा येशू त्यांना म्हणाला की, इथे जे घडले त्याविषयी कोणाला काही सांगू नका. मी लवकरच मरेल व पुन्हा जिवंत होईल. त्यानंतर तुम्ही याविषयी लोकांना सांगू शकता.’’
बायबल कथा: मत्तय //17:19; मार्क 9 : 2 - 8; लूक 9 : 28 - 36//
37. येशू लाजारास जिवंत करितो
एके दिवशी, लाजर खूप आजारी असल्याची बातमी येशूला कळली. लाजर व त्याच्या दोन बहिणी मरीया व मार्था हे येशूचे जवळचे मित्र होते. जेव्हा येशूने ही बातमी ऐकली तेंव्हा तो म्हणाला, ‘‘हा आजार मरणासाठी नाही, तर हा आजार देवाच्या गौरवासाठी आहे.’’ येशू आपल्या मित्रांवर प्रीती करत होता, परंतू तो होता त्या ठिकाणी आणखी दोन दिवस राहिला.
दोन दिवसानंतर, येशू आपल्या शिष्यांना म्हणाला,‘‘आपण पुन्हा यहूदीयामध्ये जाऊ’’. ‘‘परंतू गुरुजी ’’ शिष्यांनी उत्तर दिले, ‘‘थोडया वेळापूर्वीच तेथील लोक आपणास मारावयास टपले होते!’’ येशू म्हणाला, ‘‘आपला मित्र लाजर हा झोपला आहे, मी त्याला उठवणे अगत्याचे आहे.’’
येशूच्या शिष्यांनी उत्तर दिले, ‘‘प्रभुजी, जर लाजर झोपलेला आहे तर तो बरा होईल.’’ तेंव्हा येशूने त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘‘लाजर मेला आहे. आणि मी तेथे नव्हतो म्हणून मला आनंद वाटतो, यासाठी की तुम्ही मजवर विश्वास ठेवाल.’’
जेंव्हा येशू लाजर राहत असलेल्या गावी आला, तेंव्हा लाजर मरुन चार दिवस झाले होते. मार्था येशूला भेटण्यासाठी बाहेर गेली आणि म्हणाली, ‘‘प्रभुजी, जर आपण इथे असता, तर माझा भाऊ मेला नसता. परंतु माझा विश्वास आहे की आपण जे काही देवाजवळ मागाल, ते देव देईल.
येशू म्हणाला, ‘‘पुनरुत्थान व जीवन मीच आहे. माझ्यावर विश्वास ठेवणारा मेला असला तरी जगेल. आणि जो मजवर विश्वास ठेवितो तो कधीही मरणार नाही. याजवर तू विश्वास ठेवतेस काय?’’ मार्थाने उत्तर दिले, ‘‘होय,प्रभुजी! आपण देवाचे पुत्र मशीहा आहात असा मी विश्वास धरिते’’
तेंव्हा मरीया तेथे आली. ती येशूच्या पाया पडली आणि म्हणाली, ‘‘प्रभुजी, तुम्ही येथे असता, तर माझा भाऊ मेला नसता.’’ येशूने त्यांना विचारले, ‘‘तुम्ही लाजारला कोठे ठेविले आहे?’’ त्यांनी म्हटले ,‘‘कबरेमध्ये. या आणि पाहा.’’ तेंव्हा येशू रडला.
ती खडकामध्ये खोदलेली कबर होती व तिच्या दाराशी धोंडा ठेवण्यात आला होता. कबरेपाशी येऊन येशू त्यांना म्हणाला, ‘‘धोंडा बाजूला सारा.’’ परंतू मार्था म्हणाली, ‘‘त्याला मरुन चार दिवस झाले आहेत. आता त्याला दुर्गंधी येत असेल.’’
येशूने उत्तर दिले, ‘‘तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?’’ मग त्यांनी ती धोंड काढली.
तेव्हा येशूने वर स्वर्गाकडे पाहून म्हटले, ‘‘बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला ठाऊक आहे, की तू सर्वदा माझे ऐकतोस, परंतू जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्यांच्याकरिता मी बोललो, हयासाठी की तू मला पाठविले आहे असा विश्वास ते धरतील.’’ मग येशूने मोठयाने हाक मारली, ‘‘लाजरा, बाहेर ये!’’
तेंव्हा तो लाजर बाहेर आला! त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले होते. येशूने त्यांना सांगितले, ‘‘ प्रेतवस्त्रे काढुन टाकण्यासाठी त्याला मदत करा व त्याला मोकळे करा! हा चमत्कार पाहून अनेक यहूद्यांनी येशूवर विश्वास ठेविला.
परंतु यहूद्यांचे धार्मिक पुढारी येशूचा द्वेष करु लागले, व येशू आणि लाजर यांना जीवे मारण्यासाठी योजना आखू लागले.
बायबल कथा: योहान 11: 1 - 46
38. येशूला विश्वासघाताने धरुन देण्यात येते
दरवर्षी, यहूदी वल्हांडण सण साजरा करत. देवाने मिसर देशातील गुलामगिरीतून शेकडोवर्षापुर्वी त्यांच्या पुर्वजांची कशी सुटका केली, याचा आनंद साजरा करण्यासाठी यहूदी लोक हा सण पाळत. येशूच्या प्रचारकार्यास उघडपणे आरंभ झाल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी येशूने आपल्या शिष्यांस सांगितले की यरुशलेममध्ये त्यांजबरोबर वल्हांडण साजरा करावा अशी त्याची इच्छा आहे, आणि त्यानंतर तो तेथे मारला जाणार आहे असेही त्याने सांगितले.
येशूच्या शिष्यांपैकी यहूदा नावाचा एक शिष्य होता. यहूदा हा प्रेषितांच्या पैशाची थैली सांभाळणारा खजिनदार होता, पण तो पैशाचा लोभी असल्यामुळे अनेकदा त्यातून पैसे चोरत असे. येशू आणि शिष्य यरुशलेममध्ये आल्यानंतर, यहूदा धार्मिक पुढा-यांना जाऊन भेटतो व पैशांच्या मोबदल्यात येशूला पकडून देण्याविषयी सांगतो. त्याला ठाऊक होते की यहूदी पुढारी येशू हा मशीहा आहे हे नाकारत होते व त्यास मारण्याचा कट रचत होते.
तेंव्हा महायाजक व यहूदी पुढा-यांनी मिळून, येशूचा विश्वासघात करण्यासाठी यहूदाला चांदीची तीस नाणी दिले. संदेष्ट्यांनी सांगितलेली भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी हे सर्व काही झाले. यहूदा त्यांच्याशी सहमत झाला, व पैसे घेऊन गेला. तेंव्हापासून तो येशूला धरुन देण्याची वाट पाहू लागला.
यरुशलेमध्ये, येशूने आपल्या शिष्यांसह वल्हांडण सण साजरा केला. वल्हांडण भोजना दरम्यान येशूने भाकर घेऊन ती मोडिली. तो म्हणाला, ‘‘घ्या आणि खा.’’ हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी दिले जात आहे. माझ्या आठवणीसाठी हे करा.’’ त्याचप्रकारे, येशूने म्हटले की त्याचे शरीर त्यांच्यासाठी बलिदान म्हणून देण्यात येईल.
मग येशूने एक प्याला घेऊन म्हटले, ‘‘ ह्यातुन प्या. हा माझे नव्या कराराचे रक्त आहे. ते अनेकांच्या पापक्षमेसाठी ओतले जात आहे. जेंव्हा तुम्ही हे पिता, तेंव्हा हे माझ्या आठवणीसाठी हे करा.’’
मग येशू शिष्यांना म्हणाला, ‘‘तुम्हापैकी एक माझा विश्वासघात करील.’’ तेंव्हा त्यांना धक्का बसला आणि ते विचारु लागले की अशी गोष्ट कोण करील. येशू म्हणला, ‘‘ज्याला मी ही भाकर मोडून देईल, तोच माझा विश्वासघात करील.’’ मग त्याने यहूदास ती भाकर मोडून दिली.
यहूदाने भाकर घेतल्याबरोबर, सैतानाने त्याच्यामध्ये प्रवेश केला. यहूदा तेथून गेला आणि यहूदी पुढा-यांच्या मदतीसाठी येशूला पकडण्यासाठी गेला. तो रात्रीचा समय होता.
भोजनानंतर, येशू आपल्या शिष्यांसोबत जैतुनाच्या डोंगराकडे गेला. येशू म्हणाला, ‘‘आज रात्री तुम्ही सर्व मला सोडून जाल. असे लिहिले आहे की, मी मेंढपाळास मारीन व मेंढरांची दाणादाण करीन.’’
पेत्राने उत्तर दिले, ‘‘जरी सर्वांनी तुला सोडिले, तरी मी तुला सोडणार नाही!’’ तेंव्हा येशू पेत्रास म्हणाला, ‘‘सैतानाने तुम्हा सर्वांचा नाश करायचे ठरविले आहे, परंतू मी तुम्हासाठी प्रार्थना केली आहे, पेत्रा, अशासाठी की तुमचा विश्वास डळमळू नये. तरीदेखिल आज रात्री, कोबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.’’
तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, ‘‘मला मरावे जरी लागले, तरी मी तुला नाकारणार नाही!’’ बाकीच्या शिष्यांनीही तसेच म्हटले.
मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन गेथशेमाने म्हटलेल्या ठिकाणी गेला. शिष्यांनी परिक्षेत पडू नये म्हणून येशूने त्यांना प्रार्थना करावयास सांगितले. मग येशू स्वत: प्रार्थना करावयास गेला.
येशूने तीन वेळा प्रार्थना केली ,‘‘हे पित्या, जर शक्य असेल, तर हा दु:खसहनाचा प्याला माझ्यापासून दूर कर. परंतु लोकांच्या पापक्षमेसाठी दुसरा मार्गच नसेल, तर तुझी इच्छा पूर्ण होवो.’’ येशू खूप व्याकूळ झाला व त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा झाला. देवाने एक देवदूत पाठवून त्यास सामर्थ्य दिले.
प्रार्थना संपवून प्रत्येक वेळी येशू शिष्यांकडे आलेला असतांना शिष्य झोपलेल्या अवस्थेत त्याला आढळले. जेंव्हा तो तिस-यांदा परतला तेंव्हा येशू म्हणाला, ‘‘उठा!’’ माझा विश्वासघात करणारे आला आहे.’’
यहूदा धार्मिक पुढारी, सैनिक व एका मोठया लोकसमुदायाबरोबर आला. त्यांनी आपणाबरोबर तलवारी व सोटे आणले होते. यहूदा येशूजवळ येऊन म्हणाला, ‘‘सलाम, गुरुजी,’’ आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. कोणाला पकडावे हे यहूदी धर्मपुढा-यांना समजण्यासाठे हे एक चिन्ह होते. तेंव्हा येशू म्हणाला, ‘‘यहूदा, माझे चुंबन घेऊन माझा विश्वासघात करीत आहेस काय?’’
सैनिक येशूला पकडत असतांना, पेत्राने आपली तलवार काढली व महायाजकाच्या सेवकाचा कान कापला. येशू म्हणाला,‘‘तलवार बाजुला ठेव! मी पित्यास माझ्या बचावासाठी देवदूतांचे सैन्य मागू शकतो. परंतू मला पित्याची आज्ञा पाळणे आवश्यक आहे”. मग येशूने त्या मनुष्याचा कान बरा केला. येशूला अटक झाल्यानंतर, सर्व शिष्य पळून गेले.
बायबल कथा: मत्तय //26:14-56; मार्क 14 : 10-50; लूक 22 : 1-53; योहान __12:6; 18:1 - 11//
39. येशूची चौकशी
हा मध्यरात्रीचा समय होता. सैनिकांनी येशूची चौकशी करण्यासाठी त्याला महायाजकाच्या घरी घेऊन गेले. पेत्र लांबूनच त्यांच्या पाठीमागे येत होता. ते जेंव्हा येशूला आत घरामध्ये घेऊन गेले, तेंव्हा पेत्र बाहेर थंडी असल्यामुळे शेकत बसला होता.
आत घरामध्ये, यहूदी धर्मपुढारी येशूची चौकशी करीत होते. त्यांनी येशूविरुद्ध अनेक खोटे साक्षीदार आणले होते. तथापि, त्यांच्या जबानीमध्ये मेळ नव्हता म्हणुन यहूदी पुढा-यांना येशूचा गुन्हा सिद्ध करता आला नाही. या समयी येशू काहीच बोलला नाही.
शेवटी, महायाजकाने येशूकडे पाहून विचारले, ‘‘आम्हास सांग, की तू मशीहा, जिवंत देवाचा पुत्र आहेस?’’
येशू म्हणाला, ‘‘ मी आहे, आणि तुम्ही मला पित्याच्या बाजूस बसलेला व स्वर्गातून येत असतांना पाहाल.’’ तेंव्हा महायाजकाने रागाने आपली वस्त्रे फाडिली व अन्य धार्मीक पुढा-यांसमोर मोठयाने म्हणाला, ‘‘आता आम्हास आणखी पुराव्याची गरज नाही! तो देवाचा पुत्र आहे असे त्याने म्हटले हे तुम्ही स्वत: ऐकले आहे. तुमचा निवाडा काय आहे?’’
सर्व यहूदी पुढा-यांनी महायाजकास उत्तर दिले, ‘‘तो मरणदंडास पात्र आहे!’’ मग त्यांनी येशूच्या डोळयांवर पट्टी बांधली, त्याच्या तोंडावर थुंकले, त्यास मारिले व त्याची थट्टा उडविली.
पेत्र घराबाहेर वाट पहात होता, तेंव्हा घरकाम करणा-या एका मुलीने त्यास म्हटले, ‘‘तूही येशूबरोबर होतास!’’ पेत्राने नकार दिला. नंतर, दुस-या एका मुलीने असेच म्हटले, आणि पेत्राने पुन्हा एकदा नकार दिला. शेवटी, लोक म्हणाले, ‘‘आम्हास ठाऊक आहे की तू येशूबरोबर होतास कारण तुम्ही दोघेही गालील प्रदेशातील आहात.
तेंव्हा पेत्राने शपथ घेऊन म्हटले,‘जर मी हया मनुष्यास ओळखत असेल तर देव मला शापित करो!’’ लगेच कोबडा आरवला, आणि येशून मागे वळून पेत्राकडे पाहिले. लगेच, कोबडा आरवला, आणि येशूने मागे वळून पेत्राकडे पाहिले.
तेंतेंव्हा पेत्र दूर जाऊन खूप रडला. दरम्यान, येशूस धरुन देणा-या यहूदाने पाहिले की, यहूदी धर्मपुढा-यांनी येशूला मरणदंडाची शिक्षा दिली आहे. तेंव्हा यहूदास असे केल्याचा पस्तावा झाला व त्याने जाऊन आत्महत्या केली.
दुस-या दिवशी सकाळीच, यहूदी पुढा-यांनी येशूला रोमी सुभेदार पिलातासमोर आणले. त्यांना आशा होती की पिलात येशूस दोषी ठरवून मरणदंडाची शिक्षा देईल. पिलाताने येशूला विचारले, ‘‘तू यहू़द्यांचा राजा आहेस काय?’’
येशूने उत्तर दिले, ‘‘तू असे म्हणतोस परंतू माझे राज्य हया पृथ्वीचे नाही. असे असते तर, माझे सेवक माझ्यासाठी लढले असते. मी या पृथ्वीवर देवाविषयीचे सत्य सांगण्यास आलो आहे. सत्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण माझे ऐकतो’’ पिलाताने विचारले, ‘‘सत्य काय आहे?’’
येशूबरोबर बोलल्यानंतर पिलात बाहेर असलेल्या जमावास म्हणाला, ‘‘मला या मनुष्यामध्ये काहीच दोष आढळत नाही.’’ परन्तु यहूदी पुढारी व लोकसमुदाय मोठयाने ओरडले, ‘‘त्याला वधस्तंभावर खिळून टाका!’’ पिलात उत्तरला, ‘‘तो निर्दोष आहे!’’ पण ते आणखी मोठयाने ओरडू लागले. तेंव्हा पिलात तिस-यांदा म्हणाला, ‘‘तो निरपराध आहे.’’
जमाव आपल्या विरुध्द बंड पुकारील अशी पिलातास भिती वाटली व त्याने आपल्या सैनिकांस येशूला वधस्तंभावर खिळण्याची आज्ञा दिली. रोमी सैनिकांनी येशूला फटके मारले, त्याच्या अंगावर एक राजकीय झगा घातला व डोक्यावर काटयांचा मुकुट ठेवला. मग ते त्याची थट्टा करु लागले, ‘‘पहा, हा यहूद्यांचा राजा!’’
बायबल कथा :मत्तय 26: 57-27:26; मार्क 14 : 53 - 15: 15; लूक 22: 54 - 23 : 25; योहान 18 : 12 - 19:16
40. येशूला वधस्तंभावर खिळतात
सैनिकांनी येशूची थट्टा उडविल्यानंतर, ते त्यास वधस्तंभावर खिळे ठोकून मारण्यासाठी घेऊन गेले. ज्या वधस्तंभावर त्यास मारावयाचे होते तो वधस्तंभ त्यांनी त्याच्या खांद्यावर दिला.
तेंव्हा ‘‘कवटी’’ असलेल्या ठिकाणी ते त्याला घेऊन आले आणि त्यांनी येशूच्या हातामध्ये व पायामध्ये खिळे ठोकले. परंतू येशू म्हणाला, ‘‘हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना कळत नाही.’’ पिलाताने त्यांना आज्ञा दिली की त्यांनी ‘‘यहूद्यांचा राजा’’ अशी लिहिलेली पाटी वधस्तंभाच्या वर येशूच्या डोक्यावर लावावी.
येशूचे वस्त्र वाटून घेण्यासाठी सैनिकांनी चिठ्ठया टाकल्या. जेंव्हा त्यांनी हे केले, त्यावेळी ही भविष्यवाणी पूर्ण झाली, ’’ त्यांनी माझे वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी चिठ्ठया टाकल्या.’’
येशूला दोन लुटारुंच्या मधोमध वधस्तंभावर खिळण्यात आले. त्यापैकी एकाने येशूची थट्टा केली, परंतू दुसरा म्हणाला,‘‘तू देवाला भित नाही काय? आपण दोषी आहोत, पण हा मनुष्य निर्दोष आहे.’’ तेंव्हा तो येशूला म्हणाला, ‘‘तुझ्या राज्यामध्ये माझी आठवण ठेव.’’ येशू त्यास म्हणाला, ‘‘आजच, तू मजबरोबर सुखलोकात असशील.’’
यहूदी पुढारी व जमावातील इतर लोकांनीही येशूची थट्टा केली. ते त्यास म्हणाले, ‘‘जर तू देवाचा पुत्र आहेस तर वधस्तंभावरुन खाली उतरुन ये व स्वत:चा बचाव कर! म्हणजे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू.’’
तेंव्हा भर दुपारी देशभर आकाशामध्ये काळोख निर्माण झाला. दुपारपासून तीन वाजेपर्यंत पृथ्वीवर काळोख होता.
तेंव्हा येशू मोठयाने म्हणाला, ‘‘पूर्ण झाले! हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो.’’ तेंव्हा त्याने आपले डोके लेववून प्राण सोडिला. जेंव्हा येशू मरण पावला तेंव्हा मोठा भूकंप झाला आणि मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला.
आपल्या मृत्यूद्वारे, येशूने लोकांसाठी देवाकडे जाण्याचा मार्ग खुला करुन दिला. येशूवर पहारा करत असलेल्या सैनिकाने हे सर्व पाहून उद्गारला, ‘‘खरोखर, हा मनुष्य निष्पाप होता. तो देवाचा पुत्र होता.’’
तेंव्हा योसेफ आणि निकदेम हे दोघे यहूदी पुढारी ज्यांनी येशू हा मशीहा आहे असा विश्वास ठेविला होता, पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. त्यांनी त्याचे शरीर वस्त्रात गुंडाळून खडकामध्ये खोदलेल्या एका कबरेमध्ये ठेवले. मग त्यांनी त्या कबरेच्या दाराशी एक मोठी धोंड उभी करुन कबरेचे दार बंद केले.
बायबल कथा: _ मत्तय 27:27-61; _ मार्क_ 15:16-47; _ लूक_ 23:26-56; _ योहान_ 19:17-42_
41. देव येशूला मेलेल्यांतून उठवितो
सैनिकांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर, विश्वास न ठेवणा-या यहूदी पुढा-यांनी पिलातास म्हटले, "तो खोटारडा, येशू म्हणाला होता की तो तीन दिवसांनंतर पुन्हा उठेन. कोणीतरी त्या कबरेवर पहारा ठेवणे अगत्याचे आहे, नाहीतर त्याचे शिष्य त्याचे शरीर चोरून नेतील व तो उठला आहे असे म्हणतील."
पिलात म्हणाला, "काही सैनिकांना घ्या व त्या कबरेभोवती तुमच्याने होईल तितका चांगला बंदोबस्त ठेवा." तेव्हा त्यांनी त्या कबरेच्या तोंडावरच्या धोंडीवरती शिक्कामोर्तब केले व तेथे सैनिकांना ठेवले यासाठी की कोणी येशूचे शरीर चोरू नये.
येशूला कबरेत ठेवल्यानंतरचा दुसरा दिवस हा शब्बाथ दिवस होता, त्या दिवशी यहूद्यांना कबरेकडे जाण्याची मनाई होती. तेव्हा शब्बाथाच्या दुस-या दिवशी पहाटेच, काही स्त्रिया सुगंधी द्रव्ये घेऊन कबरेवर गेल्या त्यांनी ती त्याच्या उत्तरक्रियेसाठी तयार केली होती.
तेव्हा अचानक, एक मोठा भूकंप झाला. विजेसारखे रुप असणारा एक देवदूत स्वर्गातून प्रकट झाला. त्याने कबरेच्या तोंडाशी असलेली धोंड बाजूला सारली व त्यावर बसला. तेव्हा त्या कबरेवर पहारा करत असलेल्या सैनिकांना फार भिती वाटली व ते मेल्यासारखे जमिनीवर पडले.
जेव्हा त्या स्त्रिया कबरेजवळ आल्या, तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, "भिऊ नका. येशू येथे नाही. त्याने सांगितल्याप्रमाणे तो मेलेल्यातून उठला आहे! पाहा, ज्या कबरेत त्याला ठेवले होते ती जागा." तेव्हा त्या स्त्रियांनी आत जाऊन जेथे येशूचे शरीर ठेवले होते, ती जागा पाहिली. त्याचे शरीर त्या ठिकाणी नव्हते!
तेव्हां देवदूत त्यां स्त्रियांना म्हणाला, "जा, आणि शिष्यांना सांगा, 'येशू मरणातून उठला आहे व तो तुमच्यापुढे गालीलास जात आहे.'"
हे ऐकून स्त्रियांना फार भिती वाटली व आनंदही झाला. त्यांनी धावत जाऊन शिष्यांनी ही आनंदाची बातमी सांगितली.
त्या स्त्रिया शिष्यांना ही बातमी सांगायला जात असतांना, येशूने त्यांना दर्शन दिले, आणि त्यांनी त्याला नमन केले. येशू म्हणाला, "भिऊ नका. जा आणि माझ्या शिष्यांना गालीलात यायला सांगा. मी त्यांना तेथे भेटेन."
बायबल कथाः: मत्तय //२७://६२ //- २८://१५//; मार्क १६://१ //- ११; लूक २४://१ //- १२; योहान २०://१ //- __१८//
42. येशूचे स्वर्गारोहण
येशू मेलेल्यातून ज्या दिवशी उठला, त्या दिवशी त्याचे दोन शिष्य जवळच्या एका नगरामध्ये जात होते. ते चालत असतांना, येशूविषयी जे घडले होते त्यासंबंधाने बोलत होते. त्यांनी येशू हा मशीहा आहे असा विश्वास ठेविला होता, परंतु येशूला मारण्यात आले होते. आता त्या स्त्रिया म्हणत होत्या की तो पुन्हा जिवंत झाला आहे. आता कशावर विश्वास ठेवावा हे त्यांना कळत नव्हते.
येशू त्यांच्या जवळ आला व त्यांच्याबरोबर चालू लागला, पण त्यांनी त्याला ओळखले नाही. ते कशाविषयी बोलत होते हे त्याने त्यांना विचारले, आणि त्यांनी त्याला कांही दिवसापुर्वी येशूविषयी घडलेल्या उल्लेखनीय गोष्टी सांगितल्या. त्यांना वाटले की ते एका अनोळख्या प्रवाशाबरोबर ज्याला यरूशलेममध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नाहीत त्याच्याशी बोलत आहेत.
तेव्हा येशूने त्यांना, देवाच्या वचनीत मशीहाविषयी काय सांगितले आहे हे स्पष्ट करुन सांगितले. त्याने त्यांना आठवण करून दिली की संदेष्टयांनी सांगितले होते की मशीहा दुःख सोशील, त्यास जीवे मारतील, पण तीस-या दिवशी तो पुन्हा उठेल. जेव्हा ते दोघे जेथे त्यांना मुक्काम करावयाचा होता तेथे पोहोचले, तेव्हा संध्याकाळ होत आली होती.
त्या दोघांनी येशूला आपल्याबरोबर मुक्काम करण्याचा आग्रह केला व तो त्यांच्याबरोबर राहण्यास आत गेला. ते संध्याकाळच्या जेवणासाठी बसलेले असतांना, येशूने भाकर घेऊन देवाचा धन्यवाद केला व ती मोडली. अचानक तो येशू आहे हे त्यांनी ओळखले. परंतु त्या समयी, येशू त्यांच्यापासून अंतर्धान पावला.
ती दोघे एकमेकांना म्हणू लागली, "तो येशू होता! आणि म्हणूनच तो देवाचे वचन आम्हाला उलगडा करून सांगत असतांना आपले अंतःकरण आतल्याआत उकळत होते!" तेव्हा लगेच, ते यरुशलेमेस परतले. त्यांनी येऊन शिष्यांना सांगितले की, "येशू जिवंत झाला आहे! आम्ही त्यास पाहिले आहे!"
शिष्य हे बोलत असतांनाच, येशूने त्या खोलीमध्ये स्वतःला प्रकट केले व म्हटले, "तुम्हास शांती असो!" शिष्यांना वाटले की ते भूत आहे, पण येशू म्हणाला, "तुम्ही भयभित होऊन शंका का घेता? माझ्या हाताकडे व पायाकडे पाहा. जसे मला शरीर आहे तसे भूतांना शरीर नसते." तो भूत नाही हे सिद्ध करण्यासाठी, त्याने त्यांस खाण्यासाठी काही आहे का ते विचारले. त्यांनी त्यांस शिजविलेला मासा दिला, आणि त्याने तो खाल्ला.
येशू म्हणाला, "मी तुम्हास सांगितले होते की माझ्याविषयी देवाच्या वचनामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणे अगत्याचे आहे." मग त्याने त्यांची अंतःकरणे उघडली, तेव्हा त्यांना देवाचे वचन कळले. तो म्हणाला, "अनेक वर्षांपूर्वी असे लिहिले होते की मशीहा दुःख सहन करील, त्यास मारतील व तीस-या दिवशी तो मरणातून पुन्हा उठेल.
"धर्मशास्त्रामध्ये हेही लिहिले होते की माझे शिष्य पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाची घोषणा करतील. ते यरूशलेमेपासून ह्या संदेशास आरंभ करतील, मग सर्व ठिकाणच्या सर्व लोकांकडे हा संदेश घेऊन जातील. तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षीदार आहात."
पुढील चाळीस दिवसांमध्ये, येशू अनेक वेळा शिष्यांना प्रकट झाला. एकदा तर तो 500 हून अधिक लोकांस एकाच वेळी प्रकट झाला. त्याने आपल्या शिष्यांना आपण जिवंत असल्याचे प्रमाण विविध प्रकारे दिले व त्यांना देवराज्याविषयी शिकवण दिली.
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे. म्हणून, तुम्ही जा व सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनवा आणि पिता, पुत्र व पवित्र आत्माच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या, आणि मी आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळावयास शिकवा. आणि आठवण ठेवा की मी नेहमी तुम्हाबरोबर आहे."
येशूच्या पुनरूत्थानानंतर चाळीस दिवसांनी येशूने शिष्यांस सांगितले, "जोपर्यंत माझा पिता तुम्हास सामर्थ्य देणारा पवित्र आत्मा तुम्हावर पाठवत नाही, तोपर्यंत यरूशलेम सोडून जाऊ नका." मग येशू स्वर्गात गेला व मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. सर्व गोष्टींवर अधिकार चालवण्यासाठी येशू देवाच्या उजव्या हाताकडे बसला आहे .
बायबल कथा: मत्तय २८//://१६//-२०; मार्क १६://१२//-२०; लूक २४://१३//-५३; योहान २०://१९//-२३; प्रेषित १://१//-__११//
43. मंडळीची सुरूवात
येशू स्वर्गात गेल्यानंतर, येशूने आज्ञा दिल्याप्रमाणे शिष्य यरूशलेमेतच राहिले. तेथील विश्वासणारे प्रार्थना करण्यासाठी वारंवार एकत्र येऊ लागले.
प्रत्येकवर्षी, वल्हांडणानंतर 50 दिवसांनी, यहूदी लोक पेंटेकॉस्ट नावाचा महत्वाचा दिवस साजरा करत. पेंटेकॉस्ट हा यहुदी लोकांचा हंगामाचा सण होता. जगातील सर्व यहूदी लोक यरुशलेमेत येऊन पेंटेकॉस्ट साजरा करत. यावेळी येशूचे स्वर्गारोहण झाल्यानंतर सुमारे एक आठवड्यानंतर पेंटेकॉस्ट आला होता.
जेंव्हा सर्व विश्वासणारे एकत्र जमले होते एकाएकी ते बसले होते ती खोली सोसाट्याच्या वा-यासारख्या ध्वनीने भरून गेली. तेव्हा अग्निच्या ज्वालेसारख्या जिभा त्यांना सर्व विश्वासणा-यांच्या डोक्यावर दिसल्या. ते सर्व पवित्र आत्म्याने भरून गेले व वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले.
यरूशलेमेतील लोकांनी जेंव्हा हा आवाज ऐकला तेंव्हा हे काय आहे ते पाहाण्यासाठी आले. जेव्हा लोकांनी विश्वासणा-यांना देवाची आश्चर्यकर्मे प्रकट करतांना व त्यांच्याच मातृभाषेमध्ये बोलतांना ऐकले तेंव्हा लोकांना फार आश्चर्य वाटले.
काही लोकांना वाटले की विश्वासणारे मद्यपान करून मस्त झाले आहेत. परंतु पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला, "माझे बोलणे ऐका! ही माणसे मद्यपान करून मस्त झाली नाहीत! ह्याद्वारे योएल भविष्यवक्त्याने केलेली भविष्यवाणी पूर्ण होत आहे, देवाने म्हटले आहे "शेवटच्या काळामध्ये मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करील.'"
""अहो इस्राएल लोकांनो, येशूने देवाच्या शक्तिद्वारे अनेक चिन्हे व अद्भुते केली, जी तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिली व तुम्हाला माहीत आहेत. पण तुम्ही त्यास वधस्तंभावर खिळले!"
"जरी येशू मरण पावला होता, तरी देवाने त्यास मेलेल्यांतून पुन्हा उठविले. ह्या घटनेद्वारे ही भविष्यवाणी पूर्ण होते, ‘तू आपल्या पवित्रास कबरेमध्ये कुजू देणार नाहीस.’ आम्ही ह्या गोष्टीविषय़ीचे साक्षीदार आहेत की देवाने येशूला मरणातून पुन्हा उठविले आहे."
येशू आता आपल्या देवपित्याच्या उजव्या बाजूस ऊंचावलेला आहे. आणि येशूने अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांने आम्हासाठी पवित्र आत्मा पाठविला आहे. आता जे तुम्ही पाहात व ऐकत आहात, त्या सर्व गोष्टी पवित्र आत्मा करत आहे.
तुम्ही येशू ह्या मनुष्यास, वधस्तंभावर खिळले. परंतु आता तुम्हाला कळू द्या की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे!"
पेत्राचे भाषण ऐकणा-यांच्या मनाला टोचणी लागली. म्हणून त्यांनी पेत्र व अन्य प्रेषितांना विचारले, "बंधुजनहो, आम्ही आता काय करावे?"
पेत्र त्यांना म्हणाला, "तुम्हांपैकी प्रत्येकाने आपआपल्या पापांचा पश्चात्ताप करुन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्यावा, म्हणजे देव तुम्हास तुमच्या पापांची क्षमा करील. मग तो तुम्हास पवित्र आत्म्याचे दान सुद्धा देईल."
तेव्हा सुमारे 3,000 लोकांनी पेत्राच्या बोलण्यावर विश्वास ठेविला व ते येशूचे शिष्य झाले. त्यांनी बाप्तिस्मा घेतला व यरूशलेमेच्या मंडळीमध्ये सामिल झाले.
शिष्य प्रेषितांच्या शिक्षणात सहवासात भाकर मोडण्यात व इतरांबरोबर प्रार्थना करण्यात तत्पर असत. ते आनंदाने एकत्र देवाची स्तुती करीत आणि त्यांचे सर्व काही समाईक होते. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत. प्रत्येक दिवशी त्यांच्यामध्ये नवीन विश्वासणा-यांची भर पडत होती.
_बायबल कथाः _ प्रेषित २
44. पेत्र व योहान एका भिका-यास बरे करतात
एके दिवशी पेत्र व योहान मंदिरामध्ये जात होते. ते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जात असतांना, त्यांनी एक लंगडा भिकारी भीक मागत असतांना पाहिला.
पेत्राने त्या पांगळ्या मनुष्याकडे पाहून म्हटले, "तुला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. पण माझ्याकडे जे आहे ते मी तुला देतो. येशूच्या नावामध्ये ऊठ आणि चालू लाग!"
लगेच तो पांगळा मनुष्य बरा झाला, तो चालू लागला व तो उड्या मारत देवाची स्तुती करू लागला. मंदिराच्या अंगणातील लोकांनी त्याला पाहून आश्चर्य केले.
त्या ब-या झालेल्या मनुष्यास पाहण्यासाठी लोकांनी त्याच्याभोवती गर्दी केली. पेत्र त्यांना म्हणाला, "हा मनुष्य बरा झालेला पाहून तुम्ही का आश्चर्य करता?" आम्ही आमच्या सामर्थ्याने किंवा आमच्या चांगुलपणाने त्यास बरे केले नाही. तर येशूच्या शक्तीने व देवाने दिलेल्या विश्वासाद्वारेच हा मनुष्य बरा झाला आहे."
"तुम्ही रोमी सम्राटास येशूला जीवे मारावयास सांगितले. तुम्ही जीवनदात्यास ठार मारिले, परंतु देवाने त्यास मेलेल्यांतून पुन्हा उठविले. जरी तुम्ही काय करत होता ते तुम्हास कळले नाही, तरी देवाने तुमच्या करवी मशीहा दुःख सोशिल व मरेल ही भविष्यवाणी पूर्ण करून घेतली आहे. यास्तव, आता पश्चात्ताप करा व देवाकडे वळा म्हणजे तुमची पापे धुतली जातील."
मंदिरातील पुढारी पेत्र व योहान यांचे बोलणे ऐकून संतापले. म्हणून त्यांनी त्यांस धरून तुरुंगात टाकले. परंतु पुष्कळ लोकांनी पेत्राच्या वचनावर विश्वास ठेविला, आणि आता विश्वासणा-यांची संख्या वाढून सुमारे 5000 झाली.
दुस-या दिवशी, यहूदी पुढा-यांनी पेत्र व योहान यांना महायाजकासमोर व इतर धर्मपुढा-यांसमोर उभे केले. त्यांनी पेत्र व योहान यांना विचारले, "तुम्ही कोणत्या शक्तिद्वारे ह्या पांगळ्या मनुष्यास बरे केले?"
पेत्र त्यांना म्हणाला, "हा मनुष्य येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बरा होऊन तुम्हापुढे उभा आहे. तुम्ही येशूला खिळले, परंतु देवाने त्यास पुन्हा जिवंत केले! तुम्ही त्यास नाकारले, परंतु येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याशिवाय तारणाचा दुसरा मार्ग नाही!"
हे ऐकून धार्मिक पुढा-यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण पेत्र व योहान सामान्य व अडाणी माणसे असतांनाही त्यांच्यासमोर मोठ्या धाडसाने बोलत होते. परंतु ते येशूच्या सहवासात होते हे त्यांनी ओळखले. मग त्यांनी पेत्राला व योहानाला धमकावले व जाऊ दिले.
_बायबल कथाः _ प्रेषित ३:१-४; २२
45. फिलिप्प आणि कूशी अधिकारी
प्रारंभीच्या मंडळींमध्ये पुढा-यांपैकी स्तेफन नावाचा एक पुढारी होता. तो एक प्रतिष्ठित पुरूष होता, तो ज्ञानी व पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा होता. स्तेफनाने अनेक चमत्कार केले व लोकांनी येशूवर विश्वास ठेवावा यास्तव अनेक प्रमाण देऊन वादविवाद करीत असे.
एके दिवशी, स्तेफन येशूविषयी शिकवण देत असतांना, विश्वास न ठेवणारे काही यहूदी त्याच्याशी वादविवाद करू लागले. त्यांना स्तेफनाचा फार राग आला व त्याच्यावर त्यांनी धार्मिक पुढा-यांसमोर खोटे दोषारोप केले. ते म्हणाले, "आम्ही त्यास मोशे व देवाविषयी अपशब्द बोलतांना ऐकले आहे!" तेव्हा धार्मिक पुढा-यांनी स्तेफनास अटक केले व त्यास महायाजक व इतर पुढा-यांसमोर आणले, तेथे त्याच्याविरुदध आणखी खोटे साक्षीदार उभे केले व त्यांनी स्तेफनावर खोटे आरोप लाविले.
महायाजक स्तेफनास म्हणाला, "ह्या गोष्टी ख-या आहेत का?" स्तेफनाने त्यांस उत्तर देत देवाने अब्राहमापासून ते येशूपर्यंत कशा प्रकारे आश्चर्यकर्मे केली व देवाच्या लोकांनी निरंतर कशा त्याच्या आज्ञा मोडिल्या ह्याविषयी आठवण करून दिली. मग तो म्हणाला' "अहो ताठ मानेच्या व बंडखोर लोकांनो, जसे तुमचे पूर्वज नेहमी पवित्र आत्म्याचा विरोध करत होते, तसेच तुम्ही करत आहात. परंतु तुम्ही त्यांच्याहीपेक्षा वाईट केले आहे! तुम्ही मशीहास जीवे मारले आहे!"
जेव्हा धार्मिक पुढा-यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांना खूप राग आला व त्यांनी आपल्या कानांवर हात ठेवून मोठ्याने ओरडले. त्यांनी स्तेफनास नगराच्या बाहेर ओढत नेले आणि त्यास दगडमार केला.
स्तेफन मरत असतांना, तो मोठ्याने ओरडला, "येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर." मग त्याने गुडघ्यावर पडून पुन्हा ओरडून म्हटले, "प्रभुजी, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस." मग त्याने प्राण सोडला.
शौल नावाचा एक तरूण मनुष्य स्तेफनाला मारणा-या लोकांशी सहमत होता व त्यास दगडमार करणा-यांची वस्त्रे तो सांभाळत होता. त्या दिवसांमध्ये, यरूशलेमेतील पुष्कळ लोक येशूच्या शिष्यांचा छळ करत होते, म्हणून शिष्य दुस-या ठिकाणी पळून गेले. पण, असे असतांनाही, जेथे कोठे ते गेले, त्यांनी येशूविषयी प्रचार केला.
फिलिप्प नावाचा येशूचा शिष्य छळामूळे यरुशलेम सोडून पळून जाणा-या विश्वासणा-यांपैकी एक होता. तो शोमरोनामध्ये पळून गेला होता व त्या ठिकाणी त्याने येशूची सुवार्ता सांगितली व अनेकांचे तारण झाले. तेव्हा एके दिवशी, देवाच्या एक दूताने फिलिप्पास सांगितले वाळवंटातील एका विशिष्ट वाटेवर जा. तो वाटेने चालत असतांना फिलिप्पाने कूशी देशाचा एक अधिकारी आपल्या रथामध्ये बसून जात असतांना पाहिला. पवित्र आत्म्याने फिलिप्पास त्या मनुष्याशी बोलण्यास सांगितले.
जेव्हा फिलिप्प रथाजवळ आला, तेव्हा त्याने तो कूशी यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत असतांना ऐकले. तो वाचत होता, "त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले; आणि जसे कोकरू कातरणा-याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडीत नाही. त्यांनी त्याला वाईट वागणूक दिली व त्याचा सन्मान केला नाही. त्यांनी त्यास जीवे मारिले."
फिलिप्पाने कूशी अधिका-यास विचारले, "तुम्ही जे वाचत आहात, ते तुम्हास समजते का!" कूशी माणसाने उत्तर दिले, "नाही. जोपर्यंत मला कोणी समजावून सांगत नाही, तोपर्यंत मी समजू शकत नाही. कृपया येऊन माझ्या बाजूस बसा. यशया संदेष्टा स्वतःविषयी की अन्य कोणाविषयी लिहित आहे?"
फिलिप्पाने त्या कूशीस स्पष्टिकरण देत सांगितले की संदेष्टा हे मशीहाविषयी लिहित आहे. फिलिप्पाने अन्य शास्त्रपाठातूनही संदर्भ घेऊन त्यास येशूविषयीची सुवार्ता सांगितली.
फिलिप्प आणि कूशी अधिकारी पुढे प्रवास करत-करत एका तळ्याजवळ आले कूशी अधिकारी म्हणाला, "पाहा! येथे पाणी आहे! मी बाप्तिस्मा घेऊ शकतो का?" आणि त्याने सारथ्यास रथ थांबवायला सांगितले.
मग ते पाण्यामध्ये उतरले, आणि फिलिप्पाने त्या कूशी अधिका-यास बाप्तिस्मा दिला. ते पाण्यातून वर आल्यानंतर, पवित्र आत्मा फिलिप्पास दूस-या ठिकाणी घेऊन गेला तो त्या ठिकाणी लोकांना येशूविषयी सांगत राहिला.
कूशी इकडे आनंदाने आपल्या घराकडे प्रवास करू लागला, कारण त्याला येशूची ओळख झाली होती.
बायबल कथाः _ प्रेषित 6:8-8:5; 8:26-40_
46. पौल ख्रिस्ती बनतो
शौल हा तरुण मनुष्य स्तेफनाला दगडमार करणा-यांची वस्त्रे सांभाळत होता. तो येशूवर विश्वास ठेवत नव्हता, म्हणून तो विश्वासी लोकांचा छळ करत असे. यरुशलेममध्ये तो घरोघरी जाऊन विश्वास ठेवणा-या स्त्रीया आणि पुरूषांस दोघांसही तुरूंगात टाकत असे. महायाजकाने शौलास दिमिष्क शहरातील ख्रिस्ती लोकांस पकडून यरूशलेमेस आणण्यासाठी परवाना दिला होता.
शौल दिमिष्काच्या मार्गावर प्रवास करत असतांना, अचानक त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला आणि तो जमिनीवर पडला. शौलाने कोणी तरी हाक मारतांना ऐकले, "शौला! शौला! तू माझा छळ का करतोस?" शौलाने विचारले, "प्रभु, तू कोण आहेस?" येशूने त्यास म्हटले, "मी येशू आहे. तू माझा छळ करत आहेस!"
शौल जेव्हा उठला, तेव्हा त्याला कांही दिसेना. तेव्हा त्याच्या मित्रांना त्याला दिमिष्कास न्यावे लागले. शौलाने तीन दिवस काहीच खाल्ले प्याले नाही.
दिमिष्कात हनन्या नावाचा एक शिष्य होता. देव त्यास म्हणाला, "शौल रहात असलेल्या घरी जा. आणि त्याच्यावर आपले हात ठेव म्हणजे त्यास पुन्हा दृष्टी मिळेल." परंतु हनन्या म्हणाला, "प्रभूजी, मी ऐकले आहे की हा मनुष्य कशाप्रकारे ख्रिस्ती लोकांचा छळ केला आहे." देव त्यास म्हणाला, "जा! कारण यहूदी लोकांसमोर व परराष्ट्रीयांसमोर व माझे नाव घेऊन जाण्याकरिता मी त्याला निवडलेले आहे. माझ्या नावासाठी तो खूप दुःख सोसणार आहे."
तेव्हा हनन्याने शौलाकडे जाऊन त्याजवर आपले हात ठेवले व म्हणाला, "जो येशू तुला मार्गामध्ये प्रकट झाला, त्याने मला तुझ्याकडे पाठविले आहे, अशासाठी की, तुझी दृष्टी तुला पुन्हा प्राप्त व्हावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस." लगेच शौलाला पुन्हा दिसू लागले, आणि हनन्याने त्यास बाप्तिस्मा दिला. मग शौलाने अन्न घेतले व त्यास शक्ति मिळाली.
लगेच शौल दिमिष्कामध्ये असणा-या यहूद्यांना प्रचार करू लागला व म्हणाला, "येशू हा देवाचा पुत्र आहे." यहुद्यांना हे पाहून मोठे आश्चर्य वाटले की ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा आता येशूवर विश्वास ठेवतो व त्याचा प्रचार करत आहे! शौलाने तर्कशुद्ध संभाषण करून यहूद्यांना येशू हा मशीहा असल्याचे सिद्ध केले.
पुष्कळ दिवसांनंतर, यहूद्यांनी शौलास मारण्याचा कट रचला. शहराच्या वेशीजवळ शौलावर पाळत ठेवुन त्याला मारण्यासाठी त्यांनी काही लोक नेमले. परंतु शौलाला हा कट समजला, व त्याच्या मित्रांनी त्याची सुटका करण्यास मदत केली. एके रात्री त्यांनी वेशीच्या भिंतीवरून एका पाटी (मोठी टोपली) मध्ये बसवून त्याला खाली सोडले. शौल दिमिष्कातून, सुटल्यानंतर येशूविषयी प्रचार करू लागला.
शौल यरूशलेमेस शिष्यांना भेटण्यासाठी गेला, परंतू त्यांना त्याची भिती वाटली. तेव्हा बर्णबा नावाच्या एका विश्वासणा-याने शौलास प्रेषितांकडे नेले व सांगितले की कशा प्रकारे शौलाने दिमिष्कामध्ये येशूचा मोठ्या धाडसाने प्रचार केला. त्यानंतर शिष्यांनी त्याचा स्विकार केला.
यरूशलेमेतील छळामळे काही विश्वासणारे दूर अंत्युखिया शहरामध्ये गेले व तेथे त्यांनी येशूविषयी प्रचार केला. अंत्युखिया येथील लोकांमध्ये जास्त यहुदी लोक नव्हते, पण प्रथमच, त्यांच्यापैकी पुष्कळ लोक सुद्धा विश्वासणारे झाले. बर्णबा आणि शौल तेथील नवीन विश्वासणा-यांना येशूविषयी अधिक शिक्षण देण्यासाठी व मंडळीला उत्तेजन देण्यासाठी अंत्युखियास गेले. अंत्युखिया येथील येशूवर विश्वास ठेवणा-यांना प्रथमच "ख्रिस्ती" म्हटले गेले.
एके दिवशी, अंत्यखियाचे ख्रिस्ती उपवास-प्रार्थना करत असतांना, पवित्र आत्मा त्यांच्यावर आला व म्हणाला, "बर्णबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे, त्यासाठी त्यांना वेगळे करुन ठेवा." तेव्हा अंत्युखिया येथील मंडळीने शौल व बर्णबासाठी प्रार्थना केली व त्यांच्यावर हात ठेविले. आणि मग त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी येशूची सुवार्ता सांगण्यासाठी पाठविले. बर्णबा व शौल यांनी पुष्कळ वेगवगळ्या लोकगटांस सुवार्ता सांगितली व पुष्कळ लोकांनी येशूवर विश्वास ठेविला.
वायबल कथाः: प्रेषित //८://३//; ९://१ //- ३१; ११://१९ //- २६; १३://१ //- ३//
47. फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला
शौल संपूर्ण रोमन साम्राज्यामधून प्रवास करत असतांना, त्याने आपल्या "पौल" ह्या रोमन नावाचा उपयोग करु लागला. एके दिवशी पौल आणि त्याचा मित्र सीला हे फिलिप्पै नगरामध्ये येशूची सुवार्ता सांगण्यासाठी गेले. शहराच्या वेशीबाहेर नदीच्या काठावर प्रार्थनेसाठी एकत्रित आलेल्या लोकांकडे ते गेले. तेथे त्यांना लुदिया नावाची एक व्यापारी स्त्री भेटली. तिचे देवावर प्रेम होते व ती देवाची भक्ती करणारी होती.
देवाने लुदियाचे अःकरण उघडले व तिने येशूविषयीच्या संदेशावर विश्वास ठेविला, मग तिने आपल्या कुटुंबियांसहित बाप्तिस्मा घेतला. तिने पौल व सीला यांना आपल्या घरी बोलाविले, तेव्हा ते तिच्या कुटुंबासोबत राहिले.
पौल आणि सीला प्रार्थनेच्या स्थळी लोकांस वारंवार भेटले. दररोज ते त्या ठिकाणी जात असतांना, एक दासी व दुष्टात्माग्रस्त मुलगी त्यांच्यामागे चालू लागली. ह्या दुष्टात्म्याच्या आधारे ती लोकांचे भविष्य सांगत असे, अशा प्रकारे भविष्य सांगून ती आपल्या धन्यासाठी भरपूर मिळकत करुन देत असे.
ते रस्त्याने चालत असतांना ती गुलाम मुलगी ओरडत राहिली, "ही माणसे परात्पर देवाचे दास आहेत. ते तुम्हास तारणाचा मार्ग सांगत आहेत!" तिने असे अनेक वेळा केल्यामुळे पौलास त्रास झाला.
शेवटी एके दिवशी ती मुलगी ओरडू लागली, पौलाने तिच्याकडे वळून तिच्यामध्ये असणा-या पिशाच्चाला म्हटले, "येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा." आणि तत्काळ ते पिशाच्च तिला सोडून निघून गेले.
हे पाहून त्या मुलीच्या धन्यांस खूप राग आला! त्यांच्या लक्षात आले की दुष्टात्म्याशिवाय ती मुलगी लोकांचे भविष्य सांगू शकत नव्हती. ह्याचा अर्थ तीने लोकांना त्यांचे भविष्य सांगावे म्हणुन लोक आता तिच्या मालकांस पैसे देणार नव्हते.
तेव्हा या मुलीच्या धन्यांनी पौल व सीला यांना रोमन अधिका-याकडे नेले व त्यांनी त्यांना मारहाण केली व तुरुंगामध्ये टाकले.
त्यांनी पौल व सीला यांना तुरूंगाच्या एकदम आतल्या ठिकाणी ठेवले व त्यांचे पाय खोड्यात अडकवले. तरीही मध्यरात्रीच्या समयी, ते देवाची स्तुती करत होते व गीत गात होते.
अचानक, त्या ठिकाणी एक मोठा भूकंप झाला! तेव्हा तुरूंगाचे सर्व दरवाजे आपोआप उघडले गेले, आणि कैद्यांचे साखळदंडही तुटून पडले.
तेव्हा तुरूंगाचा अधिकारी जागा झाला, आणि जेव्हा त्याने तुरूंगाचे दरवाजे उघडे पाहिले तेव्हा तो खूप भयभित झाला! त्याला वाटले की सर्व कैदी पळून गेले असतील, म्हणून तो आत्महत्या करणार होता. (त्यास माहीत होते जर कैदी निसटून गेले तर रोमी अधिकारी त्यास जीवे मारतील.) परंतु पौलाने त्यास ओरडून म्हटले, "थांब! स्वतःस इजा करून घेऊ नकोस. कारण आम्ही सर्व इथेच आहोत."
तुरूंगाचा अधिकारी पौल व सीलाकडे जात असतांना थरथर कापत होता, तो म्हणाला, "माझे तारण व्हावे म्हणून मी काय करावे?" पौलाने उत्तर दिले, "प्रभु येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल." तेव्हा तुरूंगाधिकारी पौल व सीला यांना आपल्या घरी घेऊन गेला आणि त्याने त्यांच्या जखमा धुतल्या. पौलाने त्याच्या घरातील सर्व लोकांना येशूची सुवार्ता सांगितली.
तुरुंगाधिकारी आणि त्याचे सर्व कुटुंब यांनी येशूवर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतला. तेव्हा तुरूंगाधिका-याने पौल व सीला यांना जेवण दिले, आणि त्यांनी एकत्र मिळुन आनंद केला.
दुस-या दिवशी शहराच्या अधिका-यांनी पौल व सीला यांची सुटका केली व फिलिप्पै शहर सोडून त्यांना जाण्यास सांगितले. तेव्हा पौल व सीला यांनी लुदिया व इतर बंधूंना भेट दिली व नंतर त्यांनी ते शहर सोडले. येशूविषयीची सुवार्ता पसरत गेली व मंडळीची वाढ होत गेली.
पौल व इतर ख्रिस्ती पुढारी येशूची सुवार्ता सांगत व शिक्षण देत अनेक शहरांमधून प्रवास करत गेले. त्यांनी पुष्कळ पत्रे सुद्धा लिहीली व मंडळ्यातील विश्वासणा-यांना प्रोत्साहन व शिक्षण दिले. त्यांपैकी काही पत्रे बायबलमधील पुस्तके झाली.
बायबल कथाः _ प्रेषित 16:11-40_
48. येशू हा अभिवचनानुसार दिलेला मशीहा आहे
देवाने जेव्हा सृष्टी बनविली तेव्हा सर्वकाही परिपूर्ण होते. तेथे पाप नव्हते. आदाम आणि हव्वा एकमेकांवर प्रेम करत व त्यांचे देवावर प्रेम होते. तेथे कुठल्याही प्रकारचा आजार किंवा मृत्यु नव्हता. सृष्टी अशीच राहावी अशी देवाची इच्छा होती.
हव्वेला फसविण्यासाठी सैतानाने सर्पाद्वारे संभाषण केले. तेव्हा तिने व आदामाने देवाविरूद्ध पाप केले. त्यांनी केलेल्या पापाचा परिणाम म्हणून पृथ्वीवरील प्रत्येकजण आजारी पडतो व मरण पावतो.
आदाम आणि हव्वेने पाप केल्यामुळे आणखी एक भयानक गोष्ट घडली. ते देवाचे वैरी झाले. परिणामतः तेव्हापासून पृथ्वीवर जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ति पापाचा स्वभाव घेऊन जन्मतो व तो देवाचा शत्रु देखिल होतो. पापामुळे देव आणि मनुष्यांमध्ये असणारा नातेसंबंध तुटला. परंतु हा नातेसंबंध पुन्हा जोडण्याची देवाने एक योजना बनविली.
देवाने अभिवचन दिले की हव्वेचा एक वंशज सैतानाचे डोके फोडिल व सैतान त्याची टाच फोडिल. अर्थात सैतान मशीहास जीवे मारील, परंतु देव त्यास पुन्हा जिवंत करील आणि मग मशीहा सैतानाच्या सत्तेचा संपूर्ण नायनाट करील. अनेक वर्षांनंतर देवाने येशू हाच मशीहा आहे हे प्रकट केले.
जेव्हा देवाने संपुर्ण पृथ्वी जलप्रलयाद्वारे नष्ट केली, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवणा-यांसाठी देवाने एक जहाज दिले. त्याचप्रकारे, मनुष्यांच्या पापांमुळे प्रत्येक जण मृत्युस पात्र आहे, पण त्याजवर विश्वास ठेवणारांस वाचविण्यासाठी (तारण्यासाठी) देवाने येशूला पाठविले.
शेकडो वर्षे, महायाजक मनुष्यांना आपल्या पापांची शिक्षा मरण आहे हे दर्शविण्यासाठी सारखे पशुबली व होमार्पणे करत. परंतु त्या अर्पणांद्वारे त्यांच्या पापांची क्षमा होऊ शकली नाही. येशू हा एक थोर महायाजक आहे. इतर याजकांनी केले नाही असे येशूने केले, संपूर्ण जगातील लोकांसाठी स्वतःचेच अर्पण केले, अशासाठी की जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना पापांची क्षमा व्हावी. येशू हा एक परिपूर्ण महायाजक होता, कारण त्याने प्रत्येकाने केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा आपणावर घेतली.
देवाने अब्राहामास म्हटले, "सर्व राष्ट्रांतील कुळे तुझ्याद्वारे आशीर्वादीत होतील." येशू ख्रिस्त हा अब्राहामाचा वंशज होता. जगातील सर्व कुळे त्याच्याद्वारे आशीर्वादीत झाली, कारण जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याच्या पापांची क्षमा होते व तो अब्राहामाचा आत्मिक वंशज होतो.
जेव्हा देवाने अब्राहामास इसहाकाचे अर्पण करावयास सांगितले, तेंव्हा देवाने इसहाकाच्या ऐवजी, अर्पणासाठी कोकरा पुरविला होता. आम्ही आमच्या पापांमुळे मरणदंडास पात्र आहोत! परंतु देवाने येशूला, देवाचा कोकरा, अर्पण म्हणून आमच्याजागी मरण्यास पाठविले.
जेव्हा देवाने मिसर देशामध्ये शेवटची पीडा पाठविली, तेव्हा त्याने प्रत्येक इस्राएली कुटुंबास एक निर्दोष कोक-याचा वध करून त्याचे रक्त त्यांच्या घरांच्या चौकटीस लावावयास सांगितले होते. जेव्हा देवाने ते रक्त पाहिले, तेव्हा त्यांचे घर ओलांडून तो गेला व प्रथम जन्मलेल्या पुत्रांस त्याने मारले नाही. ह्या घटनेस वल्हांडण म्हणतात.
येशू ख्रिस्त हाच आमच्या वल्हांडणाचा कोकरा आहे. तो परिपुर्ण व निर्दोष होता आणि वल्हांडणाच्या सणाच्या समयी वधला गेला होता. जेव्हा कोणी येशूवर विश्वास ठेवितो, तेव्हा येशूच्या रक्ताद्वारे त्याच्या पापांची खंडणी भरून देण्यात येते, आणि देवाची शिक्षा त्या व्यक्तीस ओलांडून जाते.
देवाने इस्राएलाबरोबर एक करार केला होता, ते त्याचे निवडलेले लोक होते. पण त्याने आता सर्वांसाठी उपलब्ध असणारा एक नवा करार केला. ह्या नव्या करारामुळे, कोणत्याही लोकसमुदायातील कोणीही येशूवरील विश्वासाद्वारे देवाची मुले होऊ शकतात.
देवाच्या वचनाचा प्रचार करणारा मोशे हा एक महान संदेष्टा होता. परंतु येशू त्या सर्वांहून अधिक महान संदेष्टा आहे. तो देव आहे, म्हणून त्याने जे काही केले व बोलले ती देवाची कृत्ये व देवाचे शब्द होते. म्हणूनच येशूला देवाचा शब्द असे म्हणतात.
देवाने दाविद राजाला अभिवचन दिले होते की त्याच्या वंशजांपैकीच एक जण देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करील. येशू हा देवाचा पुत्र व मशीहा असल्यामुळे देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करणारा तो दाविदाचा एक विशेष वंशज आहे.
दाविद हा इस्राएलाचा राजा होता, परंतु येशू हा संपुर्ण विश्वाचा राजा आहे! तो पुन्हा येणार आहे व आपल्या राज्यामध्ये न्यायाने व शांतीने सर्वकाळ राज्य करणार आहे.
_बायबल कथा: _ उत्त्पत्ति १-३, ६, १४, २२; निर्गम १२:२०; २ शमूवेल ७; इब्री ३:१ - ६; ४:१४ - ५:१०; ७:१ - ८; १३; ९:११ - १०:१८; प्रकटीकरण २१
49. देवाचा नवा करार
देवाच्या एका दूताने मरियेस सांगितले की ती देवाच्या पुत्रास जन्म देणार आहे. म्हणून ती कुमारी असतांनाच तिने एका पुत्रास जन्म दिला आणि त्याचे नाव येशू ठेवले. म्हणून येशू हा देव व मनुष्य दोन्ही आहे.
येशूने अनेक चमत्कार करून आपण देव असल्याचे प्रमाण पटवून दिले. तो पाण्यावर चालला, वादळ शांत केले, अनेक आजा-यांना बरे केले, दुष्टात्म्यांना बाहेर काढले, मेलेल्यांना जिवंत केले व पाच भाकरी व दोन मासळ्यांद्वारे 5,000 पेक्षा अधिक लोकांना पोटभर जेवू घातले.
येशू हा एक महान शिक्षक सुद्धा होता व देवाचा पुत्र असल्यामुळे अधिकारवाणीने बोलत होता. त्याने शिकविले की आपण जशी आपल्यावर प्रीती करतो तशी आपण दुस-यांवरही प्रीती केली पाहिजे.
त्याने असे सुद्धा शिकवले की आपण आपल्या इतर सर्व वस्तूपेक्षा, संपत्तीपेक्षा देवावर अधिक प्रिती करायला पाहिजे.
कोणाही मनुष्यासाठी तो देवाच्या राज्याचा घटक असणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हास तुमच्या पापांपासुन तारले जाण्याची आवश्यकता आहे.
येशूने शिकवले की काही लोक त्याचा स्वीकार करतील व तारण पावतील, परंतु काहीजण त्यास नाकारतील. त्याने म्हटले की काही लोक सुपिक जमिनीप्रमाणे आहेत. ते येशूची सुवार्ता स्वीकारून तारण पावतात. इतर लोक वाटेवरल्या कठीण जमिनीसारखे आहेत. ज्या ठिकाणी देवाचे वचन खोलवर न गेल्यामुळे निष्फळ ते ठरते. ते लोक येशूचा संदेश नाकारतात व त्यामूळे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत.
येशूने शिकवले की देव पाप्यांवर फार प्रेम करतो. तो त्यांना क्षमा करू इच्छितो व त्यांना आपली लेकरे बनवू पाहतो.
देवाला पापाचा वीट आहे असेही येशूने सांगितले. जेव्हा आदाम व हव्वा यांनी पाप केले, तेव्हा ते सर्व मानवजातीमध्ये पसरले. त्याचा परिणाम म्हणून आज प्रत्येक व्यक्ति पाप करते व देवापासून दूर होते. म्हणून, प्रत्येक मनुष्य हा देवाचा वैरी झाला आहे.
परंतु देवाने जगातील प्रत्येक मनुष्यावर एवढी प्रिती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याजवर विश्वास ठेवितो येशू त्याला त्याच्या पापांची शिक्षा देणार नाही, पण देवाबरोबर सदासर्वकाळ राहील.
तुमच्या पापांमुळे तुम्ही दोषी आहात व मरणदंडास पात्र आहात. देवाचा क्रोध तुमच्यावर यावयास हवा होता, पण त्याने तुमच्याऐवजी आपला क्रोध येशूवर ओतला. जेंव्हा येशू वधस्तंभावर मरण पावला, तेंव्हा त्याने तुमची शिक्षा स्वतःवर घेतली.
येशूने कधीच पाप केले नाही, परंतु त्याने तुमच्या व जगातील प्रत्येक मनुष्यांच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेण्याचे निवडले व आपल्या मरणाने परिपूर्ण प्रायश्चित्त भरुन दिले. येशूने दिलेल्या बलिदानामुळे, देव आपणांस आपल्या सर्व पापांची क्षमा करू शकतो.
चांगल्या कामांनी आपले तारण होऊ शकत नाही. देवाबरोबर समेट घडवून आणण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. केवळ येशूच तुमची पापे धुवू टाकू शकतो. तुम्ही असा विश्वास धरिला पाहिजे की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला, व देवाने त्यास पुन्हा जिवंत केले आहे.
जो येशूवर आपला वैयक्तिक तारणारा म्हणून विश्वास ठेवितो, व त्याला आपला प्रभू म्हणून स्वीकारतो देव त्याचे तारण करील. परंतु तो विश्वास न ठेवणा-याचे तारण करणार नाही. तुम्ही गरीब किंवा श्रीमंत, स्त्री किंवा पुरूष, तरूण किंवा वृद्ध असा किंवा तुम्ही कोठे राहता हे महत्त्वाचे नाही. देव आपणांवर प्रिती करतो व आपण येशूवर विश्वास ठेवावा अशी त्याची इच्छा आहे, अशासाठी की त्याने आम्हाबरोबर जवळचे नातेसंबंध जोडावे.
येशू आपणांस आमंत्रण देत आहे यासाठी की तुम्ही विश्वास धरावा व बाप्तिस्मा घ्यावा. येशू हा मशीहा, देवाचा एकूलता एक पुत्र आहे असा तुम्ही विश्वास ठेविता का? आपण पापी आहात व देवाकडून होणा-या दंडास आपण पात्र आहोत याचा आपण स्वीकार करता काय? येशू आपल्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला यावर आपण विश्वास ठेवता काय?
जर आपण येशूवर विश्वास ठेवता व त्याने तुमच्यासाठी जे केले त्यावर विश्वास ठेवता तर आपण ख्रिस्ती आहात! देवाने आपणांस सैतानाच्या अंधःकारमय राज्यातून काढून आपल्या प्रकाशाच्या राज्यामध्ये आणिले आहे. देवाने आपला जुना पापी स्वभाव काढून आपणाला नवीन स्वभाव दिला आहे, ज्याच्यायोगे आपण न्यायीपणाची कामे करु शकतो.
जर आपण ख्रिस्ती आहात, तर येशूने केलेल्या कामामुळे देवाने आपणांस क्षमा केली आहे. आता शत्रुऐवजी देव आपणांस त्याचा जवळचा मित्र असे समजतो.
जर आपण देवाचे मित्र व प्रभु येशूचे सेवक आहात, तर तुम्हाला येशू जे कांही शिकवील त्याचे पालन करण्याची इच्छा होईल. जरी आपण ख्रिस्ती आहात, तरी आपल्याला पाप करण्याचा मोह होऊ शकतो. परंतु देव विश्वासू आहे आणि म्हणतो की जर आपण आपल्या पापांचा स्वीकार केला, तर तो आपणांस क्षमा करील. पापाविरूद्ध लढण्यासाठी तो आम्हास शक्ति देईल.
देव आम्हास प्रार्थना करण्यास, त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यास, इतर ख्रिस्ती लोकांसोबत त्याची आराधना करण्यास व त्याने तुम्हासाठी काय केले आहे इतरांना सांगण्यास सांगतो. ह्या सर्व गोष्टी आपणांस देवाबरोबर सखोल नातेसंबंध ठेवण्यास मदत करतात.
बायबल कथा: रोम //३://२१//-२६; ५://१//-११; योहान ३://१६//; मार्क १६://१६//; कलसै १://१३//-१४; २ करिंथ ५://१७//-२१; १ योहान १://५//-१०//
50. येशूचे पुनरागमन
सुमारे 2000 वर्षांपासून सर्व जगात अधिक आणि अधिक लोक येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी ऐकत आहेत. मंडळीची वाढ होत आहे. येशूने आश्वासन दिले की तो युगाच्या शेवटी पुन्हा पृथ्वीवर येणार आहे. जरी तो अद्याप आला नाही, तरी तो आपले वचन पाळीलच.
आपण येशूच्या येण्याची वाट पहात असतांना देवाची अशी इच्छा आहे की आपण पवित्र व त्याचा आदर करणारे जीवन जगावे. आपण त्याच्या राज्याविषयी इतरांना सांगावे अशीही त्याची इच्छा आहे. येशू ह्या पृथ्वीवर असतांना म्हणाला, "माझे शिष्य देवाच्या राज्याची सुवार्ता संपुर्ण जगामध्ये गाजवतील, तेव्हा शेवट होईल."
अनेक लोकगटांनी अजून येशूविषयी ऐकलेले नाही. स्वर्गात जाण्यापुर्वी येशूने ख्रिस्ती लोकांना सांगितले की, ज्या लोकांनी कधीच सुवार्ता ऐकली नाही त्यांना जाऊन सांगा. तो म्हणाला, "जा आणि सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा!" आणि, "शेते कापणीसाठी तयार आहेत!"
येशूने हेही सांगितले, " सेवक आपल्या धन्यापेक्षा थोर नसतो. जसे मला ह्या जगातील अधिका-यांनी माझा द्वेष केला तसेच ते तुमचाही छळ करतील व माझ्या नावासाठी तुमचा वध करतील. जरी तुम्हास ह्या जगामध्ये त्रास व संकटे आहेत तरी धैर्य धरा, कारण मी सैतानावर जो ह्या जगावर अधिकार करतो त्याचा पराभव केला आहे. जर तुम्ही शेवटपर्यंत विश्वासू राहिलात, तर देव तुमचे तारण करील!"
ह्या युगाच्या शेवटी जगातील लोकांचे काय होईल हे स्पष्ट करण्यासाठी येशूने शिष्यांना एक गोष्ट सांगितली. तो म्हणाला, "एका मनुष्याने आपल्या शेतात उत्तम बी पेरले. मग तो झोपेत असतांना, त्याच्या शत्रुने येऊन त्यामध्ये निदण पेरले आणि तो निघून गेला.
जेव्हा त्या बिजास अंकुर फुटू लागले, त्या धन्याच्या सेवकाने म्हटले, 'महाराज, आपण शेतामध्ये उत्तम बीज पेरिले होते. पण आता त्यात निदण कोठून आले?' धन्याने उत्तर दिले, 'शत्रुने ते पेरले असावे.'
सेवकाने आपल्या धन्यास म्हटले, 'आम्ही निदण उपटून टाकू का?' धनी म्हणाला, 'नाही.' जर आपण असे केले तर आपण कदाचित त्याजबरोबर गहूही उपटून टाकाल. हंगामापर्यंत वाट बघा आणि मग निदण जाळून टाकण्यासाठी पेंढ्या बांधून ठेवा; परंतु गहू माझ्या कोठारामध्ये साठवून ठेवा."
शिष्यांना ही गोष्ट समजली नाही, म्हणून त्यांनी येशूला समजावून सांगण्यास विनंती केली. येशू म्हणाला, "ज्याने उत्तम बी पेरले, तो मशीहा आहे. शेत हे जग आहे. उत्तम बी म्हणजे देवाच्या राज्यातील लोक."
"निदण म्हणजे सैतानाचे लोक. ज्या शत्रूने निदण पेरले, तो शत्रू म्हणजे सैतान. कापणी म्हणजे जगाचा शेवट आणि कापणी करणारे म्हणजे देवाचे दूत."
जेव्हा जगाचा शेवट होईल, तेव्हा देवदूत सैतानाच्या सर्व लोकांस न भडकणा-या अग्निमध्ये टाकून देईल, तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा आपल्या पित्याच्या राज्यात नीतिमान सूर्याप्रमाणे प्रकाशतील."
येशूने हेही सांगितले की जगाच्या शेवटापूर्वी तो या पृथ्वीवर परत येईल. जसा तो स्वर्गात घेतला गेला, तसाच तो येईल, अर्थात त्याला एक शरीर असेल व तो आकाशातील ढगावर बसून येईल. जेव्हा येशू परत येईल, प्रत्येक ख्रिस्ती जो मेलेला आहे तो मरणातून उठेल व अंतराळामध्ये येशूला भेटेल.
तेव्हा जिवंत असलेले ख्रिस्ती मेलेल्यांतून उठलेल्या ख्रिस्ती बांधवांस भेटण्यासाठी सामोरे जातील. तेथे ते सर्व येशूबरोबर राहतील. त्यानंतर, येशू आपल्या लोकांबरोबर परिपुर्ण शांतीमध्ये व एकतेमध्ये सर्वकाळ राहील.
येशूने आपणावर विश्वास ठेवणा-या प्रत्येकास एक मुकुट देण्याचे आश्वासन दिले आहे. ते त्या ठिकाणी राहतील व देवाबरोबर पुर्ण शांतीत सर्वकाळ राज्य करतील.
परंतु येशूवर विश्वास न ठेवणा-या प्रत्येकाचा देव न्याय करील. तो त्यांना नरकात टाकील, ज्या ठिकाणी सर्वकाळ रडणे व दुःखाने दात खाणे सर्वकाळ चालेल. त्यांना न विझणा-या अग्निमध्ये जाळून टाकण्यात येईल व किडे त्यांना सर्वकाळ खात राहतील.
जेंव्हा येशू परत येईल, तो सैतान व त्याच्या राज्याचा नाश करील. तो सैतानाला नरकात टाकील, ज्या ठिकाणी तो सर्वकाळ जळत राहील, त्याच्याबरोबर ज्यांनी त्याच्या मागे जाण्याचे निवडले व देवाची आज्ञा मानली नाही तेही असतील.
आदाम आणि हव्वेने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे पाप ह्या जगात आले व देवाने त्याचा नाश करण्याचा निर्णय घेतला. परंतु एक दिवस देव परिपूर्ण असे नवे आकाश व नवी पृथ्वी बनविणार आहे.
येशू आणि त्याचे लोक नवीन पृथ्वीवर राहतील, व तो अस्तित्वात असणा-या सर्व गोष्टींवर सर्वकाळ राज्य करेल. तो त्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील व त्या ठिकाणी कुठलाही त्रास, शोक, रडणे, दुष्टाई, दुःख किंवा मृत्यु नसेल. येशू आपल्या राज्यामध्ये शांतीने व न्यायाने व राज्य करील व तो आपल्या लोकांबरोबर सर्वकाळ राहील.
बायबल कथा: मत्तय //२४://१४//; २८://१८//; योहान १५://२०//, १६://३३//; प्रकटीकरण २://१०//; मत्तय १३://२४//-३०, ३६-४२; १ थेस्सल ४://१३//-५://११//; याकोब १://१२//; मत्तय २२://१३//; प्रकटीकरण २०://१०//, २१://१//-२२__://२१
1. सृष्टी
अशा प्रकारे सर्व गोष्टींची सुरुवात झाली. देवाने सर्व जग व त्यातील सर्व वस्तु सहा दिवसामध्ये बनविल्या. पृथ्वीची निर्मिती केल्यानंतर ती तशीच काळोखी व रिकामी होती, व तिच्यावर काहीच नव्हते. परंतु देवाचा आत्मा तेथे जलावर (पाण्यावर) होता.
मग देव बोलला, “प्रकाश होवो! आणि प्रकाश झाला. देवाने पाहिले की प्रकाश चांगला आहे आणि त्याने त्यास “दिवस म्हटले.” देवाने त्यास अंधारापासून वेगळे केले व अंधारास “रात्र” म्हटले. देवाने सृष्टीच्या पहिल्या दिवशी प्रकाश बनविला.
उत्पत्तीच्या दुसऱ्या दिवशी, देव बोलला आणि पृथ्वीच्या वरती आकाश बनविले. त्याने वरील व खालील जलाशयास वेगळे करत आकाश बनविले.
तिसऱ्या दिवशी, देव बोलला आणि पाण्यापासून कोरडी भूमि वेगळी केली. त्याने कोरडया भूमिस “पृथ्वी” व पाण्यास “समुद्र” म्हटले. देवाने पाहिले की त्याने जे कांही निर्माण केले ते चांगले आहे.
मग देव बोलला, “पृथ्वीवर वेगवेगळया प्रकारची झाडे तयार होवोत.” आणि तसेच झाले. देवाने पाहिले की त्याने जे कांही निर्माण केले ते हे चांगले आहे.
सृष्टीच्या चौथ्या दिवशी, देवाने आपल्या शब्दाद्वारे सूर्य, चंद्र व तारे बनविले. देवाने त्यांना पृथ्वीवर प्रकाश देण्यासाठी व दिवस रात्र, ॠतु व वर्षे दर्शविण्यासाठी बनविले. देवाने पाहिले की हे त्याने निर्माण केलेले सर्व चांगले आहे.
पाचव्या दिवशी, देवाने जलचर प्राणी व पक्षी बनविले. देवाने पाहिले की हे चांगले आहे आणि त्याने त्यांना आशीर्वाद दिला.
उत्पत्तीच्या सहाव्या दिवशी, देव बोलला,“पृथ्वीवर वस्ती करणारे प्राणी तयार होवोत!” आणि देवबाप बोलल्याप्रमाणेच सर्व काही झाले. अशा प्रकारे काही ग्रामपशु, जमीनीवर रांगणारे व कांही वन्यपशु निर्माण झाले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.
मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य आपण करू. त्यांना पृथ्वीवर व सर्व प्राण्यांवर सत्ता चालवता येईल.”
मग देवाने मातीपासून मनुष्य निर्माण केला व त्यामध्ये जीवनी श्वास फुंकला. हया मनुष्याला आदाम हे नाव देण्यात आले. देवाने आदामाला राहण्यासाठी एक बाग निर्माण केली व त्याची काळजी घेण्यासाठी त्याला तेथे ठेवले.
बागेच्या मध्यभागी, देवाने दोन खास झाडे लावली-- जीवनाचे झाड व बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणारे झाड. देवाने आदामास सांगितले की त्याने बागेमधून कुठल्याही झाडाचे फळ खावे, फक्त बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडास फळ खाऊ नये. जर त्याने त्या झाडाचे फळ खाल्ले, तर तो निश्चित मरेल.
मग देव बोलला, “मनुष्य एकटा असणे हे बरे नाही. परंतु प्राण्यांमध्ये आदामासाठी योग्य जोडीदार मिळाला नाही.
मग देवाने आदामाला गाढ अशी निद्रा लागू दिली. मग देवाने आदामाच्या एका फासळीपासून एक स्त्री तयार करुन तिला आदामासमोर आणले.
आदामाने तिच्याकडे पाहून म्हटले, “शेवटी मिळाली! ही तर माइयासारखीच आहे! तिला ‘नारी’ म्हणावे कारण, ‘ ती नरापासून बनविली आहे.” आणि म्हणूनच पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या पत्नीशी जडून राहतो
देवाने आपल्या प्रतिरूपाचे स्त्री पुरुष बनवले. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, “तुम्हाला पुष्कळ मुलेमुली व नातवंडे होवोत व पृथ्वी भरून टाका !” देवाने पाहिले की सर्व काही चांगले आहे, व त्या सर्वाविषयी तो आनंदित झाला. हे सर्व उत्पत्तीच्या सहाव्या दिवशी, घडले
सातव्या दिवशी काम पूर्ण झालेले होते. मग आपल्या कामापासून त्या दिवशी देवाने विश्रांती घेतली. देवाने सातव्या दिवसाला आशीर्वादित करुन पवित्र ठरविले कारण त्या दिवशी त्याने आपल्या कामापासून विश्रांती घेतली. अशा प्रकारे जग व त्यातील सर्व काही देवाने निर्माण केले.
बायबल कथा: उत्पति 1-2
2. पापाचा जगामध्ये प्रवेश
देवाने बनविलेल्या सुंदर बागेमध्ये आदाम व त्याची बायको ही दोघे खूप आनंदीत होते. ती दोघेही नग्न होती, पण त्यांना संकोच वाटत नव्हता, कारण त्यावेळी जगामध्ये पाप नव्हते. ती दोघे नेहमी बागेमध्ये देवाबरोबर फिरत असत व देवाशी बोलत असत.
परंतु त्या बागेमध्ये एक धूर्त साप होता. तो स्त्रीस म्हणाला, “काय तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले हे खरे काय ?
स्त्रीने उत्तर दिले, “बागेतील कुठल्याही झाडाचे फळ खाण्याची आम्हाला मोकळीक आहे फक्त बऱ्यावाईटाचे ज्ञान करुन देणारे फळ खाण्यास मनाई आहे. देव बोलला, ‘जर तुम्ही खाल किंवा त्यास स्पर्शही कराल, तर मराल.”
सापाने स्त्रीस म्हटले, “हे खोटे आहे ! तुम्ही खरोखर मरणार नाही. देवाला ठाऊक आहे की हे फळ खाल्ल्यानंतर, तुम्हास त्याच्या प्रमाणेच बऱ्यावाईटाचे ज्ञान होईल.”
स्त्रीने पाहिले की ते फळ खायला चांगले व दिसायला मनोहर आहे. तिला शहाणेसुदधा व्हायचे होते, म्हणुन तिने कांही फळे घेतली व खाल्ली. मग तिने आपल्या नवऱ्यास कांही दिली, तो तिच्याजवळ होता, व त्याने सुदधा ती खाल्ली.
अचानक, त्यांची डोळे उघडले व ते नग्न आहेत ते त्यांना कळले. मग त्यांनी झाडाची पाने शिवून आपणाला झाकण्यासाठी कटिवेष्टने(कपडे) तयार केली.
मग आदाम व त्याची बायको यांनी देवबाप बागेत आल्याचा आवाज ऐकला." ती दोघेही देवापासून लपली. मग देव आदामास म्हणाला, “तु कोठे आहेस ? आदामाने उत्तर दिले, “बागेत चालण्याचा तुझा आवाज ऐकला, व मी घाबरलो, कारण मी नग्न आहे. म्हणून मी लपलो.”
मग देवाने विचारले,” तु नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? “मी मना केलेले फळ तू खाल्ले आहेस काय ? आदामाने उत्तर दिले, “तू मला ही स्त्री दिली, आणि तिने हे फळ मला दिले. मग देव स्त्रीस बोलला, “तू हे काय केलेसे ? स्त्रीने उत्तर दिले, ” सापाने मला फसविले.”
देव सर्पास बोलला, “तू शापीत झाला आहेस ! तू आपल्या पोटाने चालशील आणि माती खाशील. तू व स्त्री यामध्ये वैर स्थापीत करीन व तुइया व स्त्रीच्या संततीमध्येही मी वैर स्थापीत करीन. स्त्रीचे संतान तुझे डोके ठेचील व तु त्याची टाच फोडशिल.”
मग देव स्त्रीस बोलला, “तु मोठया कष्टाने मुले प्रसवशील असे मी करीन. तरीही तुझी ओढ, तुझ्या नवऱ्याकडे राहील, व तो तुझ्यावर स्वामित्व चालविल.”
देव मनुष्यास म्हणाला, “ तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस व माझी आज्ञा मोडलीस. म्हणून जमिन शापित झाली आहे, आता तूला कष्ट करुनच अन्न मिळेल. तू मरशील, आणि तुझे शरीर मातीस मिळेल.” आदामाने त्याच्या बायकोस हव्वा हे नाव दिले याचा अर्थ “जन्मदात्री कारण तिच्याद्वारेच सर्व माणसे जन्मास आली. मग देवाने आदाम व हव्वा यांना चर्मवस्त्रे करुन घातली.
मग देव बोलला, “आता मनुष्यप्राणी आपणासारखाच झाला आहे. त्याला बऱ्यावाईटाचे ज्ञान झालेले आहे, त्यांना जीवनाच्या झाडाचे फळ खाऊ देऊन सर्वकाळ जगू देऊ नये.” म्हणून देवाने आदाम व हव्वा यांना सुंदर बागेतून घालवून दिले. देवाने त्या बागेभोवती सामर्थ्यशाली देवदूतांचा पहारा ठेवला, की कोणी त्या झाडाचे फळ खाऊ नये.
बायबल कथा: उत्पति 3
3. जल प्रलय
बऱ्याच वर्षानंतर, पृथ्वीवर खूप लोकवस्ती वाढली. लोक खूपच दुष्ट व हिंसाचारी होत गेले. ते एवढे वाईट झाले की देवाने ठरविले की त्यांचा जलप्रलयाने नाश करावा.
परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. पृथ्वीवरील दुष्ट लोकांमध्ये राहणारा हा एक न्यायी पुरुष होता. देव एक मोठा पूर पाठवणार होता त्या जल प्रलयाविषयी देवाने नोहाला सांगितले. त्याने नोहाला एक प्रचंड तारू (जहाज) बनविण्यास सांगितले.
देवाने नोहाला 140 मीटर लांब, 23मीटर रुंद, व 13.5 मीटर उंचीचे तारू तयार करण्यास सांगितले. त्याने नोहास त्यामध्ये तीन मजले, पुष्कळश्या खोल्या, छत, व खिडकी बनविण्यास सांगितले. त्या तारवामध्ये नोहा, त्याचे कुटुंब, आणि पृथ्वीवरील प्रत्येक जातीचे पशु प्रलय समयी सुरक्षित राहाणार होते.
नोहाने देवाची आज्ञा पाळली. त्याने आणि त्याच्या तिन्ही मुलांनी देवाने सांगितल्याप्रमाणे तारू बांधले. हे जहाज बनविण्यासाठी कित्येक वर्षे लागली, कारण ते खूप मोठे होते. नोहाने लोकांना प्रलयाविषयी सांगितले व देवाकडे वळण्यास सांगितले पण कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही.
देवाने नोहा व त्याच्या कुटुंबियांसाठी व प्राण्यांसाठी पुष्कळसे अन्नधान्य साठविण्यास सांगितले. जहाज तयार झाल्यानंतर देवाने नोहा, त्याची बायको, त्याची मुले व सुना यांना तारवामध्ये जाण्यास सांगितले एकूण आठ जण होते.
देवाने नोहाकडे प्रत्येक प्राण्याचे व पक्षाचे नर व मादी पाठविले, अशासाठी की त्यांनी तारवात जावे व प्रलयापासून त्यांस संरक्षण मिळावे. देवाने प्रत्येक जातीच्या प्राण्याचे सात नर व सात मादी देखील पाठविले त्यांचा उपयोग अर्पण करण्यासाठी होणार होता. त्या सर्वांनी तारवात प्रवेश केल्यानंतर देवाने स्वतः तारवाचा दरवाजा बंद केला.
आणि मग पाऊस सुरु झाला. पाऊस, पाऊस आणि पाऊस. चाळीस दिवस व चाळीस रात्र सतत पाऊस पडला. पृथ्वीखालील पाण्याचे उगम सुदधा मोकळे झाले व त्यातून जोरात पाणी वाहू लागले. सर्व पृथ्वी पाण्याने व्यापून टाकली. सर्व पर्वतही बुडाले.
तारवातील लोक व प्राणी सोडून, तारवाच्या बाहेर जमिनीवर असलेले सर्व काही प्रलयामध्ये मरून गेले. तारु पाण्यावर तरंगत राहिले व आतील सर्वजण बुडण्यापासून सुरक्षित होते.
पाऊस थांबल्यानंतर, तारु पाच महिने पाण्यावर तरंगत होते, व त्या अवधित पाणी ओसरत राहिले. मग एके दिवशी तारु एका पर्वतावर टेकले, परंतु संपूर्ण जग अजूनही पाण्याखालीच होते. आणखी तीन महिन्यानंतर पर्वताचे माथे दिसू लागले.
त्यानंतर आणखी चाळीस दिवसांनी नोहाने एक कावळा पाणी सुकले की नाही हे पाहाण्यास बाहेर सोडला. तो कावळा सुकी जमीन मिळावी म्हणुन इकडेतिकडे फिरत राहिला पण त्याला कोरडी जमीन मिळाली नाही.
नंतर नोहाने एक कबूतर बाहेर सोडले. परंतु त्यालाही कोरडी जमीन न मिळाल्याने ते नोहाकडे परत आले. एका आठवड्याने त्याने पुन्हा एक कबुतर बाहेर सोडले व ते आपल्या चोचीत जैतुनाची फांदी घेऊन आल! पाणी ओसरत होते, आणि वनस्पती वाढू लागल्या होत्या!
नोहाने आणखी एक आठवडा वाट पाहून त्या कबूतरास तिसऱ्यांदा पाठविले. यावेळी, त्याला विसावण्यास ठिकाण सापडले व ते माघारी आले नाही. पाणी सुकत चालले होते!
दोन महिन्यानंतर देव नोहास म्हणाला, “ तु व तुझे कुटुंब आता तारवाबाहेर येऊ शकता. तुम्हाला पुष्कळ मुलेमुली व नातवंडे होवोत व पृथ्वी भरून टाका.” मग नोहा व त्याचे कुटुंब तारवाबाहेर आले.
नोहा तारवाबाहेर आल्यानंतर,त्याने वेदी बांधली व अर्पणासाठी वापरल्या जाणा-या प्राण्यांपैकी प्रत्येक प्रकारातुन काही प्राण्यांचे देवाला होमार्पण केले. देव नोहाच्या होमार्पणाने संतुष्ट झाला व त्याला व त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद दिला.
देव बोलला, “मी वचन देतो येथूने पुढे मानवाच्या दुष्टाईमुळे भूमीला कधीही शाप देणार नाही, व पाण्याने जगाचा नाश करणार नाही, कारण मानव बाळपणापासुन पापी असतात.”
मग देवाने पहिल्यांदा मेघधनुष्य बनवला व नोहा बरोबर करार केला. मेघधनुष्य जेव्हाजेव्हा आकाशात दिसते, तेव्हा तेव्हा देवाला मानवाबरोबर केलेल्या कराराची आठवण होते व त्याच्या लोकांनाही आठवण होते.
बायबल कथा :// उत्पति 6-8//
4. देवाचा आब्राहामाशी करार
महापुरानंतर अनेक वर्षांनी, जगामध्ये पुन्हा लोक वाढले, व सर्वांची एकच भाषा होती. देवाने सांगितल्याप्रमाणे पृथ्वी व्यापून न टाकता, ते एकत्र जमले व त्यानी एक शहर बांधले.
ते खूप गर्विष्ठ होत गेले, व देव काय बोलला याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी स्वर्गापर्यंत पोहोचेल असा एक उंच बुरुज सुद्धा बांधण्यास सुरुवात केली. देव बोलला अशा प्रकारे दुष्टाई करण्यासाठी ते एकत्र काम करतील, तर ते अजून अधिक दुष्ट कृत्ये करतील.
मग देवाने त्यांच्या भाषेमध्ये गोंधळ निर्माण केला व अनेक भाषा निर्माण केल्या व अशा प्रकारे त्यांना सर्व जगात पांगवले. जे शहर त्यांनी बनवण्यास घेतले त्यास बाबेल, म्हणजे “गोंधळ” असे म्हटले आहे.
शेकडो वर्षानंतर, देव अब्राम नावाच्या मनुष्याबरोबर बोलला. देव त्यास बोलला, “तू आपला देश व आपल्या नातेवाईकांस सोडून मी दाखविल त्या देशात जा. मी तुला आशीर्वाद देईन व तुझ्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुझे नाव मोठे करीन. तुला जे आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन व तुला जे शाप देतील त्यांना मी शाप देईन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादीत होतील.
अब्रामने देवाच्या आज्ञेचे पालन केले. त्याने आपली पत्नी साराय, व सर्व नोकरचाकरासहीत मिळवलेली सर्व मालमत्ता घेऊन अब्राम देवाने दाखविलेल्या कनान देशात जायला निघाला.
कनान देशात आल्यानंतर देव अब्रामास म्हणाला, “तु तुझ्या आजूबाजूला बघ. हा देश जो तू पाहातोस मी तुला व तुझ्या संतानांना वतन म्हणुन देईन. मग आब्राम तेथे वस्ती करुन राहिला.
एके दिवशी, अब्राम परात्पर देवाचा याजक मलकीसदेकास भेटतो. मलकीसदेकाने आब्रामास आशीर्वाद दिला व म्हणाला. “आकाश आणि पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव अब्रामाला आशीर्वाद देवो.” मग अब्रामाने मलकीसदेकाला आपल्या सर्व गोष्टींचा दहावा भाग दिला.
पुष्कळवर्षे गेली, पण अब्राम व साराय यांना अद्याप मुलगा नव्हता. देवाने अब्रामाला पुन्हा दर्शन देऊन म्हटले की त्याला पुत्र होईल व त्याची संतती आकाशातील ताऱ्यांप्रमाणे होईल. अब्रामाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. देवावर ठेवलेल्या विश्वासामुळे देवाने अब्रामाला नितिमान ठरवले.
मग देव अब्रामाबरोबर करार करतो. करार हा दोन व्यक्तीमध्ये किंवा दोन पक्षांमध्ये केला जातो. देव बोलला, “तुझ्या पोटचाच तुला पुत्र होईल. तुझ्या संतानाला मी कनान देश देईल.” परंतु अद्याप अब्रामास पुत्र झाला नव्हता
बायबल कथा:// उत्पति 11-15//
5. अभिवचनानुसार झालेला पुत्र
अब्राम व साराय कनान देशात येऊन दहा वर्षे झाली, तरीही त्यांना मुल झाले नव्हते. म्हणून अब्रामाची पत्नी, साराय, त्यास म्हणाली, “ देवाने मला मुले दिली नाहीत आणि आता मी खूप म्हातारी झाल्यामुळे मला मुले होणार नाहीत, म्हणून तुम्ही माझी दासी, हागार घ्या. तिच्याबरोबर लग्न सुद्धा करा म्हणजे ती मजसाठी पुत्र प्रसवेल.”
यास्तव अब्रामाने हागारेशी विवाह केला. हागारापासून अब्रामास पुत्र झाला, व त्याचे नाव त्याने इश्माएल ठेवले. परंतु साराय हागारेचा द्वेष करु लागली. इश्माएल तेरा वर्षाचा असताना, देव पुन्हा अब्रामाशी बोलला.
देव बोलला, “मी सर्वसमर्थ देव आहे. मी तुझ्याशी करार करीन.” मग अब्रामाने परमेश्वरास जमिनीपर्यंत लवून नमन केले. देवाने अब्रामास असे सुद्धा म्हटले की, “तु अनेक राष्ट्रांचा पिता होशील. मी तुला व तुझ्या संतानास कनान देश देईल व मी त्यांचा निरंतरचा देव होईन. तु आपल्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता कर.
“तुझी पत्नी साराय हीस पुत्र होईल- तोच खरा वारसदार होईल. त्याचे नाव इसहाक ठेव. मी त्याच्याशी आपला करार करीन, व त्याचे महान राष्ट्र करीन. मी इश्माएलचेही एक मोठे राष्ट्र करीन, पण माझा करार इसहाकाशी असेल.” मग देवाने अब्रामाचे नाव बदलले अब्राहाम केले,याचा अर्थ “पुष्कळांचा पिता.” देवाने सारायचेही नाव बदलले “सारा असे ठेवले याचा अर्थ, “राजकन्या.”
त्या दिवशी अब्राहामाने आपल्या घराण्यातील सर्व पुरुषांची सुंता केली. एका वर्षानंतर, अब्राहाम 100 वर्षाचा व सारा 90 वर्षाची असताना सारेने अब्राहामाच्या पुत्राला जन्म दिला. त्यांनी देवाने सांगितल्याप्रमाणे त्याचे नाव इसहाक ठेवले.
जेंव्हा इसहाक तरूण झाला, देवाने अब्राहमाच्या विश्वासाची परिक्षा पाहाण्यासाठी, तो म्हणाला, “इसहाक, तुझा एकुलता एक पुत्र, घे व त्याचे मला होमार्पण कर.” अब्राहाम पुन्हा देवाची आज्ञा मानतो व इसहाकाचे अर्पण करतो.
अब्राहाम व इसहाक होमार्पणाच्या ठिकाणी जात असताना इसहाकाने विचारले “बाबा, होमापर्णासाठी लाकडे आहेत, पण कोकरु कोठे आहे?” अब्राहाम म्हणाला, “मुला, देव स्वत: होमार्पणासाठी कोकरु पाहून देईल.”
जेव्हा ते होमार्पणाच्या ठिकाणी पोहोचले, अब्राहामाने आपला पुत्र इसहाकास बांधले व वेदीवर ठेविले. तो आपल्या पुत्राला ठार मारणार इतक्यात देव बोलला, “थांब! मुलास इजा करु नकोस! आता मला कळले की तु माझी भिती बाळगतोस कारण तु आपला पुत्र माझ्यापासून राखून ठेवला नाही.”
अब्राहामाने जवळच्या झुडूपामध्ये शिंगे गुंतलेला एक एडका पाहिला. इसहाकाच्या ठिकाणी देवाने एडका पुरविला होता. अब्राहामाने आनंदाने त्या एडक्याचे अर्पण केले.
मग देव अब्राहामाशी बोलला, “कारण तु आपले सर्वस्व माझ्यासाठी देऊ केलेस आपला एकूलता एक पुत्र देखिल देऊ केलास म्हणून मी तुला आशीर्वाद देईन. तुझी संताने आकाशातील ताऱ्यांपेक्षा जास्त होतील. तु माझी आज्ञा पाळलीस म्हणून तुझ्या संततीद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.”
बायबल कथा:// उत्पति 16-22//
6. परमेश्वर इसाकास मदत करतो
जेव्हा अब्राहाम म्हातारा झाला होता, तेव्हा त्याचा मुलगा, इसहाक तरूण पुरुष झाला होता. म्हणून अब्राहामाने आपल्या दासांपैकी एका दासाला त्याचे नातेवाईक राहत असलेल्या प्रदेशामध्ये जाऊन आपला मुलगा इसहाक,याच्यासाठी वधू आणण्यास पाठविले.
खूप लांब प्रवास केल्यानंतर अब्राहमचे नातेवाईक राहात असलेल्या ठिकाणी, देवबाप त्या सेवकास रिबकाकडे घेऊन येतो. ती आब्राहमच्या भावाची नात होती.
रिबका आपल्या बापाचे घर सोडून त्या सेवकाबरोबर इसहाकाच्या घरी जाण्यास तयार झाली. ती आल्यानंतर लगेच इसहाकाने तिच्याशी विवाह केला.
ब-याच वर्षांनंतर, अब्राहाम मरण पावला व देवाने त्याला कराराच्या रुपाने दिलेली सर्व अभिवचने इसहाकाकडे सोपवण्यात आली. देवाने अब्राहामास असंख्य संतती देण्याचे अभिवचन दिले होते, परंतु इसहाकाची पत्नी रिबेकास मुलबाळ नव्हते.
इसहाकाने रिबेकासाठी प्रार्थना केली, व देवाच्या कृपेने ती गरोदर राहीली व तिच्या पोटात जुळी मुले होती. ही दोन मुले रिबकेच्या पोटामध्ये असतांनाच एकमेकांशी झगडू लागली, तेव्हा तिने देवाला विचारले की असे का होत आहे.
देव रिबकेस म्हणाला, "तुझ्या पोटातील दोन मुलांद्वारे दोन राष्ट्रे होतील. ते एकमेकांशी झगडतील; आणि वडील धाकट्याची सेवा करील."
जेव्हा रिबकेच्या मुलांचा जन्म झाला, तेव्हा पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केशवस्त्रासारखे होते, त्याचे नांव एसाव ठेवले. त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ एसावाची टाच पकडून बाहेर आला आणि त्याचे नाव याकोब ठेवण्यात आले.
बायबल कथाः उत्त्पत्ति २४:१-२५-२६
7. देव याकोबास आशीर्वाद देतो
ही मुले वाढत असतांना, याकोबाला घरीच राहायला आवडत असे, परंतु एसावाला शिकार करायला आवडत असे. याकोब रिबकेचा आवडता होता, परंतु इसहाकाला एसाव आवडत होता.
एके दिवशी, एसाव शिकारीहून आला असता, त्याला खूप भूक लागली होती. एसाव याकोबास म्हणाला, "तू बनवलेल्या जेवणातून मला काही दे." याकोब उत्तराला, "पहिल्याने, तू मोठा मुलगा म्हणून तुझे जे हक्क आहेत ते हक्क मला दे." अशा प्रकारे एसावाने याकोबाला आपला ज्येष्ठत्वाचा (मोठ्या मुलाचा) हक्क देऊन टाकला. मग याकोबाने त्याला काही अन्न दिले.
इसहाक आपला आशीर्वाद एसावास देऊ इच्छित होता. परंतु असे करण्यापूर्वी रिबका आणि याकोब यांनी मिळून याकोब हा एसाव असल्याचे ढोंग करून इसहाकास फसविले. इसहाक म्हातारा झाल्यामुळे त्याला दिसत नव्हते. याकोबाने एसावाचे कपडे घातले आणि आपल्या मानेवर व हातांवर शेळीची कातडी घातली.
याकोब इसहाकाकडे येऊन म्हणाला, "मी एसाव आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्यावा म्हणुन मी तुम्हाकडे आलो आहे.” जेव्हा इसहाकाने शेळीच्या केसास स्पर्श केला व त्याच्या कपड्यांचा वास घेतला, तेव्हा तो एसावच आहे असे वाटून त्याने त्यास आशीर्वाद दिला.
एसाव याकोबाचा द्वेष करू लागला कारण याकोबाने त्याचा जेष्ठत्वाचा अधिकार आणि आशीर्वाद चोरला होता. म्हणून आपला बाप वारल्यानंतर त्याने याकोबास ठार मारण्याची योजना आखली.
परंतु रिबकेने एसावच्या योजनेबद्दल ऐकले. म्हणून तिने आणि इसहाकाने याकोबास आपल्या दूर देशी असलेल्या नातेवाईकाकडे राहाण्यास पाठवले.
याकोब बरीच वर्षे रिबकेच्या नातेवाईकांबरोबर राहिला. या कालावधीमध्ये त्याने लग्न केले व त्यास बारा पुत्र व एक कन्या झाली. परमेश्वराने त्यास खूप श्रीमंत बनविले.
त्यानंतर वीस वर्षांनी कनानामध्ये असणा-या आपल्या घरी, याकोब आपला परिवार, नोकर-चाकर व गुराढोरांच्या कळपासह परतला.
याकोब खूप घाबरला झाला होता कारण त्याला वाटले की त्याचा भाऊ एसाव अजूनही त्यास मारण्यासाठी टपला असेल. म्हणून त्याने आपल्या जनावरांचे अनेक कळप एसावाकडे भेट म्हणून पाठविले. ज्या सेवकांनी ते कळप एसावाकडे नेले ते त्यास म्हणाले, "आपला दास याकोब आपणासाठी हे कळप भेट म्हणून देत आहे. तो लवकरच येत आहे."
परंतु एसावाने अगोदरच याकोबास क्षमा केली होती, आणि त्यांना एकमेकांना भेटून आनंद झाला. मग याकोब सुखाने कनानामध्ये राहू लागला. मग इसहाक मरण पावला, आणि याकोब व एसावाने त्यास पुरले. देवाने अब्राहामाशी केलेल्या कराराचे अभिवचन आता इसहाकाकडून याकोबाकडे सुपूर्त करण्यात आले.
बायबल कथाः उत्त्पत्ति २५:२७-३३:२०
8. देव योसेफ व त्याच्या कुटुंबाचा बचाव करतो
ब-याच वर्षांनंतर याकोब वयोवृद्ध झाला असतांना, तो आपला आवडता पुत्र, योसेफ, यास मेंढरांचे राखण करत असलेल्या आपल्या भावांकडे त्यांचे कसेकाय चालले आहे हे पाहाण्यास पाठविले.
आपला पिता याकोब याचे योसेफावर जास्त प्रेम असल्यामुळे व योसेफ आपल्या भावांवर राज्य करील असे स्वप्न त्याला पडल्यामूळे त्याचे भाऊ त्याचा द्वेष करू लागले. जेव्हा योसेफ आपल्या भावांकडे आला, तेव्हा त्यांनी त्यास काही गुलामांच्या व्यापा-यांस विकून टाकले.
योसेफाच्या भावांनी घरी परतण्यापूर्वी योसेफाचा झगा शेळीच्या रक्तामध्ये बुडवला. मग त्यांनी तो झगा आपल्या बापास दाखविला अशासाठी की हिंस्त्र पशूने योसेफाची हत्या केली आहे यावर त्याचा विश्वास बसावा. याकोबास फार दुःख झाले.
त्या गुलामांच्या व्यापा-यांनी योसेफास मिसर देशामध्ये आणले. नाईल नदीच्या तीरावर वसलेला मिसर देश हा एक मोठा, व सामर्थ्यशाली देश होता. गुलामांच्या व्यापा-यांनी योसेफास एका श्रीमंत सरकारी अधिका-यास विकून टाकले. योसेफाने आपल्या स्वामीची चांगली सेवा केली, आणि देवाने योसेफास आशीर्वादित केले.
त्याच्या स्वामीच्या पत्नीने योसेफाबरोबर कुकर्म करण्याचा प्रयत्न केला, परंतु अशा प्रकारे देवाच्या विरूद्ध पाप करण्यास योसेफाने नकार दिला. यावर तिने संतप्त होऊन योसेफावर खोटा आरोप केला व योसेफास पकडून तुरुंगामध्ये टाकण्यात आले. तुरुंगामध्ये देखिल, योसेफ देवाशी विश्वासू राहिला, आणि देवाने त्यास आशीर्वाद दिला.
दोन वर्षांनंतर, निष्पाप असूनही योसेफ तुरुंगातच होता. एके रात्री, फारोला, मिसरी लोक आपल्या राजांना म्हणत असत, त्याला दोन चिंताजनक स्वप्ने पडली. त्याच्या सल्लागारांपैकी कोणीही त्याला स्वप्नांचा अर्थ सांगू शकला नाही.
देवाने योसेफाला स्वप्नांचा अर्थ सांगण्याची क्षमता दिली होती, म्हणून फारोने योसेफास तुरूंगातून आपल्या घरी आणले. योसेफाने त्याच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला व म्हटले, "देव सात वर्षे पुष्कळ पिकपाणी देईल व त्यानंतर सात वर्षे दुष्काळ पडेल.
योसेफाची फारोवर एवढी छाप पडली की त्याने त्याला मिसर देशाचा पंतप्रधान बनविले.
योसेफाने लोकांना सुकाळातील सात वर्षांमध्ये धान्याचा भरपूर साठा करून ठेवण्यास सांगितले. मग योसेफाने दुष्काळातील सात वर्षे लोकांना खाण्यासाठी पुरेसे होईल इतके धान्य विकले.
तो दुष्काळ फक्त मिसरातच नव्हे तर याकोब आणि त्याचे कुटुंबिय राहात असलेल्या कनान देशामध्येही भयंकर असा होता.
मग याकोब आपल्या मोठ्या मुलांस अन्न विकत घेण्यासाठी मिसरात पाठवतो. धान्य विकत घ्यायला आलेले भाऊ योसेफाच्या समोर उभे होते पण त्यांनी त्यास ओळखले नाही. परंतु योसेफाने त्यांना ओळखले.
ते बदलले आहेत की नाही याची परीक्षा पाहिल्यानंतर, योसेफ त्यांना म्हणाला, "मी तुमचा भाऊ योसेफ आहे!" भिऊ नका. तुम्ही मला गुलाम म्हणून विकून वाईट करण्याचा प्रयत्न केला, पण देवाने त्याच वाईटाचा चांगले करण्यासाठी उपयोग केला! या आणि मिसर देशामध्ये वस्ती करून राहा, म्हणजे मी तुम्हास व तुमच्या कुटुंबियांस धान्याचा पुरवठा करीन.
जेव्हा योसेफाचे भाऊ घरी आले व त्यांनी आपल्या बापास, याकोबास, योसेफ अजून जीवंत आहे असे सांगितले, तेव्हा याकोबास खूप आनंद झाला.
जरी याकोब आता वृद्ध झाला होता, तरीही तो आपल्या कुटुंबियांसह मिसरात आला व ते सर्व तेथे राहू लागले. याकोबाने आपल्या मरणापूर्वी, आपल्या सर्व मुलांस आशीर्वाद दिला.
देवाने अब्राहमाशी केलेल्या कराराचे अभिवचन इसहाकाकडे, मग याकोब आणि त्याच्या बारा पुत्रांकडे व त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आले होते. या बारा पुत्रांची संतती ही इस्राएलाचे बारा वंश झाले.
बायबल कथाः उत्त्पत्ति ३७-५०
9. देव मोशेला पाचारण करतो
योसेफ मृत्यु पावल्यानंतर, त्याचे सर्व नातेवाईक मिसर देशात राहत होते. ते आणि त्यांची संताने अनेक वर्षे तेथे राहिली व त्यांस पुष्कळ मुले झाली. त्यांनी इस्राएली असे म्हणण्यात आले.
शेकडो वर्षांनंतर इस्राएली लोकाची संख्या खूप वाढली. योसेफाने केलेल्या कामगिरीचा मिसरी लोकांना विसर पडला. त्यांना आता इस्राएली लोकांची भिती वाटू लागली. कारण ते पुष्कळ होते. म्हणून त्यावेळी मिसरावर राज्य करत असलेल्या फारोने इस्राएल लोकांस मिसरी लोकांचे गुलाम करून ठेवले.
मिस-यांनी इस्राएलांस अनेक इमारतींचे बांधकाम करण्यास व मोठमोठ्या शहरांचे निर्माण करण्यास सक्ती केली. अशा कष्टांच्या कामाने त्यांचे जीवन खूप त्रासदायक झाले, परंतु देवाने त्यांना आशीर्वादित केले व त्यांना आणखी मुले झाली.
फारोने पाहिले की इस्राएल लोकांना पुष्कळ मुले होत आहेत, म्हणून त्याने आदेश दिला की इस्राएलांच्या पुत्र संतानांस नाईल नदीमध्ये फेकून द्यावे.
एका इस्राएली स्त्रीने एका मुलास जन्म दिला. तिने व तिच्या पतीने आपल्या बाळास काही काळापर्यंत लपविण्याचा प्रयत्न केला.
जेव्हा त्या बाळाचे आईवडिल त्यास लपवू शकले नाही, तेव्हा त्यांनी त्या बाळास मृत्युपासून वाचविण्यासाठी त्याला एका तरंगणा-या टोपलीमध्ये ठेवून ती नाईल नदीच्या तीरावर लव्हाळ्यात ठेवली. त्या बाळाची थोरली बहिण त्याचे काय होईल ते पाहत होती.
फारोच्या मुलीने ती टोपली उघडून आत बघितले. जेव्हा तिने त्या बाळास पाहिले, तेव्हा तिने त्यास आपला पुत्र बनविले. तिने त्या बाळास दुध पाजण्यासाठी एका इस्राएली स्त्रीस बोलाविले, परंतु ती त्याची आई होती हे तिला ठाऊक नव्हते. जेव्हा ते बाळ मोठे झाले व त्यास आपल्या आईच्या दुधाची आवश्यकता नव्हती, तेव्हा तिने त्यास फारोच्या मुलीकडे सोपवले, तिने त्याचे नाव मोशे ठेवले.
एके दिवशी, जेव्हा मोशे मोठा झाला, तेव्हा त्याने एका मिसरी मनुष्यास एका यहूदी गुलामास मारताना पाहिले. मोशेने आपल्या इस्राएली बांधवास वाचविण्याचा प्रयत्न केला.
आपणांस कोणी पाहत नाही हे बघून मोशेने त्या मिस-यास जीवे मारले व त्याचे शरीर पुरले. परंतु मोशेने केलेले हे कृत्य कोणीतरी पाहिले होते.
जेव्हा फारोने मोशेने केलेल्या कृत्याविषयी ऐकले तेव्हा त्याने त्यास मारण्याचा प्रयत्न केला. फारोच्या शिपायांपासून सरक्षित राहाण्यासाठी मोशे मिसर देश सोडून जंगलामध्ये पळून गेला.
मोशे आता मिसर देशापासून दूर जंगलामध्ये मेंढरे चारू लागला. त्याने तिथेच एका स्त्रीशी विवाह केला व त्यास दोन पुत्र झाले.
एके दिवशी मेंढरे चारत असतांना, मोशेने एक झुडूप जळत असतांना पाहिले. परंतु ते झाड जळून भस्म झाले नाही असे त्यास दिसून आले. मग ते न्याहाळून पाहावयास तो त्या झुडूपाकडे गेला. तो त्या जळत असलेल्या झुडूपाजवळ जात असतांना, देवाचा आवाज त्याच्या कानी पडला, "मोशे, तू आपल्या पायातले जोडे काढ. कारण तू पवित्र भूमीवर उभा आहेस."
देव म्हणाला, "मी आपल्या लोकांचे दुःख पाहिले आहे. मी तुला फारोकडे माझ्या लोकांना मिसराच्या गुलामगिरीतून सोडविण्यासाठी पाठविणार आहे. मी त्यांना कनान देश देणार आहे, जो मी अब्राहाम, इसहाक व याकोबास देण्याची प्रतिज्ञा केली होती."
मोशे म्हणाला, "जर लोकांनी मला विचारले की तुला कोणी पाठविले आहे, तर मी त्यास काय सांगू?" देव म्हणाला, "मी आहे तो आहे. त्यांना सांग, ‘मी आहे याने मला तुम्हाकडे पाठविले आहे.’ त्यांना हेही सांग की, मी त्यांच्या पूर्वजांचा अर्थात अब्राहाम, इसहाक व याकोबाचा देव आहे. हेच माझे सनातन नाव आहे."
मोशे फार भयभित झाला व फारोकडे जाण्यास नकार देऊ लागला कारण त्याला व्यवस्थित बोलता येत नव्हते, म्हणून देवाने मोशेचा भाऊ, अहरोन, ह्यास त्याच्या मदतीस पाठविले. देवाने मोशे व अहरोनास अगोदरच सांगून ठेवले की फारो हट्टीपणा करील.
बायबल कथाः निर्गम १-४
10. दहा पीडा
मोशे आणि अहरोन फारोकडे गेले. ते म्हणाले, "इस्राएलाचा देव असे म्हणतो, 'माझ्या लोकांना जाऊ द्या!" फारोने त्यांचे ऐकले नाही. इस्त्राएल लोकांना मोकळे करण्याऐवजी त्याने त्यांस आणखी कष्टाची कामे करण्याची सक्ती केली!
फारोने लोकांना जाण्याची सतत मनाई केली, म्हणून देवाने मिसर देशावर दहा भयानक पीडा पाठविल्या. या पीडांद्वारे देवाने दाखवून दिले की तो फारो आणि मिसरातील देवतांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे.
देवाने नाईल नदीच्या पाण्याचे रक्तामध्ये रूपांतर केले, पण तरीही फारो इस्राएलाची सुटका करावयास तयार झाला नाही.
मग देवाने सर्व मिसर देशामध्ये बेडूक पाठविले. फारोने मोशेस बेडूक दूर करण्यास विनंती केली. परंतु सर्व बेडूक मेल्यानंतर फारोचे अंतःकरण आणखी कठोर झाले व त्याने इस्राएलास मिसर देश सोडण्याची परवानगी दिली नाही.
मग देवाने उवांची पीडा पाठविली. मग त्याने गोमाशांची पीडा पाठविली. फारोने मोशे व अहरोनास बोलावून म्हटले की जर ते गोमाशांची पीडा दूर करत असतील तर तो इस्राएलास मिसर देश सोडता येईल. जेव्हा मोशेने प्रार्थना केली, तेव्हा देवाने सर्व गोमाशा दूर केल्या. परंतु फारोने आपले अंतःकरण आणखी कठोर केले व लोकांना जाण्यास मनाई केली.
पुढे, देवाने मिसरी लोकांचे सर्व पाळीव प्राणी आजारी पाडून मारले. परंतु फारोचे मन अधिक कठोर होत गेले व त्याने इस्राएलास जाऊ दिले नाही.
मग देवाने मोशेस फारोसमोर हवेमध्ये राख उधळण्यास सांगितले. त्याने असे केल्यानंतर, सर्व मिसर देशातील लोकांच्या अंगावर गळवे तयार झाले, मात्र इस्राएलावर त्याचा काही परिणाम झाला नाही. वाने फारोचे अंतःकरण अधिक कठोर केले, व फारो आता इस्राएलास सोडण्यास तयार नव्हता.
त्यानंतर, देवाने मिसर देशावर गारांचा पाऊस पाडून ब-याच पिकांचे नुकसान केले व बाहेर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीस ठार मारले. फारोने मोशे व अहरोनास बोलावून म्हटले, "मी मोठे पाप केले आहे.तुम्ही जाऊ शकता.” मग मोशेने प्रार्थना केली व गारांचा पाऊन थांबला.
परंतु फारोने पुन्हा पाप केले व आपले मन कठोर केले. तो आता त्यांना बाहेर पाठविण्यास तयार नव्हता.
मग देवाने मिसर देशावर टोळांची पीडा पाठवली. या टोळांनी गारपिटीच्या पावसामध्ये शिल्लक राहिलेले सर्व पिक खाऊन टाकले.
मग देवाने मिसरावर तीन दिवस निबिड अंधकाराची पीडा पाठविली. एवढा काळोख होता की मिसरी लोक घराबाहेर पडू शकत नव्हते. परंतु इस्राएली लोक राहत असलेल्या ठिकाणी प्रकाश होता.
या नऊ पीडांनंतरही, फारो इस्राएल लोकांना जाऊ देण्यास नाकारत होता. फारो ऐकत नसल्यामूळे देवाने आणखी एक शेवटची पीडा पाठविली. या पीडेने फारोचे मन बदलले.
बायबल कथाः निर्गम_ 5-10_
11. वल्हांडण सण
देवाने फारोला सांगितले की जर तो इस्राएल लोकांना जाऊ देणार नाही, तर देव मिसरातील प्रथम जन्मलेल्या मनुष्यांस व प्राण्यांस जीवे मारील. जेव्हा फारोने हे ऐकले तेव्हाही त्याच्यावर काही परिणाम झाला नाही व त्याने इस्राएलास सोडले नाही.
जो कोणी देवावर विश्वास ठेवील त्याच्या घरातील प्रथम जन्मलेल्यास वाचविण्यासाठी देवाने मार्ग काढला. प्रत्येक कुटुंबाला एक निष्कलंक कोकरु निवडायचे होते आणि ते वधायचे होते.
देवाने इस्राएलास सांगितले की त्यांनी कोक-याचे कांही रक्त त्यांच्या घराच्या दरवाजाच्या चौकटीस लावावे, आणि त्याचे मांस विस्तवावर भाजून बेखमीर भाकरीबरोबर घाईघाईने खावे. त्याने त्यांना भोजन झाल्यानंतर मिसर देश सोडण्यास तयार राहण्यासही सांगितले.
देवाने सांगितल्याप्रमाणे इस्राएलांनी सर्व तयारी केली. मध्यरात्री, देवाने जाऊन मिसरातील प्रत्येक कुटुंबातील प्रथम जन्मलेल्या पुत्रास मारले.
इस्राएलाच्या सर्व घरांच्या चौकटीवर कोक-याचे रक्त असल्यामूळे देव त्या घरांना ओलांडून गेला. त्या घरातील सर्वजण सुरक्षित होते. कोक-याच्या रक्तामुळे त्यांचा बचाव झाला होता.
परंतु मिस-यांनी देवावर विश्वास ठेवला नाही व त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत. म्हणून देवाने त्यांचे घर ओलांडले नाही. देवाने मिसरातील प्रत्येक प्रथम जन्मलेल्यांस जीवे मारले.
तुरुंगातील प्रथम जन्मलेल्या मुलापासून ते फारोच्या घरातील प्रथम जन्मलेल्या मुलापर्यंत प्रत्येक मिसरी पुरूष मरण पावला. मिसर देशातील पुष्कळ लोक खुप दुःखाने रडत व विव्हळत होते.
त्याच रात्री, फारोने मोशे व अहरोनास बोलावून म्हटले, "इस्राएलांना घेऊन लगेच मिसर देश सोडा." मिसरातील लोकांनीही इस्राएली लोकांना मिसर देश लगेच सोडण्याची विनंती केली.
बायबल कथाः निर्गम ११:१-१२:३२
12. निर्गमन
मिसर देश सोडत असतांना इस्राएल लोकांना खूप आनंद झाला. आता ते गुलाम नव्हते, ते आता वचनदत्त भूमीकडे वाटचाल करत होते! मिसरातील लोकांनी इस्राएल लोकांनी मागितलेल्या सर्व वस्तु अर्थात सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तू त्यांना दिल्या. काही परराष्ट्रीय लोकांनीही देवावर विश्वास ठेवला व इस्राएल जनतेबरोबर त्यांनीही मिसर देश सोडला.
देवाने एका ऊंच ढगाच्या खांबाद्वारे जो दिवसा त्यांच्या पुढे चालत असे व रात्री तोच ऊंच अग्निचा खांब बनत असे त्याद्वारे त्यांचे मार्गदर्शन केले. देव नेहमी त्यांच्याबरोबर होता व प्रवासात त्यांचे मार्गदर्शन करत होता. त्यांना एकच गोष्ट करायची होती ती म्हणजे देवाचे आज्ञापालन करणे.
थोड्या वेळाने इकडे फारोचे व त्याच्या लोकांचे मन बदलले व इस्राएलांना पुन्हा त्यांचे गुलाम करावे असे त्यांना वाटले. परमेश्वराने फारोला हट्टी व कठोर बनविले, अशासाठी की लोकांना ख-या व जीवंत देवाची ओळख पटावी व यहोवा देव हा फारो व त्याच्या देवतांपेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे हे त्यांना समजावे.
मग फारो व त्याचे सैन्य इस्राएल लोकांना पुन्हा त्यांचे गुलाम बनविण्यासाठी त्यांचा पाठलाग करू लागले. जेव्हा इस्राएलांनी मिसरी सैन्य त्यांचा पाठलाग करतांना पाहिले तेव्हा त्यांना समजले की ते आता मिसरी सैन्य आणि तांबड्या समुद्राच्या मध्ये अडकले आहेत. ते फार घाबरले व ओरडले, "आम्ही मिसर देश का सोडला? आता आम्ही मरणार !"
मोशेने इस्राएलास सांगितले, "भिऊ नका! देव तुमच्या वतीने आज लढणार आहे व तुमचे तारण करणार आहे.” मग देव मोशेस म्हणाला, "लोकांना तांबड्या समुद्राकडे जाण्यास सांग."
मग देवाने इस्राएली लोक व मिसरी सैन्य यांच्या मधोमध मेघस्तंभ (ढगाचा खांब) उभा केला व यामुळे मिसरी सैन्य इस्राएलास पाहू शकत नव्हते.
देवाने मोशेला तांबड्या समुद्रावर आपली काठी उभारण्यास व तो समुद्र दुभागण्यास सांगितले. मग देवाने जोरदार वा-याच्या साह्याने समुद्राचे पाणी डावीकडे व उजवीकडे हटवले,व समुद्रात कोरडी वाट तयार केली.
इस्राएली लोक भरसमुद्रात कोरड्या भूमिवरून चालत गेली व त्यांच्या दोन्ही बाजूंनी पाणी भिंतीसारखे झाले.
मग देवाने मेघस्तंभ वरती घेऊन मार्गातून हलवला यासाठी की इस्राएली लोक आपल्या हातातून निसटून जात आहेत हे त्यांना दिसावे. मिसरी लोकांनी त्यांचा पाठलाग करावयाचे ठरवले.
व ते इस्राएलांचा पाठलाग करत समुद्रातील वाटेने आत आले, परंतु देवाने त्यांना भिती घातली व त्यांचे रथही चिखलामध्ये अडकून बसले. ते ओरडले, "पळा!" कारण देव इस्राएलांच्या वतीने लढत आहे!"
जेव्हा सर्व इस्राएल लोक सुरक्षितपणे समुद्राच्या दुस-या बाजुला पोहोचले, देवाने मोशेला आपला हात उंच करावयास सांगितले. त्याने असे केल्यानंतर, समुद्राचे पाणी मिसरी सैन्यावर पडू लागले व पूर्वीसारखे झाले. सर्व मिसरी सैन्य पाण्यात बुडून मेले.
जेव्हा इस्राएलांनी पाहिले की मिसरी सैन्य मेले, तेव्हा त्यांनी देवावर व मोशे हा देवाचा संदेष्टा आहे याजवर विश्वास ठेवला.
इस्राएल लोकांनी मोठा आनंद केला, कारण देवाने त्यांचे मरण व गुलामगिरीपासून तारण केले होते! आता ते आपल्या देवाची सेवा करण्यासाठी स्वतंत्र झाले होते. इस्राएल लोकांनी त्यांना नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल पुष्कळ गीते गाऊन आनंद केला व देवाची स्तुती केली, कारण देवाने त्यांना मिसरी सैन्यांपासून तारले होते.
देवाने इस्राएलाला मिसरी लोकांवर कसा विजय दिला व त्यांची गुलामगिरीपासून कशी सुटका केली याचे स्मरण त्यांना राहावे म्हणून देवाने इस्राएलास दरवर्षी वल्हांडण सण साजरा करण्याची आज्ञा दिली. निष्कलंक कोक-याचे बलिदान देऊन त्याचे मांस बेखमीर भाकरीबरोबर खाऊन त्यांनी हा सण साजरा केला.
बायबल कथाः निर्गम १२:३३-१५:२१
13. देवाचा इस्राएलाशी करार
तांबडा समुद्र पार केल्यानंतर, देव इस्राएलाला जंगलामधून सीनाय पर्वताकडे घेऊन गेला. मोशेने जेथे जळते झाड पाहिले होते, तो हाच पर्वत होता. लोकांनी पर्वताच्या पायथ्याशी आपले तंबू ठोकले.
देव मोशेला व इस्राएल लोकांस म्हणाला, "जर तुम्ही माझी आज्ञा व माझा करार पाळाल, तर तुम्ही माझे खास निवडलेले लोक व्हाल, राजकीय याजकगण व पवित्र राष्ट्र असे व्हाल."
तिस-या दिवशी, लोकांची आत्मिक तयारी झाल्यानंतर, देव सिनाय पर्वताच्या शिखरावर उतरत असतांना मेघगर्जना, विजेचा प्रखर प्रकाश, धूर, प्रचंड शिंगाचा नाद यासह उतरून आला. पर्वतावर जाण्याची परवानगी केवळ मोशेलाच होती.
मग देवाने त्यांना ही वचने सांगितली, "मी यहोवा, तुमचा देव आहे, ज्याने तुम्हास मिसरच्या दास्यत्वातून सोडवले. तुम्ही अन्य देवतांची पूजा करू नका."
"आपल्यासाठी कोरीव मुर्ती करू नका व तिच्या पाया पडू नका, कारण मी, यहोवा, तुझा देव ईर्षावान देव आहे. तू माझे नाव व्यर्थ घेऊ नकोस. शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. अर्थात सहा दिवस तू आपले सर्व काम कर व सातवा दिवस हा तुझा विश्रांतीचा दिवस व माझी आठवण करण्याचा दिवस म्हणून पाळ."
"आपल्या बापाचा व आईचा मान राख. तू खून करू नकोस. तू व्यभिचार करू नकोस. तू चोरी करू नकोस. तू खोटी साक्ष देऊ नकोस(खोटे बोलू नकोस.) तू आपल्या शेजा-याच्या बायकोचा, त्याच्या घराचा, किंवा त्याच्या कुठल्याही गोष्टीचा लोभ धरू नकोस."
मग देवाने ह्या दहा आज्ञा दगडाच्या दोन पाट्यांवर लिहून मोशेकडे दिल्या. देवाने त्यांना पालन करण्यासाठी आणखी पुष्कळ नियम व विधी देखिल दिले. जर त्यांनी हे सर्व नियम पाळले, तर देवाने त्यांना आशीर्वाद व संरक्षण देण्याचे अभिवचन दिले. जर त्यांनी त्याचे उल्लंघन केले, तर देव त्यांना शासन करील.
देवाने इस्राएल लोकांना त्याच्यासाठी एक मंडप बनवण्यासाठी तपशिलवार माहिती दिली. ह्याला निवासमंडप म्हणत, यामध्ये दोन खोल्या होत्या व त्यांना दुभागणारा एक मोठा पडदा होता. पडद्याच्या पाठीमागे असणा-या खोलीमध्ये केवळ महायाजकासच जाण्याची परवानगी होती कारण तेथे देवाचा निवास होता.
देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करणारा प्रत्येक जण निवासमंडपा समोर असणा-या वेदीवर देवाला होमार्पण करण्यासाठी पशू आणू शकत असे. याजक त्या पशूस मारून त्याचे वेदीवर होमार्पण करत असे. त्या पशूच्या रक्ताद्वारे त्या व्यक्तीचे पाप झाकले जाऊन ती व्यक्ति देवाच्या दृष्टीने शुद्ध ठरत असे. मोशेचा भाऊ अहरोन व अहरोनाची संताने यांना देवाने आपले याजक म्हणून निवडले.
देवाने दिलेल्या आज्ञा पाळावयास व केवळ त्याचीच उपासना करून त्याचे खास लोक होण्यास इस्राएल लोक सहमत झाले. परंतु देवाला आज्ञापालनाचे वचन दिल्यानंतर थोड्याच दिवसांनी त्यांनी भयंकर पाप केले.
पुष्कळ दिवस, मोशे सिनाय पर्वत शिखरावर देवाशी संभाषण करत होता. लोकांना त्याची वाट पाहता-पाहता कंटाळा आला. म्हणून त्यांनी सोने आणून त्याची मूर्ती बनविण्यासाठी ते अहरोनाकडे दिले.
अहरोनाने त्याची एक वासराच्या आकाराची सोन्याची मूर्ती बनवली. लोक बेभान होऊन तिची पूजा करू लागले व त्या मूर्तीस यज्ञ करू लागले. त्यांच्या पापामुळे देवाला त्यांचा भयंकर राग आला व त्याने त्यांचा नाश करावयाचे ठरविले. परंतु मोशेने त्यांच्यासाठी प्रार्थना केली व देवाने त्याची प्रार्थना ऐकली व त्यांचा नाश केला नाही.
जेव्हा मोशे पर्वतावरून खाली आला व त्याने ती मूर्ती पाहिली, त्याला फार राग आला व ज्याच्यावर देवाने दहा आज्ञा लिहिल्या होत्या त्या दगडाच्या पाट्या त्याने तोडून टाकल्या.
ममग त्याने त्या मूर्तीचा कुटून चुरा केला, तो त्याने पाण्यामध्ये टाकला व लोकांना ते पाणी प्यावयास दिले. देवाने लोकांवर भयानक पीडा पाठविली व त्यांपैकी बरीचशी माणसे त्यामध्ये मरण पावली.
मोशेने पुन्हा दहा आज्ञा लिहिण्यासाठी दगडाच्या दोन नविन पाट्यां बनवल्या कारण पहिल्या पाट्या त्याने फोडल्या ङोत्या. मोशे पुन्हा पर्वतावर चढला व त्याने लोकांच्या क्षमेसाठी देवाकडे प्रार्थना केली. देवाने मोशेचे ऐकले व त्यांना क्षमा केली. मोशे दहा आज्ञा लिहिलेल्या नवीन पाट्या घेऊन परत पर्वतावरुन खाली उतरतो. मग देवाने सीनाय पर्वतापासून वचनदत्त देशाकडे जाण्यास लोकांचे मार्गदर्शन केले.
बायबल कथाः निर्गम १९-३४
14. जंगलामध्ये भटकणे
देवाने इस्राएल लोकांशी केलेल्या कराराचा भाग म्हणून जे नियम त्यांना पाळण्यासाठी दिले होते ते सांगून झाल्यानंतर त्यांनी सीनाय पर्वत सोडला. देव त्यांना वचनदत्त देशाकडे, ज्याला कनान देश सुदधा म्हटले जायचे त्याकडे त्यांना घेऊन जात होता. कनान देशाकडे जात असतांना मेघस्तंभ त्यांच्यापुढे गेला व ते त्यांच्या पाठीमागे गेले.
देवाने अब्राहाम, इसहाक व याकोब यांना वचन दिले होते की त्यांच्या वंशजांना तो वचनदत्त देश देईल, पण आता त्या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक राहत होते. त्यांना कनानी असे म्हणत असत. कनानी लोक देवाची आराधना करीत नव्हते व त्याची आज्ञा मानत नव्हते. ते खोट्या देवदवतांची पुजा करीत होते व पुष्कळ वाईट गोष्टी करीत होते.
देव इस्राएलास म्हणाला, "वचनदत्त देशामधील कनानी लोकांचा तुम्ही पुर्णपणे नाश करा. त्यांच्याशी शांतीने वागू नका व त्यांच्याशी विवाह करू नका. तुम्ही त्यांच्या सर्व मूर्त्यांचा समूळ नाश करा. जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाही, तर तुम्ही माझ्याऐवजी त्यांच्या मूर्त्यांच्या पाया पडाल ."
जेव्हा इस्राएल लोक कनान देशाच्या सीमेवर आले, तेव्हा मोशेने इस्राएलाच्या बारा वंशामधून प्रत्येकी एक अशा बारा मनुष्यांस निवडले. त्याने त्या मनुष्यांस कसे जावे व देश कसा हेरावा याविषयी सुचना देऊन तो देश कसा आहे हे बघायला सांगितले. कनानी लोकांवरतीही हरगिरी करुन ते शक्तिशाली आहेत की दुर्बल आहेत हे पाहायला सांगितले.
ही बारा माणसे चाळीस दिवस कनानात फिरली व परत आली. त्यांनी लोकांस सांगितले. "जमीन एकदम सुपीक आहे व पिकपाणी भरपूर आहे. परंतु दहा हेर म्हणाले, "शहरे खूप मजबूत व तटबंदीची आहेत तेथिल लोक राक्षस आहेत!" जर आपण त्यांच्यावर हल्ला केला तर ते निश्चितच आपला पराभव करतील व आपणांस जीवे मारतील!"
लगेच कालेब आणि यहोशवा ही दोघे हेर म्हणाले, "कनानी लोक उंच व बलाढ्य आहेत ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण त्यांना निश्चितपणे पराभव करु शकतो. देव आमच्या बाजूने लढेल!"
परंतु लोकांनी कालेब व यहोशवाचे ऐकले नाही. ते मोशे व अहरोनावर भडकले व म्हणाले, "तुम्ही आम्हांस अशा भयानक ठिकाणी का आणिले?" इथे युद्धामध्ये मरणे व आमच्या बायका व मुले यांना गुलाम बनण्यापेक्षा मिसर देशामध्ये राहणे हे बरे होते. आपणांस पुन्हा मिसर देशामध्ये घेऊन जाईल असा वेगळा नेता त्यांना निवडायचा होता.
हे पाहून देव रागावला व दर्शनमंडपाजवळ आला. देव म्हणाला, "तुम्ही माझ्याविरूद्ध बंड पुकारल्यामुळे आता तुम्हा सर्वांना ह्या जंगलामध्ये भटकावे लागेल. फक्त यहोशवा आणि कालेब, यांना सोडून बाकी सर्व वीस वर्षाचे व वीस वर्षांवरील लोक या जंगलामध्येच मरतील व त्यांचा वचनदत्त देशामध्ये प्रवेश होणार नाही.”
लोकांनी हे ऐकल्यावर, त्यांना असे केल्याचे दुःख झाले. त्यांनी आपली हत्यारे घेतली व कनानी लोकांविरूद्ध लढाई करायला गेले. मोशेने त्यांना सावध केले व म्हटले की जाऊ नका कारण देव त्यांच्याबरोबर नव्हता, तरी त्यांनी त्याचे ऐकले नाही.
या युद्धामध्ये देव त्यांच्याबरोबर गेला नव्हता, म्हणून त्यांचा पराभव झाला व बरेच जण मृत्युमुखी पडले. मग इस्राएली लोक कनानमधून परतले व चाळीस वर्षे जंगलामध्ये भटकत राहिले.
त्यांच्या या चाळीस वर्षाच्या भटकंतीच्या समयी देवाने जंगलामध्ये देखिल त्यांच्या सर्व गरजा पुरविल्या. त्याने त्यांना स्वर्गातील भाकर ज्याला त्यांनी "मान्ना" म्हटले ती खावयास दिली. त्याने त्यांच्या तंबूमध्ये लावा पक्षांचे(हे पक्षी मध्यम आकाराचे असतात) थवे पाठविले, अशासाठी की त्यांना मांस खावयास मिळावे. या काळामध्ये, देवाने त्यांची वस्त्रे फाटू दिली नाहीत व त्यांची पादत्राणेही झिजू दिली नाहीत.
देवाने आश्चर्यकारक रितीने त्यांना खडकामधून पाणी दिले. पण तरीही इस्राएल लोकांनी देवाविरूद्ध व मोशेविरूद्ध कुरकुर केली. तरीदेखील देव अब्राहाम, इसहाक व याकोब यांना दिलेल्या अभिवचनाविषयी विश्वासू राहिला.
अजून एकदा जेव्हा लोकांना प्यावयास पाणी नव्हते, तेव्हा देव मोशेस म्हणाला, "खडकाशी बोल, म्हणजे त्यातून पाणी निघेल." परंतु त्या खडकास आज्ञा करण्याऐवजी त्याने दोनदा त्या खडकावर काठी मारून सर्व लोकांसमोर देवाचा अनादर केला. सर्वांना पिण्यासाठी खडकातून पाणी आले, परंतु देव मोशेवर रागावला आणि म्हणाला, "तू वचनदत्त देशात प्रवेश करणार नाहीस."
चाळीस वर्षे इस्राएल लोक जंगलामध्ये भटकले, ज्या इस्राएलांनी देवाविरूद्ध बंड केले, ते सर्व तेथेच मरण पावले. मग देवाने लोकांस पुन्हा त्या वचनदत्त देशाकडे येण्यास त्यांचे मार्गदर्शन केले. मोशे आता वयोवृद्ध झाला असल्यामूळे परमेश्वराने लोकांचे नेतृत्व करण्यास त्याची मदत करण्यासाठी यहोशवाची निवड केली. देवाने मोशेस हेही आश्वासन दिले की एक दिवस त्याच्या सारखाच दुसरा संदेष्टा देव पाठविल.
मग देवाने मोशेस पर्वताच्या शिखरावर जाऊन वचनदत्त देश पाहावयास सांगितले. मोशेने वचनदत्त देश पाहिला, परंतु देवाने त्यास तेथे प्रवेश करण्यास परवानगी दिली नाही. मग मोशे मरण पावला व इस्राएलांनी चाळीस दिवस त्याच्यासाठी शोक केला. यहोशवा त्यांचा नविन नेता बनला. यहोशवा एक चांगला नेता झाला कारण त्याने देवावर विश्वास ठेविला व त्याच्या आज्ञा पाळल्या.
बाबल कथाः निर्गम १६-१७; गणना १०-१४; २०; २७; अनुवाद ३४
15. वचनदत्त देश
शेवटी आता इस्राएलांना कनानामध्ये, वचनदत्त देशामध्ये प्रवेश करण्याची वेळ आली. यहोशवाने कनानी शहर यरीहो जे मोठ्या वेशींनी सुरक्षित केले गेले होते, तेथे दोन हेरांस हेरगिरी करण्यास पाठविले. त्या शहरामध्ये रहाब नावाची एक वेश्या राहत होती. तिने त्या हेरांना आपल्या घरामध्ये लपवले व नंतर त्यांना निसटून जाण्यास मदत केली.तिने असे केले कारण तिने देवावर विश्वास ठेवला होता. जेव्हा इस्राएल लोक यरीहोचा नाश करतील तेव्हा रहाब व तिच्या घराण्याचे रक्षण करण्याचे त्यांनी वचन दिले.
इस्राएलांना वचनदत्त देशामध्ये प्रवेश करण्यासाठी यार्देन नदी पार करणे अगत्याचे होते. देवाने यहोशवास सांगितले, "प्रथम याजकांस पुढे जाऊ द्या." जेव्हा याजकांच्या पायाचा स्पर्श पाण्यास झाला तेव्हा यार्देन नदीचा वरून येणारा प्रवाह बंद झाला व इस्राएल लोक कोरड्या जमिनीवरून चालत नदीच्या पलिकडे जाऊ शकले.
यार्देन नदी पार केल्यानंतर, देवाने यहोशवास सांगितले की कशा प्रकारे त्यांनी मजबूत यरीहो नगरावर हल्ला करावा. लोकांनी देवाच्या आज्ञेचे पालन केले. देवाने सांगितल्या प्रमाणेच सर्व सैनिकांनी व याजकांनी यरीहो शहरास सहा दिवस प्रत्येकी एक वेळा प्रदक्षिणा घातल्या.
मग सातव्या दिवशी, इस्राएलांनी आणखी सात वेळा शहरास प्रदक्षिणा घातल्या. शेवटच्या वेळी प्रदक्षिणा घालत असतांना सैनिकांनी गर्जना केल्या व याजकांनी आपली कर्णे वाजवले.
मग यरीहो शहराच्या भिंती कोसळल्या. देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएलांनी शहराचा नाश केला. त्यांनी केवळ राहाब व तिच्या कुटुंबास जिवंत ठेविले, जे नंतर इस्राएलांचा एक भाग बनले. जेव्हा कनानमध्ये राहणा-या इतर लोकांनी ऐकले की इस्राएलांनी यरीहो नगराचा नाश केला आहे, तेव्हा इस्त्राएली लोक त्यांच्यावरही हल्ला करतील याची त्यांनी भिती वाटली.
देवाने इस्राएलास आज्ञा केली होती की त्यांनी कनानी लोकांबरोबर शांतीचा करार करु नये. परंतु गिबोनी नावाचा कनानामधील एक लोकगट यहोशवाबरोबर खोटे बोलला ते म्हणाले की ते कनानापासून खूप लांब रहातात. त्यांनी यहोशवास त्यांच्यासोबत शांतीचा करार करण्यास विनंती केली. यहोशवा व इस्राएल यांनी गिबोनी लोक कोठून आले होते याची देवाकडे विचारपूस केली नव्हती. म्हणून यहोशवाने त्यांच्याशी शांतीचा करार केला.
जेव्हा इस्राएलास समजले की गिबोनी लोकांनी त्यांची फसवणूक केली आहे, तेव्हा ते खूप रागावले, पण तरीही त्यांनी तो करार पाळला कारण त्यांनी देवासमोर त्यांना वचन दिले होते. काही काळानंतर, कनानामधील इतर लोकगटाच्या राजांनी, अमोरी लोकांनी, ऐकले की गिबोनी लोकांनी इस्राएलाबरोबर करार केला आहे, तेव्हा त्यांनी आपले सैन्य एकत्र करून गिबोन्यांवर हल्ला केला. गिबोन्यांनी यहोशवाकडे संदेश पाठविला व त्यांना मदत करण्याची विनंती केली.
यास्तव यहोशवाने इस्राएलाच्या सैनिकांस जमा केले व गिबोन्यांकडे पोहोचण्यासाठी रात्रभर चालत राहिले. पहाटेच त्यांनी अमोरी सैनिकांना आश्चर्याचा धक्का दिला व त्यांच्यावर हल्ला केला.
त्या दिवशी इस्राएलाच्या बाजूने देव स्वतः लढला. त्याने अमोरी सैनिकांमध्ये गोंधळ निर्माण केला व त्यांच्यावर मोठ्या गारा पाडल्या, ज्यामध्ये अनेक अमोरी मरण पावले.
देवाने सुद्धा सूर्यास आकाशात एका जागी स्थिर राहाण्याची आज्ञा केली कारण इस्राएलांना अमो-यांचा पुर्णपणे नाश करण्यास वेळ मिळावा. त्या दिवशी देवाने इस्राएलाला मोठा विजय प्राप्त करून दिला.
देवाने त्या सैनिकांस पराजित केल्यानंतर, अनेक कनानी लोकगटांनी एकत्र येऊन इस्त्राएलावर चढाई केली. यहोशवा आणि इस्राएलांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा नाश केला.
या लढाईनंतर देवाने इस्राएलाच्या प्रत्येक वंशास वचनदत्त देशाची वाटणी करुन दिली. त्यानंतर देवाने इस्राएलाच्या सर्व सीमेवर शांती प्रस्थापित केली.
जेव्हा यहोशवा वृद्ध झाला, तेव्हा त्याने सर्व इस्राएली लोकांस एकत्र बोलावले. मग त्याने इस्राएली लोकांस देवाने त्यांच्याशी केलेल्या सीनाय पर्वतावरील कराराचे स्मरण करून दिले की त्यांनी देवाच्या आज्ञा पाळाव्यात. सर्व लोकांनी देवाशी विश्वासू राहण्याचे व त्याच्या आज्ञा पाळण्याचे वचन दिले.
बाबल कथाः Joshua 1-24
16. तारणारे
यहोशवाच्या मृत्युनंतर, इस्त्राएल लोकांनी देवाचे अनुकरण केले नाही, उरलेल्या कनानी लोकांना घालवून दिले नाही व देवाचे नियम पाळले नाहीत. याव्हे ख-या व जिवंत देवाची उपासना न करता इस्त्राएली लोक कनानी देवतांची पूजा करू लागले. इस्त्राएलांस राजा नव्हता, म्हणून प्रत्येक जण आपल्या दृष्टिने जे बरे ते तो करत असे.
इस्त्राएलांनी सतत देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे, देवाने त्यांना त्यांच्या शत्रूंच्या पुढे पराभूत करून शिक्षा दिली. ह्या शत्रुंनी इस्त्राएल लोकांची वस्तूंची चोरी केली, त्यांच्या संपत्तीचा नाश केला व त्यांच्यातील कित्येकांना मारून टाकले. अनेक वर्षानंतर देवाचा आज्ञाभंग व शत्रूद्वारे जुलूम सोसून झाल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला व त्यांनी सुटकेसाठी देवाकडे धाव घेतली.
मग देवाने त्यांना एक तारणारा पाठविला ज्याने त्यांना शत्रूंपासून सोडविले व त्यांच्या मध्ये शांती प्रस्थापित झाली. पण नंतर इस्त्राएल लोकांना देवाचा विसर पडला व ते पुन्हा मूर्तिपूजा करू लागले. मग देवाने शेजारच्या मिद्यांनी लोकांद्वारे त्यांचा पराभव केला.
मिद्यांनी लोकांनी सात वर्षे इस्त्राएल लोकांचे अन्न - धान्य हडप केले. आता इस्त्राएली खूप भयभीत झाले व आपण मिघान्यांच्या हातामध्ये सापडू नये म्हणून ते गुहेमध्ये राहू लागले. शेवटी आपला बचाव व्हावा म्हणून ते देवाकडे विनवणी करू लागले.
एके दिवशी गिदोन नावाचा एक इस्त्राएली मनुष्य मिद्यान्यांनी आपले धान्य चोरू नये म्हणून गुप्तपणे त्याची झोडणी करीत होता. यहोवाचा एक दूत येऊन त्याला म्हणाला, ‘‘हे बलवान वीरा, देव तुझ्याबरोबर आहे. जा आणि इस्त्राएलाला मिद्यान्यांच्या हातातून सोडव’’
गिदोनाच्या पित्याने एका मूर्तीसाठी वेदी बनवली होती. देवाने गिदोनास ती वेदी तोडण्यास सांगितले. परंतु गिदोनास लोकांचे भय वाटल्यामुळे तो अंधार पडण्याची वाट पाहत होता. मग त्याने ती वेदी फोडून तिचे तुकडे तुकडे केले. मुर्तीसाठी बांधलेल्या वेदीजवळ त्याने जीवंत देवासाठी एक नवीन वेदी बांधली व त्यावर देवाला पशूबली अर्पण केला.
दुस-या दिवशी त्या वेदीचा कोणीतरी नाश केला आहे हे पाहून लोक खूप रागावले. ते गिदोनास जीवे मारण्यासाठी त्याच्या घरी गेले, पण गिदोनाचा पिता त्यांस म्हणाला, ‘‘तूम्ही आपल्या देवाची मदत करण्याचा प्रयत्न का करता? जर तो देव आहे तर त्याला स्वत:चे रक्षण करु द्या!’’ त्याने असे म्हटल्यामुळे त्यांनी गिदोनास मारिले नाही.
मग मिद्यानी लोक पुन्हा इस्त्राएल लोकांचे धान्य चोरी करण्यासाठी आले. ते इतके पुष्कळ होते की, ते मोजण्याच्या पलीकडे होते. गिदोनाने इस्त्राएल लोकांस एकत्र बोलावून मिद्यान्यांशी युध्द करण्यास तयार केले. गिदोनाने देव आपणास इस्त्राएल लोकांची सुटका करण्यासाठी उपयोग करणार आहे याची खा़त्री पटावी म्हणून देवाकडे दोन चिन्हे मागितली.
पहिले चिन्ह म्हणून गिदोनाने जमिनीवर कपडा ठेवला व देवाला म्हटले की उद्या सकाळी जमिनीवर दहिवर न पडता फक्त कापडावरच पडावे असे होवो. देवाने तसेच केले. दुस-या रात्री, त्याने म्हटले की जमीन भिजावी पण कपडा सुकाच रहावा असे होवो. देवाने तेही केले. हया दोन्ही चिन्हांद्वारे गिदोनास खात्री पटली की देव त्याचा उपयोग इस्त्राएलाला मिद्यान्यांपासून सोडविण्यासाठी उपयोग करणार आहे.
32,000 इस्त्रायली सैनिक त्याच्याकडे आले, परंतु देवाने त्याला सांगितले की, ते खूप आहेत. म्हणून युध्द करण्यास भिणा-या 22000 सैनिकांना त्याने परत पाठविले. देवाने गिदोनास सांगितले की ते अजूनही पुष्कळ आहेत. म्हणून 300 सैनिकांना सोडून बाकी सर्वांना त्याने घरी पाठवून दिले.
त्या रात्री देवाने गिदोनास सांगितले,‘‘तू मिद्यान्यांच्या छावणीकडे जा व ते काय बोलतात हे ऐकून भयभित होऊ नकोस.’’ म्हणून त्या रात्री तो छावणीकडे गेला व आपणास पडलेले स्वप्न एक मिद्यानी सैनिक आपल्या मित्रास सांगत असल्याचे गिदोनाने ऐकले. त्या सैनिकाचा मित्र म्हणाला,‘‘ हया स्वप्नाचा अर्थ गिदोनाचे सैन्य मिद्यानी सैन्यांचा पराभव करील असा होतो!’’ गिदोनाने हे ऐकून देवाची उपासना केली.
मग गिदोन आपल्या सैनिकांकडे परतला व त्याने प्रत्येकास एक शिंग, एक मडके व एक मशाल दिली. मिद्यानी सैनिक झोपले होते त्या छावणीस त्यांनी घेरा घातला. गिदोनाच्या 300 सैनिकांनी आपल्या मशाली मडक्यात घालून ठेवल्यामुळे मिद्यान्यांना त्यांचा प्रकाश दिसला नाही.
मग, एकाच वेळी गिदोनाच्या सैनिकांनी मडकी फोडली व आपल्या मशालीचा जाळ दिसू दिला. त्यांनी आपापली रणशिंगे फूंकली व गर्जना केली,‘‘याव्हे देवाची तलवार व गिदोनाची तलवार!’’
देवाने मिद्यान्यांना गोंधळून टाकले व त्यामुळे ते आपसांतच एकमेकांवर हल्ले करु लागले व मारु लागले. लगेच, मिद्यान्यांना हाकलण्यासाठी मदत करायला म्हणून बाकीच्या इस्राएली लोकांना त्यांच्या घरी बोलावणे पाठवले गेले. त्यांनी त्यांपैकी कित्येकांना जीवे मारिले व बाकीच्यांना इस्त्राएलाच्या भूमितून घालवून दिले. त्याच दिवशी 120000 मिद्यांनी सैनिक मारले गेले. देवाने इस्त्रायलाची अशा प्रकारे सुटका केली.
लोक गिदोनास आपला राजा बनवू पहात होते. गिदोनाने त्यांना असे करण्यास मना केले, पण त्यांच्यातील प्रत्येकाने मिद्यान्यांकडून घेतलेल्या सोन्याच्या अंगठयांपैकी कांही त्याने मागितल्या. लोकांनी गिदोनास पुष्कळ सोने दिले.
मग गिदोनाने त्या सोन्यापासून महायाजक घालत असलेल्या वस्त्रासारखे एक विशेष वस्त्र तयार केले. परंतू लोकांनी त्या वस्त्रास एक मूर्ती मानून तिची पूजा ते करु लागले. मग देवाने इस्त्रायलांस पुन्हा शासन केले, कारण त्यांनी मूर्तिपूजा केली होती. देवाने त्यांच्या शत्रूंना त्यांचा पराभव करु दिला. शेवटी त्यांनी देवाचीच मदत मागितली व देवाने त्यांना दुसरा तारणारा पाठविला.
हया नमुन्याची अनेकदा पुनरावृत्ती झाली. इस्त्रायली पाप करत, देव त्यांना शासन करी, ते पश्चात्ताप करत आणि देव त्यांचे तारण करण्यासाठी तारणारा पाठवत असे. अनेक वर्षांपासून, देवाने इस्त्राएली लोकांकडे त्यांना शत्रूंपासून सोडविण्यासाठी अनेक तारणारे पाठविले.
शेवटी, लोकांनी इतर राष्ट्रांसारखा राजा देवाकडे मागितला. त्यांना उंच, सशक्त व युद्धामध्ये नेतृत्व करणारा असा राजा हवा होता. देवाला हे आवडले नाही, तरीही त्याने त्यांच्या मागणी नुसार त्यांना एक राजा दिला.
बायबल कथा : शास्ते 1 -3; 6 - 8
17. देवाच्या दाविदाबरोबर करार
शौल इस्त्रायलचा पहिला राजा होता. इस्राएल लोकांना पाहिजे तसाच तो सुंदर व ऊंच होता. इस्त्राएलावर काही वर्षे शौल राजाने चांगले राज्य केले. परंतु नंतर तो एक दुष्ट राजा बनला व त्याने देवाची आज्ञा मानली नाही, म्हणून देवाने त्याच्या जागी राज्य करण्यासाठी दुस-या मनुष्यास नेमले.
देवाने शौलानंतर दाविद नावाच्या एका इस़्त्रायली तरुणांस राजा होण्यास निवडले. दाविद हा बेथलेहेम नगरातील एक मेंढपाळ होता. आपल्या पित्याची मेंढरे चारीत असताना दाविदाने अनेकदा मेंढरांवर हल्ला करणा-या सिंह व अस्वलास जीवे मारिले होते. दाविद हा देवाचे भय बाळगणारा नम्र व धार्मिक पुरुष होता.
दाविद एक महान योद्धा व पुढारी झाला. दाविद लहान असतानाच त्याने गल्याथ नावाच्या एका राक्षसी मुनष्याबरोबर युद्ध केले. गल्याथ हा एक प्रशिक्षित, बलाढय व तीन मीटर उंचीचा सैनिक होता! परंतू देवाने दाविदाचे सहाय्य केले व त्याच्याकरवी गल्याथाचा वध करुन इस्त्रायल लोकांस सोडविले. त्यानंतर दाविदाने इस्राएलाच्या शत्रूंवर अनेक विजय मिळविले त्यामुळे लोकांनी त्याची प्रशंसा केली.
लोक दाविदाची प्रशंसा करत असेलेले पाहूल शौलाला त्याचा हेवा वाटू लागला. शौलाने अनेकदा त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण दाविदाने स्वत:स शौलापासून लपविले. एके दिवशी शौल दाविदास मारण्यासाठी शोधीत होता. दाविद लपून बसलेल्या गुहेमध्ये शौल गेला, परंतू शौलाला तो दिसला नाही. दाविद आता शौलाच्या अगदी जवळ होता व तो त्याला मारु शकत होता, पण त्याने तसे केले नाही. त्याऐवजी, दाविदाने शौलाच्या वस्त्राचा काठ कापला व सिद्ध केले की राजा बनण्यासाठी तो शौलाचा वध करणार नाही.
शेवटी, शौल युद्धात मरण पावला आणि दाविद इस्त्रायलाचा राजा झाला. तो खूप चांगला राजा होता व लोक त्याजवर प्रेम करत. देवाने दाविदास आर्शिवादीत केले व तो यशस्वी झाला. दाविदाने अनेक युद्ध केले व देवाने त्यास इस्त्रायलांच्या शत्रूस पराजित करण्यास सहाय्य केले. दाविदाने यरुशलेम जिंकली व तिला आपली राजधानी बनविली. दाविदाच्या कारकीर्दीत इस्त्रायल सामर्थ्यवान व श्रीमंत राष्ट बनले.
दाविदाला एक मंदिर बांधावयाचे होते ज्यामध्ये सर्व इस्राएल लोक देवाची उपासना व अर्पणे करु शकतील. जवळजवळ 400 वर्षे लोक मोशेने बांधलेल्या दर्शन मंडपाच्या समोर देवाची उपासना करत व अर्पणे आणत.
परंतु देवाने नाथान संदेष्ट्यास दाविदाकडे संदेश घेऊन पाठविले,‘‘ तू लढाईचा माणुस असल्यामुळे हे मंदिर बांधू शकत नाही.’’ तूझा पुत्र ते मंदिर बांधील. परंतू मी तुला खूप आशीर्वादीत करीन. तुझ्याच वंशातील एक पुरुष माझ्या लोकांवर सर्वकाळ राज्य करील!’’ सर्वकाळ राज्य करणारा दाविदाच्या वंशातील एकमेव पुरुष म्हणजे मशिहा.’’ मशिहा हा देवाचा निवडलेला अभिषिक्त जगातील लोकांना त्यांच्या पापांपासून सोडविणारा होता.
दाविदाने हे शब्द ऐकल्यावर लगेच देवाचा धन्यवाद केला व त्याची स्तूती केली, कारण देवाने त्याला हा सन्मान व पुष्कळ आशीर्वाद देण्याचे अभिवचन दिले होते. देव हे कधी पूर्ण करील याविषयी दाविदास कल्पना नव्हती. परंतु मशिहा येण्याच्या अगोदर इस्त्रायली लोकांना जवळ जवळ 1000 वर्षे त्याची वाट पाहावी लागली.
दाविदाने न्यायाने व विश्वासूपणाने अनेक वर्षे राज्य केले व देवाने त्यास आशीर्वादित केले. तथापि, त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याने देवाविरुध्द भयंकर पाप केले.
एके दिवशी दाविदाचे सर्व सैन्य युद्धासाठी बाहेर गेले असताना, त्याने आपल्या राजमहालातून एक सुंदर स्त्री स्नान करीत असताना पाहिली. तिचे नाव बथशेबा होते.
दुसरीकडे बघण्याऐवजी, दाविदाने त्या स्त्रीस आपणाकडे आणावे म्हणुन कोणालातरी पाठवले. तो तिच्यापाशी निजला व तिला तिच्या घरी पाठवून दिले. काही काळानंतर आपण गरोदर असल्याचा निरोप तिने दाविदास पाठविला.
बथशेबाचा पती उरीया हा दाविदाचा शूर योद्धा होता. दाविदाने उरीयास युद्धातून परत बोलावले व आपल्या पत्नी बरोबर राहण्यास सांगितले. परंतु दूसरे सैनिक युद्ध करत असताना आपण घरी जाणे योग्य नव्हे असे समजून त्याने घरी जाण्यास नकार दिला. म्हणून दाविदाने उरीयास परत युद्धामध्ये पाठविले व सेनापतीस सांगितले की त्याने तुंबळ युद्धाच्या ठिकाणी उरीयाची नेमणूक करावी म्हणजे उरीया युद्धात मारला जाईल.
उरीया मेल्यानंतर दाविदाने बथशेबाशी लग्न केले. नंतर तिने दाविदाच्या पुत्रास जन्म दिला. दाविदाने केलेल्या कृत्याबद्दल देवाचा क्रोध भडकला, व त्याने नाथान संदेष्टयाला दाविदाकडे पाठवून त्याचे पाप किती दुष्ट होते याविषयी सांगितले. दाविदाने आपल्या पापाविषयी पश्चात्ताप केला आणि देवाने त्यास क्षमा केली. नंतर मरेपर्यंत दाविदाने अगदी कठिण प्रसंगी देखिल देवाच्या आज्ञा पाळल्या.
परंतु पापाची शिक्षा म्हणून दाविदाचा पुत्र मरण पावला. दाविदाच्या उरलेल्या जीवनात त्याच्या कुटुंबात नंतर भांडणे होत राहिली व त्याचे सामर्थ्यही खुप कमी झाले. जरी दाविद देवाशी अविश्वासू राहिला होता तरीही देव आपले वचन पाळण्यासाठी दाविदाशी विश्वासू राहिला. नंतर दाविद व बथशेबा यांना आणखी एक पुत्र झाला, आणि त्यांनी त्याचे नाव शलमोन असे ठेवले.
बायबल कथा :// 1 // शमूवेल 10; 15-19; 24; 31; 2 शमूवेल 5 : 7; 11 - 12
18. राज्याची विभागणी
ब-याच वर्षानंतर, दाविद मरण पावला आणि त्याचा पुत्र शलमोन हा इस्त्राएलवर राज्य करु लागला. देवाने शल्मोनास दर्शन दिले व त्यास सर्वात अधिक काय हवे आहे असे विचारले. जेंव्हा शल्मोनाने बुद्धि मागितली तेंव्हा देव त्याच्यावर प्रसन्न झाला व त्याने त्याला जगातील सर्वांत ज्ञानी मनुष्य बनविले. शल्मोन अनेक गोष्टी शिकला व तो एक सुज्ञ न्यायाधीश झाला. देवाने त्यास खूप श्रीमंतही बनविले.
आपला बाप दाविद याच्या योजनेप्रमाणे व त्याने जमविलेल्या साधन सामग्रीने शल्मोनाने यरुशलेममध्ये एक मंदिर बांधले. लोक दर्शनमंडपासमोर उपासना न करता आता मंदिरामध्ये देवाची उपासना व अर्पण करु लागले. देव मंदिरात आला व त्याची उपस्थिती त्या मंदिरामध्ये होती, आणि देव आपल्या लोकांमध्ये वस्ती करु लागला.
परंतू शल्मोनाने परराष्ट्रीय स्त्रीयांवर प्रेम केले. त्याने अनेक स्त्रियांशी विवाह करुन देवाची आज्ञा मोडिली. त्याने 1000 स्त्रियांशी विवाह केला! त्यापैकी अनेक स्त्रिया परराष्ट्रीय होत्या त्यांनी आपली दैवते बरोबर आणिली व त्यांची पूजा करणे चालू ठेवले. शल्मोन वृद्ध झाल्यानंतर त्यानेही त्यांच्या दैवतांची पूजा केली.
देव शल्मोनाने केलेल्या कृत्यांविषयी त्याजवर कोपला. त्याच्या हया अविश्वासूपणाबद्दल देवाने त्यास शासन केले. देवाने शल्मोनाच्या मृत्यूनंतर इस्त्रायलाच्या राज्याचे दोन भाग केले.
शल्मोनाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र रहोबाम हा राजा झाला. रहोबाम हा मूर्ख मनुष्य होता. इस्त्रायल राष्ट्रातील सर्व लोक त्याला राजा म्हणून मान्यता देऊन त्याचा राज्याभिषेक करण्यास एकत्र आले. त्यांनी रहोबामाकडे तक्रार केली की, शल्मोनाने त्यांना खूप परिश्रम करण्यास भाग पाडले व जास्त प्रमाणात कर वसूल केला.
रहोबामाने मूर्खपणाने उत्तर दिले,‘‘तुम्हांस वाटले असेल की माझा पिता शल्मोन हयाने तुमच्याकडून परिश्रम करुन घेतले, परंतु मी तर त्याहीपेक्षा अधिक परिश्रम तुमच्याकडून करुन घेईन व तुमच्याशी क्रूरतेने वागेन.’’
इस्त्राएल राष्ट्राच्या दहा गोत्रांनी एकत्र येऊन रहोबामाविरुद्ध बंड पुकारले. केवळ दोनच गोत्रे त्याच्याशी विश्वासू राहिली. ही दोन गोत्रे मिळून यहूदाचे राज्य झाले.
इस्राएल राष्ट्राच्या अन्य दहा बंडखोर गोत्रांनी यरुबाम नावाच्या मनुष्यास आपला राजा म्हणून नेमले. त्यांनी उत्तरेच्या भागात आपल्या राज्याची स्थापना केली व त्यांस इस्त्रायलचे राज्य असे संबोधण्यात आले.
यराबामाने देवाविरुध्द बंड पुकारले व लोकांना पापात पाडिले. यहूदाच्या राज्यामध्ये असलेल्या देवाच्या मंदिरात उपासना न करता त्याने आपल्या लोकांसाठी दोन मूर्ति स्थापन केल्या व त्यांची पूजा करु लागल्या.
यहूदाचे राज्य व इस्त्रायलचे राज्य एकमेकांचे शत्रू झाले व त्यांच्यामध्ये नेहमी लढाया होऊ लागल्या.
इस्त्रायलाच्या नवीन राज्यामध्ये, सर्वच राजे दुष्ट होते. त्यांपैकी बहुतेक राजांचा वध अन्य इस्त्राएल लोकांनीच केला जे त्यांच्या जागी राज्य करु पाहात होते.
सर्व राजे व इस्त्रायलाच्या राज्यातील बहुसंख्य प्रजा मूर्तींची पूजा करु लागले. त्यांच्या हया मूर्तिपूजेमध्ये बहुधा व्यभिचार व नरबली (बालकांचे अर्पण) यांचा समावेश होता.
यहूदाचे राजे हे दाविदाच्या वंशातील होते. त्यांपैकी काही राजे चांगले होते. त्यांनी न्यायाने राज्य केले व ख-या देवाची उपासना केली. परंतु यहूदाच्या राजांपैकी अनेक राजे दुष्ट होते. त्यांनी भ्रष्ट होऊन मूर्तिपूजा केली. त्यापैकी काही राजांनी तर स्वत:च्या मुलांचेही अर्पण खोटया देवांसाठी केले. यहूदाच्या राज्यातील बहुसंख्य प्रजेने ही देवाविरुध्द बंड करुन अन्य दैवतांची पूजा केली.
बायबल कथा :1 राजे 1 - 6; 11 - 12
19. संदेष्ट्ये
इस्त्रायलाच्या संपूर्ण इतिहासामध्ये, देवाने त्यांच्याकडे संदेष्ट्ये पाठविली. संदेष्ट्ये देवाकडून संदेश ऐकत व तो लोकांपर्यंत पोहचवित असत.
जेंव्हा अहाब इस्राएल राज्याचा राजा होता तेंव्हा एलीया हा संदेष्टा होता. अहाब हा एक दुष्ट राजा होता व त्याने लोकांस बालदेवाची उपासना करावयास प्रोत्साहित केले. एलीया अहाबास म्हणला,‘‘जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इस्त्रायलमध्ये पाऊस पडणार नाही.’’ हे ऐकून अहाबाला खूप राग आला.
अहाब एलीयास जीवे मारु इच्छीत होता म्हणून देवाने एलीयास जंगलातील एका ओहोळाजवळ लपून राहाण्यास सांगितले. प्रत्येक दिवशी सकाळी व संध्याकाळी, पक्ष्यांच्या द्वारे देवाने त्यास भोजन पुरविले. अहाब व त्याचे सैन्य एलीयास शोधत होते, पण त्यांना तो सापडला नाही. दुष्काळ एवढा भयानक होता की शेवटी तो ओहोळही आटला.
म्हणून एलीया शेजारच्या देशामध्ये गेला. त्या देशात राहणारी एक विधवा व तिचा मुलगा यांच्याकडे असणारी अन्नसामग्री दुष्काळामुळे संपत आली होती. परंतु त्यांनी एलीयाची काळजी घेतली, म्हणून देवाने त्यांच्या गरजा पूर्ण केल्या व त्यांच्या डब्यातले पीठ व कुप्पीतील तेल कधीच संपले नाही. संपूर्ण दुष्काळ संपेपर्यंत त्यांच्याकडे अन्न उपलब्ध होते. एलीया त्या ठिकाणी पुष्कळ वर्षे राहिला.
साडेतीन वर्षानंतर देवाने एलीयास इस्त्रायलच्या राज्यात जाऊन देव आता पाऊस पाठविणार आहे याची अहाब राजासमोर घोषणा करावयास सांगितली. जेव्हा अहाबाने एलियास पाहिले तेंव्हा तो म्हणाला,‘‘ तूच तो छळणारा ना!” एलियाने त्यास उत्तर दिले,‘‘तूच छळणारा आहेस ! तू आपला खरा देव याव्हे यास सोडून बालदेवतेची पूजा केली आहेस. इस्त्रायल राज्याच्या सर्व लोकांना कर्मेल डोंगरावर घेऊन ये.’’
तेंव्हा इस्त्रायलाच्या राज्यातील सर्व लोक, बालदेवतेच्या 450 संदेष्टयांसहित कर्मेल डोंगराकडे आले. एलीया लोकांस म्हणाला,‘‘तुम्ही किती वेळ आपले मन बदलत राहणार ? जर याव्हे हा खरा देव असेल तर त्याचीच सेवा करा! जर बाल देव असेल, तर त्याची सेवा करा!”
मग एलीया बालदेवतांच्या संदेष्टयांस म्हणाला,‘‘एक बैल मारा व अर्पण तयार करा, पण त्यास आग लावू नका. मीही तसेच करीन. जो देव अग्निच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा देव.’’ अशा प्रकारे बालदेवतेच्या याजकांनी होमार्पण तयार केले पण त्यास आग लावली नाही.
मग बालदेवतेचे संदेष्टये प्रार्थना करु लागले,‘‘बालदेवता, आमचे ऐका!’’ ते दिवसभर प्रार्थना करत व ओरडत होते, त्यांनी स्वत:ला चाकूने कापलेही तरीही त्यांना उत्तर मिळाले नाही.
शेवटी संध्याकाळच्या वेळी एलियाने देवासाठी होमार्पण तयार केले. मग त्याने लोकांस बारा घागरी(पाणी भरण्याचे मोठे भांडे) पाणी त्या होमबलीवर व इंधनावर ओतण्यास सांगितले. इतके की होमबली व इंधन व वेदी भोवतालची जमीन सुद्धा पूर्णपणे भिजली.
मग एलीयाने प्रार्थना केली,‘‘हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या देवा, इस्त्रायलामध्ये तूच देव आहेस व मी तुझा सेवक आहे हे सर्वांस दाखव. मला उत्तर दे म्हणजे तूच खरा देव आहेस अशी या लोकांना खात्री पटेल.”
तेंव्हा परमेश्वरापासून अग्नि उतरला आणि त्याने होमबली, इंधने, धोंडे आणि माती आणि त्या खळग्यातले पाणी सुद्धा भस्म करुन टाकले. हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, परमेश्वर (याव्हे) हाच देव ! परमेश्वर हाच देव!’’
तेंव्हा एलीया त्यांस म्हणाला,‘‘बआलाच्या संदेष्टयांस पकडा; त्यातल्या एकासही निसटून जाऊ देऊ नका !’’ तेंव्हा त्यांनी त्यांस पकडिले; आणि त्यास दूर नेऊन त्यांस जीवे मारिले.
मग एलीया अहाब राजास म्हणाला,‘‘लवकर नगरास जा कारण पाऊस येत आहे.’’ लगेच आकाशामध्ये काळे ढग जमा होऊन मुसळधार पाऊस पडू लागला. याव्हे देवाने अशाप्रकारे दुष्काळ संपवला आणि आपणच खरा देव आहे हे सिद्ध केले.
एलीया नंतर देवाने अलीशा नावाच्या मनुष्यास आपला संदेष्टा म्हणुन नेमले. देवाने अलीशाद्वारे अनेक चमत्कार केले. एक चमत्कार शत्रुचा सेनापती नामान, याच्यासाठी झाला, त्याला एक भयंकर चर्मरोग होता. त्याने अलीशाविषयी ऐकले होते म्हणून तो त्याच्याकडे गेला व आपणास बरे करा अशी विनंती केली. अलीशाने नामानास यार्देन नदीमध्ये सात वेळा डुबकी मारण्यास सांगितले.
सुरुवातीस नामानास राग आला व असे करण्यास तो तयार झाला नाही, कारण ते त्याला मूर्खपणाचे वाटले. परंतु नंतर त्याने आपले मन बदलले व त्याने यार्देन नदीमध्ये जाऊन सात वेळा डुबकी मारली. जेंव्हा सातव्या वेळी त्याने डुबकी मारली तेंव्हा त्याचे कोड पूर्णपणे बरे झाले! देवाने त्याला बरे केले होते.
देवाने अन्य संदेष्टयेही पाठविले. त्या सर्वांनी लोकांना मूर्तीपूजा बंद करा आणि दुस-यांना न्याय व दया दाखवा असे सांगितले. संदेष्टयांनी त्यांना इशारा दिला की जर त्यांनी आपला वाईट मार्ग सोडून देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत तर देव त्यांना दोषी ठरवून त्यांना शिक्षा करील.
पुष्कळ वेळा लोकांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्यांनी वारंवार संदेष्टयांचा अपमान केला व कधी कधी त्यांस जीवे मारिले. एकदा त्यांनी यिर्मया संदेष्टयास मरण्यानाठी कोरड्या विहिरीमध्ये ढकलून दिले. विहिरीच्या तळाशी असलेल्या गाळामध्ये तो रुतला, परंतु नंतर राजाला त्याची दया आली व तो मरण्यापुर्वी त्याला बाहेर काढण्याची त्याने त्याच्या सेवकांना आज्ञा दिली.
जरी लोक त्यांचा द्वेष करत होते, तरी संदेष्टये देवासाठी बोलत राहिले. त्यांनी लोकांस सावधानतेचा इशारा दिला की जर त्यांनी पश्चाताप केला नाही तर देव त्यांचा नाश करील. देवाच्या अभिवचना प्रमाने मशीहा (ख्रिस्त) येणार आहे याचीही त्यांनी लोकांना आठवण करुन दिली.
बायबल कथा :1 राजा 16 - 18; 2 राजा 5 ; यिर्मया 38
20. पाडाव आणि सुटका
इस्त्रायलाचे राज्य व यहूदाचे राज्य या दोहोंनीही देवाविरुध्द पाप केले. देवाने त्यांच्याशी सिनाय पर्वतावर केलेला करार त्यांनी तोडला. देवाने त्यांनी पश्चाताप करावा व देवाकडे वळावे म्हणून भविष्यवक्ते पाठविले, परंतु त्यांनी आज्ञा मानण्याचे त्यांनी नाकारले.
म्हणून देवाने त्या दोन्ही राज्यांना शिक्षा दिली, त्यांच्या शत्रूंना त्यांचा नाश करु दिला. अश्शूर हया दुष्ट व शक्तिशाली राष्ट्राने इस्त्रायलाचा नाश केला. अश्शूरी लोकांनी इस्त्रायलाच्या अनेक लोकांस जीवे मारिले, मौल्यवान वस्तूंची लूटालूट केली व देशाचा बराच भाग जाळून टाकला.
अश्शूरी लोकांनी सर्व नेत्यांस, श्रीमंतांस व कुशल कारागिरांस एकत्र करुन आपल्या देशामध्ये नेले. केवळ फार गरीब इस्त्रायल लोक जे युद्धमध्ये मारले गेले नाहीत, तेच इस्त्रायलमध्ये शिल्लक राहिले.
तेंव्हा अश्शूराने इस्त्रायल राहत असलेल्या ठिकाणी परराष्ट्रीय लोकांस वस्ती करण्यासाठी आणिले. परराष्ट्रीयांनी नाश झालेल्या शहरांची पुनर्बांधणी केली व इस्त्रायली स्त्रियांशी विवाह केला. इस्त्रायली वंशातील ज्या लोकांनी परराष्ट्रीयांशी विवाह केला त्यांना शोमरोनी म्हणण्यात आले.
यहूदा राज्यातील लोकांनी पाहिले की, इस्त्रायल राज्यातील लोकांना अविश्वास व आज्ञा मोडल्यामुळे देवाने कशाप्रकारे शासन केले आहे. पण तरीही त्यांनी मूर्तिपूजा केली व कनानी दैवतांचीही उपासना केली. देवाने इशारा देण्यासाठी त्यांच्याकडे संदेष्टये पाठविले, पण त्यांनी त्यांचे ऐकले नाही.
सुमारे 100 वर्षांनंतर जेंव्हा अश्शूराने इस्त्रायल राज्याचा नाश केला, तेंव्हा देवाने यहूदाच्या राज्यावर हल्ला करण्यासाठी नबुखद्नेस्सर हया बाबेलच्या राजास पाठविले. बाबेल हे एक शक्तिशाली राष्ट्र होते. यहूदाचा राजा नबुखद्नेस्सराचा सेवक बनण्यास तयार झाला व प्रतिवर्षी मोठया प्रमाणात पैसे देण्यासही तयार झाला.
परंतु काही वर्षांनंतर यहूदाच्या राजाने बाबेल विरुध्द बंड पुकारले. म्हणून बाबेलच्या लोकांनी परत येऊन यहूदाच्या राज्यावर चढाई केली. त्यांनी यरुशलेम शहर ताब्यात घेतले, मंदिराचा नाश केला व शहरातील व मंदिरातील सर्व संपती घेऊन गेले.
यहूदाच्या राजाच्या हया बंडखोरपणाबद्दल शासन म्हणून नबुकखद्नेस्सरच्या सैनिकांनी यहूदाच्या राजाच्या मुलांचा त्याच्या समोर वध केला व यहूदाच्या राजाचे डोळे फोडून त्यास आंधळे केले. त्यानंतर त्यांनी त्यास मरण्यासाठी बाबेल येथील तुरुंगात ठेवले.
नबुखद्नेस्सर व त्याच्या सैनिकांनी यहूदाच्या राज्यातील जवळ जवळ सर्वच लोकांना बाबेलमध्ये आणले केवळ फार गरीब इस्त्रायल लोकांनाच शेती करण्यासाठी मागे ठेवले. हयाच कालावधित जेंव्हा देवाच्या लोकांस वचनदत्त देश सोडून जाण्यास सक्ति करण्यात आली, त्यास पाडाव- हद्दपारी असे म्हणतात.
जरी देवाने आपल्या लोकांचा त्यांच्या पापांमुळे त्यांचा पाडाव होऊ दिला तरीही तो त्यांना व त्याने दिलेले वचन विसरला नाही. देवाची आपल्या लोकांवर कृपादृष्टी होती व संदेष्टयांच्या द्वारे तो त्यांच्याशी बोलत असे. त्याने त्यांना आश्वासन दिले की, सत्तर वर्षांनंतर तो त्यांना परत वचनदत्त देशात घेऊन येईल.
त्यानंतर सुमारे सत्तर वर्षांनी पारसाचा राजा कोरेश हयाने बाबेलचा पराभव केला व बाबेलच्या राज्याच्या जागी पारसाचे राज्य आले. इस्त्रायली लोक आता यहूदी या नावाने ओळखले जाऊ लागले व त्यांच्यापैकी पुष्कळ लोक आपल्या आयुष्यभर बाबेलमध्येच राहिले. केवळ थोडयाशा वयोवृध्द यहूद्यांनाच यहूदी राज्याचे स्मरण होते.
पारसाचे साम्राज्य शक्तिशाली होते, परंतु आपण पराभूत केलेल्या लोकांविषयी ते दयाळू होते. कोरेश पारसाचा राजा झाल्यानंतर लगेच त्याने फर्मान काढले की जर कोणी यहूदी यहूदामध्ये परत जाऊ इछितो तर त्याला तसे करण्याची परवानगी आहे. त्याने त्यांना मंदिराचे पुन्हा बांधकाम करण्यासाठी पैसाही पुरविला. अशा प्रकारे सत्तर वर्षाचा हद्दपारी संपवून यहूद्यांचा छोटा समूह यहूदातील यरुशलेमेस परतला.
यरुशलेमेस आल्यानंतर त्यांनी मंदिराचे पुनर्वसन केले व शहराच्या वेशी पुन्हा बांधल्या. जरी अद्याप त्यांच्यावर अन्य लोकांचे वर्चस्व होते, तरी आता पुन्हा एकदा वचनदत्त देशामध्ये ते राहू लागले व मंदिरामध्ये देवाची उपासना करु लागले.
A Bible story from: 2 _ राजा 17; 24-25; 2 इतिहास 36; एज्रा 1-10; नहेम 1-13_
21. देव मशीहा पाठवण्याचे अभिवचन देतो
आरंभापासूनच, देवाने मशीहाला पाठविण्याची योजना बनविली होती. मशीहा संबंधीचे अभिवचन सर्वप्रथम आदाम व हव्वा यांच्याकडे आले. देवाने वचन दिले की हव्वेला जे संतान होईल ते सापाचे डोके फोडील. ज्या सापाने हव्वेस फसविले तो सैतान होता. हया अभिवचनाचा अर्थ असा होता की मशीहा सैतानास पूर्णपणे पराजित करील.
देवाने अब्राहामास असे वचन दिले की त्याच्या द्वारे जगातील सर्व कुळे आशीर्वादीत होतील. पुढे भविष्यात मशीहा आल्यानंतर हया अभिवचनाची पुर्तता होणार होती. तो प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक गटाच्या लोकांचे तारण होणे शक्य करील.
देवाने मोशेस वचन दिले होते की भविष्यामध्ये तो मोशेसारखाच एक संदेष्टा तयार करील. हे मशीहाविषयीचे दुसरे अभिवचन होते. जे काही काळानंतर पूर्ण होणार होते.
देवाने दाविद राजास अभिवचन दिले की त्याच्याच वंशातील एक जण देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करील. त्याचा अर्थ असा होता की मशीहा हा दाविदाच्याच घराण्यात जन्मास येणार होता.
यिर्मया संदेष्टयाच्या द्वारे, देवाने वचन दिले की तो एक नवा करार करणार आहे, परंतु तो सिनाय पर्वतावर इस्राएलांबरोबर केलेल्या करारासारखा नसेल. नव्या करारामध्ये देव आपल्या आज्ञा मनुष्यांच्या हृदयावर लिहिल, लोक देवाला वैयक्तीकरित्या ओळखतील,ते त्याचे लोक होतील आणि देव त्यांच्या अपराधांची क्षमा करील. मशीहा या नव्या कराराचा आरंभ करील.
देवाच्या संदेष्टयांनीही सांगितले होते की मशीहा हा एक संदेष्टा, याजक, आणि राजा असेल. संदेष्टा हा एक असा माणूस असतो की जो देवाचा संदेश ऐकून तो लोकांना सांगतो. देवाने अभिवचन दिलेला मशीहा हा एक परिपूर्ण संदेष्टा असेल.
इस्राएली याजक लोकांनी केलेल्या पापाच्या शिक्षेचे प्रायश्चित म्हणून देवाला होमार्पणे करत असत. याजक लोकांसाठी देवाला प्रार्थनाही करत असत. मशीहा हा एक परिपूर्ण महायाजक असणार होता जो देवाला स्वत:चे परिपूर्ण बलिदान करणार होता.
राजा म्हणजे जो लोकांवर राज्य करतो व त्यांचा न्याय करतो. आपला पूर्वज दाविद याच्या सिंहासनावर बसणारा मशीहा हा एक परिपूर्ण राजा असेल. तो संपूर्ण जगावर सर्वकाळ राज्य करील, आणि प्रामाणिकपणे न्याय करील व योग्य निर्णय घेईल.
देवाच्या भविष्यवाद्यांनी मसीहाविषयी अनेक भाकित केले होते. मलाखी संदेष्टयाने भाकित केले होते की मसिहा येण्याच्या अगोदर एक महान संदेष्टा उदयास येईल. यशया संदेष्टयाने भविष्यवाणी केली की मसिहा हा एक कुमारीच्या पोटी जन्म घेईल. मीखा संदेष्टयोन सांगितले की मसीहा बेथलेहेम नगरामध्ये जन्मास येईल.
यशया संदेष्टा म्हणाला की मशीहा गालिलमध्ये राहील, निराशामध्ये असलेल्या लोकांचे सांत्वन करील, आणि बंदिवानांना सोडवून स्वातंत्र्याची घोषणा करील. त्याने हेही सांगितले की मशीहा आजारी आंधळया, मुक्या, बहि-यांस व लंगडयांस बरे करील.
यशया संदेष्टयाने हेही भाकित केले की मशीहाचा विनाकारण द्वेश केला जाईल व त्याला नाकारले जाईल. इतर संदेष्टयांनी अगोदरच सांगून ठेवले की मशीहास मारणारे लोक त्याचे कपडे वाटून घेण्यासाठी चिठ्टया टाकतील आणि मशीहाचा एक मित्रच त्याचा विश्वासघात करिल. जख-या संदेष्टयाने अगोदरच सांगून ठेवले होते की मशीहाचा विश्वासघात करण्यासाठी त्याच्या मित्रास वेतन म्हणून चांदीची तीस नाणी दिली जातील.
संदेष्टयांनी मशीहा कशा प्रकारे मरेल याचेही भविष्य केले होते. यशयाने भविष्य केले होते की लोक मशीहावर थुंकतील, त्याची थट्टा करतील व त्यास फटके मारतील. जरी त्याने काहीही वाईट केले नव्हते, तरी त्यास खिळे ठोकून भयंकर वेदनेचे पीडादायक मरण देतील.
संदेष्टयांनी हेही सांगितले की मशीहा परिपूर्ण व निष्पाप असेल. तो अन्य लोकांच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून मरेल. त्याची शिक्षा मुनष्य आणि परमेश्वर यांमध्ये समेट घडवून आणिल. हया कारणास्तव, मशीहास ठेचावे ही देवाची इच्छा होती.
संदेष्टयांनी भविष्य केले होते की मशीहा मरेल आणि देव त्याला पुन्हा जीवंतसुद्धा करील. मशीहाच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे देव आपली योजना पूर्ण करील, पाप्यांचे तारण करुन एक नवा करार प्रस्थापित करील.
देवाने संदेष्टयांना मशीहाविषयी अनेक गोष्टी प्रकट केल्या, परंतु त्या संदेष्टयांपैकी कोणाच्याही काळामध्ये मशीहा आला नाही. देवाने संदेष्टयांना मशीहाविषयी अनेक गोष्टी प्रकट केल्या, परंतु त्या संदेष्टयांपैकी कोणाच्याही काळामध्ये मशीहा आला नाही.
बायबल कथा: उत्पत्ति //3:15; 12: 1 -3; अनुवाद 18:15; 2 शमूवेल 7; यिर्मया 31; यशचा 59:16; दानिय्येल7; मलाखी 4 : 5; यशचा 7:147; मिखा 5 : 2; यशया 9:1-7; 35 : 3-5; 61; 53; स्त्रोत 22 : 18; 35 : 19; 69 : 4; 41 : 9 जखर्या 11 : 12 - 13; यशचा 50 : 6; स्त्रोत्र __16 : 10-11//
22. योहानाचा जन्म
पूर्वीच्या काळी, देव आपल्या लोकांशी देवदूत व संदेष्टयांद्वारे बोलला. परंतु त्यानंतर 400 वर्षे तो लोकांशी बोलला नाही. अचानक एके दिवशी जख-या नावाच्या एका वयोवृध्द याजकाकडे एक देवदूत एक संदेश घेऊन आला. जख-या व त्याची पत्नी, अलीशिबा, हे धार्मिक लोक होते, पण त्यांना मुलबाळ नव्हते.
देवदूत जख-यास म्हणाला,‘‘तुझ्या पत्नीस मुलगा होणार आहे.’’ त्याचे नाव तुम्ही योहान असे ठेवा. तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन, मशीहाच्या आगमनासाठी लोकांची तयारी करील !’’ जख-याने उत्तर दिले,‘‘मी आणि माझी पत्नी आता खूप म्हातारे झालो आहोत आणि आता आम्हास मुले होऊ शकत नाहीत! हे घडेल हे कशावरुन मी समजू?’’
देवदूत जख-यास म्हणाला,‘‘तुला ही सुवार्ता सांगण्यासाठी देवाने मला पाठविले आहे. तू माझ्या वचनावर विश्वास ठेविला नाही, म्हणून बाळाचा जन्म होईपर्यंत तुला बोलता येणार नाही. लगेच, जख-या मुका झाला. तेंव्हा देवदूत जख-यास सोडून गेला. त्यानंतर जख-या घरी आला आणि त्याची पत्नी गर्भवती झाली.
जेव्हा अलीशिबा ही सहा महिन्यांची गरोदर होती, तेंव्हा तोच देवदूत अलिशिबाच्या नात्यातील मरीयेस अचानक प्रकट झाला. ती कुमारी होती व योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर तीचे वाग्दान झाले होते. देवदूत म्हणाला,‘‘तू गर्भवती होऊन तूला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव. तो परात्पर परमेश्वराचा पुत्र असून सर्वकाळ राज्य करिल.’’
मरीयाने उत्तर दिले,‘‘हे कसे होणार, मी तर कुमारी आहे?’’ देवदूताने स्पष्ट केले,‘‘पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि देवाचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. यास्तव ते बाळ पवित्र, देवाचा पुत्र असेल.’’ देवदूताने सांगितलेल्या गोष्टीवर मरीयेने विश्वास ठेविला.
देवदूताच्या भेटीनंतर लगेच मरीया अलीशिबा हीस भेटण्यास गेली. मरीयेचे हे अभिवादन ऐकताच अलीशिबेच्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली. देवाने त्यांच्यासाठी जे काही केले होते त्याविषयी दोन्ही स्त्रियांनी एकत्र आनंद केला. अलीशिबेस भेटून तीन महिन्यानंतर मरीया आपल्या घरी परतली.
अलीशिबेने आपल्या पुत्रास जन्म दिल्यानंतर, देवदूताने सांगितल्याप्रमाणे जख-या व अलीशिबेने त्याचे नाव योहान असे ठेविले. तेंव्हा देवाने जख-यास पुन्हा बोलण्याची अनुमति दिली. जख-या म्हणला,‘‘परमेश्वराची स्तुती असो, कारण त्याने आपल्या लोकांचे स्मरण ठेविले आहे! तु, माझ्या पुत्रा, तु परात्पर देवाचा एक महान संदेष्टा होशिल जो आपल्या लोकांना त्यांच्या पापांची क्षमा कशी होईल हे सांगेल!’’
बायबल कथा//: Luke 1//
23. येशूचा जन्म
मरीयेचे वाग्दान योसेफ नावाच्या एका धार्मीक पुरुषाबरोबर झाले होते. मरीया गरोदर असल्याचे ऐकून त्याला कळले की, हे बाळ त्याचे नव्हे. तो धार्मीक पुरुष असल्यामुळे मरीयेची बेअब्रु होऊ नये म्हणून त्याने गुप्तपणे तिला सोडण्याची योजना केली. त्याने असे करण्यापूर्वी, एक देवदूत त्याच्या स्वप्नामध्ये आला व त्याच्याशी बोलला.
देवदूत म्हणाला,‘‘योसेफा, मरीयेस तू आपली पत्नी म्हणून स्विकारण्यास भिऊ नकोस.ठेविल, कारण तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून सोडविल.’’ तिच्या उदरामध्ये असणारे बाळ हे पवित्र आत्म्यापासून आहे. ती एका मुलास जन्म देईल.
तेंव्हा योसेफाने मारियेशी विवाह केला व आपली पत्नी म्हणून तिचा स्विकार केला, परंतु त्या बाळाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी समागम केला नाही.
जेंव्हा बाळाचा जन्म होण्याचा समय जवळ आला, तेंव्हा रोमी सरकारने जनगणना करण्यासाठी आपापल्या गावी जाण्यास सांगितले. योसेफ आणि मरीया यांना नासरेथहून बेथलेहेम असा लांबचा प्रवास करावा लागला, कारण त्यांचा पूर्वज दाविद हा बेथलेहेम गावाचा होता.
.
बेथलेहेम येथे पोहोचल्यावर, त्यांना राहायला जागा मिळाली नाही. फक्त गुरांच्या गोठयामध्ये जागा होती ती त्यांना मिळाली. बाळाचा जन्म त्या गोठयामध्ये झाला व त्याच्या आईने त्यास गव्हाणीमध्ये ठेवले. त्यांनी त्याचे नाव येशू ठेवले.
त्या रात्री, काही मेंढपाळ आपली मेंढरे रानामध्ये राखीत होते. अचानक एक तेजस्वी देवदूत येऊन त्यांच्यासमोर प्रकट झाला, आणि ते खूप घाबरले. देवदूत म्हणाला, ‘‘भिऊ नका, कारण मी तुम्हास मोठ्या आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आज बेथलेहेम नगरामध्ये तुमच्यासाठी मशीहा, अर्थात प्रभू जन्मला आहे!’’
‘‘जा आणि बाळाचा शोध घ्या, आणि तो तुम्हास बाळंत्याने गुंडाळलेला गव्हाणीमध्ये ठेवलेला दृष्टिस पडेल.’’ अचानक, आकाशामध्ये देवदूत देवाची स्तूती करत म्हणाले,‘‘वर स्वर्गात देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या मनुष्यांवर त्याची कृपा झाली आहे त्यांस शांती!’’
मेंढपाळ लगेच येशूच्या जन्माच्या ठिकाणी पोहोचले आणि देवदूताने सांगितल्याप्रमाणे त्यांना ते बाळ गव्हाणीमध्ये ठेवलेले दृष्टीस पडले. हे पाहून त्यांना खूप आनंद झाला. मरीयेस ही खूप आनंद झाला. आपण जे पाहिले व ऐकले त्याविषयी आनंद करत मेंढपाळ आपल्या मेंढरांकडे परतले.
थोडया दिवसांनंतर, पूर्व दिशेला एक विशेष तारा ज्ञानी लोकांनी पाहिला. त्यांना समजले की, हा यहूद्यांचा एक नवा राजा जन्मास आला आहे. म्हणून त्याचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी फार मोठा प्रवास केला. ते बेथलेहेम येथे आले आणि जेथे येशू व त्याचे माता-पिता राहात होते ते घर त्यांनी शोधले.
जेव्हा त्या ज्ञानी लोकांनी येशू बाळास त्याची आई मरीया हिच्या बरोबर पाहिले तेव्हा त्यांनी त्याला नमन केले व त्याची उपासना केली. त्यांनी येशूबाळास मौल्यवान भेटवस्तू दिल्या. तेंव्हा ते आपल्या घरी परतले
बायबल कथा: मत्तय 1; लूक 2
24. योहान येशूचा बाप्तिस्मा करतो
योहान, जख-या आणि अलीशिबा यांचा पुत्र, मोठा होऊन एक संदेष्टा बनतो. तो जंगलामध्ये राहत असे, रानमध व टोळ खात असे आणि त्याची वस्त्रे ऊंटाच्या केसापासून बनविलेली होती.
योहानाचे भाषण ऐकण्यासाठी अनेक लोक जंगलामध्ये जाऊ लागले. त्याने त्यांस प्रचार केला,‘‘पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे!’’
योहानाचा संदेश ऐकून अनेक लोकांनी पश्चाताप केला आणि योहानाने त्यांना बाप्तिस्मा दिला. अनेक धार्मिक पुढारी देखील बाप्तिस्मा घेण्यासाठी आले, परंन्तु त्यांनी आपल्या पापांविषयी पश्चात्ताप केला नव्हता व आपले पाप कबूल केले नव्हते.
योहान त्या धार्मिक पुढा-यांना म्हणाला,‘‘ तुम्ही विषारी सापांनो! पश्चात्ताप करा आणि तुमची वागणूक बदला. प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही, ते तोडले जाईल व अग्निमध्ये टाकण्यात येईल. योहानाने संदेष्टयांच्या या वचनाची पूर्तता केली, ‘‘पाहा, मी आपला दूत तुझ्या पुढे पाठवित आहे, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.’’
काही यहूद्यांनी योहानाला तु मशीहा आहे की काय असे विचारले. योहान म्हणला,‘‘मी मशीहा नाही, परंतू माझ्या मागून एकजण येत आहे. तो एवढा महान आहे की, त्याच्या वहाणांचा बंद सोडण्याची देखील माझी पात्रता नाही.’’
दूस-या दिवशी येशू योहानाकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आला. योहानाने त्यास पाहून म्हटले,‘‘पाहा! जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा.’’
योहान येशूला म्हणाला, ‘‘मी तुला बाप्तिस्मा देण्यास पात्र नाही. त्याऐवजी मला तुझ्याकडून बाप्तिस्मा घेण्याची आवश्यकता आहे. परंतू येशू त्यास म्हणाला,‘‘तु मला बाप्तिस्मा दे, कारण देवाच्या दृष्टिने हे करणे योग्य आहे.’’ तेंव्हा योहानाने त्याला बाप्तिस्मा दिला, जरी येशूने काहीच पाप केले नव्हते.
जेव्हा येशू बाप्तिस्म्यानंतर पाण्यातून वर आला, तेंव्हा देवाचा आत्मा कबूतराच्या रुपामध्ये येऊन त्याच्यावर थांबला. त्याचवेळी आकाशवाणी झाली,‘‘तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुज विषयी मी फार संतुष्ट आहे.’’
देवाने योहानास सांगितले होते, ‘‘तू बाप्तिस्मा दिलेल्या ज्या व्यक्तिवर पवित्र आत्मा उतरुन येईल. तीच व्यक्ति देवाचा पुत्र. असेल’’ एकच देव आहे. परंतु जेव्हा योहानाने येशूला बाप्तिस्मा दिला, तेंव्हा त्याने देवपिता बोलत असलेला पाहिला, देवपुत्र येशू पाहिला, आणि पवित्र आत्मा पाहिला.
बायबल कथा: मत्तय //3; मार्क 1:9 - 11; लूक 3: 1 - 23//
25. येशूची सैतानाकडून परिक्षा
बाप्तिस्म्यानंतर लगेच पवित्र आत्म्याने येशूला अरण्यात नेले , त्या ठिकाणी येशू चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास करतो. तेव्हा सैतानाने तेथे येऊन येशूची परीक्षा पाहिली.
सैतानाने येशूला मोहात पाडले,‘‘जर तू खरोखर देवाचा पुत्र आहेस, तर हया दगडांस भाकरी होण्याची आज्ञा कर म्हणजे तूला जेवण मिळेल!’’
येशूने उत्तर दिले,‘‘देवाच्या वचनामध्ये असे लिहिले आहे,‘लोकांना जगण्यासाठी केवळ भाकरी नको, तर देवाच्या मुखातून निघणा-या प्रत्येक वचनाची गरज आहे!’’
मग सैतानाने येशूला घेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले,‘‘तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असे लिहीले आहे की, ‘देव आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील, आणि तुझा पाय धोंडयावर आपटू नये म्हणून ते तूला हातांवर झेलून धरतील.’’
परन्तु येशूने सैतानाला धर्मशास्त्रातूनच उत्तर दिले. तो म्हणला,‘‘देव आपल्या वचनातून आपल्या लोकांना आज्ञा देतो,‘तू आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस.’’
मग सैतानाने येशूला जगातील सर्व राज्ये व वैभव दाखविले व म्हणाला,‘‘जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे तुला देईन.’’
येयेशूने म्हटले,‘‘अरे सैताना, चालता हो! देव आपल्या वचनामध्ये लोकांस आज्ञा करितो, परमेश्वर तुझा देव हयाला नमन कर व केवळ त्याचीच उपसना कर!’’
अशा प्रकारे येशू सैतानाच्या मोहाला बळी पडला नाही, म्हणून सैतान त्याला सोडून तेथून निघून गेला. मग देवदूतांनी येऊन येशूची सेवा केली.
बायबल कथा: मत्तय 4:1-11; मार्क 1:12-13; लूक 4:1-13
26. येशू आपल्या सेवेचा आरंभ करतो
सैतानाच्या परीक्षेवर विजय मिळविल्यावर येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परिपूर्ण होऊन आपण राहत असलेल्या गालील या ठिकाणी परत आला. येशू वचनाचे शिक्षण देत अनेक ठिकाणी जात असे. प्रत्येक जण त्याच्याविषयी चांगलेच बोलत असे.
येशू त्याच्या बालपणी राहात असलेल्या नासरेथ या ठिकाणी गेला. शब्बाथ दिवशी, तो उपासना करीत त्या ठिकाणी गेला. त्यांनी त्यास यशया संदेष्टयाच्या ग्रंथाची गुंडाळी वाचण्यासाठी दिली. येशूने ती गुंडाळी उघडून त्यातील कांही भाग लोकांसमोर वाचला.
येशूने वाचले,‘‘परमेश्वराने त्याचा आत्मा मला दिला आहे, ते अशासाठी की गरीबांस सुवार्ता सांगावी, धरुन नेलेल्यांची सुटका व अंधळयांस पुन्हा दृष्टिचा लाभ व्हावा व ठेचले जात आहेत त्यांस सोडवुन पाठवावे हयाची घोषणा करावी. परेमश्वराच्या कृपा प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी’’
त्यानंतर येशू खाली बसला. प्रत्येकाने त्याला निरखून पाहिले. त्यांना ठाऊक होते की येशूने वाचलेला शास्त्रातील हा उतारा ख्रिस्ताविषयी होता. येशू म्हणला,‘‘ हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.’’ तेंव्हा सर्व आश्चर्य करु लागले. ‘‘हा योसेफाचा पुत्र ना?’’ ते म्हणू लागले.
मग येशू म्हणाला,‘‘ कोणताही संदेष्टा आपल्या गावात मान्य होत नाही हे खरे आहे. एलीया संदेष्टयाच्या काळामध्ये इस्राएलामध्ये अनेक विधवा होत्या. परंतू जेंव्हा साडेतीन वर्षे दुष्काळ पडता तेंव्हा देवाने इस्राएलांतील विधवांना मदत करण्यासाठी एलीयास पाठविले नाही, तर परराष्ट्रीय विधवेस मदत करण्यासाठी पाठविले.’’
येशू पुढे म्हणला, ‘‘आणि अलीशा संदेष्टयाच्या काळामध्ये इस्राएलात अनेक कुष्ठरोगी होते. परंतू अलीशाने त्यांपैकी कोणालाही बरे केले नाही. त्याने फक्त नामानाचा कुष्ठरोग बरा केला, तो इस्राएलाच्या शत्रूंचा सेनापती होता.’’ येशूचे भाषण ऐकत असलेले लोक यहूदी होते. म्हणुन जेंव्हा त्यांनी हे ऐकले, त्यांना त्याचा खूप राग आला.
नासरेथातील लोकांनी येशूला पकडून ओढत डोंगराच्या कडयावरुन फेकून त्यास जीवे मारावे म्हणून नेले. परंतु येशूने गर्दीतून वाट काढत, नासरेथ नगर सोडले.
मग येशू गालिलातील प्रांतामधून प्रवास करत गेला व पुष्कळसे लोक त्याकडे आले. त्यांनी त्याच्याकडे अनेक आजारी, अपंग, आंधळे ,पांगळे, बहिरे, व मुके लोक घेऊन आले आणि येशून त्यांना बरे केले.
भुते लागलेले असे अनेक लोक येशूकडे आणिले गेले. येशूच्या आज्ञेने, ती भूते त्या मनुष्यांतून बाहेर निघाली व पुष्कळदा ओरडून म्हणत ‘‘तू देवाचा पुत्र आहेस!’’ मोठया जनसमुदायाने आश्चर्यचकीत होऊन देवाची उपासना केली.
तेंव्हा येशूने बारा शिष्यांची निवड केली, त्यांना येशूचे प्रेषित म्हणत. ते प्रेषित येशूबरोबर प्रवास करत आणि त्याच्यापासून शिकत असत.
बायबल कथा:मत्तय 4 : 12 - 25; मार्क 1 : 14 - 15; 35 - 39; 3 : 13-21; लूक 4 : 14 - 30; 38 - 44
27. चांगल्या शोमरोण्याची गोष्ट
एके दिवशी, यहूदी धर्मशास्त्रात पारंगत असलेला एक व्यक्ति येशूची परिक्षा पाहण्यासाठी येऊन म्हणाला,‘‘गुरुजी सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी मी काय करावे?’’ येशूने उत्तर दिले,‘‘देवाचा नियमशास्त्रामध्ये काय लिहिले आहे?’’
त्याने म्हटले,‘‘तू आपला देव याजवर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने व संपूर्ण शक्तिने प्रीती कर. आणि जशी आपणावर तशी शेजा-यावर प्रीति कर’’ येशूने म्हटले,‘‘अगदी बरोबर उत्तर दिलेस! हे कर म्हणजे तू सर्वकाळ जगशील.’’
परंतु धर्मशास्त्राचा पंडित स्वत:ला धार्मीक ठरवू पाहात होता म्हणून त्याने विचारले,‘‘माझा शेजारी कोण आहे?’’
येशूने एक गोष्ट सांगून त्या धर्मशास्त्र पंडितास उत्तर दिले. ‘‘एक यहुदी मनुष्य यरुशलेमेहून यरीहो नगरास रस्त्याने जात होता.’’
‘‘‘तो मनुष्य रस्त्याने जात असतांना, लुटारुंनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी त्याकडे असलेली सर्व मालमत्ता घेऊन त्यास मारहाण करुन अर्धमेल्या अवस्थेत सोडून गेले. मग ते तेथून निघून गेले.
‘‘ त्यानंतर लगेच, एक यहूदी याजक त्याच रस्त्याने खाली चालत आला. जेंव्हा हया धार्मिक पुढा-याने पाहिले की हा मनुष्याला लुटारुंनी लुटले आहे, अर्धमेल्या अवस्थेत आहे, तो रस्त्याच्या दुस-या बाजुने गेला, त्याने मदतीची गरज असलेल्याकडे दुर्लक्ष केले व पुढे निघून गेला.
‘‘त्यानंतर थोड्या वेळातच, एक लेवी त्याच रस्त्याने आला. (लेवी हे यहूदी लोकांतील एक गोत्र होते जे मंदिराच्या सेवेमध्ये याजकांची मदत करत असत.) लेवीनेही त्या मनुष्याकडे, ज्याला लुटारुंनी लुटले होते मारले होते, दुर्लक्ष केले व दुस-या वाटेने निघून गेला.”
‘‘त्या मागून येणारा तिसरा व्यक्ति एक शोमरोनी होता. (शोमरोनी हे यहूदी वंशातील परराष्ट्रीयांशी विवाह केलेले लोक होते.) (शोमरोनी व यहूदी एकमेकांचा द्वेष करत असत.) परंतु हया शोमरान्याने त्या यहूदी मनुष्यास पाहिले, तेंव्हा त्याला त्याचा कळवळा आला. मग त्याने त्याची काळजी घेतली व त्याच्या जखमांवर पट्टी बांधली”.
‘‘मग त्या शोमरोन्याने त्या मनुष्याला उचलून आपल्या गाढवावर बसविले व त्याने त्याला मार्गावर असलेल्या एका उतार शाळेमध्ये आणिले व त्याची काळजी घेतली.”
‘‘दुस-या दिवशी, शोमरोन्याला पुढे प्रवासास जायचे होते. म्हणून त्याने उतारशाळेच्या व्यवस्थापकास काही पैसे देऊन म्हटले,‘‘याची काळजी घ्या, आणि यापेक्षा जे कांही अधिक पैसे खर्चाल तो खर्च मी परत आल्यावर तुम्हाला देईन.’’
तेंव्हा येशूने त्या धर्मशास्त्राच्या पंडितास विचारले,‘‘तूला काय वाटते? त्या तिघांपैकी लुटलेल्या मारलेल्या अवस्थेत असलेल्या मनुष्याचा शेजारी कोण होता?’’ तो उत्तरला, ‘‘ज्याने त्याजवर दया दाखविली’’ येशूने त्यास म्हटले,‘‘तूही जाऊन तसेच कर.’’
बायबल कथा :लूक 10 : 25 - 37
28. एक श्रीमंत तरुण अधिकारी
एके दिवशी, एक श्रीमंत तरुण अधिकारी येशूकडे येऊन विचारु लागला,‘‘उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करावे?’’ येशून त्यास म्हटले,‘‘तू मला ‘उत्तम’ असे का म्हणतोस? एका देवा शिवाय कुणीच उत्तम नाही. परंतु तुला सार्वकालिक जीवन हवे आहे, तर देवाच्या आज्ञा पाळ.’’
‘‘कोणत्या आज्ञा मी पाळावयाची आवश्यकता आहे?’’ त्याने विचारले. येशूने उत्तर दिले,‘‘खून करु नकोस. व्यभिचार करु नकोस. चोरी करु नकोस. खोटे बोलू नकोस. आपल्या आईबापाचा मान राख, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजा-यावर प्रीति कर.’’
परंतु त्या तरुणाने म्हटले,‘‘हया सर्व आज्ञा मी लहानपणापासूनच पाळत आलो आहे. सर्वकाळ जगण्यासाठी मला आणखी काय करण्याची गरज आहे?’’ येशूने त्याच्याकडे पाहिले व त्याच्यावर प्रीती केली.
येशूने उत्तर दिले,‘‘जर तू पूर्ण होऊ पाहतोस, तर जा आणि तूझी सर्व मालमत्ता विकून आलेला पैसा गोरगरीबांस दे, म्हणजे तुला स्वर्गामध्ये संपत्ती मिळेल. मग ये आणि माझ्यामागे चालू लाग.’’
येशूचे हे बोलणे ऐकून तो तरुण खूप निराश झाला, कारण तो खूप श्रीमंत होता व आपल्या जवळची मालमत्ता दुस-यास देऊ इच्छीत नव्हता. तो येशूपासून निघून गेला.
मग येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, “श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात जाणे फार कठिण आहे! होय, श्रीमंताचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा ऊंटाला सुईच्या नेढयातून जाणे सोपे आहे.’’
जेंव्हा शिष्यांनी हे ऐकले तेंव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला व ते म्हणाले, ‘‘तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?’’
येशूने शिष्यांकडे पाहून म्हटले, ‘‘मनुष्यांस हे अशक्य आहे, परंतु देवाला सर्व काही शक्य आहे.’’
पेत्र येशूला म्हणाला, ‘‘आम्ही सर्व सोडून तुझ्या पाठीमागे आलो आहोत. याचे आम्हास काय प्रतिफळ मिळणार?’’
येशूने उत्तर दिले,‘‘ज्यांनी माझ्यासाठी घरे, भाऊ, बहिणी, माता, पिता, लेकरे किंवा मालमत्ता सोडली आहे, त्यांना ती 100 पटीने जास्त मिळणार व त्याजबरोबर सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल.’’ परंतु पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले असे पुष्कळांचे होईल’’
बायबल कथा:मत्तय 19:16 - 30; मार्क 10: 17 - 31; लूक 18:18 - 30
29. कृतघ्न चाकराची गोष्ट
एके दिवशी,पेत्राने येशूला विचारले,‘‘प्रभुजी, जेंव्हा माझा भाऊ माझ्याविरुद्ध अपराध करील तेव्हा मी त्यास किती वेळा क्षमा करावी?’’ सात वेळा काय?’’ येशूने म्हटले,‘‘सात वेळा नव्हे, तर साताच्या सत्तर वेळा!’’ यावरुन, येशूला असे म्हणावयाचे होते की, आपण नेहमी क्षमा करावी. तेंव्हा येशूने ही गोष्ट सांगितली.
येशू म्हणाला,‘‘देवाचे राज्य एका राजासारखे आहे. त्याला आपल्या चाकरांकडून हिशेब घ्यावा असे वाटले. त्याच्या एका चाकराकडे 200,000 वर्षांच्या वेतनाइतके इतके फार मोठे कर्ज होते.
‘‘हा चाकर कर्ज फेडू शकत नसल्यामुळे राजाने म्हटले की, हया मनुष्यास व त्याच्या कुटुंबास गुलाम म्हणून विकून त्याच्या कर्जाची फेड करुन घ्यावी.’’
‘‘तो चाकर राजासमोर आपले गुडघे टेकून म्हणाला, कृपया माझ्यावर दया करा व मला कही वेळ द्या, म्हणजे मी तुमचे सर्व कर्ज फेडीन’’ राजाला त्या चाकराची दया आली व त्याने त्याला त्याचे सर्व कर्ज माफ केले व त्याला जाऊ दिले.’’
‘‘ परंतु हा चाकर बाहेर गेला असताना त्याला त्याच्या सोबतीचा एक चाकर भेटला ज्याच्याकडून त्याचे सुमारे चार महिन्यांच्या वेतनाइतके कर्ज येणे होते. त्या चाकराने आपल्या सोबतीच्या चाकराला पकडले आणि म्हणाला,‘आताच्या आता माझे घेतलेले पैसे मला दे!’’
‘‘त्याचा सोबतीचा चाकर गुडघे म्हणाला, ‘‘मला थोडा समय द्या व माझ्यावर कृपा करा, म्हणजे मी तुझे सर्व कर्ज फेडीन’’ परंतु त्याऐवजी, त्याने आपल्या सोबतीच्या चाकराला सर्व कर्जाची फेड होईपर्यंत तुरुंगात टाकले.
‘‘दुस-या चाकरांनी हे पाहिले व त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी राजाकडे जाऊन सर्वकांही सांगितले.’’
राजाने त्या चाकरास बोलावून घेतले व म्हटले,‘अरे दुष्ट चाकरा!’’ तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व कर्ज तुला सोडिले होते. तशी तूही आपल्या सोबतीच्या चाकरावर दया करावयास पाहिजे होती. राजाला त्याचा खूप राग आला व त्याने त्याचे सर्व देणे फेडीपर्यंत त्याला तुरुंगात टाकले.’’
तेंव्हा येशू म्हणाला, ‘‘जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या भावाला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील.’’
बायबल कथा :मत्तय 18 : 21 - 35
30. येशू पाच हजारांना भोजन देतो
येशूने आपल्या प्रेषितांना अनेक गावांतुन लोकांना सुवार्ता सांगण्यास व शिक्षण देण्यासाठी पाठविले. जेंव्हा ते येशूकडे पुन्हा आले, तेंव्हा त्यांनी आपण केलेली सर्व कार्ये येशूला सांगितली. तेंव्हा येशूने त्यांना तळ्याच्या पलिकडे शांत ठिकाणी काही वेळ विश्रांती घेण्यासाठी त्याच्याबरोबर बोलाविले. म्हणून ते तारवामध्ये बसले व तळयाच्या पलिकडे पोहोचले.
परंतु त्या ठिकाणी पुष्कळ लोक होते त्यांनी येशू व शिष्यांना तारवात बसुन जातांना पाहीले. हा जनसमुदाय त्यांच्या अगोदर तळयाच्या पलिकडे पोहचण्यासाठी तळ्याच्या काठाने धावला. म्हणुन येशू व शिष्य त्या ठिकाणी पोहोचले,तेंव्हा एक मोठा जनसमुदाय त्यांची प्रतिक्षा करत तेथे थांबला होता.
त्या जनसमुदायामध्ये सुमारे 5000 पुरुष होते, तरी स्त्रिया व मुले मोजली नव्हती. येशूला त्यांचा कळवळा आला. येशूला, हा समुदाय मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखा दिसून आला. तेंव्हा तो त्यांना शिकवू लागला व त्यामध्ये असणा-या आजा-यांना बरे केले.
दुपारी उशीराने, शिष्यांनी येशूकडे जाऊन सांगितले, ‘‘खूप उशीर झाला आहे आणि येथे जवळपास गाव नाही. तेंव्हा आपण लोकांना पाठवून द्या म्हणजे ते आपणांसाठी कांही खायला घेतील.’’
परंतू येशूने शिष्यांस म्हटले, ‘‘तूम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या!’’ ते उत्तरले, ‘‘आम्ही कसे काय एवढया मोठया समुदायास जेवण देऊ शकतो?’’ आम्हाकडे केवळ पाच भाकरी व दोन मासळी आहेत.’’
येशूने शिष्यांस सांगितले की, त्यांनी लोकांस हिरवळीवर पन्नास पन्नासाच्या पंक्ति करुन बसायला सांगावे.
मग येशूने त्या पाच भाकरी व दोन मासळी घेऊन वरती आकाशाकडे पहिले व त्या अन्नाबद्दल देवाचा धन्यवाद केला.
मग येशूने त्या भाकरी व मासळीचे तुकडे केले. मग त्याने शिष्यांस लोकांना वाढण्यासाठी दिले. शिष्य लोकांना वाढतच राहीले तरी ते अन्न संपले नाही. सर्व लोक जेवून तृप्त झाले.
त्यानंतर, शिष्यांनी उरलेल्या भाकरी व मासळीचे तुकडे गोळा केले व ते बारा टोपल्या भरली! हे सर्व भोजन केवळ पाच भाकरी व दोन मासळयांतूनच पुरविले गेले.
A Bible story from: _ मत्तय 14:13-21; _ मार्क_ 6:31-44; _ लूक_ 9:10-17; John 6:5-15_
31. येशू पाण्यावर चालतो
तेंव्हा लोकांना घरी पाठवून देत असतांना येशूने शिष्यांना मचव्यामध्ये बसून समुद्राच्या पलीकडे जाण्यास सांगितले. सर्व लोक निघून गेल्यानंतर येशू डोंगरावर प्रार्थनेसाठी गेला. येशू तेथे एकटाच होता, आणि रात्री खुप उशिरापर्यंत तो प्रार्थना करीत राहीला.
तोपर्यंत, शिष्य मचवा वल्हवत राहीले,पण बरीच रात्र झाली तरी ते समुद्राच्या मध्यभागापर्यंतच पोहोचले होते. फार कष्टाने ते मचवा वल्हवीत होते कारण जोराचा वारा त्यांच्या विरुद्ध वाहात होता.
तेंव्हा येशू प्रार्थना संपवून शिष्यांकडे आला. तो समुद्रावरुन पाण्यावर चालत त्यांच्या मचव्याकडे येत होता!
येशूला पाहून शिष्य खूप घाबरले, कारण त्यांना वाटले की ते कोणा भुताला पाहात आहेत. येशूला ठाऊक होते की, ते घाबरले आहेत म्हणून तो त्यांना म्हणाला, ‘‘भिऊ नका. मीच आहे!’’
तेंव्हा पेत्र येशूला म्हणला, ‘‘प्रभुजी, जर आपण आहात, तर मला पाण्यावर चालण्याची आज्ञा द्या.’’ येशूने पेत्रास म्हटले, ‘‘ये!’’
म्हणून पेत्र मचव्यातून उतरुन येशूकडे पाण्यावर चालू लागला. परंतू थोडे अंतर चालल्यानंतर, त्याने आपली दृष्टि येशूवरुन काढली आणि तो लाटांकडे व वा-याकडे पाहू लागला.
तेंव्हा पेत्राला भिती वाटली व तो पाण्यामध्ये बुडू लागला. तो मोठयाने ओरडला, ‘‘प्रभुजी, मला वाचवा!’’ येशू लगेच त्याच्यापर्यंत पोहोंचला व त्याला धरले. मग तो पेत्रास म्हणाला, ‘‘अरे अल्पविश्वासी माणसा, तू संशय का धरलास?’’
जेंव्हा पेत्र आणि येशू दोघे मचव्यामध्ये(तारवामध्ये) चढले, तेंव्हा लगेच वारा थांबला आणि पाणी शांत झाले. हे पाहून शिष्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी येशूला नमन केले व म्हणाले, ‘‘तू खरोखर, देवाचा पूत्र आहेस.’’
बायबल कथा: मत्तय //14 : 22 - 33; मार्क 6 : 45 - 52; योहान __6 : 16 - 21//
32. येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो
एके दिवशी, येशू आणि त्याचे शिष्य मचव्यामध्ये बसून समुद्राच्या पलिकडे गरसेकर राहात असलेल्या प्रदेशात गेले.
सरोवराच्या (छोटा समुद्र किंवा समुद्र म्हटले तरी चालेल) पलिकडे जाताच एक भूतग्रस्त मनुष्य येशूकडे धावत आला.
हा मनुष्य एवढा शक्तिशाली होता की कोणीही मनुष्य त्याला नियंत्रीत करु शकत नव्हता. लोकांनी त्याचे दंड व पाय साखळदंडांनी व बेडयांनी बांधले, परंतू त्या तो तोडत असे.
तो मनुष्य कबरींमध्ये रहात असे. तो रात्रंदिवस मोठयाने ओरडत असे. तो अंगावर कपडे घालत नसे व आपले अंग दगडांनी वारंवार ठेचून घेत असे.
जेंव्हा तो मनुष्य येशूकडे आला, तेंव्हा येशूसमोर येऊन त्याने गुडघे टेकले. येशू त्या दुष्टात्म्यास म्हणाला, ‘‘हया मनुष्यातून बाहेर निघ!’’
तग्रस्त मनुष्य मोठयाने ओरडला, ‘‘परात्पर देवाच्या पुत्रा येशू , तू मध्ये का पडतोस?’’ कृपया मला छळू नकोस !’’ तेंव्हा येशूने दुष्टात्म्यास (अशुद्ध आत्म्यास, भुतास) विचारले, ‘‘तूझे नाव काय आहे?’’ तो उत्तरला,‘‘माझे नाव सैन्य आहे, कारण आम्ही पुष्कळ आहोत.’’ (‘‘लीजन’’ हा शब्द रोमी सेनेतील हजारो सैनिकांच्या गटासाठी होता)
तेते दुष्टात्मे येशूला विनवणी करु लागले, ‘‘कृपया आम्हाला या प्रांतातून घालवून देऊ नका!’’ शेजारच्या टेकडीवर डुकरांचा एक कळप चरत होता. म्हणून, दुष्टात्म्यांनी विनंती केली, “कृपया त्याऐवजी आम्हास डुकरांमध्ये पाठवा!’’ येशू म्हणाला, ‘‘जा!’’
तेंव्हा दुष्टात्मे त्या माणसामधून निघून डुकरामध्ये घुसले. तेंव्हा ती डुकरे कड्यावरुन खाली पळत गेली व समुद्रामध्ये बुडाली. त्या कळपामध्ये सुमारे 2000 डुकरे होती.
हे पाहून डुकरे राखणारे धावत नगरामध्ये गेले व त्यांनी झालेला हा प्रकार व येशूने काय केले हे प्रत्येकाला सांगितले. तेंव्हा नगरातील लोकांनी येऊन त्या भूतग्रस्त मनुष्यास पाहिले. तो शांत बसलेला, अंगावर कपडे घातलेला, व एक सर्वसामान्य वागणा-या माणसा सारखा असा त्यांनी त्याला पाहिला.
हे पाहून लोक फार घाबरले व त्यांनी येशूला त्यांचा प्रांत सोडून जाण्यास सांगितले. तेंव्हा येशू मचव्यात बसून जाण्यासाठी तयार झाला. पूर्वी भूतग्रस्त असलेला मनुष्य येशूच्या बरोबर जाण्यासाठी विनंती करु लागला.
परंतू येशू त्यास म्हणाला, ‘‘नाही, तू आपल्या घरी जा व आपल्या मित्रांस व कुटुंबियांस सर्व सांग की देवाने तुझ्यासाठी काय केले व तुझ्यावर कशी दया दाखविली आहे.’’
तेंव्हा तो मनुष्य निघाला व देवाने त्याच्या साठी काय केले आहे याची साक्ष प्रत्येकाला त्याने दिली. हे ऐकणारा प्रत्येकजण आश्चर्याने थक्क झाला.
येशू सरोवराच्या पलिकडे परत गेला. तो तेथे पोहोचल्यानंतर, लोकांचा मोठा समुदाय त्याच्याभोवती जमला व ते त्याच्यावर पडू लागले. त्या समुदायामध्ये बारा वर्षापासून रक्तस्रावाची पीडा होत असलेली एक स्त्री होती. तिने आपला सर्व पैसा वैद्यांवर खर्च केला पण तरीही ती बरी झाली नाही, तर तिची परिस्थिती आणखी वाईट झाली.
तिने ऐकले होते की येशूने अनेक रोग्यांना बरे केले आहे आणि ती म्हणाली, ‘‘मला खात्री आहे की, जर मी केवळ येशूच्या वस्त्राला स्पर्श केला, तरीही बरी होईन!’’ म्हणून तीने येशूच्या मागे जाऊन त्याच्या वस्त्रास स्पर्श केला. तिने वस्त्राला स्पर्श करताच तीचा रक्तस्राव थांबला!
येताबडतोब, येशूला कळले की त्याच्या शरीरामधून सामर्थ्य गेले आहे. म्हणून त्याने मागे वळून पाहिले व म्हटले,‘‘मला कोणी स्पर्श केला?’’ शिष्यांनी उत्तर दिले, ‘‘लोकांची एवढी गर्दी तुमच्याभोवती आहे व ते तुम्हाला चेंगरत आहेत. तर तूम्ही असे का विचारले, ‘‘मला कोणी स्पर्श केला?’’
त्या स्त्रीने भितीने कापत कापत येशूपुढे जाऊन गुढगे टेकले. मग तिने काय केले व ती कशी बरी झाली ते त्याला सांगितले. येशूने तिला म्हटले, ‘‘तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा.’’
बायबल कथा: मत्तय //8: 28 - 34; 9 : 20 - 22; मार्क 5 : 1 - 20; 5 : 24b - 34; लूक 8 : 26 - 39; 8 : 42b - 48//
33. पेरणी करणा-याची गोष्ट
एके दिवशी समुद्रकिना-याजवळ येशू एका मोठया जनसमुदायास शिकवण देत होता. पुष्कळ लोक त्याचे ऐकण्यास एकत्र जमले तेंव्हा येशू एका मचव्यात बसला व तो मचवा पाण्यामध्ये थोडा आत ढकलला, अशासाठी की त्याला त्यांच्याशी बोलण्यास पुरेशी जागा मिळावी. तो मचव्यात बसून लोकांना शिकवू लागला.
येशूने त्यांना ही गोष्ट सांगितली. ‘‘एक शेतकरी पेरणी करावयास निघाला. तो हाताने पेरणी करत असतांना, काही बी वाटेवर पडले, आणि आकाशातील पक्षांनी येऊन ते सर्व खाऊन टाकले.
‘‘काही बी खडकाळीवर पडले, त्या ठिकाणी खूपच कमी माती होती. खडकाळीवरील बी लगेच उगवले, पंरतु (माती खोल नसल्यामुळे) त्याची मुळे खोलवर जाऊ शकली नाहीत. जेंव्हा सूर्य वर आला तेंव्हा, ते करपले.’’
‘‘आणखी काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले. ते बी वाढू लागले, परंतू काटयांनी त्याची वाढ खुंटविली. म्हणून काटेरी झुडपांमध्ये पडलेल्या बीजाची वाढ होऊ शकली नाही व त्यास फळ आले नाही.’’
‘‘कांही बी चांगल्या जमिनीत पडले. ते बी उगवले व वाढले त्याला पीक आले 30, 60, तर कुठे 100 पट फळ मिळाले. ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको!’’
हया दाखल्याचा अर्थ शिष्यांना समजला नाही. म्हणून येशूने स्पष्टिकरण केले, ‘‘बी हे देवाचे वचन आहे. वाटेवरची जमीन म्हणजे असा व्यक्ती की जो देवाचे वचन ऐकतो पण समजून घेत नाही आणि सैतान येऊन ते मनातून काढून टाकतो.’’
‘‘खडकाळ जमीन म्हणजे अशी व्यक्ती जो देवाचे वचन ऐकूतो आणि आनंदाने स्वीकारतो. परंतू कष्ट व छळ आल्यानंतर लगेच अडखळतात.’’
‘‘काटेरी जमीन म्हणजे जो देवाचे वचन ऐकतो, परंतू कालांतराने संसाराची चिंता, श्रीमंती आणि जगिक सुख यामुळे त्याचे देवावरील प्रेम कमी होत जाते. याचा परिणाम म्हणुन, त्याने ऐकलेले वचन निष्फळ ठरते.’’
‘‘परंतू सुपिक जमिन म्हणजे जो व्यक्ती देवाचे वचन ऐकून त्याजवर विश्वास ठेवतो, आणि फळ देतो.’’
बायबल कथा: मत्तय //13 :1 -8; 18-23; मार्क 4 : 1 - 8 ; 13 - 20; लूक 8 : 4 - 15//
34. येशू अनेक गोष्टी शिकवितो
येशूने देवाच्या राज्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. हरणार्थ, तो म्हणाला, ‘‘देवाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे जे कोणीएकाने आपल्या शेतात पेरले. तुम्हास ठाऊक आहे की मोहरीचा दाणा हा सर्व बीजांमध्ये अगदी लहान आहे.’’
परंतू जेंव्हा हा मोहरीचा दाणा उगवुन वाढतो तेंव्हा बागेतील इतर झुडपांपेक्षा ते सर्वत मोठे होऊन इतके वाढते की, आकाशातील पाखरेही येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करतात.’’
येशूने आणखी एक गोष्ट सांगितली, ‘‘देवाचे राज्य खमिरासारखे आहे जे एका स्त्रीने पिठामध्ये घातले व संपूर्ण पीठ फुगून गेले.’’
‘‘देवाचे राज्य शेतामध्ये कुणीतरी लपवून ठेवलेल्या गुप्त खजिन्यासारखे आहे. दुस-या मनुष्यास ते सापडले व त्याने ते पुन्हा पुरुन ठेवले. त्याला एवढा आनंद झाला की त्याने आपली सर्व संपत्ती विकून आलेल्या पैशांनी ते शेत विकत घेतले.
‘‘देवाचे राज्य एका मौल्यवान मोत्यासारखे सुद्धा आहे. जेंव्हा मोत्याच्या व्यापा-याच्या ते दृष्टिस पडले, तेंव्हा त्याने त्याची सर्व मालमत्ता विकून टाकली व आलेल्या पैशांनी ते मौलवान मोती विकत घेतले.’’
तेंव्हा येशूने कांही लोकांस एक गोष्ट सांगितली जे स्वत:च्या चांगल्या कामावर भरवंसा ठेवत व दूस-या लोकांना तुच्छ मानीत असत. तो म्हणाला, ‘‘दोन माणसे प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेले. त्यांपैकी एक जकातदार व दूसरा एक धार्मिक पुढारी होता.’’
धार्मिक पुढा-याने अशी प्रार्थना केली, ‘‘हे देवा, मी तुला धन्यवाद देतो की मी अन्य मनुष्यांसारखा पापी नाही. जे चोरी, अन्याय, व्यभिचार करतात त्यांच्याप्रमाणे मी नाही, व हया जकातदारासारखाही नाही.”
‘‘उदाहरणार्थ, मी आठवड्यातून दोनदा उपास करितो आणि आपल्या सर्व उत्पन्नाचा दशांश तुला देतो.’’
‘‘परन्तु तो जकातदार त्या धार्मिक पुढा-यापासून फार दूर उभा होता, आणि वर स्वर्गाकडेही पाहात नव्हता. त्याऐवजी, त्याने आपल्या हातांनी छाती बडवून घेतली आणि प्रार्थना केली, ‘‘देवा, मज पाप्यावर दया कर.’’
तेंव्हा येशू म्हणाला, ‘‘मी तुम्हाला खचित सांगतो, देवाने त्या जकातदाराची प्रार्थना ऐकून त्यास नितिमान ठरविले. परंतू त्याला धार्मिक पुढा-याची प्रार्थना आवडली नाही.देव प्रत्येक गर्विष्ठाला नीच करील, व जो स्वत:ला नम्र बनवितो त्याला देव उंचाविल.’’
बायबल कथा: मत्तय //13 : 31 - 33, 44 - 46; मार्क 4 : 30 - 32; लूक 13 : 18 - 21; 18 : 19 - 14//
35. दयाळू पित्याची गोष्ट
एके दिवशी, त्याचे ऐकण्यास जमलेल्या अनेक जकातदार व पापी लोकांस येशू शिकवीत होता.
काही धार्मिक पुढारीही त्या ठिकाणी होते व येशू पापी लोक व जकातदार यांना मित्राप्रमाणे वागवतो हे त्यांनी पाहिले आणि ते त्याच्यावर आपसात टीका करु लागले. तेंव्हा येशून त्यांना ही गोष्ट सांगितली.
‘‘एका मनुष्यास दोन पुत्र होते. धाकटया पुत्राने त्याकडे जाऊन म्हटले, ‘‘बापा, माझ्या वाट्याला येणारी मालमत्ता मला आत्ता द्या’’ यास्तव पित्याने आपल्या संपत्तीचे दोन वाटे दोन मुलांसाठी केले.
‘‘लवकरच धाकटा मुलगा सर्व मालमत्ता घेऊन दूरदेशी निघून गेला आणि तेथे वाईट मार्गानी ती संपवून टाकली.’’
‘‘त्यानंतर, तो राहात असलेल्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्यास अन्न खरेदी करण्यास त्याच्याजवळ पैसे उरले नाहीत. तेंव्हा त्याला केवळ एकच काम मिळाले ते होते शेतामध्ये डुकरे चारण्याचे काम.
तो एवढा दीनवाणा व भूकेलेला होता की डुकरे खात असलेल्या शेंगा खाऊ की काय असे त्याला वाटले. ‘‘शेवटी, तो धाकटा पुत्र स्वत:ला म्हणाला, ‘‘मी येथे काय करतोय?’’ झ्या पित्याच्या घरामध्ये नोकरचाकारांची खाण्याची चंगळ आहे, आणि मी येथे उपाशी मरतोय. मी आपल्या पित्याकडे परत जाईल आणि त्याचा एक चाकर म्हणून राहण्यास विनंती करील.’’
‘‘अशा प्रकारे तो धाकटा पुत्र आपल्या पित्याच्या घराकडे जाण्यास निघाला. तो दूर असतानाच, पित्याने त्यास पाहिले व त्याला त्याची दया आली. त्याने धावत जाऊन त्यास मिठी मारली व त्याचे मुके घेतले.’’
‘‘‘पुत्र म्हणाला, ‘‘हे बापा, मी देवाविरुध्द व आपणाविरुध्द पाप केले आहे. मी आपला पुत्र म्हणविण्यास लायक नाही.’’
‘‘‘परंतू त्याच्या पित्याने एका चाकरास बोलावून म्हटले, ‘लवकर जा आणि माझ्या पुत्रास उत्तम वस्त्रे आण आणि त्याच्या अंगावर घाला! त्याच्या हातामध्ये अंगठी व पायामध्ये जोडे घाला. मग एक पुष्ट वासरु मारुन एक मेजवानी तयार करा व आपण सगळे आनंद साजरा करु, कारण माझा हा मुलगा मेला होता, पण आता जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे!’’
‘‘अशाप्रकारे त्यांनी आनंदोत्सव सुरु केला. त्याअगोदर, थोरला मुलगा शेतामध्ये काम करुन घरी आला होता. संगीत व नृत्याचा आवाज ऐकून त्याला आश्चर्य वाटले.”
‘‘‘‘जेंव्हा थोरल्या पुत्रास कळले की त्याचा घाकटा भाऊ घरी आला आहे, तेंव्हा तो रागावला व आत जाईना. त्याचा पिता बाहेर येऊन त्यास आत येण्यासाठी व आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी विनंती करु लागला, परंतू त्याने आत जाण्यास नकार दिला.
”थोरला पुत्र आपल्या पित्यास म्हणाला, ‘एवढी वर्षे मी तुम्हासाठी विश्वासूपणे काम करत आहे! मी तुमच्या आज्ञेच्या पलिकडे काहीही केले नाही, तरिही तुम्ही माझ्या मित्रांसोबत आनंद करण्यासाठी एक लहानसे करडूही दिले नाही. परंतू तुमचा हा पुत्र आपली सारी मालमत्ता वाईट मार्गाने नष्ट करुन घरी परतल्यावर, आपण त्याच्यासाठी एक उत्तम वासरु कापले आहे!’’
“पित्याने उत्तर दिले, ‘माझ्या मुला, तू नेहमीच माझ्या सोबत आहेस, आणि माझे जे काही आहे, हे सर्व तुझेच आहे. परंतू आता आपण आनंद करणे योग्य आहे, कारण तुझा हा भाऊ मेला होता, पण आता जिवंत झाला आहे. तो हरवला होता, पण आता सापडला आहे!’’
बायबल कथा//: Luke 15:11-32//
36. येशूचे रुपांतर
एके दिवशी, येशूने आपल्या शिष्यांपैकी पेत्र, याकोब व योहान हया तिघांना आपल्या बरोबर घेतले. (य़ोहान नावाचा शिष्य व ज्याने येशूचा बाप्तिस्मा केला ते दोघे एकच व्यक्ती नाहीत.) ते प्रार्थना करण्यासाठी एक उंच डोंगरावर गेले. य़ेशू प्रार्थना करीत असतांना त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरीशुभ्र झाली, इतकी पांढरीशुभ्र की, पृथ्वीवरील कोणालाही तेवढी पांढरीशुभ्र काढता आली नसती.
तेंव्हा मोशे व एलीया संदेष्टा हे त्यांच्या दृष्टीस पडले. ही माणसे शेकडो वर्षांपूर्वी ह्या पृथ्वीवर होऊन गेली होती. ते येशूच्या मृत्युविषयी त्याच्याशी बोलत होते, जे यरुशलेममध्ये घडणार ङोते.
जेंव्हा मोशे व एलीया येशूबरोबर बोलत होते, पेत्र येशूला म्हणाला, “इथे असणे आम्हाला बरे आहे. येथे आपण तीन मंडप बनवू, एक आपणासाठी, एक मोशेसाठी, व एक एलीयासाठी.” पेत्र काय बोलत होता त्याचे त्याला समजत नव्हते.
पेत्र बोलत असतानाच, एका तेजस्वी मेघाने येऊन त्यांना वेढिले व मेघातून अशी वाणी झाली की, ‘‘हा माझा पुत्र आहे याच्यावर मी प्रीती करतो. मी याजविषयी संतुष्ट आहे. त्याचे तुम्ही ऐका’’ ते तिन्ही शिष्य खूप भयभित झाले व भूमिवर खाली पडले.
तेंव्हा येशूने त्यांना स्पर्श करुन म्हटले, ‘‘भिऊ नका. चला उठा.’’ जेंव्हा त्यांनी सभोवताली पाहिले, तेंव्हा तेथे फक्त येशू होता.
येशू आणि ते तीन शिष्य पुन्हा डोंगरावरुन खाली उतरले. तेंव्हा येशू त्यांना म्हणाला की, इथे जे घडले त्याविषयी कोणाला काही सांगू नका. मी लवकरच मरेल व पुन्हा जिवंत होईल. त्यानंतर तुम्ही याविषयी लोकांना सांगू शकता.’’
बायबल कथा: मत्तय //17:19; मार्क 9 : 2 - 8; लूक 9 : 28 - 36//
37. येशू लाजारास जिवंत करितो
एके दिवशी, लाजर खूप आजारी असल्याची बातमी येशूला कळली. लाजर व त्याच्या दोन बहिणी मरीया व मार्था हे येशूचे जवळचे मित्र होते. जेव्हा येशूने ही बातमी ऐकली तेंव्हा तो म्हणाला, ‘‘हा आजार मरणासाठी नाही, तर हा आजार देवाच्या गौरवासाठी आहे.’’ येशू आपल्या मित्रांवर प्रीती करत होता, परंतू तो होता त्या ठिकाणी आणखी दोन दिवस राहिला.
दोन दिवसानंतर, येशू आपल्या शिष्यांना म्हणाला,‘‘आपण पुन्हा यहूदीयामध्ये जाऊ’’. ‘‘परंतू गुरुजी ’’ शिष्यांनी उत्तर दिले, ‘‘थोडया वेळापूर्वीच तेथील लोक आपणास मारावयास टपले होते!’’ येशू म्हणाला, ‘‘आपला मित्र लाजर हा झोपला आहे, मी त्याला उठवणे अगत्याचे आहे.’’
येशूच्या शिष्यांनी उत्तर दिले, ‘‘प्रभुजी, जर लाजर झोपलेला आहे तर तो बरा होईल.’’ तेंव्हा येशूने त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘‘लाजर मेला आहे. आणि मी तेथे नव्हतो म्हणून मला आनंद वाटतो, यासाठी की तुम्ही मजवर विश्वास ठेवाल.’’
जेंव्हा येशू लाजर राहत असलेल्या गावी आला, तेंव्हा लाजर मरुन चार दिवस झाले होते. मार्था येशूला भेटण्यासाठी बाहेर गेली आणि म्हणाली, ‘‘प्रभुजी, जर आपण इथे असता, तर माझा भाऊ मेला नसता. परंतु माझा विश्वास आहे की आपण जे काही देवाजवळ मागाल, ते देव देईल.
येशू म्हणाला, ‘‘पुनरुत्थान व जीवन मीच आहे. माझ्यावर विश्वास ठेवणारा मेला असला तरी जगेल. आणि जो मजवर विश्वास ठेवितो तो कधीही मरणार नाही. याजवर तू विश्वास ठेवतेस काय?’’ मार्थाने उत्तर दिले, ‘‘होय,प्रभुजी! आपण देवाचे पुत्र मशीहा आहात असा मी विश्वास धरिते’’
तेंव्हा मरीया तेथे आली. ती येशूच्या पाया पडली आणि म्हणाली, ‘‘प्रभुजी, तुम्ही येथे असता, तर माझा भाऊ मेला नसता.’’ येशूने त्यांना विचारले, ‘‘तुम्ही लाजारला कोठे ठेविले आहे?’’ त्यांनी म्हटले ,‘‘कबरेमध्ये. या आणि पाहा.’’ तेंव्हा येशू रडला.
ती खडकामध्ये खोदलेली कबर होती व तिच्या दाराशी धोंडा ठेवण्यात आला होता. कबरेपाशी येऊन येशू त्यांना म्हणाला, ‘‘धोंडा बाजूला सारा.’’ परंतू मार्था म्हणाली, ‘‘त्याला मरुन चार दिवस झाले आहेत. आता त्याला दुर्गंधी येत असेल.’’
येशूने उत्तर दिले, ‘‘तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?’’ मग त्यांनी ती धोंड काढली.
तेव्हा येशूने वर स्वर्गाकडे पाहून म्हटले, ‘‘बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला ठाऊक आहे, की तू सर्वदा माझे ऐकतोस, परंतू जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्यांच्याकरिता मी बोललो, हयासाठी की तू मला पाठविले आहे असा विश्वास ते धरतील.’’ मग येशूने मोठयाने हाक मारली, ‘‘लाजरा, बाहेर ये!’’
तेंव्हा तो लाजर बाहेर आला! त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले होते. येशूने त्यांना सांगितले, ‘‘ प्रेतवस्त्रे काढुन टाकण्यासाठी त्याला मदत करा व त्याला मोकळे करा! हा चमत्कार पाहून अनेक यहूद्यांनी येशूवर विश्वास ठेविला.
परंतु यहूद्यांचे धार्मिक पुढारी येशूचा द्वेष करु लागले, व येशू आणि लाजर यांना जीवे मारण्यासाठी योजना आखू लागले.
बायबल कथा: योहान 11: 1 - 46
38. येशूला विश्वासघाताने धरुन देण्यात येते
दरवर्षी, यहूदी वल्हांडण सण साजरा करत. देवाने मिसर देशातील गुलामगिरीतून शेकडोवर्षापुर्वी त्यांच्या पुर्वजांची कशी सुटका केली, याचा आनंद साजरा करण्यासाठी यहूदी लोक हा सण पाळत. येशूच्या प्रचारकार्यास उघडपणे आरंभ झाल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी येशूने आपल्या शिष्यांस सांगितले की यरुशलेममध्ये त्यांजबरोबर वल्हांडण साजरा करावा अशी त्याची इच्छा आहे, आणि त्यानंतर तो तेथे मारला जाणार आहे असेही त्याने सांगितले.
येशूच्या शिष्यांपैकी यहूदा नावाचा एक शिष्य होता. यहूदा हा प्रेषितांच्या पैशाची थैली सांभाळणारा खजिनदार होता, पण तो पैशाचा लोभी असल्यामुळे अनेकदा त्यातून पैसे चोरत असे. येशू आणि शिष्य यरुशलेममध्ये आल्यानंतर, यहूदा धार्मिक पुढा-यांना जाऊन भेटतो व पैशांच्या मोबदल्यात येशूला पकडून देण्याविषयी सांगतो. त्याला ठाऊक होते की यहूदी पुढारी येशू हा मशीहा आहे हे नाकारत होते व त्यास मारण्याचा कट रचत होते.
तेंव्हा महायाजक व यहूदी पुढा-यांनी मिळून, येशूचा विश्वासघात करण्यासाठी यहूदाला चांदीची तीस नाणी दिले. संदेष्ट्यांनी सांगितलेली भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी हे सर्व काही झाले. यहूदा त्यांच्याशी सहमत झाला, व पैसे घेऊन गेला. तेंव्हापासून तो येशूला धरुन देण्याची वाट पाहू लागला.
यरुशलेमध्ये, येशूने आपल्या शिष्यांसह वल्हांडण सण साजरा केला. वल्हांडण भोजना दरम्यान येशूने भाकर घेऊन ती मोडिली. तो म्हणाला, ‘‘घ्या आणि खा.’’ हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी दिले जात आहे. माझ्या आठवणीसाठी हे करा.’’ त्याचप्रकारे, येशूने म्हटले की त्याचे शरीर त्यांच्यासाठी बलिदान म्हणून देण्यात येईल.
मग येशूने एक प्याला घेऊन म्हटले, ‘‘ ह्यातुन प्या. हा माझे नव्या कराराचे रक्त आहे. ते अनेकांच्या पापक्षमेसाठी ओतले जात आहे. जेंव्हा तुम्ही हे पिता, तेंव्हा हे माझ्या आठवणीसाठी हे करा.’’
मग येशू शिष्यांना म्हणाला, ‘‘तुम्हापैकी एक माझा विश्वासघात करील.’’ तेंव्हा त्यांना धक्का बसला आणि ते विचारु लागले की अशी गोष्ट कोण करील. येशू म्हणला, ‘‘ज्याला मी ही भाकर मोडून देईल, तोच माझा विश्वासघात करील.’’ मग त्याने यहूदास ती भाकर मोडून दिली.
यहूदाने भाकर घेतल्याबरोबर, सैतानाने त्याच्यामध्ये प्रवेश केला. यहूदा तेथून गेला आणि यहूदी पुढा-यांच्या मदतीसाठी येशूला पकडण्यासाठी गेला. तो रात्रीचा समय होता.
भोजनानंतर, येशू आपल्या शिष्यांसोबत जैतुनाच्या डोंगराकडे गेला. येशू म्हणाला, ‘‘आज रात्री तुम्ही सर्व मला सोडून जाल. असे लिहिले आहे की, मी मेंढपाळास मारीन व मेंढरांची दाणादाण करीन.’’
पेत्राने उत्तर दिले, ‘‘जरी सर्वांनी तुला सोडिले, तरी मी तुला सोडणार नाही!’’ तेंव्हा येशू पेत्रास म्हणाला, ‘‘सैतानाने तुम्हा सर्वांचा नाश करायचे ठरविले आहे, परंतू मी तुम्हासाठी प्रार्थना केली आहे, पेत्रा, अशासाठी की तुमचा विश्वास डळमळू नये. तरीदेखिल आज रात्री, कोबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.’’
तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, ‘‘मला मरावे जरी लागले, तरी मी तुला नाकारणार नाही!’’ बाकीच्या शिष्यांनीही तसेच म्हटले.
मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन गेथशेमाने म्हटलेल्या ठिकाणी गेला. शिष्यांनी परिक्षेत पडू नये म्हणून येशूने त्यांना प्रार्थना करावयास सांगितले. मग येशू स्वत: प्रार्थना करावयास गेला.
येशूने तीन वेळा प्रार्थना केली ,‘‘हे पित्या, जर शक्य असेल, तर हा दु:खसहनाचा प्याला माझ्यापासून दूर कर. परंतु लोकांच्या पापक्षमेसाठी दुसरा मार्गच नसेल, तर तुझी इच्छा पूर्ण होवो.’’ येशू खूप व्याकूळ झाला व त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा झाला. देवाने एक देवदूत पाठवून त्यास सामर्थ्य दिले.
प्रार्थना संपवून प्रत्येक वेळी येशू शिष्यांकडे आलेला असतांना शिष्य झोपलेल्या अवस्थेत त्याला आढळले. जेंव्हा तो तिस-यांदा परतला तेंव्हा येशू म्हणाला, ‘‘उठा!’’ माझा विश्वासघात करणारे आला आहे.’’
यहूदा धार्मिक पुढारी, सैनिक व एका मोठया लोकसमुदायाबरोबर आला. त्यांनी आपणाबरोबर तलवारी व सोटे आणले होते. यहूदा येशूजवळ येऊन म्हणाला, ‘‘सलाम, गुरुजी,’’ आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. कोणाला पकडावे हे यहूदी धर्मपुढा-यांना समजण्यासाठे हे एक चिन्ह होते. तेंव्हा येशू म्हणाला, ‘‘यहूदा, माझे चुंबन घेऊन माझा विश्वासघात करीत आहेस काय?’’
सैनिक येशूला पकडत असतांना, पेत्राने आपली तलवार काढली व महायाजकाच्या सेवकाचा कान कापला. येशू म्हणाला,‘‘तलवार बाजुला ठेव! मी पित्यास माझ्या बचावासाठी देवदूतांचे सैन्य मागू शकतो. परंतू मला पित्याची आज्ञा पाळणे आवश्यक आहे”. मग येशूने त्या मनुष्याचा कान बरा केला. येशूला अटक झाल्यानंतर, सर्व शिष्य पळून गेले.
बायबल कथा: मत्तय //26:14-56; मार्क 14 : 10-50; लूक 22 : 1-53; योहान __12:6; 18:1 - 11//
39. येशूची चौकशी
हा मध्यरात्रीचा समय होता. सैनिकांनी येशूची चौकशी करण्यासाठी त्याला महायाजकाच्या घरी घेऊन गेले. पेत्र लांबूनच त्यांच्या पाठीमागे येत होता. ते जेंव्हा येशूला आत घरामध्ये घेऊन गेले, तेंव्हा पेत्र बाहेर थंडी असल्यामुळे शेकत बसला होता.
आत घरामध्ये, यहूदी धर्मपुढारी येशूची चौकशी करीत होते. त्यांनी येशूविरुद्ध अनेक खोटे साक्षीदार आणले होते. तथापि, त्यांच्या जबानीमध्ये मेळ नव्हता म्हणुन यहूदी पुढा-यांना येशूचा गुन्हा सिद्ध करता आला नाही. या समयी येशू काहीच बोलला नाही.
शेवटी, महायाजकाने येशूकडे पाहून विचारले, ‘‘आम्हास सांग, की तू मशीहा, जिवंत देवाचा पुत्र आहेस?’’
येशू म्हणाला, ‘‘ मी आहे, आणि तुम्ही मला पित्याच्या बाजूस बसलेला व स्वर्गातून येत असतांना पाहाल.’’ तेंव्हा महायाजकाने रागाने आपली वस्त्रे फाडिली व अन्य धार्मीक पुढा-यांसमोर मोठयाने म्हणाला, ‘‘आता आम्हास आणखी पुराव्याची गरज नाही! तो देवाचा पुत्र आहे असे त्याने म्हटले हे तुम्ही स्वत: ऐकले आहे. तुमचा निवाडा काय आहे?’’
सर्व यहूदी पुढा-यांनी महायाजकास उत्तर दिले, ‘‘तो मरणदंडास पात्र आहे!’’ मग त्यांनी येशूच्या डोळयांवर पट्टी बांधली, त्याच्या तोंडावर थुंकले, त्यास मारिले व त्याची थट्टा उडविली.
पेत्र घराबाहेर वाट पहात होता, तेंव्हा घरकाम करणा-या एका मुलीने त्यास म्हटले, ‘‘तूही येशूबरोबर होतास!’’ पेत्राने नकार दिला. नंतर, दुस-या एका मुलीने असेच म्हटले, आणि पेत्राने पुन्हा एकदा नकार दिला. शेवटी, लोक म्हणाले, ‘‘आम्हास ठाऊक आहे की तू येशूबरोबर होतास कारण तुम्ही दोघेही गालील प्रदेशातील आहात.
तेंव्हा पेत्राने शपथ घेऊन म्हटले,‘जर मी हया मनुष्यास ओळखत असेल तर देव मला शापित करो!’’ लगेच कोबडा आरवला, आणि येशून मागे वळून पेत्राकडे पाहिले. लगेच, कोबडा आरवला, आणि येशूने मागे वळून पेत्राकडे पाहिले.
तेंतेंव्हा पेत्र दूर जाऊन खूप रडला. दरम्यान, येशूस धरुन देणा-या यहूदाने पाहिले की, यहूदी धर्मपुढा-यांनी येशूला मरणदंडाची शिक्षा दिली आहे. तेंव्हा यहूदास असे केल्याचा पस्तावा झाला व त्याने जाऊन आत्महत्या केली.
दुस-या दिवशी सकाळीच, यहूदी पुढा-यांनी येशूला रोमी सुभेदार पिलातासमोर आणले. त्यांना आशा होती की पिलात येशूस दोषी ठरवून मरणदंडाची शिक्षा देईल. पिलाताने येशूला विचारले, ‘‘तू यहू़द्यांचा राजा आहेस काय?’’
येशूने उत्तर दिले, ‘‘तू असे म्हणतोस परंतू माझे राज्य हया पृथ्वीचे नाही. असे असते तर, माझे सेवक माझ्यासाठी लढले असते. मी या पृथ्वीवर देवाविषयीचे सत्य सांगण्यास आलो आहे. सत्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण माझे ऐकतो’’ पिलाताने विचारले, ‘‘सत्य काय आहे?’’
येशूबरोबर बोलल्यानंतर पिलात बाहेर असलेल्या जमावास म्हणाला, ‘‘मला या मनुष्यामध्ये काहीच दोष आढळत नाही.’’ परन्तु यहूदी पुढारी व लोकसमुदाय मोठयाने ओरडले, ‘‘त्याला वधस्तंभावर खिळून टाका!’’ पिलात उत्तरला, ‘‘तो निर्दोष आहे!’’ पण ते आणखी मोठयाने ओरडू लागले. तेंव्हा पिलात तिस-यांदा म्हणाला, ‘‘तो निरपराध आहे.’’
जमाव आपल्या विरुध्द बंड पुकारील अशी पिलातास भिती वाटली व त्याने आपल्या सैनिकांस येशूला वधस्तंभावर खिळण्याची आज्ञा दिली. रोमी सैनिकांनी येशूला फटके मारले, त्याच्या अंगावर एक राजकीय झगा घातला व डोक्यावर काटयांचा मुकुट ठेवला. मग ते त्याची थट्टा करु लागले, ‘‘पहा, हा यहूद्यांचा राजा!’’
बायबल कथा :मत्तय 26: 57-27:26; मार्क 14 : 53 - 15: 15; लूक 22: 54 - 23 : 25; योहान 18 : 12 - 19:16
40. येशूला वधस्तंभावर खिळतात
सैनिकांनी येशूची थट्टा उडविल्यानंतर, ते त्यास वधस्तंभावर खिळे ठोकून मारण्यासाठी घेऊन गेले. ज्या वधस्तंभावर त्यास मारावयाचे होते तो वधस्तंभ त्यांनी त्याच्या खांद्यावर दिला.
तेंव्हा ‘‘कवटी’’ असलेल्या ठिकाणी ते त्याला घेऊन आले आणि त्यांनी येशूच्या हातामध्ये व पायामध्ये खिळे ठोकले. परंतू येशू म्हणाला, ‘‘हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना कळत नाही.’’ पिलाताने त्यांना आज्ञा दिली की त्यांनी ‘‘यहूद्यांचा राजा’’ अशी लिहिलेली पाटी वधस्तंभाच्या वर येशूच्या डोक्यावर लावावी.
येशूचे वस्त्र वाटून घेण्यासाठी सैनिकांनी चिठ्ठया टाकल्या. जेंव्हा त्यांनी हे केले, त्यावेळी ही भविष्यवाणी पूर्ण झाली, ’’ त्यांनी माझे वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी चिठ्ठया टाकल्या.’’
येशूला दोन लुटारुंच्या मधोमध वधस्तंभावर खिळण्यात आले. त्यापैकी एकाने येशूची थट्टा केली, परंतू दुसरा म्हणाला,‘‘तू देवाला भित नाही काय? आपण दोषी आहोत, पण हा मनुष्य निर्दोष आहे.’’ तेंव्हा तो येशूला म्हणाला, ‘‘तुझ्या राज्यामध्ये माझी आठवण ठेव.’’ येशू त्यास म्हणाला, ‘‘आजच, तू मजबरोबर सुखलोकात असशील.’’
यहूदी पुढारी व जमावातील इतर लोकांनीही येशूची थट्टा केली. ते त्यास म्हणाले, ‘‘जर तू देवाचा पुत्र आहेस तर वधस्तंभावरुन खाली उतरुन ये व स्वत:चा बचाव कर! म्हणजे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू.’’
तेंव्हा भर दुपारी देशभर आकाशामध्ये काळोख निर्माण झाला. दुपारपासून तीन वाजेपर्यंत पृथ्वीवर काळोख होता.
तेंव्हा येशू मोठयाने म्हणाला, ‘‘पूर्ण झाले! हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो.’’ तेंव्हा त्याने आपले डोके लेववून प्राण सोडिला. जेंव्हा येशू मरण पावला तेंव्हा मोठा भूकंप झाला आणि मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला.
आपल्या मृत्यूद्वारे, येशूने लोकांसाठी देवाकडे जाण्याचा मार्ग खुला करुन दिला. येशूवर पहारा करत असलेल्या सैनिकाने हे सर्व पाहून उद्गारला, ‘‘खरोखर, हा मनुष्य निष्पाप होता. तो देवाचा पुत्र होता.’’
तेंव्हा योसेफ आणि निकदेम हे दोघे यहूदी पुढारी ज्यांनी येशू हा मशीहा आहे असा विश्वास ठेविला होता, पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. त्यांनी त्याचे शरीर वस्त्रात गुंडाळून खडकामध्ये खोदलेल्या एका कबरेमध्ये ठेवले. मग त्यांनी त्या कबरेच्या दाराशी एक मोठी धोंड उभी करुन कबरेचे दार बंद केले.
बायबल कथा: _ मत्तय 27:27-61; _ मार्क_ 15:16-47; _ लूक_ 23:26-56; _ योहान_ 19:17-42_
41. देव येशूला मेलेल्यांतून उठवितो
सैनिकांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर, विश्वास न ठेवणा-या यहूदी पुढा-यांनी पिलातास म्हटले, "तो खोटारडा, येशू म्हणाला होता की तो तीन दिवसांनंतर पुन्हा उठेन. कोणीतरी त्या कबरेवर पहारा ठेवणे अगत्याचे आहे, नाहीतर त्याचे शिष्य त्याचे शरीर चोरून नेतील व तो उठला आहे असे म्हणतील."
पिलात म्हणाला, "काही सैनिकांना घ्या व त्या कबरेभोवती तुमच्याने होईल तितका चांगला बंदोबस्त ठेवा." तेव्हा त्यांनी त्या कबरेच्या तोंडावरच्या धोंडीवरती शिक्कामोर्तब केले व तेथे सैनिकांना ठेवले यासाठी की कोणी येशूचे शरीर चोरू नये.
येशूला कबरेत ठेवल्यानंतरचा दुसरा दिवस हा शब्बाथ दिवस होता, त्या दिवशी यहूद्यांना कबरेकडे जाण्याची मनाई होती. तेव्हा शब्बाथाच्या दुस-या दिवशी पहाटेच, काही स्त्रिया सुगंधी द्रव्ये घेऊन कबरेवर गेल्या त्यांनी ती त्याच्या उत्तरक्रियेसाठी तयार केली होती.
तेव्हा अचानक, एक मोठा भूकंप झाला. विजेसारखे रुप असणारा एक देवदूत स्वर्गातून प्रकट झाला. त्याने कबरेच्या तोंडाशी असलेली धोंड बाजूला सारली व त्यावर बसला. तेव्हा त्या कबरेवर पहारा करत असलेल्या सैनिकांना फार भिती वाटली व ते मेल्यासारखे जमिनीवर पडले.
जेव्हा त्या स्त्रिया कबरेजवळ आल्या, तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, "भिऊ नका. येशू येथे नाही. त्याने सांगितल्याप्रमाणे तो मेलेल्यातून उठला आहे! पाहा, ज्या कबरेत त्याला ठेवले होते ती जागा." तेव्हा त्या स्त्रियांनी आत जाऊन जेथे येशूचे शरीर ठेवले होते, ती जागा पाहिली. त्याचे शरीर त्या ठिकाणी नव्हते!
तेव्हां देवदूत त्यां स्त्रियांना म्हणाला, "जा, आणि शिष्यांना सांगा, 'येशू मरणातून उठला आहे व तो तुमच्यापुढे गालीलास जात आहे.'"
हे ऐकून स्त्रियांना फार भिती वाटली व आनंदही झाला. त्यांनी धावत जाऊन शिष्यांनी ही आनंदाची बातमी सांगितली.
त्या स्त्रिया शिष्यांना ही बातमी सांगायला जात असतांना, येशूने त्यांना दर्शन दिले, आणि त्यांनी त्याला नमन केले. येशू म्हणाला, "भिऊ नका. जा आणि माझ्या शिष्यांना गालीलात यायला सांगा. मी त्यांना तेथे भेटेन."
बायबल कथाः: मत्तय //२७://६२ //- २८://१५//; मार्क १६://१ //- ११; लूक २४://१ //- १२; योहान २०://१ //- __१८//
42. येशूचे स्वर्गारोहण
येशू मेलेल्यातून ज्या दिवशी उठला, त्या दिवशी त्याचे दोन शिष्य जवळच्या एका नगरामध्ये जात होते. ते चालत असतांना, येशूविषयी जे घडले होते त्यासंबंधाने बोलत होते. त्यांनी येशू हा मशीहा आहे असा विश्वास ठेविला होता, परंतु येशूला मारण्यात आले होते. आता त्या स्त्रिया म्हणत होत्या की तो पुन्हा जिवंत झाला आहे. आता कशावर विश्वास ठेवावा हे त्यांना कळत नव्हते.
येशू त्यांच्या जवळ आला व त्यांच्याबरोबर चालू लागला, पण त्यांनी त्याला ओळखले नाही. ते कशाविषयी बोलत होते हे त्याने त्यांना विचारले, आणि त्यांनी त्याला कांही दिवसापुर्वी येशूविषयी घडलेल्या उल्लेखनीय गोष्टी सांगितल्या. त्यांना वाटले की ते एका अनोळख्या प्रवाशाबरोबर ज्याला यरूशलेममध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नाहीत त्याच्याशी बोलत आहेत.
तेव्हा येशूने त्यांना, देवाच्या वचनीत मशीहाविषयी काय सांगितले आहे हे स्पष्ट करुन सांगितले. त्याने त्यांना आठवण करून दिली की संदेष्टयांनी सांगितले होते की मशीहा दुःख सोशील, त्यास जीवे मारतील, पण तीस-या दिवशी तो पुन्हा उठेल. जेव्हा ते दोघे जेथे त्यांना मुक्काम करावयाचा होता तेथे पोहोचले, तेव्हा संध्याकाळ होत आली होती.
त्या दोघांनी येशूला आपल्याबरोबर मुक्काम करण्याचा आग्रह केला व तो त्यांच्याबरोबर राहण्यास आत गेला. ते संध्याकाळच्या जेवणासाठी बसलेले असतांना, येशूने भाकर घेऊन देवाचा धन्यवाद केला व ती मोडली. अचानक तो येशू आहे हे त्यांनी ओळखले. परंतु त्या समयी, येशू त्यांच्यापासून अंतर्धान पावला.
ती दोघे एकमेकांना म्हणू लागली, "तो येशू होता! आणि म्हणूनच तो देवाचे वचन आम्हाला उलगडा करून सांगत असतांना आपले अंतःकरण आतल्याआत उकळत होते!" तेव्हा लगेच, ते यरुशलेमेस परतले. त्यांनी येऊन शिष्यांना सांगितले की, "येशू जिवंत झाला आहे! आम्ही त्यास पाहिले आहे!"
शिष्य हे बोलत असतांनाच, येशूने त्या खोलीमध्ये स्वतःला प्रकट केले व म्हटले, "तुम्हास शांती असो!" शिष्यांना वाटले की ते भूत आहे, पण येशू म्हणाला, "तुम्ही भयभित होऊन शंका का घेता? माझ्या हाताकडे व पायाकडे पाहा. जसे मला शरीर आहे तसे भूतांना शरीर नसते." तो भूत नाही हे सिद्ध करण्यासाठी, त्याने त्यांस खाण्यासाठी काही आहे का ते विचारले. त्यांनी त्यांस शिजविलेला मासा दिला, आणि त्याने तो खाल्ला.
येशू म्हणाला, "मी तुम्हास सांगितले होते की माझ्याविषयी देवाच्या वचनामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणे अगत्याचे आहे." मग त्याने त्यांची अंतःकरणे उघडली, तेव्हा त्यांना देवाचे वचन कळले. तो म्हणाला, "अनेक वर्षांपूर्वी असे लिहिले होते की मशीहा दुःख सहन करील, त्यास मारतील व तीस-या दिवशी तो मरणातून पुन्हा उठेल.
"धर्मशास्त्रामध्ये हेही लिहिले होते की माझे शिष्य पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाची घोषणा करतील. ते यरूशलेमेपासून ह्या संदेशास आरंभ करतील, मग सर्व ठिकाणच्या सर्व लोकांकडे हा संदेश घेऊन जातील. तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षीदार आहात."
पुढील चाळीस दिवसांमध्ये, येशू अनेक वेळा शिष्यांना प्रकट झाला. एकदा तर तो 500 हून अधिक लोकांस एकाच वेळी प्रकट झाला. त्याने आपल्या शिष्यांना आपण जिवंत असल्याचे प्रमाण विविध प्रकारे दिले व त्यांना देवराज्याविषयी शिकवण दिली.
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे. म्हणून, तुम्ही जा व सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनवा आणि पिता, पुत्र व पवित्र आत्माच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या, आणि मी आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळावयास शिकवा. आणि आठवण ठेवा की मी नेहमी तुम्हाबरोबर आहे."
येशूच्या पुनरूत्थानानंतर चाळीस दिवसांनी येशूने शिष्यांस सांगितले, "जोपर्यंत माझा पिता तुम्हास सामर्थ्य देणारा पवित्र आत्मा तुम्हावर पाठवत नाही, तोपर्यंत यरूशलेम सोडून जाऊ नका." मग येशू स्वर्गात गेला व मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. सर्व गोष्टींवर अधिकार चालवण्यासाठी येशू देवाच्या उजव्या हाताकडे बसला आहे .
बायबल कथा: मत्तय २८//://१६//-२०; मार्क १६://१२//-२०; लूक २४://१३//-५३; योहान २०://१९//-२३; प्रेषित १://१//-__११//
43. मंडळीची सुरूवात
येशू स्वर्गात गेल्यानंतर, येशूने आज्ञा दिल्याप्रमाणे शिष्य यरूशलेमेतच राहिले. तेथील विश्वासणारे प्रार्थना करण्यासाठी वारंवार एकत्र येऊ लागले.
प्रत्येकवर्षी, वल्हांडणानंतर 50 दिवसांनी, यहूदी लोक पेंटेकॉस्ट नावाचा महत्वाचा दिवस साजरा करत. पेंटेकॉस्ट हा यहुदी लोकांचा हंगामाचा सण होता. जगातील सर्व यहूदी लोक यरुशलेमेत येऊन पेंटेकॉस्ट साजरा करत. यावेळी येशूचे स्वर्गारोहण झाल्यानंतर सुमारे एक आठवड्यानंतर पेंटेकॉस्ट आला होता.
जेंव्हा सर्व विश्वासणारे एकत्र जमले होते एकाएकी ते बसले होते ती खोली सोसाट्याच्या वा-यासारख्या ध्वनीने भरून गेली. तेव्हा अग्निच्या ज्वालेसारख्या जिभा त्यांना सर्व विश्वासणा-यांच्या डोक्यावर दिसल्या. ते सर्व पवित्र आत्म्याने भरून गेले व वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले.
यरूशलेमेतील लोकांनी जेंव्हा हा आवाज ऐकला तेंव्हा हे काय आहे ते पाहाण्यासाठी आले. जेव्हा लोकांनी विश्वासणा-यांना देवाची आश्चर्यकर्मे प्रकट करतांना व त्यांच्याच मातृभाषेमध्ये बोलतांना ऐकले तेंव्हा लोकांना फार आश्चर्य वाटले.
काही लोकांना वाटले की विश्वासणारे मद्यपान करून मस्त झाले आहेत. परंतु पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला, "माझे बोलणे ऐका! ही माणसे मद्यपान करून मस्त झाली नाहीत! ह्याद्वारे योएल भविष्यवक्त्याने केलेली भविष्यवाणी पूर्ण होत आहे, देवाने म्हटले आहे "शेवटच्या काळामध्ये मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करील.'"
""अहो इस्राएल लोकांनो, येशूने देवाच्या शक्तिद्वारे अनेक चिन्हे व अद्भुते केली, जी तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिली व तुम्हाला माहीत आहेत. पण तुम्ही त्यास वधस्तंभावर खिळले!"
"जरी येशू मरण पावला होता, तरी देवाने त्यास मेलेल्यांतून पुन्हा उठविले. ह्या घटनेद्वारे ही भविष्यवाणी पूर्ण होते, ‘तू आपल्या पवित्रास कबरेमध्ये कुजू देणार नाहीस.’ आम्ही ह्या गोष्टीविषय़ीचे साक्षीदार आहेत की देवाने येशूला मरणातून पुन्हा उठविले आहे."
येशू आता आपल्या देवपित्याच्या उजव्या बाजूस ऊंचावलेला आहे. आणि येशूने अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांने आम्हासाठी पवित्र आत्मा पाठविला आहे. आता जे तुम्ही पाहात व ऐकत आहात, त्या सर्व गोष्टी पवित्र आत्मा करत आहे.
तुम्ही येशू ह्या मनुष्यास, वधस्तंभावर खिळले. परंतु आता तुम्हाला कळू द्या की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे!"
पेत्राचे भाषण ऐकणा-यांच्या मनाला टोचणी लागली. म्हणून त्यांनी पेत्र व अन्य प्रेषितांना विचारले, "बंधुजनहो, आम्ही आता काय करावे?"
पेत्र त्यांना म्हणाला, "तुम्हांपैकी प्रत्येकाने आपआपल्या पापांचा पश्चात्ताप करुन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्यावा, म्हणजे देव तुम्हास तुमच्या पापांची क्षमा करील. मग तो तुम्हास पवित्र आत्म्याचे दान सुद्धा देईल."
तेव्हा सुमारे 3,000 लोकांनी पेत्राच्या बोलण्यावर विश्वास ठेविला व ते येशूचे शिष्य झाले. त्यांनी बाप्तिस्मा घेतला व यरूशलेमेच्या मंडळीमध्ये सामिल झाले.
शिष्य प्रेषितांच्या शिक्षणात सहवासात भाकर मोडण्यात व इतरांबरोबर प्रार्थना करण्यात तत्पर असत. ते आनंदाने एकत्र देवाची स्तुती करीत आणि त्यांचे सर्व काही समाईक होते. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत. प्रत्येक दिवशी त्यांच्यामध्ये नवीन विश्वासणा-यांची भर पडत होती.
_बायबल कथाः _ प्रेषित २
44. पेत्र व योहान एका भिका-यास बरे करतात
एके दिवशी पेत्र व योहान मंदिरामध्ये जात होते. ते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जात असतांना, त्यांनी एक लंगडा भिकारी भीक मागत असतांना पाहिला.
पेत्राने त्या पांगळ्या मनुष्याकडे पाहून म्हटले, "तुला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. पण माझ्याकडे जे आहे ते मी तुला देतो. येशूच्या नावामध्ये ऊठ आणि चालू लाग!"
लगेच तो पांगळा मनुष्य बरा झाला, तो चालू लागला व तो उड्या मारत देवाची स्तुती करू लागला. मंदिराच्या अंगणातील लोकांनी त्याला पाहून आश्चर्य केले.
त्या ब-या झालेल्या मनुष्यास पाहण्यासाठी लोकांनी त्याच्याभोवती गर्दी केली. पेत्र त्यांना म्हणाला, "हा मनुष्य बरा झालेला पाहून तुम्ही का आश्चर्य करता?" आम्ही आमच्या सामर्थ्याने किंवा आमच्या चांगुलपणाने त्यास बरे केले नाही. तर येशूच्या शक्तीने व देवाने दिलेल्या विश्वासाद्वारेच हा मनुष्य बरा झाला आहे."
"तुम्ही रोमी सम्राटास येशूला जीवे मारावयास सांगितले. तुम्ही जीवनदात्यास ठार मारिले, परंतु देवाने त्यास मेलेल्यांतून पुन्हा उठविले. जरी तुम्ही काय करत होता ते तुम्हास कळले नाही, तरी देवाने तुमच्या करवी मशीहा दुःख सोशिल व मरेल ही भविष्यवाणी पूर्ण करून घेतली आहे. यास्तव, आता पश्चात्ताप करा व देवाकडे वळा म्हणजे तुमची पापे धुतली जातील."
मंदिरातील पुढारी पेत्र व योहान यांचे बोलणे ऐकून संतापले. म्हणून त्यांनी त्यांस धरून तुरुंगात टाकले. परंतु पुष्कळ लोकांनी पेत्राच्या वचनावर विश्वास ठेविला, आणि आता विश्वासणा-यांची संख्या वाढून सुमारे 5000 झाली.
दुस-या दिवशी, यहूदी पुढा-यांनी पेत्र व योहान यांना महायाजकासमोर व इतर धर्मपुढा-यांसमोर उभे केले. त्यांनी पेत्र व योहान यांना विचारले, "तुम्ही कोणत्या शक्तिद्वारे ह्या पांगळ्या मनुष्यास बरे केले?"
पेत्र त्यांना म्हणाला, "हा मनुष्य येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बरा होऊन तुम्हापुढे उभा आहे. तुम्ही येशूला खिळले, परंतु देवाने त्यास पुन्हा जिवंत केले! तुम्ही त्यास नाकारले, परंतु येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याशिवाय तारणाचा दुसरा मार्ग नाही!"
हे ऐकून धार्मिक पुढा-यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण पेत्र व योहान सामान्य व अडाणी माणसे असतांनाही त्यांच्यासमोर मोठ्या धाडसाने बोलत होते. परंतु ते येशूच्या सहवासात होते हे त्यांनी ओळखले. मग त्यांनी पेत्राला व योहानाला धमकावले व जाऊ दिले.
_बायबल कथाः _ प्रेषित ३:१-४; २२
45. फिलिप्प आणि कूशी अधिकारी
प्रारंभीच्या मंडळींमध्ये पुढा-यांपैकी स्तेफन नावाचा एक पुढारी होता. तो एक प्रतिष्ठित पुरूष होता, तो ज्ञानी व पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा होता. स्तेफनाने अनेक चमत्कार केले व लोकांनी येशूवर विश्वास ठेवावा यास्तव अनेक प्रमाण देऊन वादविवाद करीत असे.
एके दिवशी, स्तेफन येशूविषयी शिकवण देत असतांना, विश्वास न ठेवणारे काही यहूदी त्याच्याशी वादविवाद करू लागले. त्यांना स्तेफनाचा फार राग आला व त्याच्यावर त्यांनी धार्मिक पुढा-यांसमोर खोटे दोषारोप केले. ते म्हणाले, "आम्ही त्यास मोशे व देवाविषयी अपशब्द बोलतांना ऐकले आहे!" तेव्हा धार्मिक पुढा-यांनी स्तेफनास अटक केले व त्यास महायाजक व इतर पुढा-यांसमोर आणले, तेथे त्याच्याविरुदध आणखी खोटे साक्षीदार उभे केले व त्यांनी स्तेफनावर खोटे आरोप लाविले.
महायाजक स्तेफनास म्हणाला, "ह्या गोष्टी ख-या आहेत का?" स्तेफनाने त्यांस उत्तर देत देवाने अब्राहमापासून ते येशूपर्यंत कशा प्रकारे आश्चर्यकर्मे केली व देवाच्या लोकांनी निरंतर कशा त्याच्या आज्ञा मोडिल्या ह्याविषयी आठवण करून दिली. मग तो म्हणाला' "अहो ताठ मानेच्या व बंडखोर लोकांनो, जसे तुमचे पूर्वज नेहमी पवित्र आत्म्याचा विरोध करत होते, तसेच तुम्ही करत आहात. परंतु तुम्ही त्यांच्याहीपेक्षा वाईट केले आहे! तुम्ही मशीहास जीवे मारले आहे!"
जेव्हा धार्मिक पुढा-यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांना खूप राग आला व त्यांनी आपल्या कानांवर हात ठेवून मोठ्याने ओरडले. त्यांनी स्तेफनास नगराच्या बाहेर ओढत नेले आणि त्यास दगडमार केला.
स्तेफन मरत असतांना, तो मोठ्याने ओरडला, "येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर." मग त्याने गुडघ्यावर पडून पुन्हा ओरडून म्हटले, "प्रभुजी, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस." मग त्याने प्राण सोडला.
शौल नावाचा एक तरूण मनुष्य स्तेफनाला मारणा-या लोकांशी सहमत होता व त्यास दगडमार करणा-यांची वस्त्रे तो सांभाळत होता. त्या दिवसांमध्ये, यरूशलेमेतील पुष्कळ लोक येशूच्या शिष्यांचा छळ करत होते, म्हणून शिष्य दुस-या ठिकाणी पळून गेले. पण, असे असतांनाही, जेथे कोठे ते गेले, त्यांनी येशूविषयी प्रचार केला.
फिलिप्प नावाचा येशूचा शिष्य छळामूळे यरुशलेम सोडून पळून जाणा-या विश्वासणा-यांपैकी एक होता. तो शोमरोनामध्ये पळून गेला होता व त्या ठिकाणी त्याने येशूची सुवार्ता सांगितली व अनेकांचे तारण झाले. तेव्हा एके दिवशी, देवाच्या एक दूताने फिलिप्पास सांगितले वाळवंटातील एका विशिष्ट वाटेवर जा. तो वाटेने चालत असतांना फिलिप्पाने कूशी देशाचा एक अधिकारी आपल्या रथामध्ये बसून जात असतांना पाहिला. पवित्र आत्म्याने फिलिप्पास त्या मनुष्याशी बोलण्यास सांगितले.
जेव्हा फिलिप्प रथाजवळ आला, तेव्हा त्याने तो कूशी यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत असतांना ऐकले. तो वाचत होता, "त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले; आणि जसे कोकरू कातरणा-याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडीत नाही. त्यांनी त्याला वाईट वागणूक दिली व त्याचा सन्मान केला नाही. त्यांनी त्यास जीवे मारिले."
फिलिप्पाने कूशी अधिका-यास विचारले, "तुम्ही जे वाचत आहात, ते तुम्हास समजते का!" कूशी माणसाने उत्तर दिले, "नाही. जोपर्यंत मला कोणी समजावून सांगत नाही, तोपर्यंत मी समजू शकत नाही. कृपया येऊन माझ्या बाजूस बसा. यशया संदेष्टा स्वतःविषयी की अन्य कोणाविषयी लिहित आहे?"
फिलिप्पाने त्या कूशीस स्पष्टिकरण देत सांगितले की संदेष्टा हे मशीहाविषयी लिहित आहे. फिलिप्पाने अन्य शास्त्रपाठातूनही संदर्भ घेऊन त्यास येशूविषयीची सुवार्ता सांगितली.
फिलिप्प आणि कूशी अधिकारी पुढे प्रवास करत-करत एका तळ्याजवळ आले कूशी अधिकारी म्हणाला, "पाहा! येथे पाणी आहे! मी बाप्तिस्मा घेऊ शकतो का?" आणि त्याने सारथ्यास रथ थांबवायला सांगितले.
मग ते पाण्यामध्ये उतरले, आणि फिलिप्पाने त्या कूशी अधिका-यास बाप्तिस्मा दिला. ते पाण्यातून वर आल्यानंतर, पवित्र आत्मा फिलिप्पास दूस-या ठिकाणी घेऊन गेला तो त्या ठिकाणी लोकांना येशूविषयी सांगत राहिला.
कूशी इकडे आनंदाने आपल्या घराकडे प्रवास करू लागला, कारण त्याला येशूची ओळख झाली होती.
बायबल कथाः _ प्रेषित 6:8-8:5; 8:26-40_
46. पौल ख्रिस्ती बनतो
शौल हा तरुण मनुष्य स्तेफनाला दगडमार करणा-यांची वस्त्रे सांभाळत होता. तो येशूवर विश्वास ठेवत नव्हता, म्हणून तो विश्वासी लोकांचा छळ करत असे. यरुशलेममध्ये तो घरोघरी जाऊन विश्वास ठेवणा-या स्त्रीया आणि पुरूषांस दोघांसही तुरूंगात टाकत असे. महायाजकाने शौलास दिमिष्क शहरातील ख्रिस्ती लोकांस पकडून यरूशलेमेस आणण्यासाठी परवाना दिला होता.
शौल दिमिष्काच्या मार्गावर प्रवास करत असतांना, अचानक त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला आणि तो जमिनीवर पडला. शौलाने कोणी तरी हाक मारतांना ऐकले, "शौला! शौला! तू माझा छळ का करतोस?" शौलाने विचारले, "प्रभु, तू कोण आहेस?" येशूने त्यास म्हटले, "मी येशू आहे. तू माझा छळ करत आहेस!"
शौल जेव्हा उठला, तेव्हा त्याला कांही दिसेना. तेव्हा त्याच्या मित्रांना त्याला दिमिष्कास न्यावे लागले. शौलाने तीन दिवस काहीच खाल्ले प्याले नाही.
दिमिष्कात हनन्या नावाचा एक शिष्य होता. देव त्यास म्हणाला, "शौल रहात असलेल्या घरी जा. आणि त्याच्यावर आपले हात ठेव म्हणजे त्यास पुन्हा दृष्टी मिळेल." परंतु हनन्या म्हणाला, "प्रभूजी, मी ऐकले आहे की हा मनुष्य कशाप्रकारे ख्रिस्ती लोकांचा छळ केला आहे." देव त्यास म्हणाला, "जा! कारण यहूदी लोकांसमोर व परराष्ट्रीयांसमोर व माझे नाव घेऊन जाण्याकरिता मी त्याला निवडलेले आहे. माझ्या नावासाठी तो खूप दुःख सोसणार आहे."
तेव्हा हनन्याने शौलाकडे जाऊन त्याजवर आपले हात ठेवले व म्हणाला, "जो येशू तुला मार्गामध्ये प्रकट झाला, त्याने मला तुझ्याकडे पाठविले आहे, अशासाठी की, तुझी दृष्टी तुला पुन्हा प्राप्त व्हावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस." लगेच शौलाला पुन्हा दिसू लागले, आणि हनन्याने त्यास बाप्तिस्मा दिला. मग शौलाने अन्न घेतले व त्यास शक्ति मिळाली.
लगेच शौल दिमिष्कामध्ये असणा-या यहूद्यांना प्रचार करू लागला व म्हणाला, "येशू हा देवाचा पुत्र आहे." यहुद्यांना हे पाहून मोठे आश्चर्य वाटले की ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा आता येशूवर विश्वास ठेवतो व त्याचा प्रचार करत आहे! शौलाने तर्कशुद्ध संभाषण करून यहूद्यांना येशू हा मशीहा असल्याचे सिद्ध केले.
पुष्कळ दिवसांनंतर, यहूद्यांनी शौलास मारण्याचा कट रचला. शहराच्या वेशीजवळ शौलावर पाळत ठेवुन त्याला मारण्यासाठी त्यांनी काही लोक नेमले. परंतु शौलाला हा कट समजला, व त्याच्या मित्रांनी त्याची सुटका करण्यास मदत केली. एके रात्री त्यांनी वेशीच्या भिंतीवरून एका पाटी (मोठी टोपली) मध्ये बसवून त्याला खाली सोडले. शौल दिमिष्कातून, सुटल्यानंतर येशूविषयी प्रचार करू लागला.
शौल यरूशलेमेस शिष्यांना भेटण्यासाठी गेला, परंतू त्यांना त्याची भिती वाटली. तेव्हा बर्णबा नावाच्या एका विश्वासणा-याने शौलास प्रेषितांकडे नेले व सांगितले की कशा प्रकारे शौलाने दिमिष्कामध्ये येशूचा मोठ्या धाडसाने प्रचार केला. त्यानंतर शिष्यांनी त्याचा स्विकार केला.
यरूशलेमेतील छळामळे काही विश्वासणारे दूर अंत्युखिया शहरामध्ये गेले व तेथे त्यांनी येशूविषयी प्रचार केला. अंत्युखिया येथील लोकांमध्ये जास्त यहुदी लोक नव्हते, पण प्रथमच, त्यांच्यापैकी पुष्कळ लोक सुद्धा विश्वासणारे झाले. बर्णबा आणि शौल तेथील नवीन विश्वासणा-यांना येशूविषयी अधिक शिक्षण देण्यासाठी व मंडळीला उत्तेजन देण्यासाठी अंत्युखियास गेले. अंत्युखिया येथील येशूवर विश्वास ठेवणा-यांना प्रथमच "ख्रिस्ती" म्हटले गेले.
एके दिवशी, अंत्यखियाचे ख्रिस्ती उपवास-प्रार्थना करत असतांना, पवित्र आत्मा त्यांच्यावर आला व म्हणाला, "बर्णबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे, त्यासाठी त्यांना वेगळे करुन ठेवा." तेव्हा अंत्युखिया येथील मंडळीने शौल व बर्णबासाठी प्रार्थना केली व त्यांच्यावर हात ठेविले. आणि मग त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी येशूची सुवार्ता सांगण्यासाठी पाठविले. बर्णबा व शौल यांनी पुष्कळ वेगवगळ्या लोकगटांस सुवार्ता सांगितली व पुष्कळ लोकांनी येशूवर विश्वास ठेविला.
वायबल कथाः: प्रेषित //८://३//; ९://१ //- ३१; ११://१९ //- २६; १३://१ //- ३//
47. फिलिप्पै नगरामध्ये पौल आणि सीला
शौल संपूर्ण रोमन साम्राज्यामधून प्रवास करत असतांना, त्याने आपल्या "पौल" ह्या रोमन नावाचा उपयोग करु लागला. एके दिवशी पौल आणि त्याचा मित्र सीला हे फिलिप्पै नगरामध्ये येशूची सुवार्ता सांगण्यासाठी गेले. शहराच्या वेशीबाहेर नदीच्या काठावर प्रार्थनेसाठी एकत्रित आलेल्या लोकांकडे ते गेले. तेथे त्यांना लुदिया नावाची एक व्यापारी स्त्री भेटली. तिचे देवावर प्रेम होते व ती देवाची भक्ती करणारी होती.
देवाने लुदियाचे अःकरण उघडले व तिने येशूविषयीच्या संदेशावर विश्वास ठेविला, मग तिने आपल्या कुटुंबियांसहित बाप्तिस्मा घेतला. तिने पौल व सीला यांना आपल्या घरी बोलाविले, तेव्हा ते तिच्या कुटुंबासोबत राहिले.
पौल आणि सीला प्रार्थनेच्या स्थळी लोकांस वारंवार भेटले. दररोज ते त्या ठिकाणी जात असतांना, एक दासी व दुष्टात्माग्रस्त मुलगी त्यांच्यामागे चालू लागली. ह्या दुष्टात्म्याच्या आधारे ती लोकांचे भविष्य सांगत असे, अशा प्रकारे भविष्य सांगून ती आपल्या धन्यासाठी भरपूर मिळकत करुन देत असे.
ते रस्त्याने चालत असतांना ती गुलाम मुलगी ओरडत राहिली, "ही माणसे परात्पर देवाचे दास आहेत. ते तुम्हास तारणाचा मार्ग सांगत आहेत!" तिने असे अनेक वेळा केल्यामुळे पौलास त्रास झाला.
शेवटी एके दिवशी ती मुलगी ओरडू लागली, पौलाने तिच्याकडे वळून तिच्यामध्ये असणा-या पिशाच्चाला म्हटले, "येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा." आणि तत्काळ ते पिशाच्च तिला सोडून निघून गेले.
हे पाहून त्या मुलीच्या धन्यांस खूप राग आला! त्यांच्या लक्षात आले की दुष्टात्म्याशिवाय ती मुलगी लोकांचे भविष्य सांगू शकत नव्हती. ह्याचा अर्थ तीने लोकांना त्यांचे भविष्य सांगावे म्हणुन लोक आता तिच्या मालकांस पैसे देणार नव्हते.
तेव्हा या मुलीच्या धन्यांनी पौल व सीला यांना रोमन अधिका-याकडे नेले व त्यांनी त्यांना मारहाण केली व तुरुंगामध्ये टाकले.
त्यांनी पौल व सीला यांना तुरूंगाच्या एकदम आतल्या ठिकाणी ठेवले व त्यांचे पाय खोड्यात अडकवले. तरीही मध्यरात्रीच्या समयी, ते देवाची स्तुती करत होते व गीत गात होते.
अचानक, त्या ठिकाणी एक मोठा भूकंप झाला! तेव्हा तुरूंगाचे सर्व दरवाजे आपोआप उघडले गेले, आणि कैद्यांचे साखळदंडही तुटून पडले.
तेव्हा तुरूंगाचा अधिकारी जागा झाला, आणि जेव्हा त्याने तुरूंगाचे दरवाजे उघडे पाहिले तेव्हा तो खूप भयभित झाला! त्याला वाटले की सर्व कैदी पळून गेले असतील, म्हणून तो आत्महत्या करणार होता. (त्यास माहीत होते जर कैदी निसटून गेले तर रोमी अधिकारी त्यास जीवे मारतील.) परंतु पौलाने त्यास ओरडून म्हटले, "थांब! स्वतःस इजा करून घेऊ नकोस. कारण आम्ही सर्व इथेच आहोत."
तुरूंगाचा अधिकारी पौल व सीलाकडे जात असतांना थरथर कापत होता, तो म्हणाला, "माझे तारण व्हावे म्हणून मी काय करावे?" पौलाने उत्तर दिले, "प्रभु येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल." तेव्हा तुरूंगाधिकारी पौल व सीला यांना आपल्या घरी घेऊन गेला आणि त्याने त्यांच्या जखमा धुतल्या. पौलाने त्याच्या घरातील सर्व लोकांना येशूची सुवार्ता सांगितली.
तुरुंगाधिकारी आणि त्याचे सर्व कुटुंब यांनी येशूवर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतला. तेव्हा तुरूंगाधिका-याने पौल व सीला यांना जेवण दिले, आणि त्यांनी एकत्र मिळुन आनंद केला.
दुस-या दिवशी शहराच्या अधिका-यांनी पौल व सीला यांची सुटका केली व फिलिप्पै शहर सोडून त्यांना जाण्यास सांगितले. तेव्हा पौल व सीला यांनी लुदिया व इतर बंधूंना भेट दिली व नंतर त्यांनी ते शहर सोडले. येशूविषयीची सुवार्ता पसरत गेली व मंडळीची वाढ होत गेली.
पौल व इतर ख्रिस्ती पुढारी येशूची सुवार्ता सांगत व शिक्षण देत अनेक शहरांमधून प्रवास करत गेले. त्यांनी पुष्कळ पत्रे सुद्धा लिहीली व मंडळ्यातील विश्वासणा-यांना प्रोत्साहन व शिक्षण दिले. त्यांपैकी काही पत्रे बायबलमधील पुस्तके झाली.
बायबल कथाः _ प्रेषित 16:11-40_
48. येशू हा अभिवचनानुसार दिलेला मशीहा आहे
देवाने जेव्हा सृष्टी बनविली तेव्हा सर्वकाही परिपूर्ण होते. तेथे पाप नव्हते. आदाम आणि हव्वा एकमेकांवर प्रेम करत व त्यांचे देवावर प्रेम होते. तेथे कुठल्याही प्रकारचा आजार किंवा मृत्यु नव्हता. सृष्टी अशीच राहावी अशी देवाची इच्छा होती.
हव्वेला फसविण्यासाठी सैतानाने सर्पाद्वारे संभाषण केले. तेव्हा तिने व आदामाने देवाविरूद्ध पाप केले. त्यांनी केलेल्या पापाचा परिणाम म्हणून पृथ्वीवरील प्रत्येकजण आजारी पडतो व मरण पावतो.
आदाम आणि हव्वेने पाप केल्यामुळे आणखी एक भयानक गोष्ट घडली. ते देवाचे वैरी झाले. परिणामतः तेव्हापासून पृथ्वीवर जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ति पापाचा स्वभाव घेऊन जन्मतो व तो देवाचा शत्रु देखिल होतो. पापामुळे देव आणि मनुष्यांमध्ये असणारा नातेसंबंध तुटला. परंतु हा नातेसंबंध पुन्हा जोडण्याची देवाने एक योजना बनविली.
देवाने अभिवचन दिले की हव्वेचा एक वंशज सैतानाचे डोके फोडिल व सैतान त्याची टाच फोडिल. अर्थात सैतान मशीहास जीवे मारील, परंतु देव त्यास पुन्हा जिवंत करील आणि मग मशीहा सैतानाच्या सत्तेचा संपूर्ण नायनाट करील. अनेक वर्षांनंतर देवाने येशू हाच मशीहा आहे हे प्रकट केले.
जेव्हा देवाने संपुर्ण पृथ्वी जलप्रलयाद्वारे नष्ट केली, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवणा-यांसाठी देवाने एक जहाज दिले. त्याचप्रकारे, मनुष्यांच्या पापांमुळे प्रत्येक जण मृत्युस पात्र आहे, पण त्याजवर विश्वास ठेवणारांस वाचविण्यासाठी (तारण्यासाठी) देवाने येशूला पाठविले.
शेकडो वर्षे, महायाजक मनुष्यांना आपल्या पापांची शिक्षा मरण आहे हे दर्शविण्यासाठी सारखे पशुबली व होमार्पणे करत. परंतु त्या अर्पणांद्वारे त्यांच्या पापांची क्षमा होऊ शकली नाही. येशू हा एक थोर महायाजक आहे. इतर याजकांनी केले नाही असे येशूने केले, संपूर्ण जगातील लोकांसाठी स्वतःचेच अर्पण केले, अशासाठी की जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना पापांची क्षमा व्हावी. येशू हा एक परिपूर्ण महायाजक होता, कारण त्याने प्रत्येकाने केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा आपणावर घेतली.
देवाने अब्राहामास म्हटले, "सर्व राष्ट्रांतील कुळे तुझ्याद्वारे आशीर्वादीत होतील." येशू ख्रिस्त हा अब्राहामाचा वंशज होता. जगातील सर्व कुळे त्याच्याद्वारे आशीर्वादीत झाली, कारण जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याच्या पापांची क्षमा होते व तो अब्राहामाचा आत्मिक वंशज होतो.
जेव्हा देवाने अब्राहामास इसहाकाचे अर्पण करावयास सांगितले, तेंव्हा देवाने इसहाकाच्या ऐवजी, अर्पणासाठी कोकरा पुरविला होता. आम्ही आमच्या पापांमुळे मरणदंडास पात्र आहोत! परंतु देवाने येशूला, देवाचा कोकरा, अर्पण म्हणून आमच्याजागी मरण्यास पाठविले.
जेव्हा देवाने मिसर देशामध्ये शेवटची पीडा पाठविली, तेव्हा त्याने प्रत्येक इस्राएली कुटुंबास एक निर्दोष कोक-याचा वध करून त्याचे रक्त त्यांच्या घरांच्या चौकटीस लावावयास सांगितले होते. जेव्हा देवाने ते रक्त पाहिले, तेव्हा त्यांचे घर ओलांडून तो गेला व प्रथम जन्मलेल्या पुत्रांस त्याने मारले नाही. ह्या घटनेस वल्हांडण म्हणतात.
येशू ख्रिस्त हाच आमच्या वल्हांडणाचा कोकरा आहे. तो परिपुर्ण व निर्दोष होता आणि वल्हांडणाच्या सणाच्या समयी वधला गेला होता. जेव्हा कोणी येशूवर विश्वास ठेवितो, तेव्हा येशूच्या रक्ताद्वारे त्याच्या पापांची खंडणी भरून देण्यात येते, आणि देवाची शिक्षा त्या व्यक्तीस ओलांडून जाते.
देवाने इस्राएलाबरोबर एक करार केला होता, ते त्याचे निवडलेले लोक होते. पण त्याने आता सर्वांसाठी उपलब्ध असणारा एक नवा करार केला. ह्या नव्या करारामुळे, कोणत्याही लोकसमुदायातील कोणीही येशूवरील विश्वासाद्वारे देवाची मुले होऊ शकतात.
देवाच्या वचनाचा प्रचार करणारा मोशे हा एक महान संदेष्टा होता. परंतु येशू त्या सर्वांहून अधिक महान संदेष्टा आहे. तो देव आहे, म्हणून त्याने जे काही केले व बोलले ती देवाची कृत्ये व देवाचे शब्द होते. म्हणूनच येशूला देवाचा शब्द असे म्हणतात.
देवाने दाविद राजाला अभिवचन दिले होते की त्याच्या वंशजांपैकीच एक जण देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करील. येशू हा देवाचा पुत्र व मशीहा असल्यामुळे देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करणारा तो दाविदाचा एक विशेष वंशज आहे.
दाविद हा इस्राएलाचा राजा होता, परंतु येशू हा संपुर्ण विश्वाचा राजा आहे! तो पुन्हा येणार आहे व आपल्या राज्यामध्ये न्यायाने व शांतीने सर्वकाळ राज्य करणार आहे.
_बायबल कथा: _ उत्त्पत्ति १-३, ६, १४, २२; निर्गम १२:२०; २ शमूवेल ७; इब्री ३:१ - ६; ४:१४ - ५:१०; ७:१ - ८; १३; ९:११ - १०:१८; प्रकटीकरण २१
49. देवाचा नवा करार
देवाच्या एका दूताने मरियेस सांगितले की ती देवाच्या पुत्रास जन्म देणार आहे. म्हणून ती कुमारी असतांनाच तिने एका पुत्रास जन्म दिला आणि त्याचे नाव येशू ठेवले. म्हणून येशू हा देव व मनुष्य दोन्ही आहे.
येशूने अनेक चमत्कार करून आपण देव असल्याचे प्रमाण पटवून दिले. तो पाण्यावर चालला, वादळ शांत केले, अनेक आजा-यांना बरे केले, दुष्टात्म्यांना बाहेर काढले, मेलेल्यांना जिवंत केले व पाच भाकरी व दोन मासळ्यांद्वारे 5,000 पेक्षा अधिक लोकांना पोटभर जेवू घातले.
येशू हा एक महान शिक्षक सुद्धा होता व देवाचा पुत्र असल्यामुळे अधिकारवाणीने बोलत होता. त्याने शिकविले की आपण जशी आपल्यावर प्रीती करतो तशी आपण दुस-यांवरही प्रीती केली पाहिजे.
त्याने असे सुद्धा शिकवले की आपण आपल्या इतर सर्व वस्तूपेक्षा, संपत्तीपेक्षा देवावर अधिक प्रिती करायला पाहिजे.
कोणाही मनुष्यासाठी तो देवाच्या राज्याचा घटक असणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हास तुमच्या पापांपासुन तारले जाण्याची आवश्यकता आहे.
येशूने शिकवले की काही लोक त्याचा स्वीकार करतील व तारण पावतील, परंतु काहीजण त्यास नाकारतील. त्याने म्हटले की काही लोक सुपिक जमिनीप्रमाणे आहेत. ते येशूची सुवार्ता स्वीकारून तारण पावतात. इतर लोक वाटेवरल्या कठीण जमिनीसारखे आहेत. ज्या ठिकाणी देवाचे वचन खोलवर न गेल्यामुळे निष्फळ ते ठरते. ते लोक येशूचा संदेश नाकारतात व त्यामूळे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत.
येशूने शिकवले की देव पाप्यांवर फार प्रेम करतो. तो त्यांना क्षमा करू इच्छितो व त्यांना आपली लेकरे बनवू पाहतो.
देवाला पापाचा वीट आहे असेही येशूने सांगितले. जेव्हा आदाम व हव्वा यांनी पाप केले, तेव्हा ते सर्व मानवजातीमध्ये पसरले. त्याचा परिणाम म्हणून आज प्रत्येक व्यक्ति पाप करते व देवापासून दूर होते. म्हणून, प्रत्येक मनुष्य हा देवाचा वैरी झाला आहे.
परंतु देवाने जगातील प्रत्येक मनुष्यावर एवढी प्रिती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याजवर विश्वास ठेवितो येशू त्याला त्याच्या पापांची शिक्षा देणार नाही, पण देवाबरोबर सदासर्वकाळ राहील.
तुमच्या पापांमुळे तुम्ही दोषी आहात व मरणदंडास पात्र आहात. देवाचा क्रोध तुमच्यावर यावयास हवा होता, पण त्याने तुमच्याऐवजी आपला क्रोध येशूवर ओतला. जेंव्हा येशू वधस्तंभावर मरण पावला, तेंव्हा त्याने तुमची शिक्षा स्वतःवर घेतली.
येशूने कधीच पाप केले नाही, परंतु त्याने तुमच्या व जगातील प्रत्येक मनुष्यांच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेण्याचे निवडले व आपल्या मरणाने परिपूर्ण प्रायश्चित्त भरुन दिले. येशूने दिलेल्या बलिदानामुळे, देव आपणांस आपल्या सर्व पापांची क्षमा करू शकतो.
चांगल्या कामांनी आपले तारण होऊ शकत नाही. देवाबरोबर समेट घडवून आणण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. केवळ येशूच तुमची पापे धुवू टाकू शकतो. तुम्ही असा विश्वास धरिला पाहिजे की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला, व देवाने त्यास पुन्हा जिवंत केले आहे.
जो येशूवर आपला वैयक्तिक तारणारा म्हणून विश्वास ठेवितो, व त्याला आपला प्रभू म्हणून स्वीकारतो देव त्याचे तारण करील. परंतु तो विश्वास न ठेवणा-याचे तारण करणार नाही. तुम्ही गरीब किंवा श्रीमंत, स्त्री किंवा पुरूष, तरूण किंवा वृद्ध असा किंवा तुम्ही कोठे राहता हे महत्त्वाचे नाही. देव आपणांवर प्रिती करतो व आपण येशूवर विश्वास ठेवावा अशी त्याची इच्छा आहे, अशासाठी की त्याने आम्हाबरोबर जवळचे नातेसंबंध जोडावे.
येशू आपणांस आमंत्रण देत आहे यासाठी की तुम्ही विश्वास धरावा व बाप्तिस्मा घ्यावा. येशू हा मशीहा, देवाचा एकूलता एक पुत्र आहे असा तुम्ही विश्वास ठेविता का? आपण पापी आहात व देवाकडून होणा-या दंडास आपण पात्र आहोत याचा आपण स्वीकार करता काय? येशू आपल्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला यावर आपण विश्वास ठेवता काय?
जर आपण येशूवर विश्वास ठेवता व त्याने तुमच्यासाठी जे केले त्यावर विश्वास ठेवता तर आपण ख्रिस्ती आहात! देवाने आपणांस सैतानाच्या अंधःकारमय राज्यातून काढून आपल्या प्रकाशाच्या राज्यामध्ये आणिले आहे. देवाने आपला जुना पापी स्वभाव काढून आपणाला नवीन स्वभाव दिला आहे, ज्याच्यायोगे आपण न्यायीपणाची कामे करु शकतो.
जर आपण ख्रिस्ती आहात, तर येशूने केलेल्या कामामुळे देवाने आपणांस क्षमा केली आहे. आता शत्रुऐवजी देव आपणांस त्याचा जवळचा मित्र असे समजतो.
जर आपण देवाचे मित्र व प्रभु येशूचे सेवक आहात, तर तुम्हाला येशू जे कांही शिकवील त्याचे पालन करण्याची इच्छा होईल. जरी आपण ख्रिस्ती आहात, तरी आपल्याला पाप करण्याचा मोह होऊ शकतो. परंतु देव विश्वासू आहे आणि म्हणतो की जर आपण आपल्या पापांचा स्वीकार केला, तर तो आपणांस क्षमा करील. पापाविरूद्ध लढण्यासाठी तो आम्हास शक्ति देईल.
देव आम्हास प्रार्थना करण्यास, त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यास, इतर ख्रिस्ती लोकांसोबत त्याची आराधना करण्यास व त्याने तुम्हासाठी काय केले आहे इतरांना सांगण्यास सांगतो. ह्या सर्व गोष्टी आपणांस देवाबरोबर सखोल नातेसंबंध ठेवण्यास मदत करतात.
बायबल कथा: रोम //३://२१//-२६; ५://१//-११; योहान ३://१६//; मार्क १६://१६//; कलसै १://१३//-१४; २ करिंथ ५://१७//-२१; १ योहान १://५//-१०//
50. येशूचे पुनरागमन
सुमारे 2000 वर्षांपासून सर्व जगात अधिक आणि अधिक लोक येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी ऐकत आहेत. मंडळीची वाढ होत आहे. येशूने आश्वासन दिले की तो युगाच्या शेवटी पुन्हा पृथ्वीवर येणार आहे. जरी तो अद्याप आला नाही, तरी तो आपले वचन पाळीलच.
आपण येशूच्या येण्याची वाट पहात असतांना देवाची अशी इच्छा आहे की आपण पवित्र व त्याचा आदर करणारे जीवन जगावे. आपण त्याच्या राज्याविषयी इतरांना सांगावे अशीही त्याची इच्छा आहे. येशू ह्या पृथ्वीवर असतांना म्हणाला, "माझे शिष्य देवाच्या राज्याची सुवार्ता संपुर्ण जगामध्ये गाजवतील, तेव्हा शेवट होईल."
अनेक लोकगटांनी अजून येशूविषयी ऐकलेले नाही. स्वर्गात जाण्यापुर्वी येशूने ख्रिस्ती लोकांना सांगितले की, ज्या लोकांनी कधीच सुवार्ता ऐकली नाही त्यांना जाऊन सांगा. तो म्हणाला, "जा आणि सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा!" आणि, "शेते कापणीसाठी तयार आहेत!"
येशूने हेही सांगितले, " सेवक आपल्या धन्यापेक्षा थोर नसतो. जसे मला ह्या जगातील अधिका-यांनी माझा द्वेष केला तसेच ते तुमचाही छळ करतील व माझ्या नावासाठी तुमचा वध करतील. जरी तुम्हास ह्या जगामध्ये त्रास व संकटे आहेत तरी धैर्य धरा, कारण मी सैतानावर जो ह्या जगावर अधिकार करतो त्याचा पराभव केला आहे. जर तुम्ही शेवटपर्यंत विश्वासू राहिलात, तर देव तुमचे तारण करील!"
ह्या युगाच्या शेवटी जगातील लोकांचे काय होईल हे स्पष्ट करण्यासाठी येशूने शिष्यांना एक गोष्ट सांगितली. तो म्हणाला, "एका मनुष्याने आपल्या शेतात उत्तम बी पेरले. मग तो झोपेत असतांना, त्याच्या शत्रुने येऊन त्यामध्ये निदण पेरले आणि तो निघून गेला.
जेव्हा त्या बिजास अंकुर फुटू लागले, त्या धन्याच्या सेवकाने म्हटले, 'महाराज, आपण शेतामध्ये उत्तम बीज पेरिले होते. पण आता त्यात निदण कोठून आले?' धन्याने उत्तर दिले, 'शत्रुने ते पेरले असावे.'
सेवकाने आपल्या धन्यास म्हटले, 'आम्ही निदण उपटून टाकू का?' धनी म्हणाला, 'नाही.' जर आपण असे केले तर आपण कदाचित त्याजबरोबर गहूही उपटून टाकाल. हंगामापर्यंत वाट बघा आणि मग निदण जाळून टाकण्यासाठी पेंढ्या बांधून ठेवा; परंतु गहू माझ्या कोठारामध्ये साठवून ठेवा."
शिष्यांना ही गोष्ट समजली नाही, म्हणून त्यांनी येशूला समजावून सांगण्यास विनंती केली. येशू म्हणाला, "ज्याने उत्तम बी पेरले, तो मशीहा आहे. शेत हे जग आहे. उत्तम बी म्हणजे देवाच्या राज्यातील लोक."
"निदण म्हणजे सैतानाचे लोक. ज्या शत्रूने निदण पेरले, तो शत्रू म्हणजे सैतान. कापणी म्हणजे जगाचा शेवट आणि कापणी करणारे म्हणजे देवाचे दूत."
जेव्हा जगाचा शेवट होईल, तेव्हा देवदूत सैतानाच्या सर्व लोकांस न भडकणा-या अग्निमध्ये टाकून देईल, तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा आपल्या पित्याच्या राज्यात नीतिमान सूर्याप्रमाणे प्रकाशतील."
येशूने हेही सांगितले की जगाच्या शेवटापूर्वी तो या पृथ्वीवर परत येईल. जसा तो स्वर्गात घेतला गेला, तसाच तो येईल, अर्थात त्याला एक शरीर असेल व तो आकाशातील ढगावर बसून येईल. जेव्हा येशू परत येईल, प्रत्येक ख्रिस्ती जो मेलेला आहे तो मरणातून उठेल व अंतराळामध्ये येशूला भेटेल.
तेव्हा जिवंत असलेले ख्रिस्ती मेलेल्यांतून उठलेल्या ख्रिस्ती बांधवांस भेटण्यासाठी सामोरे जातील. तेथे ते सर्व येशूबरोबर राहतील. त्यानंतर, येशू आपल्या लोकांबरोबर परिपुर्ण शांतीमध्ये व एकतेमध्ये सर्वकाळ राहील.
येशूने आपणावर विश्वास ठेवणा-या प्रत्येकास एक मुकुट देण्याचे आश्वासन दिले आहे. ते त्या ठिकाणी राहतील व देवाबरोबर पुर्ण शांतीत सर्वकाळ राज्य करतील.
परंतु येशूवर विश्वास न ठेवणा-या प्रत्येकाचा देव न्याय करील. तो त्यांना नरकात टाकील, ज्या ठिकाणी सर्वकाळ रडणे व दुःखाने दात खाणे सर्वकाळ चालेल. त्यांना न विझणा-या अग्निमध्ये जाळून टाकण्यात येईल व किडे त्यांना सर्वकाळ खात राहतील.
जेंव्हा येशू परत येईल, तो सैतान व त्याच्या राज्याचा नाश करील. तो सैतानाला नरकात टाकील, ज्या ठिकाणी तो सर्वकाळ जळत राहील, त्याच्याबरोबर ज्यांनी त्याच्या मागे जाण्याचे निवडले व देवाची आज्ञा मानली नाही तेही असतील.
आदाम आणि हव्वेने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे पाप ह्या जगात आले व देवाने त्याचा नाश करण्याचा निर्णय घेतला. परंतु एक दिवस देव परिपूर्ण असे नवे आकाश व नवी पृथ्वी बनविणार आहे.
येशू आणि त्याचे लोक नवीन पृथ्वीवर राहतील, व तो अस्तित्वात असणा-या सर्व गोष्टींवर सर्वकाळ राज्य करेल. तो त्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील व त्या ठिकाणी कुठलाही त्रास, शोक, रडणे, दुष्टाई, दुःख किंवा मृत्यु नसेल. येशू आपल्या राज्यामध्ये शांतीने व न्यायाने व राज्य करील व तो आपल्या लोकांबरोबर सर्वकाळ राहील.
बायबल कथा: मत्तय //२४://१४//; २८://१८//; योहान १५://२०//, १६://३३//; प्रकटीकरण २://१०//; मत्तय १३://२४//-३०, ३६-४२; १ थेस्सल ४://१३//-५://११//; याकोब १://१२//; मत्तय २२://१३//; प्रकटीकरण २०://१०//, २१://१//-२२__://२१